Category Archives: My Life

भेटलेले साधे महाराज

माझी औरंगाबादला बढतीवर बदली झाली. तेव्हा जळगावचे माझे मित्र डाॅ. खटावकर ह्यांनी औरंगाबादच्या जयशंकर महाराजांना एकदा भेटा असे सांगितले होते. कामाच्या गडबडीत व पत्ता नेमका माहित नसल्यामुळे मी काही जयशंकरमहाराजांना भेटू शकलो नव्हतो. कामानिमित्त जळगावला गेलो. डाॅ. खटावकरांशी कामाचे बोलणे झाल्यावर मी निघालो. निघताना मीच म्हणालो, “ डाॅ., जयशंकर महाराजांना कुठे भेटायचे? पत्ता माहित नाही. ते म्हणाले,” औरंगपुऱ्यात आहेत. कुणाचा वाडा ते नेमके माहित नाही.” मी शोधून काढतो,इतके म्हणून दौरा संपवून औरंगाबादला आलो. आल्यावर नुकतेच ओळख झालेले व पुढे चांगले घरोब्याचे मित्र झालेले अनंतराव देशपांड्यांना जयशंकर महाराजांचा पत्ता विचारला. त्यांनी अंदाजाने सांगितला.

मी गेलो. ते राहात होते त्या वाड्यात गेलो. जुना वाडा. मोडकळीला आला नव्हता तरी तसा वाटत होता. आत गेल्यावर बाजूच्या ओवरीत छपरापर्यंत सरपणाची लाकडे भरून ठेवलेली. आजूबाजूलाही काही पडलेली. त्यातच एका कोपऱ्यात, बाजेवर थोडीशी वाढलेल्या पांढऱ्या दाढीचे म्हातारे गृहस्थ झोपलेले होते. तोंडात दातही फारसे नविहते. पण चेहरा हसरा होता.त्या काळात सर्रास वापरात असलेली चट्यापट्याची नाडीची अर्धी चड्डी घालून झोपलेले म्हातारे गृहस्थ दिसले. मी आत गेल्याबरोबर ते हसऱ्या चेहऱ्याने “जयशंकर”म्हणून गप्प झाले.

थोड्या वेळाने आतल्या बाजूने श्री.दातार व सौ.दातार आल्या. त्यांनी माझी चौकशी केली. दातार राज्य सरकारी नोकरीत साध्या पदावर असावेत. दोघे पतिपत्नी शांत,सौम्य पण समाधानी दिसत होते. हे जयशंकरमहाराजांची काळजी घेत होते. मी वारंवार नाही तरी काही वेळा जयशंकरमहाराजांना भेटून येत असे. ते माझी कसे काय चाललंय, मुलांची चौकशी करायचे. पण जयशंकर म्हणण्यात ते रमत असावेत असे वाटले. मध्येच ते मोठ्याने जयशंकर म्हणत. काही वर्षानंतर दातारांनी जागा बदलली व सरस्वती काॅलनीत राहायला आले. ही जागा जास्त प्रशस्त,मोकळी व व्यवस्थित होती. मी जयशंकरमहाराजांना भेटायला जाई तेव्हा दोघेही दातार सौम्य हसत स्वागत करीत. महाराजांपेक्षा अर्थात त्यांच्याशीच जास्त बोलणे होई. एकदोन वेळा मी सुधीरला घेऊन गेलो होतो. सुधीरला पाहून जयशंकरमहाराजांना आनंद झाल्याचे दिसत होते. त्याला ते जवळ बसवून पाठीवर किंवा डोक्यावर हात फिरवत.

अनंतराव देशपांडेसाहेबांनी मला जयशंकर महाराजांविषयी माहिती सांगितली ती ऐकण्यासारखी आहे. ती ऐकल्यावर जयशंकर महाराज महाराज का हे पटू लागले. ते सांगत होते,” मेवाड हाॅटेलचा मालक जयशंकरमहाराजांना रोज सकाळी हाॅटेलात घेऊन जात असे. आजही जात असतील कदाचित. तिथे त्यांना गल्ल्यावर बसवित. जेव्हढा वेळ ते हाटेलात गल्ल्यावर असत तोपर्यंत ते येणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला गल्यातून पैसे देत. ते कुणाला किती देत तिकडे मेवाडचे मालक पाहात नसत. मग महाराज म्हणाले निघायचे की मालक त्यांना घरी आणून सोडत असे. हे किती तरी वर्षे चालू होते. आजही असेल कदाचित. रोज नसेल पण केव्हा तरी तो महाराजांना घेऊन येत असेलही.” मेवाड हाॅटेलच्या बरकती मागे जयशंकर महाराजांच्या कृपेचाही मोठा भाग असणार.

ही १९७२-७५ व त्यानंतरच्या काही वर्षातील हकीकत आहे. जयशंकरमहाराजांची सर्व प्रकारे काळजी दातार दांपत्याने मनापासून घेतली. जयशंकरमहाराजांनी मेवाडच्या हाॅटेल मालकाच्या श्रद्धेला किती सफळ सुफळ केले असेल त्याची इतर काही माहिती नाही. पण त्यांचे आणखी एक हाॅटेल सुरू झाले. गुलमंडीवरचे रेस्टाॅरंट जोरात चालतच होते. हे मात्र पाहिले आहे.

माझ्या बाबतीत काहीही चमत्कार घडला नाही. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटत असे तेव्हा एकदाही माझ्या मनांत त्यांनी मला हे मिळवून द्यावे, असे घडावे असला विचार कधीही येत नसे.बहुधा,मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला ते महाराज वगैरे काही वाटले नव्हते. ह्यामुळेही कदाचित मला त्यांच्याकडे काही मागावे असे वाटले नसेल! पण मला बरे, शांत वाटत असे हे खरे. मी फक्त त्यांना भेटल्यावर व निघतांना नमस्कार करीत असे. ते फक्त नेहमी हात वर केल्यासारखा करून हसतमुखाने जयशंकर म्हणत.

अनंतराव देशपांडे ह्यांनी अशीच हकीकत बाळकृष्ण महाराजांसंबंधी सांगितली होती. औरंगाबादच्या अप्पा हलवाईंचा प्रसिद्ध पेढा हा बाळकृष्णमहाराजांचा कृपाप्रसाद आहे असे देशपांडेसाहेब म्हणाले होते. बाळकृष्णमहाराजांची समाधी अप्सरा टाॅकीजसमोरच्या भागात आहे. तीही मी जाऊन पाहिली.

हे लिहित असता एक लक्षात आले आणि ते आल्यावर माझ्या हातून केव्हढी मोठी चूक झाली, केव्हढा अपराध घडला ह्याची जाणीव झाली. शंभर थोबाडीत मारून घ्याव्यात असे वाटले. सुरवातीला तरी मी बरेच वेळा दातार साहेबांच्या घरी जयशंकर महाराजांच्या दर्शनासाठी गेलो असेन. पण मी त्या दोघांना एकदाही ,” आमच्या घरी चहाला या.” असे म्हणालो नाही! आता मी माझे मलाच ‘करंट्या’ शिवाय काय म्हणणार!

त्या दोघांनी कित्येक वर्षे जयशंकरमहाराजांची सेवा करण्यात व्यतीत केली असल्यामुळे दातार मला उदार मनाने क्षमा करतील अशी प्रार्थना करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. जयशंकर!

अप्रूप

आमचे पहिले घर टेकड्यांमध्ये होते. अनेक घरे टेकड्यांवर होती. काही खोलगट भागात होती. टेकड्या झाडावृक्षांनी नटलेल्या तसेच खोलगट भागही वृक्षराजींने भरलेला असायचा. त्यामुळे घरांची संख्या कमी होती असे नाही. किंवा घरे लहान किंवा आलिशान महाल होते असेही नव्हते. सर्व प्रकारची घरे होती. कौलारू होती. उतरत्या साध्या पत्र्यांची होती. सिमेंटची होती. तांबड्या विटाची होती. पांढरी होती. पिवळी होती. निळसर होती. विटकरी होती. काचेच्या खिडक्यांची होती. लाकडी दरवाजांची होती. काही अतिशय देखणी होती. बरीचशी चारचौघींसारखी होती. काही दहा जणांत उठून दिसणारी होती. तर काही दोन-चार असामान्यही होती. पण सगळी झाडां झुडपांचे अभ्रे घातलेली असल्यामुळे हे टेकड्यांवरचे,टेकड्यांमधले गाव दिवसाही पाहात राहावे असे होते. त्यातच निरनिराळ्या ऋतुत फुलणारी विविध फुले अनेक रंग भरून टाकीत! रंगीत फुले गावची शोभा दुप्पट करत!
रात्री तर गाव घराघरांतल्या लहान मोठ्या दिव्यांनी, त्यांच्या सौम्य ,भडक, मंद प्रकाशांच्या मिश्रणाने स्वर्गीय सौदर्याने खुलत जायचे! काही रात्री तर गावाच्या ह्या सौदर्यापुढे आपण फिके पडू ह्या भीतीने चंद्र -चांदण्या,तारे ढगांच्या आड लपून राहत!


गॅलरीत उभे राहिले की ‘आकाशात फुले धरेवरि फुले’ त्याप्रमाणे आकाशात चंद्र तारे नक्षत्रे व समोर, खाली, सभोवतालीही,तारे, नक्षत्रे ह्यांचा खच पडलेला दिसे! आकाशातून दुधासारखे चांदणे खाली येऊन टेकड्यांवरच्या गावातील निळसर दुधाळ प्रकाशात सहज मिसळून पसरत असे. हात नुसते पुढे केले की चंद्राच्या गालावरून हळुवारपणे सहज फिरवता येत असे. तर मूठभर चांदण्यांची फुले गोळा करून ओंजळ भरून जात असे! आपल्या प्रेयसीला ओळी ओळीतून चंद्र आणून देणारे, येता जाता तारे-नक्षत्रे तोडून तिच्या केसांत घालणारे जगातले सर्व कवि इथेच राहात असावेत. किंवा एकदा तरी इथे राहून गेले असावेत! इतके अप्रूप असे आमचे गाव होते.

आज पंधरा वर्षांनी पुन्हा त्याच गावात राहायला आलो.थोडे काही बदल झाले असणारच. पण गाव आजही बरेचसे पूर्वीप्रमाणेच होते. मोठ्या उत्सुकतेने मी रात्री गॅलरीत गेलो. सगळीकडे नजर फिरवत पाहिले. आनंद झाला. पण मन पहिल्यासारखे उचंबळून आले नाही. काही वर्षे रोज पाहिले असल्याने, मधली वर्षे ह्या गावाच्या फार दुर राहात नसल्यामुळेही सवय झालेली असावी. सवय, संवेदना बोथट करते. त्याहीपेक्षा सवय, उत्कटता घालवते ह्याचे जास्त वाईट वाटते!


हे लघुनिबंधाचे गाव राहू द्या. ह्या पंधरा वर्षांपूर्वीच्या गावापेक्षा साठ पासष्ठ वर्षांपूर्वीच्या गावात जाऊ या.

नव्या पेठेतल्या दुकानांच्या, व्यवसाय आणि लोकांच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर मोकळे मोकळे वाटते. नविन वस्ती सुरु झाली हे सांगणाऱ्या उंबरठ्यावर आपण येतो. थोडा त्रिकोणि थोड्या अर्धवर्तुळाकाराच्या चौकांत आपण येतो. आणि समोरचा बंगला पाहून हे हाॅटेल असेल असे वाटतही नाही. बरीच वर्षे ह्या हाॅटेलच्या नावानेच हा चौक ओळखला जात असे. लकीचा चौक किंवा लकी चौक!

लकी रेस्टाॅरंट अर्धगोलाकार होते. गोलाकार सुंदर खांबांनी जास्तच उठून दिसे. आत गेले की समोर चार पायऱ्या चढल्यावर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंच्या दोन दोन खांबांमध्ये लहानसे चौकोनी टेबल व समोरासमोर दोन खुर्च्या. इथे बसायला मिळाले की आगगाडीत,बसमध्ये खिडकीची जागा मिळाल्याचा आनंद होई.रस्त्यावरची गंमत पाहात बसायला ही फार सोयीची टेबले होती. मघाशी चारपायऱ्या चढून आल्याचा उल्लेख केला. तिथल्या दोन गोलाकार खांबांवर मधुमालती होत्या. आमच्या गावात मधुमालती बरीच प्रिय होती. वेल व तिची फुले!
ह्या व्हरांड्याच्या समोरची गोलाकार जागा,जाई जुईच्या वेलांच्या मांडवांनी बहरलेली असायची. त्यांचेही आपोआप चौकोन होऊन त्याखाली तिथेही गिऱ्हाईके बसत. ती जागा ‘प्रिमियम’च म्हणायची. कारण जवळच्या वेलींनी केलेल्या कुंपणातून रस्त्यावरचे दृश्य दिसायचे; शिवाय खाजगीपणही सांभाळले जायचे.


चार पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मालकांच्या गल्ल्याचे टेबल. मालकांचे नाव भानप. भानप अगदी जाडजूड नव्हते पण बऱ्यापैकी लठ्ठ होते. आखूड बाह्यांचा शर्ट घातलेला. काळ्या पांढऱ्या केसांचे राखाडी मिश्रण. त्यांचा सकाळी भांग पाडलेला असणार. पण दुपारपर्यंत हात फिरवून त्याच्या खुणा राहिलेल्या दिसत. ओठ जाडसर. सिगरेट प्याल्याने काळसर पडलेले. ते कधी कुणाशी गप्पा मारतांना दिसले नाहीत. मालक नेहमीच्या गिऱ्हाईकांशी सुद्धा ‘कसे काय’इतकेच बोलत. कारण बहुतेक सर्व गिऱ्हाईके नेहमीचीच. न कळत त्यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या.व्हऱ्हांड्याच्या दोन्ही बाजूच्या कोपऱ्यात एक एक फॅमिली रूम होती. पासष्ट वर्षांपूर्वी हाॅटेलातली फॅमिली रूम वर्दळीची नव्हती. काॅलेजमधली मुले मुलीही ते धाडस करत नसत. असा माझा समज आहे.


वऱ्हांड्यातील खांबांमधील टेबलांचे आकर्षण असण्याचे कारण म्हणजे रस्त्यावरच्या वर्दळीची गंमत पाहात चहाचे घुटके घ्यावे ह्यासारखे सुखकारी काही नव्हते. सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढायला बंदी नव्हती. पण जी पोरे लवकर सिगरेट प्यायला लागायची ती टोळक्याने जाईच्या मांडवाखाली बसून पीत. व्हरांड्यातील खांबामधल्या एका टेबलावर ठराविक खुर्चीवर आमच्या मावशीचे सासरे बसलेले असत. चहाचा कप समोर आणि करंगळी व तिसऱ्या बोटामध्ये विडी किंवा कधी सिगरेट धरून ते दमदार झुरके घेत बराच वेळ बसलेले असत. रोज. भानपही इतके नियमितपणे त्यांच्याच लकीत येत नसतील. अण्णा बसलेले असले की आम्हाला लकीत जाता येत नसे. कारण लगेच “हा हाॅटेलात जातो!” ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार व तो शिक्का कायमचा बसणार ही भीती! अर्थात काही दिवसांनी ही भीती मोडली तरी पण मावशीचे सासरे नसताना जाणेच आम्ही पसंत करत असू.

त्या वेळी बटाटे, फ्लाॅवर, मटार ह्या भाज्या मोठ्या विशेष असत. भाज्यांमधल्या ह्या खाशा स्वाऱ्या होत्या! काॅलीफ्लाॅवर व मटार थंडीच्या दिवसांतच मिळायचा. बटाटे त्या मानाने बरेच वेळा मिळत. पण बटाट्याची भाजी ही सणासुदीला व्हायची. विश्वास बसणार नाही पण लकीमध्ये बटाटा-भाजी हा वेगळा, स्वतंत्र पदार्थ होता! स्पेशल डिश म्हणा ना!


लकीने आमच्या दृष्टीने क्रांतीच केली होती. लकीची बटाट्याची भाजी केवळ बटाटा अप्रूप होता म्हणून नव्हे तर चवीनेही अप्रूप होती. मी लकीच्या मधल्या हाॅलमध्ये गोल टेबलाच्या खुर्चीवर बसून ती मागवत असे. किंचित लिंबू पिळलेले, एक दोन कढीलिंबाची पाने सहजरीत्या कुठेतरी तिरपी पडलेली. कोथिंबिरीची पाने त्यांना लाजून आणखीनच आकसून काही फोडींना बिलगून बसलेली, अंगावर एखादा दागिना हवा म्हणून एक दोन मोहरीचे मणि बटाट्यांच्या फोडींना नटवत.केशरी पिवळ्या तेलाचा ओघळ प्लेटचा एखादा कोन, भाजी ‘अधिक ती देखणी’ करायचा. साखरेचे एक दोन कण मधूनच चमकायचे. लकीतली बटाट्याची भाजी शब्दश: चवी चवीने खाण्यासारखी असायची.भाजी संपत येई तसे शेवटचे दोन घास घोळवून घोळवून खायचो! आता पुन्हा कधी खायला मिळेल ह्याची शाश्वती नसल्यासारखी ते दोन घास खात असे. नंतर कळले की मीच नाही तर जे जे लकीची बटाट्याची भाजी मागवत ते ह्याच भरल्या गळ्याने,भावनाविवश होऊन खात असत. प्रत्येक वेळी!


एकमेव ‘लकीचे’ वैशिष्ठ्य नसेल पण तिथे चकल्याही मिळत. कांड्या झालेल्या असत. पण चहा बरोबर ब्रेड बटर खाणाऱ्यांसारखेच चहा आणि लकीची खुसखुशीत चकली खाणारे त्याहून जास्त असत. तशाच शंकरपाळ्याही. घरच्या शंकरपाळ्यांच्या आकारात नसतील पण हल्ली बरेच वेळा घट्ट चौकोन मिळतात तशा नव्हत्या. चौकोन होते पण डालडाने घट्ट झालेले नसत.


घरीही सणासुदीला श्रीखंड,बासुंदी, पाकातल्या पुऱ्यांचा बेत असला की बटाट्याची भाजी व्हायचीच. तीही लकीच्याच नजाकतीची किंवा त्याहून जास्त चविष्ट असेल. मुख्य पक्वान्ना इतक्याच आदबीने व मानाने बटाट्याची भाजी वाढली जायची. तितक्याच आत्मीयतेने पुरी दुमडून ती खाल्लीही जायची. लगेच श्रीखंडाचा घास किंवा बासुंदीत बुडलेल्या पुरीचा घास. बटाट्याच्या भाजीचे अप्रुप इतके की लहान मुलगाही तिला नको म्हणत नसे की पानात टाकत नसे.


लकी चौक, सुभाष चौक म्हणून ओळखला जाऊ लागला. बटाट्याची भाजी बारमाही झाली. सणासुदीचा वेगळेपणा तिला राहिला नाही. तिने दुसरी रूपेही घेतली. ती सार्वत्रिक झाली. चवीचेही वेगळेपण विसरून गेली. आजही सणवार होतात. सवयीने बटाट्याची भाजी त्या दिवशीही होते. सुंदर होत असेल पण दिसत नाही. चविष्टही असेल पण तशी ती जाणवत नाही. अप्रूपतेची उतरती भाजणी म्हणायचे!

आजही बटाट्याची भाजी आहे. पण लकी नाही. बटाट्याची भाजी दैनिक झाली. सवयीची झाली. अप्रूपता राहिली नाही.


अर्थशास्त्रातल्या घटत्या उपयोगितेचा किंवा उपभोक्ततेचा नियम आमच्या टेकडीवरच्या दाट वृक्षराजीत लपलेल्या, रात्री आकाशातून तारे चांदण्या ओंजळी भरभरून घ्याव्यात इतके ‘नभ खाली उतरु आले’ अशा स्वप्नवत गावाची अप्रूपता घटली तर बटाट्याच्या भाजीचीही अप्रुपता आळणी व्हावी ह्यात काय नवल!
हाच आयुष्यातील Law of Diminishing Joy असावा!

पहिले पाढे

प्रत्येक पहिली गोष्ट रोमांचक असते. अविस्मरणीय असते. शाळेचा पहिला दिवसही विसरु म्हणता विसरला जात नाही. तशीच पहिली शाळासुद्धा आपण विसरत नाही. त्यातही ती मुन्शीपाल्टीची असली तर विचारुच नका. काळ्या दगडावरच्या रेघेसारखी तहहयात ती आपल्या बरोबर असते.

आमच्या शाळेचे नाव पाच नंबरची शाळा. शाळा अकरा वाजता सुरू व्हायची. मधल्या सुट्टीपर्यंत थोडे फार शिक्षण होई. बेरजा, वजाबाकी, मराठीच्या पुस्तकातील धडा. शुद्धलेखन; मग पुन्हा मास्तर बेरजेची कधी वजाबाकीची गणिते घालायचे. सोडवून झाली की “तोंडे फिरवून पाटी पालथी टाका ” ही बसल्या जागी कवायत करायची. लवकर पाटी पालथी टाकणारी दोनच प्रकारची पोरं होती. हुशार आणि ढ. बाकीची सगळी डाव्या हाताची बोटं मुडपून मुडपून ती तुटेपर्यंत कशाची मोजदाद करत ते अजूनही मला आणि त्यांनाही समजले नाही. कधी भेटलेच ते तर ह्या बोटे दुमडण्याच्या आठवणीतच भेट संपते! पाटी पुन्हा पुन्हा पुसण्यात, पाणी किंवा ओले फडके चाळीस पोरांत एक दोघांकडेच असायचे. ते कशाला देतील दुसऱ्याला. मग बोटे जिभेवरून फिरवून किंवा पाटी तोंडाजवळ नेऊन चक्क पटकन थुंकी लावून पुसायची.

ह्या कर्मकांडांत ही मधली पोरे व्यग्र असत. तोपर्यंत मास्तर शेजारच्या वर्गातील मास्तरांशी सुपारीच्या खांडाची किंवा एकाच पानाच्या विड्याची देवाण घेवाण करत. तोपर्यंत सगळी पोरे तोंडे फिरवून पाट्या पालथ्या टाकून आपापासात सुरवातीला हळू, मग भीड चेपली की ‘अबे!काय बे’ची द्वंद्व युद्धे सुरू व्हायची. त्याची “ आता तुला मधल्या सुट्टीत बघतो! तू बघच बे” ह्याने सांगता व्हायची. मधल्या सुट्टीत तरटाच्या रस्साीखेची झाल्या की मग भांडणाला सुरुवात व्हायची. त्याचीही सांगता “शाळा सुटल्यावर कुठं जाशील बे?” मंग बघ; न्हाई दाताड मोडलं तर ..” ह्या वीररसाच्या संवादाने व्हायची. शाळा सुटल्यावर त्या दोघा चौघांचे दोस्त मिळून दहा बारांची जुंपायची. जास्त करून शाब्दिक किंवा फार तर ढकला ढकलीने जुंपायची. “ अबे जातो कुठं बे तू?आं? उद्या शाळेत येशीलच की साल्या! मग बघ काय होतं त्ये!” हे भरतवाक्य होऊन दिवसभराच्या शाळेवर पडदा पडायचा. ही त्यावेळची त्रिकाळ संध्या होती! तिन्ही वेळेला सौम्य ते किंचित तिखट फुल्यांचा मारा होत असे. पण त्यामुळे तिन्ही खेळातील संवाद खटकेबाज आणि चटकदार होत. ह्या तिन्ही युद्धात माझ्या सारख्याची भूमिका दिग्दर्शकाची किंवा साऊंड इफेक्ट वाढवायची होती.

ह्या चकमकी, लढायांची कारणेही महत्वाची असत. कुणी कुणाची शाईची दौत सांडली- तीही दप्तर किंवा चड्डीवर – मग तर विचारूच नका-हे म्हणजे महायुद्धाचे कारण होते- कोणी कुणाची पाटीवरची पेन्सिल तोडली, तोडून तुकडा घेतला, कुण्या तत्वनिष्ठाने म्हणजे खडूसने सोडवलेली वजाबाकी दाखवली नाही. ही ह्या दैनिक लढायांची कारणे असत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोडवलेली बेरीज कुणी कुणाला दाखवलीच पाहिजे अशी सक्ती नव्हती. ते कायमच्या तहातील एक कलम होते!

मधली सुट्टी संपली की मास्तरांसकट पोरेसुद्धा जरा आळसावल्यासारखी होत. पुजारी मास्तरांची एक डुलकी झाल्यावर मला पाणी आणायला सांगत. आव्वाचे घर समोरच होते. तेव्हढ्या वेळात मी आणखी स्वत:चा वेळ घ्यायचो. पाण्याचा तांब्या, वर तिरक्या टोपीसारखा ठेवलेल्या पेल्यासह, आणून मास्तरांना दिल्यावर सगळी पोरे रोज क्षणभर -क्षणभरच- मला दबून असत. मास्तरांचे पुन्हा शेजारच्या वर्गातील मोरे किंवा पवार मास्तरांच्या बरोबर जलपान आणि सुपारीच्या खांडांची अदलाबदल झाली की पुजारी मास्तर गोष्ट सांगत. झकास सांगत. ती झाली की मग शहराच्या भूगोलाचा धडा. तो लवकर आटपायचा. मग पाढे म्हणायला सुरुवात. पहिल्यांदा मास्तर “बें एकें बें” ह्या नांदीने सुरुवात करीत. त्यांच्या मागोमाग चाळीस पोरे आपापल्या स्वतंत्र गायकीत म्हणत. असे तीन चार पाढे झाले की शाळेत पुन्हा जीव यायचा. कारण कमी जास्त प्रमाणात साथीच्या रोगाप्रमाणे बहुतेक वर्गांत पाढे सुरू झालेले असत.

पाढे म्हणणे सोपे नाही.एक मुलगा बेचा पाढा म्हणतांना ‘ बे एके बेअे’ इतके सफाईने व झटक्यात म्हणायचा की त्याच्या पुढचा मुलगा ‘तीन एके तीऽनं’ची मनात सुरुवातही करायचा. पण बे दुणे आले की हा पुन्हा क्षणभराने ‘बे दोनी’ निराळ्या आवाजात म्हणायचा. असे हे ‘बे दोनी’ तीन वेळा झाले की मग हा निराळा सुर लावून पुन्हा ‘ बे दोन्ही’ निराळ्या ढंगाने म्हणू लागायचा. त्याच्या पुढचा मुलाच्या मनातल्या मनातले ‘तीन एकं तीनं’ कधीच थांबले असत. ह्या ‘बे दोनी’ कडे सगळा वर्ग आनंदाने तल्लीन होऊन पाहात,ऐकत राही. मास्तर मात्र “अरे पुढे” पुढे काय?” असे टेबलावर छडी आपटत विचारायचे. पण ह्याची निरनिराळ्या ढंगाने,अंगाने अर्धा तास “बाबुल मोरा”म्हणणाऱ्या कुण्या बडे खाॅंसारखे ‘ बे दुणे,बे दोनी,बे दोन्ही’ चालूच राही! पुजारी मास्तर झाले तरी त्यांच्या सहनशक्तीलाही मर्यादा होतीच की. ते पुढच्या मुलाला म्हणायचे “हां, तू म्हण रे पुढे ; “बे दोनी? “ हा भाऊ त्याच्या तीनच्या पाढ्यात गुंग झालेला. तो सहज म्हणू लागला,”बे दोनी साहा!” बे त्रिक नऊ “ फटकन छडी बसली तेव्हा पुढचे ‘बे चोक बारा’ कळवळण्यातच विरून जायचे.

रोज असे व्हायचे. त्यामुळे काही दिवस आमच्या वर्गाला कविता ओरडायला मिळाल्या नाहीत. तेव्हा लच्छ्या शिंदेनीच सांगितले,”मास्तर त्या तोतऱ्याला शेवटी ठेवा. म्हणजे नंतर आम्हाला कविता तरी म्हणता येतील.” मास्तरांनाही पटले.

काही वेळा संपूर्ण वर्गाला एकसाथ पाढे म्हणायला लावत मास्तर. हे बऱ्याच जणांना फायद्याचे होते. काहीजणांच्या दुधात ह्यांचे पाणी बेमालूम मिसळून जाई. त्यातही एक लई खारबेळं होतं. कुठलाही पाढा असला तरी हा नेहमी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव करत पंच्याण्णव पासून घाई करत ‘धावर पूज्य शंऽऽभर “ म्हणत मांडी ठोकायचा. पुढच्या वर्गात गेला की “धा एक्के धा करत ‘धाही धाही शंभर” हाच पाढा घाई घाईत म्हणायचा. त्याही पुढच्या वर्गात पुन्हा हा “वीसेके वीस” करीत वीस धाय दोनशे” म्हणत उडी मारायचा. त्याने असे “ तीस धाय तीनशे” पर्यंत मजल मारली होती! ह्यानेच पुढे “पाढे मेड ईझी” हे पुस्तक लिहिले! का लिहिले तर तो नंतर खरंच एका लघु उद्योगाचा का होईना मालक झाला होता.

आमच्या पाढ्यांची आणखीन एक खासीयत होती.सुरुवातीला सगळी मुले “एक्कोण चाळीस, एक्कूण चाळीस पर्यंत व्यवस्थित म्हणत. पण एके चाळीस ची गणती सुरू झाली की सगळा वर्ग ‘एकेचाळ’ , बेऽचाळ… , स्हेचाळ,… अठ्ठेचाळ असेच म्हणत. मग त्यात शिंदे, कोठे,जाधव, रशीदसह पट्या,गुंड्या,उंड्या,सोहनी,सावकार, देशपांडे हे सुद्धा आले!

शेवटच्या तासाला खरी शाळा सुरु होई! सगळ्या गावाला समजे की इथे शाळा भरते. कारण कविता म्हणायला सुरुवात झालेली असे. “पाखरांची शाळा भरे …” ही कविता वर्गाला असो नसो पण कुठलेही दोन तीन वर्ग ह्या कवितेतच हमखास ओरडत असत. त्यानंतर दुसरी हिट कविता म्हणजे “धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे!”

कविता म्हणायला सगळी मुले एका पायावर तयार असत. एरव्ही मुकी बहिरी असणारी मुलेही कवितेच्या आवाजात आपला आवाज बिनदिक्कत मिसळत. मोर्चा, मिरवणुकीत भित्राही शूर होतो त्याप्रमाणे ही मुखदुबळी मुलेही कवि होत काव्यगायन करू लागायचे. बरं, चाल एकच असली तरी म्हणणारा ‘आयडाॅल’ आपल्या पट्टीत थाटात म्हणणार. त्यामुळे ‘धरू नका ही बरे’ ह्या ओळीपासूनच कुणाच्या गळ्यामानेच्या तर कुणाच्या कानशीलापासल्या शिरा फुगलेल्या असत! निरनिराळ्या वर्गातून काही त्याच तर काही वेगळ्या कवितांचा कोलाहल ऐकू येत असे.

कवितेमुळे शाळेत निराळेच वारे भरले जायचे! शाळाही आताच भरल्यासारखी वाटायची. शाळा भरूच नये असे शाळेला जाताना वाटायचे. पण शाळा सुटूच नये असे फक्त ह्या शेवटच्या तासाला वाटायचे.

पाढ्यांवरून सुरवात झाली पण शेवट आम्ही ‘ पोरे भारी कवितेचा गोंगाट करी” ह्या ओळीच्या गोंगाटातच करावा म्हणतो !

माझी पहिली कमाई

दोस्त प्रभाकर जोशीने मला सांगितले, “ चल, माझ्या बरोबर.” दोस्ताने चल म्हटल्यावर कोणता मित्र निघणार नाही? मी आणि जोशी निघालो. जोशीला त्याच्या न्यू हायस्कूल मधले सगळे मित्र लाल्या म्हणत.मी हरिभाईचा. माझी आणि जोशीची मैत्री काॅलेज मध्ये झाली. मी कसा त्याला लाल्या म्हणणार? मी त्याला जोशीच म्हणत असे.

मी आणि हा जोशी नाॅर्थकोट हायस्कूल मध्ये आलो. तिथे त्यावेळच्या व्ह.फा. ची म्हणजे प्राथमिक शाळेचे शेवटचे वर्ष सातवीचे याची वार्षिक परीक्षा होती. त्या काळी प्राथमिक शाळेत व्ह.फालाही मॅट्रिक सारखेच महत्व होते. तो एका साहेबांशी बोलला. माझी ओळख करून दिली. साहेब म्हणाले,” या तुम्ही उद्या सकाळी १०:०० वाजता.” मी आणि जोशी बाहेर आलो. मी त्याला विचारले,”काम कसले आहे? काय करायचे असते?” “ अरे,व्ह.फा.ची परीक्षा आहे.आपण पेपर लिहित असतो त्यावेळेस सुपरव्हायझर करतो तेच आपणही करायचे!”

दुसरे दिवशी सकाळी मी ९:३० लाच नाॅर्थकोटशाळेच्या ॲाफिसमध्ये गेलो. बरीच गडबड दिसत होती. आज साहेबांच्या जागी बाई होत्या. त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर मी नमस्कार करून माझे नाव पत्ता सांगितला. त्यांनी तो तपासून पाहिला. मग म्हणाल्या,” कामतकर तुम्ही ह्या वर्गावर जायचे. बाहेर व्हरांड्यात पाण्याचा डेरा भरलेला आहे का ते पाहायचे. मला त्यांनी एक उत्तरपत्रिका दिली.ती कशी भरायची व मुलांनी कशी भरायची त्या सूचना सांगितल्या. ह्या सूचना विद्यार्थ्यांना द्यायच्या हेही सांगितले. पेपर संपताना दिल्या जाणाऱ्या घंटा, त्यांचा अर्थ काय व काय करायचे तेही सांगितले. मी वर्गाकडे निघणार तेव्हढ्यात जोशीही आला. त्याचेही त्यांच्याशी बोलणे झाले. मधून ते दोघेही माझ्याकडे पाहात. जोशी मला त्याच्या वर्गावर जातो,पेपर संपल्यावर भेटू असे सांगून गेला. मीही निघालो. बाईं तेव्हढ्यात मला म्हणाल्या,” आणि एक मात्र अजिबात विसरू नका. मुलांना उत्तरे सांगणे, हे चुकले तसे लिही, अशी कसलीही मदत करू नका. मुलांना पास व्हायचे आहे हे विसरू नका!” म्हणजे माझा शैक्षणिक आलेख जोशांनी बाईंना सांगितला वाटते!त्याला मनातल्या मनात प्रभ्या,जोश्या,लाल्या सा… आणि फुल्या फुल्या म्हणत वर्गाकडे निघालो.त्यानेच मला हे काम मिळवून दिले हे इतक्यातच विसरलो. हे लक्षात आले आणि माझा मलाच राग आला. चूक लक्षात आली.

वर्गात आलो. सगळीकडे पाहिले. “व्ह.फा”ची मुलं मुली होत्या.हिरव्या पानांच्या गर्दीत काही कळ्या दिसाव्यात तशा डेस्कांच्या प्रत्येक रांगेत एक दोन मुली बसल्या होत्या. त्या सर्वांबरोबरच मलाही परिक्षेचे tension आले होते. कोण काॅपी करेल कशी करेल त्या सर्व कृल्प्त्या आठवत होतो. सगळ्यांचे हात बाह्या वर करून पाहिले. कुणाजवळ वही पुस्तक वगैरे नाही ह्याची डेस्काच्या खालच्या कप्प्यात डोकावून हात फिरवून खात्री करून घेतली. इतक्यात कुणा शिक्षकाने माझ्याजवळ उत्तरपत्रिकांचा गठ्ठा दिला. घंटा झाली. मी त्या प्रत्येकाला दिल्या. मुलांना मी वरचा भाग कसा भरायचा ते सांगू लागलो. कुणीही लक्ष देत नव्हते. त्यांचे ते भरत होते. त्यांना माहित झाले होते कसे भरायची ती उत्तरपत्रिका. तेव्हढ्यात दुसरे शिक्षक आले. त्यांनी मला प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा दिला. घंटा झाल्याशिवाय वाटू नका असे बजावून गेले. प्रश्नपत्रिका म्हटल्यावर मला माझ्या परिक्षा आठवल्या व घाम फुटला. पोरं ढिम्म होती. त्यांना,परीक्षा कुणाची आणि मला का घाम फुटला ते समजेना. एका धीट पोराने विचारलेच, “ सर, तुम्ही काॅपी केली होती का?” इतर पोरंपोरी हसू लागल्या. घंटा झाली! मी प्रश्नपत्रिका वाटल्या. पोरे ती वाचू लागली. काहीजण लगेच तर काही थोड्या वेळाने पेपर लिहू लागले.

मी रांगे रांगेतून हिंडू लागलो. टेबलाजवळ येऊन वर्गाकडे बारकाईने पाहू लागलो. पंधरा वीस मिनिटात कोण काॅपी करायला सुरवात करतोय ह्या विचाराने निश्चिंत होऊन पुन्हा फेऱ्या मारू लागलो. थोड्या वेळाने त्या वरिष्ठ बाई चष्म्यावरून पाहात माझ्या वर्गात आल्या. पोरं मान खाली घालून लिहित होती. काही विचारात पडली होती. तोंडात बोट घालून शून्यात पाहात होती. बाई आलेल्या पाहून ‘आता आणखीन काय’ह्या विचाराने मीच घाबरून गेलो. बाईंनी जमतेय ना विचारले. मनात म्हणालो ह्यात काय जमायचे? मी हो म्हणालो. बाई “कुणालाही उत्तरासाठी मदत करायची नाही” हे पुन्हा बजावून गेल्या. नोकरी एक दिवसाची असली तरी तिच्यातही अपमान होतोच हे लक्षात आले. पण माझी शैक्षणिक प्रगति आठवून बाईंना मुलांच्या निकालाची काळजी वाटणारच हे मी समजून घेतले!

अर्धा पाऊण तास झाला . मीही सरावलो होतो. रांगांतून फिरता फिरता मुलांच्या पेपरात डोकावू लागलो. प्रश्न ‘संधी आणि समास ह्यातील फरक स्पष्ट करा” असावा. एकाने लिहिले होते, “ संधी ची सुरवात अनुस्वाराने होते. समासाची होत नाही.” दुसऱ्याचा पेपर पाहिला त्यात त्याने जास्त खुलासेवार लिहिले होते,”आधी संधी आणि जोडाक्षरांतील फरक पाहिला पाहिजे. मी मनात विचारले,”का रे बाबा?” त्याने पुढे स्पष्ट केले होते,” जोडाक्षरात दोन अक्षरे एकत्र येतात. उदा. ‘आणि’ तर संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिवसरात्र. समासातही दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिनरात.” हे अफाट ज्ञान वाचून माझा चेहरा उदगार चिन्हासारखा झाला. पुढे गेलो. मुलगी हुषार असावी. तिने लिहिले होते,” संधी म्हणजे सोडणे व साधणे ह्यांचे नाम आहे.”तिने पुढे लिहिले होते की ‘ संधी सोडायची नसते आणि समास हा सोडवायचा असतो. दोघात हा स्पष्ट फरक आहे.” मी टाळ्या वाजवणार होतो पण आवरले स्वत:ला. दुसऱ्या रांगेतील एका मुलाने प्रश्न फार सहज व सोपा करून टाकला होता. त्याने लिहिले होते,”सं+धी ही दोन अक्षरे मिळून संधी होतो तर समास ह्या शब्दात दोन स मध्ये मा हे अक्षर येते. त्यात कुठेही धी नाही. हा स्पष्ट फरक आहे.” मला माझ्या उत्तरांची आठवण झाली! खिडकी जवळच्या रांगेतील एका मुलीने अत्यंत व्यावहारिक उत्तर लिहिले होते. तिने लिहिले होते की,” संधी चा संबंध वेळेशी जोडला आहे. आणि लिहिताना समास हा सोडावाच लागतो. दोन्हीतील हा फरक स्पष्ट आहें” एकाने लिहिले होते,” संधी व साधु हे दोन वेगळे शब्द आहेत पण संधीसाधु हा एकच शब्द आहे. संधी आणि समास मध्येही असाच स्पष्ट फरक आहे.”

माझा पहिला दिवस पार पडला. उद्याचा शेवटचा दिवस होता. मला बाईंनी उद्याही बोलावले. पेपर सुरू झाला. आज इतिहासाचा पेपर होता. लिहिणे खूप असते. थोरवी व योग्यता हा प्रश्न तर हमखास असतोच. तसा आजही होता. वर्गात फेऱ्या घालताना उद्याचा इतिहास आजच निर्माण करणारे हे आधारस्तंभ काय लिहितात हे पाहावे म्हणून डोकावू लागलो. एकीने झाशीच्या राणीविषयी लिहिताना, पहिलेच वाक्य ,”झाशीची राणी ही एक थोर पुरूष होऊन गेली.” लिहिलेले पाहून थक्क झालो. पण बऱ्याच मुलांमुलींनी तसेच लिहिले बोते.सवयीचा परिणाम. अहिल्याबाई होळकरांसंबंधी लिहितानाही “त्या एक थोर पुरुष होऊन गेल्या” असेच लिहिलं होते. झाशीची राणी असो की अहिल्यादेवी होळकर असो, दुसरे वाक्य “त्यांची योग्यता मोठी होती.” असेच बहुतेकांनी लिहिले होते. झाले उत्तर! सम्राट अशोकांनी कारकीर्दीत काय केले व शेरशहांनी काय सुधारणा केल्या ह्यांच्या दोन्ही उत्तरात रस्ते बांधले, दुतर्फा झाडे लावलीआणि विहिरी खोदल्या हेच साचेबंद उत्तर सगळ्यांनी लिहिले होते! माझ्या मदतीची कुणालाही गरज नव्हती !

व्ह.फा.च्या परीक्षेतील शेवटचे दोनच दिवस मला सुपरव्हायझिंगचे काम मिळाले. माझ्या आयुष्यातील ही पहिली नोकरी किंवा मोबदला मिळालेले पहिलेच काम होते. मित्र प्रभाकर जोशींनी “चल रे” म्हणून नेले हा त्याचा मोठेपणा! बारा चौदाच रुपये मिळाले असतील.पण मला ती फार मोठी रक्कम वाटली ह्यात आश्चर्य नाही. त्याबरोबरच मुलांची उत्तरे वाचताना ज्ञानात आणि करमणुकीत जी भर पडली त्याचे मोल कसे करणार?

मधूची सायकल

टीव्हीवर बातम्या पाहात होतो. मध्ये मोटारीची जाहिरातही आली. तिच्यातल्या सुंदर मोटारी पाहून मी सतीशला म्हणालो, “काय सुंदर चकचकीत दिसतात ह्या मोटारी.! “ नव्या आहेत त्या बाबा.” सतीश म्हणाला.

त्यावर मी माझी एक आठवण सांगत म्हणालो,” आमचा आतेभाऊ मधू त्याच्या सायकलची इतकी देखभाल करायचा! हा कंटाळत कसा नाही वाटण्या इतकी तो रोज घासून घासून पुसायचा. तेलाची धार एकाच ठिकाणी पण चेन गरगर फिरवित सगळ्या चेनला व्यवस्थित तेल पाजायचा. मग लहान बाळाचे तोंड पुसावे तितक्याच काळजीने चेन वरच्यावर पुसुन घ्यायचा.

दोन्ही चाकांची मडगार्डस तर बाहेरून कुणीही चकाचक करेल. मधुच्या सायकलची मडगार्डस आतूनही स्वच्छच नव्हे तर चमकतही असत! रात्री खाली रस्त्यावर त्या मडगार्डसचा प्रकाशच चाकाबरोबर फिरत येई. सीटही तो मेण लावून चमकवत असे. मग सायकलचा साचा -मधला त्रिकोणही-स्वच्छ का नसणार? चाकांची प्रत्येक तार व रिमही चमचम चांदीची वाटत असे. प्रत्येक स्पोक तो एकदा कोरड्या फडक्याने मग किंचित ओल्या फडक्याने व ते झाल्यावर रुमालावर अत्तराचा थेंब टाकावा तसा तेलाचा थेंब टाकलेल्या फडक्याने प्रत्येक तार (स्पोक) पुसायचा. ही फडकी काही शेमाॅयची किंवा पिवळी मऊ फ्लॅनेलची नसत. जुन्या गंजीफ्राकाची चार फडकी असत. हे घासून पुसून झाले की तो हबकडे वळे. तिथेही हीच किमया करू लागे.

आम्ही एकदा, बिरबलाने बहुरुप्याच्या नंदीबैलाची परीक्षा घ्यावी तसे, त्याच्या सायकलच्या ब्रेकस्चे रबरी मोजे किंवा शूज स्वच्छ आहेत की नाही ते पाहू लागलो. ब्रेकसची रबरे राहू द्या दोन्ही टायर्सवरही धुळीचा एक कण नव्हता!

मधुला सायकलची देखभल करताना कुठे किती जोर लावून घासावे, खरारा कितपत आणि कुठे करावा हे माहित होते.काही भागांना, लहान बाळाचे नॅपकिनने स्पंज करावे तितक्या हळुवारपणे तो करायचा! उपजत म्हणतात ते ज्ञान मधूचेच असावे !

त्यावेळी सायकलला लावायचे दिवे लहान असले तरी कंदीलासारखे वातीचे असत. त्यांचीही तो निगा राखत असे. त्याच्या दिव्याची भिंगासारखी काच स्वच्छ असे.यामुळे त्याच्या दिव्याचा प्रकाशाला कधीही काविळ होत नसे! नंतर तर डायनॅमोचे किंवा बॅटरीचे दिवे आले. त्यामुळे मधुच्या उत्साहाला आणखीच भरती येत असे. नशीब! मधु, दिव्यातून पडणारा प्रकाशही घासून पुसून स्वच्छ करत नव्हता!

आम्हा सगळ्यांनाच संशय असे की मधु त्याची सायकल रस्त्यावर चालवत नसणार. आवडत्या कुत्र्याला फिरवून आणावे तशी तिला तो फिरवून आणत असावा.

रात्री मधुच्या घरी गेलो तर, अंधारात घड्याळातील रेडियमचे काटे चमकावेत तशी,त्याची सायकल चकचकत असे. मधुच्या सायकलमुळेच, त्यांच्या वाड्यापुरती तरी अमावस्याही पौर्णिमा होत असे!

झाडे वाचवा आरे वाचवा ! कार-शेड हटवा आरे वाचवा!

मुंबई

मुंबईच्या मेट्रो ट्रेनचा तिसरा टप्पा करण्यास सुरवात झाली. त्यासाठी कार शेड करण्यासाठी २७०० झाडे तोडायला सुरुवात झाली. गेला एक महिना दर शनिवारी आणि रविवारी ‘झाडे वाचवा आरे वाचवा ‘ कार शेड हटवा ‘ अशा अनेक घोषणा देत हातात लहान फलक घेऊन तरुण मुले मुली कार्यकर्ते रस्त्याच्या एका बाजूला लांबलचक रांग करून उभी असतात. ह्या मध्ये काही
एनजीओज्, बरेच वैयक्तिक, काही राष्ट्र सेवा दलाचे(अजून सेवा दल जिवंत आहे हे पाहून आश्चर्यच वाटले!) काही तरुण मंडळांचे असे निरनिराळ्या गटाची तरुण मंडळी भाग घेतात. हिंदी इंग्रजी मराठीत घोषणा चालू असतात.

हे निदर्शन ११.००-३० पासून सुरु होते. दोन पर्यंत संपते.
गेले दोन तीन शनिवार रविवार मी आणि स्मिता जाऊ जाऊ म्हणत होतो. पण कुठे करतात निदर्शने, किती वाजता ही काहीही माहिती कुठेही सहजासहजी मिळत नव्हती. फक्त एखाद्या-एखाद्याच-चॅनेलवर फक्त शनिवारी रनिवारी हे आंदोलन असते असे सांगितले होते. हल्ली चळवळ्यांनाही वाटते की कुठेतरी सोशल मिडियावर टाकले की भरपूर प्रसिद्धी होते. भ्रम आहे.जाऊ दे. कल्याणीने शोधून वेळा सांगितल्या. बरे झाले नाही तर आम्ही सहाला उठून जाणार होतो. आरामात दहाला निघालो. ११.०० वाजता पोचलो.

फारशी मंडळी दिसत नव्हती. उगी २०-२५ इकडे तिकडे दिसली. पण पोलिसांच्या गाड्या, निदर्शकांना पकडून लांब दूर सोडून देण्यासाठी जाळीची मोठी गाडी हे सगळे पाहिल्यावर मला विशेष स्फुरण आले. तो लाठी हल्ला, ती आरडा ओरड, निदर्शनाच्या घोषणा,पोलिसांची फळी मोडण्यासाठीची निदर्शकांची रेटारेटी. त्यासाठी “इन्किलाब इन्किलाब! नही हटेंगे नही हटेंगे” घोषणा मध्येंच पोलिस धक्काबुक्की करत माझी मानगुट पकडून मला ढकलत मोटारीत कोंबताहेत, चॅनेलवाल्यांचे सगळे कॅमेरे माझ्यावर,त्यांची गडबड आणि बडबड हे सर्व दृश्य वारंवार डोळ्यांसमोर आणू लागलो. त्याची मनातल्या मनात दोन वेळा ‘रंगीत’ तालीमही झाली. आज हुतात्मा व्हायची केव्हढी मोठी संधी मिळाली ह्या हौतात्म्याच्या स्वप्नांत दंग होऊन, ती’अमर रहे’ ची मिरवणुक;माझ्यावर पडणारे हारांचे ढीग त्यामुळे चेहरा कुणाचा दिसतच नव्हता. मीच का हा हुतात्मा ही शंकाही आली. लगेच मी तिथेच करायचे श्रद्धांजलीचे भाषणही करु लागलो. हे सर्व स्वगतच चालले होते.प्रत्यक्षात फौजदार-पोलिसांना मी म्हणत होतो,” आमच्या पेक्षा तुमचीच संख्या जास्त दिसतेय साहेब! चॅनेलवर पोलिसांचीच निदर्शने अशी बातमी दाखवतील!” तोही हसला आणि म्हणाला,” येऊ द्या, तशी बातमीही येऊ द्या, तुम्हीच द्या!”

लवकरच अनेक जण पुटुपुटु करत कुठून कुठून येऊ लागले. रांग लांब लांब लांब होत चालली. मला आणि स्मिताला कुणी एक एक फ्लेक्सी दिला. तो रस्त्यावरील रहदारीला दाखवत, देणाऱ्याच्या मागोमाग घोषणा पूर्ण करत ओरडत होतो. ‘Save Aarey Save Mumbai’
‘कार शेड हटाव झाडे बचाव;’बचाव बचाव आरे बचाव;’ ‘आरे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची!’ ‘हटवा रे हटवा कार शेड हटवा,वाचवा रे वाचवा आरे वाचवा!’ (ही माझी), ‘जाॅनी जाॅनी येस पप्प…’ वापरून कुणी केलेली चांगली घोषणा; ह्या घोषणाबाजीतच काही तरूण मंडळी मोठा डफ वाजवत त्यांच्या कला पथकाची गाणी म्हणत होती. आणखीही बऱ्याच घोषणा चालूच होत्या. सगळीकडे तरुणांचा उत्साह दिसत होता. माझ्या एव्हढी नाही पण म्हातारी म्हणावीत असे दोघे तिघेच असतील.

आरे रस्ता म्हणजे दुतर्फा सुंदर झाडी असलेला! पूर्वी सिनेमाच्या गाण्यांचे शूटिंग होत असे ती आरे मिल्क काॅलनीची सुंदर बाग आणखी पुढे होती.,रस्ता अरुंद. त्यावरूनच बसेस मोटारी रिक्षा दुचाकी वाहनांची गर्दी. रविवार असल्यामुळे तर खूपच. त्यामुळे जातानाचे लोक परतताना बस मधून,मोटारीतून मलाच हात दाखवत thumsup करत जाऊ लागले असे वाटू लागले.बरेच लोक मला ओळखू लागलेत! ह्या भ्रमात मी घोषणाही जोरात देऊ लागलो.!

मधून मधून मी पाणी पीत होतो. चांगली दिड दोन किलोमीटर लांबीची रांग झाली होती. माझ्यासमोर एक पोलिस होता. त्याला मी म्हणालो, “असं काही तरी तुम्ही रोज पाहात असाल. मनात हसत असाल. काय ओरडताहेत उगीच. काही फरक पडणार नाही!” तो न बोलता फक्त हसला. सर्व काही शांततापूर्ण वातावरणात, गाणी म्हणत मध्येच जोशाने तर कधी नेहमीच्या आवाजात घोषणा चालू होत्या. उत्साह यावा म्हणून त्याच घोषणा चाल बदलून म्हणत. त्यामुळे पुन्हा आवाज जोरदार निघत!

स्मिताने थोडा वेळ रस्त्याच्या पलीकडे जाऊन Record for the posterity असावे म्हणून फोटो काढले. पण तिचा नाही आला फोटो. मला खरंच सुचले नाही! मी त्या अति सौम्य,साध्या वरणासारख्या निदर्शनात घोषणा देण्यातच रमलो होतो.

स्मिताच्या प्रोत्साहनामुळे माझा कालचा रविवार म्हणजे ‘पल भर के लिये तो आंदोलन करें,झूटा ही सही!’ के नाम झाला! झूटा ही नव्हते पण शांततामय होते.

Secret Life of Dr. Walter Mitty सारखा मी तेव्हढ्यातही रस्त्याच्या कडेची पांढरी लक्ष्मण रेखा ओलांडून मुठी वळवून; पोलिसांची नजर चुकवून; पळत पळत रस्त्याच्या मध्यभागी जाऊन “ नही हटेंगे नही हटेंगे” “नही चलेगी नही चलेगी कार शेडकी तानाशाही”, “आली रे आली जनता आली कारशेड खल्लास केली” अशा घोषणा देतोय; मी गेलेला पाहून इतरही रस्त्यामध्ये येताहेत, आॅलिव्ह ग्रीनची जाळीची हेल्मेट घालून अंगभर असणाऱ्या ढाली पुढे घेऊन पोलिसांची फलटण हवेत बंदुकी उडवत माझ्याच दिशेने येत आहे ह्या स्वप्नरंजनात स्वत:चे समाधान करून घेत होतो.प्रत्यक्षात मी समोरच्या पोलिसाच्या-तो पाठमोरा असूनही- धाकाने,रस्त्या कडेच्या खड्यात उभा होतो. खंबीरपणे पाय रोवून. काय समजलात मला!

१:३०-४५ वाजत आले. स्मिता म्हणाली,”बाबा,जाऊ या.” जिथे आम्ही सुरवातीला येऊन थांबलो होतो तिथे गेलो. पाण्याची बाटली घेतली. पाणी प्यालो. आरे काॅलनीतच होतो.त्यामुळे तिथे आरेचे ताकही मिळाले.

मी माझ्या शेजारी असलेल्या निदर्शकांचा निरोप घेत पुढे निघालो. रिक्षाने १७ किमिचे अंतर पार करून घरी आलो.
तर आता निदर्शनाचे स्मिताने काढलेले फोटो पहा.

हिशोबातील खर्चिक लेख

शीव

ता.११ सप्टेंबर २०१९ पासूनचा खर्च:-
रु. २०.०० किल्ली बनवून घेतली.
रु. ७.०० चहा.
ता.१२ सप्टेंबर २०१९
रु.२४०.००दाराच्या अंगच्या व कडीकोयंड्याच्या कुलुपाच्या किल्ल्या बनवून घेतल्या.
रु. ३०.०० ताक
रु. १९०.०० चाॅकलेट्स मेलडी आणि किसमि – १०० चाॅकलेटांची दोन पाकिटे!
रु. १०.०० पार्ले ग्लुको बिस्किट्स
रु. ४०.०० किल्यासाठी- दोन key chains
ता. १३ सप्टेंबर २०१९


रु. २८:०० दोन समोसे आणि एक चहा(८रु.) बनारस दुग्धालयात.हे दुकान सायन स्टेशनकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. बरेच वेळा त्यावरून जातो पण कधीही जावेसे वाटले नाही. पण आजची परिस्थितीच निराळी होती. दरवाज्याच्या अंगच्या कुलपाची (latch key) एक जास्तीची किल्ली बनवून घ्यायचे काम परवा पासून चालू आहे. एक किल्ली ती काय! जणू काही ‘बंद अकलका दरवाजे का तालेकी’ किल्लीच ती.


काल माझ्याकडे तशी एकच किल्ली होती. त्याबरहुकुम बनविण्यासाठी ती देणे भागच होते.पण मग मी घरात कसा जाणार? ह्यावर उपाय म्हणून स्मिता तिची किल्ली ठेवून गेली होती. काल दुपारी जास्तीची बनवून घेतलेली व मूळची अशा दोन्ही किल्या घेऊन आलो. पण नविन करून घेतलेली किल्ली कुलपातच जाईना.पुन्हा आज किल्लीवाल्याकडे जाणे आले.गेलो. तर तो आपली सर्व हत्यारे व display (!) साठी दोन तीन तारांना अडकवून लावलेल्या जुन्या पुराण्या व गंजलेल्या किल्ल्यांचे ते गबाळ गुंडाळून, मोटरसायकलवरून निघण्याच्या तयारीतच होता.बरे झाले ती चालू झाली नाही. मी गेलो. त्याने म्हटले तुमची नेहमीची किल्ली व जी दुरुस्त करायची ती अशा दोन्ही किल्ल्या द्या. मी गडबडीत मोठ्या आत्मविश्वासाने त्याला दिल्या.

घरी आलो. तर लॅच की नव्हती. दोन्ही खिसे उलटे सुलटे करून पाहिले. स्मिताने ठेवलेली किल्ली मी घरातच विसरलो होतो तर ती खिशात कुठून मिळणार? माणूसच मी. प्रथम, आता काय करायचे? ह्या विचारात आणि काळजीत पडलो. मग म्हणालो,” स्मिता येईपर्यंत फक्त आठ तासांचाच प्रश्न आहे. काढू या इकडे तिकडे फिरत. बागेत बाकावर बसू.मध्येच त्यावर आडवे पडू. जवळ रुपम टाॅकीज आहे तिथे सिनेमे पाहू, लागोपाठ दोन.(पण ते दोन्ही रद्दी होते.) पाण्याची बाटली विकत घेऊ.” खिशात पैसे होते ना! अलिकडे भूक लागली आहे जोरात, असे होत नाही. पण आता मात्र लगेच काही तरी खाऊन घेऊ हा विचार आला. निरिक्षण:- संकटात खूप भूक लागते. वर लिहिलेल्या बनारसी दुग्धालयात जाऊन न आवडणारे सामोसे खाल्ले.


स्मिताला आणि कल्याणीला फोन करुन सांगावे व त्यांनाही काळजीत टाकावे हा एक सुविचारही आला.पण जवळ फोनही नव्हते. नंबरही लक्षात नाहीत. हाॅटेलातून बाहेर पडल्यावर लक्षात आले,”अरे त्या चावीवाल्याकडून आपली किल्ली आणावी. घरात जाऊन जास्तीची किल्ली घ्यावी व ही किल्ली त्याला पुन्हा आणून द्यावी. अरे व्वा! अशा बिकट प्रसंगी, कधी नाही ते, हे मला सुचले ह्यावर मीच माझ्यावर किती तरी वेळ खूष झालो ! ह्या खुषीत बराच वेळ गेला. मग काय! ढांगा टाकत तिथे पोचलो तर चावीवाला आपले सर्व गबाळे आवरून नमाज पढायला गेला होता! आज शुक्रवार आहे विसरलो होतो. गेले तीन दिवस मला तिथे तिन्ही त्रिकाळ पाहून मला चावीवाल्याचा नविन ॲप्रेंटिस समजू लागलेला रसवाला म्हणाला,”बाबा, नादिरके पास काम सिखते हो का?अच्छा है काम. कभी भी खुदका पेट खुद भरना अच्छा रहेता.चाबीवाला येईल;थांबा इथे.” हे सगळे, मी डोळ्यांसकट चेहऱ्याचे उदगार चिन्ह करून ऐकून घेतले.


जनकल्याण बॅंकेच्या रखवालदाराच्या खुर्चीवर बसलो.पण बॅंकेचे गिऱ्हाईक आल्यावर चुकुन मीच उभा राहायचो. हे लक्षात आल्यावर नंतर तिथेच बाजूच्या अरुंद कट्ट्यावर बसलो. रखवालदाराची असली तरी खुर्ची आपल्या नशिबात नाही हे पुन्हा लक्षात आले. तास दीड तास वाट पाहात बसलो. रसवाल्याची किती विक्री झाली हे पाहात त्याच्या गल्ल्याचा अंदाज घेत वेळ काढत होतो. अखेर तो किल्लीवाला आला.त्याच्या कडून किल्ली घेतली.घरी आलो. कुलुप उघडून घरात आल्यावर घर म्हणजे Home Sweet Home हे जाणवले. दुपारी चार साडेचारला जेवलो. सहा वाजता पुन्हा त्याला किल्ली द्यायला गेलो पण जाताना दरवाजाचे अंगचे कुलुप लागू नये ह्याची दक्षता घेऊन निघालो. किल्ली देऊन परत आलो. साधे कडीचे कुलुप उघडून घरात आलो!!! हुश्श! हे तुम्ही म्हणायचे.


ता. १४ सप्टेंबर २०१९
रु. १०.०० केळी ३
रु. ३५.०० पार्लेची नवीन चाॅकलेट कुकीज्- मिलानो.
रु. २५.०० सिताफळे, फक्त दोन तीही लहान.
रु. १२.०० अमूलची बिस्किटे.
रविवार ता. १५ सप्टें २०१९ – अखेर आज किल्ली बनवून घेण्याच्या रामायणाचे पारायण संपले. (गदिमांनी ळ चे घननीळा लडिवाळा हिंदोळा वगैरे ळ चे चार शब्द लिहून गाणे लिहिले तर किती कौतुक केले डाॅ. करंबेळकरांनी सुंदर लेख लिहून. मी वर बाणातला ण वापरून सलग तीन शब्द त्यातला एक तर ण वापरून एक जोडाक्षरही लिहिले ! ह. ना. आपटे म्हणतात तसे’पण लक्षात कोण घेतो?!’ मला तर सुखाची किल्ली मिळाल्याचा आनंद झाला! रोज कमीत कमी दोन चार हेलपाटे घातले असतील. असे चार दिवस हेलपाटे घालत होतो.काल तर सोसायटीचा रखवालदार म्हणाला “ आजोबा, शतपावली किती वेळा घालता. तीही इतका वेळ?” मी काय उत्तर देणार. नुसते हसलो. हसणे व माझा चेहरा दोन्ही केविलवाणा झाला असणार. कारण तो लगेच म्हणाला,” नाही तसे काही नाही सहज विचारले!” कुलपाच्या किल्लीसाठी इतके हेलपाटे तर यशाची गुरुकिल्ली सापडायला जन्म-मरणाचे किती खेटे घालायला लागतील! ! असो.


तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडला असेल; गेले चार दिवस किल्ली पुराण चालू आहे माझे. असो. “असो असो लिहिता,म्हणता आणि पुन्हा दहा वाक्ये लिहतात तुम्ही “ असे तुम्ही म्हणाल. पण खरेच आता असो.चला एकदाचे अखेरचे ‘असो’ लिहून झाले! अ……


रविवार १५ सप्टें २०१९
रु. १५.०० एव्हरेडी बॅटरी सेल्
सोमवार ता.१६ सप्टें२०१९ माझा जमा नसलेला हिशोब चालूच आहे !

हिशेबनीस- सदाशिव पं. कामतकर

वेगळी पुस्तके

बेलमाॅन्ट

आज रेडवुडसिटी लायब्ररीतील ‘माणूस ग्रंथालयात’ गेलो होतो. पंधरा दिवसांपूर्वी नाव नोंदवले होते. तीन मानवी पुस्तके निवडायला सांगितली होती. मी माझी आवड निवड कळवली. पण एकच वाचायला मिळेल बाकीची दोन आधीच कुणी तरी घेतली होती असे कळले. मी ठीक आहे असे मनात म्हणालो. त्यातही नेहमी प्रमाणे तिसऱ्या पसंतीचेच मिळाले होते.


ह्या पुस्तकांच्या यादीत वेगवेगळ्या विषयांवरचे मानवी ग्रंथ होते! यादी पाहा. आंधळा, व्यसनमुक्त बाप लेक, सुधारलेला गुंड, स्वप्ने पाहणारा!, संगणक शास्त्रज्ञ,पोलिस आॅफिसर, लिंगबदल झालेली व्यक्ति व आणखी काही दोन तीन पुस्तके होती.

परिक्षेत कोणत्याही पेपरात, एकही सोपा प्रश्न माझ्या वाट्याला न येणाऱ्या मला इथेही अवघड पुस्तकच वाचावे लागणार होते. लक्षात आलं असेलच की मला संगणक शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचायचे होते!

विषय समजल्यापासूनच धडधड सुरू झाली होती. मी काय वाचणार आणि मला काय समजणार?! सतीशला विचारायचो काय विचारू, काय बोलायचे वगैरे प्रश्न चालू होते माझे. नंतर लक्षात आले की सोनिया, तिच्या वर्गातील दुसरी मुले त्यांच्या project साठी काही जणांच्या मुलाखती घेतात ते किती अवघड असते! पण ती किती व्यवस्थित घेते. मी दहा बारा दिवस नुसता विचार न करताही घामेघुम होत असे. आणि आज सतीशने रेडवुडसिटी लायब्रीपाशी सोडले तेव्हा मी लगेच पळत घरी जायला गाडीत बसणार होतो. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेल्या आई बापाचा हात पोरगं सोडतच नाही; वर्गात जात नाही तसे माझे झाले होते. ‘ बाबा काही पुस्तक वाचायला जाणार नाहीत’हे सतीशला समजले असावे.

मी गाडीतून उतरल्याबरोबर त्याने इकडे तिकडे न पाहता फक्त All the Best पुटपुटत गाडी लगेच भरधाव नेली. मी रडकुंडीला येऊन गाडीमागे दोन पावले पळत गेलो.पण त्याने गाडी थांबवली नाही. मी त्यालाच आत पाठवणार होतो. पण मलाच आत जावेलागले. तिथे पोचणारा मीच पहिला होतो. अजून अर्धा एक तास होता. नेहमीप्रमाणे प्रथम तिथल्या दुकानात गेलो. नव्यासारखी दिसणारी, काही नवी, काही जुनी झालेली निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके पाहात थोडा वेळ घालवला.

रिडिंग हाॅल मध्ये जाऊन तिथे दिसेल ते पुस्तक वाचायचे ठरवले होते. पण पहिल्याच झटक्यात AIQ हे Nick Polson & James Scott ह्यांचे पुस्तक हाताला लागले! एकदम भरून आले. ‘केव्हढी कृपा’
‘चमत्कार चमत्कार तो हाच!’ ‘ह्यामागे काही तरी योजना असली पाहिजे’ ह्या भाबड्या बावळट विचारांच्या ढगांत फिरून आलो.महाराजांनी पेपर तर फोडलाच आणि वर मला हे AIQ चे गाईडही दिले!

पुस्तक वाचायच्या आधी परिक्षणे अभिप्राय तरी वाचावेत म्हणून मलपृष्ठ वाचू लागलो.पहिलाच अभिप्राय न्यूयाॅर्क टाईम्सचा. तो म्हणत होता, “लेखकांनी इतक्या हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे की ते सदाशिव कामतकरांनाही समजेल! आम्हाला तर शंका आहे की त्यांच्यासाठीच ते लिहिले आहे! “ थक्क झालो! हे वाचल्यावर ट्रम्प, न्यूयाॅर्क टाईम्स वाॅशिंग्टन पोस्ट ह्यांना fake news म्हणणार नाही. पण मला आताच प्रश्न पडला की,न्यूयाॅर्क टाईम्सचे सोडून देऊ,त्यांना मी माहितच आहे; पण रेडवुड लायब्ररीला कसे समजले की मी वाचक आहे ते? थोडे डोके खाजवल्यावर लक्षात आले. “अरे शाळेत असतांना तू जसे गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये मला घ्याना मला घ्या ना बे; बॅटिंग बोलिंगही करतो ना मी. वाटल्यास फिल्डिंगही करीन. अशी दोन दिवस भुणभुण लावत त्या टीमभोवती फिरायचास? तसेच ह्या लायब्ररीलाही तू एकदा नाही तीन वेळा कळवलेस मी पुस्तक वाचायला येईन म्हणून!”

परीक्षेच्या हाॅल मध्ये जाण्यापूर्वी बहुतेक सगळेच अभ्यासावर शेवटचा हात फिरवितच आत जातात तसेच झाले की हे! असे म्हणत पुस्तक उधडले. वाचायला लागलो. भाताच्या प्रत्येक घासाला खडा लागावा किंवा भाकरीच्या पिठात खर आल्यामुळे भाकरीचा घासही वाळूची भाकरी खातोय की काय असे वाटावे तसे पहिल्या वाक्यापासून होऊ लागले. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळायला घ्यावा किंवा ‘देवा तुझे किती सुंदर… ‘ ह्या कवितेच्यापुढे मजल न गेलेल्या माझ्या सारख्याने मर्ढेकर, पु. शि. रेगे किंवा ग्रेस ह्यांच्या कविताचे रसग्रहण करण्यासारखे किंवा अनुष्टुभ, अबक मधील कवितांचा अर्थ समजून घेण्यासारखेच हे काम आहे हे समजून आले. पुस्तक जागेवर उलटे ठेऊन वरच्या हाॅलमध्ये गेलो.

नेहमीप्रमाणे मीच पहिला वाचक. इतर वाचक कोणीही नव्हते. त्यामुळे मला पाहून Jenny Barnes ला खरंच ‘Happy to see you’ झाले. तिने मला नाव न विचारता माझे “सुंदर ते ध्यान” पाहूनच माझ्या नावापुढे मी आल्याची खूण केली. आत घेऊन गेली व माझे टेबल दाखवले. माझे पुस्तक आले नव्हते. हळू हळू इतर वाचक आणि पुस्तके येऊ लागली. त्या अगोदर व्यसनमुक्त बाप लेका ऐवजी माय लेक(मुलगा)आले होते.त्यांच्याशी बोललो. तेव्हढेच Warm up !

बार्न्सने एक छापील पत्रक दिले होते. वैयक्तिक खाजगी माहिती विचारू नये; हरकत नसेलतर विचारा/ सांगा. बोलण्यापेक्षा बोलते करा, ऐका; नमुन्यादाखल काय विचारणे चांगले वगैरे सर्व सूचना त्यात होत्या. मला पुष्कळ धीर येऊ लागला. वेळ झाली. सगळी पुस्तके आली वाचक आले. आपापल्या टेबला वर गेले. पेपर वीस मिनिटांचा. १५व्या मिनिटाला पूर्व सूचनेची घंटा होईल हे सांगून झाले. आणि सुर करा असे जेनी बार्न्स म्हणाली. माझी दातखीळ बसली! बरे झाले,शास्त्रज्ञ बाईनेच स्वत:ची “ हाय्! मी एमिली!” कसे काय आहात?”विचारत माझ्या घामाच्या धारांना बांध घालायचा प्रयत्न केला. नुकतेच वाचलेले शीर्षकच AIQ म्हणून उत्तर दिले. घाबरल्यावर आवाज मोठा होतो हे आजच लक्षात आले. कारण त्या हाॅलमध्ये माझ्या AIQ चे तीन वेळा प्रतिध्वनी घुमले! सगळ्या वाचकांनी पुस्तके पटापट बंद केली व काय झाले असा चेहरा करून एमिली बाईंकडे सहानुभुतीने पाहू लागले.त्यांना काय माहित असे अजून बरेच वेळा होणार आहे ते! पण एमिली बाई प्रसंगावधानी. त्यांनी तोच धागा पकडून “ ह्या गोष्टींची सुरवात १७५० पासून झाली. १९२० साली नेव्हीतील अॅडमिरल बाईंनी ह्यावर बरेच काम केले होते. मी मग काही संबंध नसताना algorithms हे संध्येतील नाव घ्यावे तसे म्हणून लगेच आठवून आठवून step by step..असे काही तरी पुटपुटलो.म्हणजे मला वाटले मी पुटपुटलो; पण माझा घुमलेला आवाज ऐकून लगेच इतर वाचकांनी आणि नवल म्हणजे पुस्तकांनीही माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने रागाने पाहात लायब्ररीत शांतता पाळायची असते त्याची आठवण करून दिली. एमिली बाईंबरोबर माझाही उत्साह वाढू लागला असावा. मग रोबाॅट्सही चर्चेत आले.

ह्या बाई संगणक शास्त्रात डाॅक्टरेट आहेत. पण गंमत अशी की त्या ह्या शास्त्राकडे वळल्या त्यामागे त्यांची पहिली व आजही असलेली भाषेविषयीची आवड. त्यांना चार पाच भाषा तरी येतात. विशेष म्हणजे लॅटिन जास्त चांगली येते. म्हणजे आपल्या कडील संस्कृत तज्ञ. भाषेतील व्याकरण, शब्दोच्चार त्यातील उच्चारांचे टप्पे किंवा तुकडे. शब्दरचना व होणारे वाक्य; पिरॅमिडच्या शिखरावर शब्द व त्या खाली, खाली तो तयार होण्यासाठी त्यातील अक्षरे त्यांचे होणारे उच्चार ह्यांची बांधणी करत करत शब्द होतो. तसेच वाक्यही. तेच मी प्रोग्रॅमिंगमध्ये करते असे उदाहरणे देऊन सांगितले. त्या इंजिनिअर नसूनही संगणक शास्त्रज्ञ झाल्या. त्यांनी मला alexa, siri संबंधात थोडक्यात सांगितले.पहिल्या अर्ध्या मिनिटातच माझ्या आकलनशक्तीचीही व स्तराची त्यांना कल्पना आली असावी. त्यांच्या टेबलाकडे मी व जातांना त्या स्वेटर विणत होत्या. शेवटी शेवटी मी त्यांना तसे सांगितले. त्यावर त्या लगेच हसत म्हणाल्या knitting सुद्धा प्रोग्रॅमिंगच आहे. विणायचा स्वेटर घेउन लगेच त्यांनी दोन उलट एक सुलट पुन्हा एक उलट…टाके सुईवर घेत त्याही कशा algorithmic स्टेप्स आहेत ते मला प्रत्येक स्टेप घेऊन सांगू लागल्या. घंटा होऊन गेली होती. ‘पेपर’ वाचून (सोडवून) झाला होता. वेळ संपत आला. सगळ्यांच्या उठण्याच्या निघायच्या हालचाली सुरु झाल्या. माझेही वाचन संपले होते.

हा मुलाखतीचा किंवा प्रश्नोत्तरांचा प्रकार नाही. ह्यात वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या नेहमीच्या पठडीतील लोकांपेक्षा वेगळ्या, आपल्याला ज्यांच्याविषयी, ज्यांच्या पेशा कामा विषयी फारशी माहिती नसते कुतुहल असते अशांची भेट. त्यांनाही मुख्य प्रवाहात इतरेजनांच्या सहवासात आणून संवाद साधण्याचा हा एक वेगळा सामाजिक कार्याचा प्रकार आहे.दोन वाक्यात सांगायचे तर तुम्हीही आम्हीच आहात. आणि व आम्हीही तुम्हीच आहात. हे जाणून घ्यायचा हा वेगळा एका अर्थी उद्बोधक आणि सुंदर सामाजिक उपक्रम आहे.

उपक्रमाला नावही (ज्या स्थळी हा आयोजित केला त्याचाही त्यात थोडा वाटा असेल ) वेगळे व लक्षवेधी आहे . Human Library. Civit ह्या संस्थेने केलेला उपक्रम आहे.

मी सर्वेक्षणात सहसा भाग घेत नाही. पण अखेरीला मी त्यांचा फाॅर्म भरून दिला. नविन पुस्तके सुचवा मध्ये मी weatherman(Meteorologist) fire fighter first responders सुचवले.

मला हा नविन अनुभव होता. समोरासमोर अनोळखी व्यक्तीशी (इंग्रजीतून!) संभाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. वेळ चांगला गेला व कारणी लागला असे वाटले.

मी लिहिलेले ‘हे पुस्तक’ वाचनीय वाटेल की नाही ही शंका आहे. कारण सर्वेक्षणातील “तुम्हाला ‘पुस्तक’ व्हायला आवडेल का?” हा प्रश्न मी सोडून दिला!

संपता संपता, AIQ ची मी दोन चार पाने वाचली त्यावरून हे पुस्तक उत्तम आणि वाचावे असे आहे इतके सुचवतो.

जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार

मी एक ओळीत जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार… !
माणूस आयुष्यभर शिकत असतो. जन्मभर विद्यर्थी असतो हे अनुभवाचे बोल प्रत्येकाला पाठ असतात. हे बोल ऐकल्यावर अनेकांना गुरु दत्तानी एकवीस गुरू केल्याची कथाही आठवते. त्याच त्या चुका वारंवार करत जीवनाच्या शाळेतील मी किती पारंगत विद्यार्थी आहे हे सगळ्यांना माहिती झाले आहे.
अनेक चुकांतील एक माझी नेहमीची ठळक चूक कोणती ते…..


आज मी उन्हे उलटण्याच्या सुमारास म्हणजे सावल्या लांब पडण्यास सुरुवात झाली नव्हती पण लवकरच पडू लागतील अशा वेळे आधी निघालो. साडे चार वाजता. फाटकातून बाहेर पडलो आणि नाॅटरडेम हायस्कूलच्या दिशेने निघालो.चुला व्हिस्टा’च्या वळणापाशी आलो. जावे का ह्या चढाच्या रस्त्याने? स्वत:लाच विचारले. “पण चढ खूप मोठा आहे. आपण ल्युनार्डीवरून ‘चुला व्हिस्टाकडे’ वळून दोन तीनदा गेलोय. कारण काय तर इकडूनही चढच आहे. पण ह्यापेक्षा कमी म्हणून तिकडून आलो होतो. पण हा जमेल का चढून जायला?” मळ्यात जाऊन “काय वांगी घेऊ का ?” असे वांग्यांच्या झाडांनाच विचारून भरपूर वांगी तोडून घेणाऱ्या भिकंभटासारखे मीही स्वत:लाच विचारून, जाऊ का नको ते ठरवत होतो! शेवटी देवाचे नाव घेतले व चुला व्हिस्टाचा चढ च-ढ-त,च—ढ—त निघालो.


वर मध्ये स्वल्प विराम टाकलाय पण एक एकेक पावलानंतर अर्धविराम घेत मी चाललो होतो. एका बाजूने डोंगर,झाडी दुसऱ्या हातालाएकीकडे खोलगट दऱ्या. घाटातला रस्ता म्हणावा तसा. पण झाडी दोन्ही बाजूला.आणि दोन्ही बाजूला घरे! काही झाडीतून दिसणारी, काही डोकावणारी! व वरच्या चढा चढाच्या हाताला वर वर बांधलेली. इकडे खाली उताराच्या बाजूलाही घरे. सगळी सुंदर! मी ज्या घाटातल्या रस्त्यावरून चढत जाण्याचा प्रयत्न करत होतो तो रहदारीचा. पण फार वर्दळीचा नाही. तिथे राहणाऱ्यांच्याच मोटारींची रहदारी. चढण त्रासाची होती. हे लोक मोटारीतूनही कशी सारखी ही चढण पार करत असतील व उतरतही कशी असतील!


अखेर वाटेत तीन चार वेळा प्रत्येक थांब्याला अर्धा एक मिनिट थांबत, ती रम्य आणि मनोहारी चढण पाहात पाहात पठारावर आलो. आणि हे काय आता आलीच की ती कार्लमाॅन्टची शाळा म्हणत पाय एक दो-न करत पडू लागले. डोंगर-चढाच्या चंद्रभागेचा रस्ता चढून-उतरून घरी आलो. एक तास लागला असेल. घाटातली अर्धचंद्राकार वळणाची गल्ली तीच चुला व्हिस्टाचीच; आज दुसऱ्या बाजूने आलो इतकेच.पण शहरातल्या खंडाळ्यातून फिरून आलोय इतका ताजा आनंद झाला!
ल्युनार्डीवरून भर रहदारीच्या नेहमीच्या रस्त्याने घरी सुखरूप आलो.
………………


वरचा संपूर्ण परिच्छेद मी पत्राच्या रूपात मुलांना पाठवला. त्याला काय उत्तर आले आले ते पाहा.
“बाबा, “आज उन्हे उलटण्याच्या ……निघालो” ह्याची काय गरज आहे? साडे चार वाजता निघालो. इतके पुरे.


पुढचे फाटकातून वगैरे कशाला? तुम्ही नेहमी फाटकावरून उड्या मारून बाहेर पडता? “चुला व्हिस्टापाशी आलो. इतके बास.नंतर तुम्ही जावे की न जावे वगैरे लिहिलेय. हॅम्लेटचे नाटक लिहिताय का भूमिका करताय? पुढचे ते देवाचे नाव कशासाठी? फिरायला निघाला होतात का लढाईला? आं?चुला व्हिस्टा तिथला चढ वगैरे अगोदर येऊन गेलंय. पुन्हा ते शिवणाचे टाके घालत काय लिहिलेय! चढ चढत किती वेळा? चढ चढतच जायचा असतो. ते लिहायची आवश्यकता नाही.बरं ते मध्ये स्वल्प वि…. ..का काय ते व्याकरण का आणले? अनावश्यक. आतातुम्ही शहरात राहता. घरे असणारच. बरे डोंगरातल्या रस्त्यावरून जाता आहात. तुम्ही अमेरिकेत असता. तिथे भरपूर झाडी आहे हे इथल्या देगाव-दवंड्यांचे गावच्या लोकांनाही माहित आहे. पुढे रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे काय.? कशासाठी प्रयत्न? आता निघालात ना फिरायला? पुन्हा प्रयत्न कसला? रहदारीचा पण फार वर्दळीचा नाही म्हणजे काय समजायचे वाचणाऱ्यांनी? असे हेही नाही तेही नाही तऱ्हेचे वाचून कुणी तो रस्ता ओलांडून गेला तर काय होईल त्याचे? अहो तुमचे हे पत्र वाचून अमेरिकेतले लोक खटला भरतील तुमच्यावर. तसेच ते पुढचे ‘मोटारीतूनही कशी ही चढण…..असतील’ ह्या वाक्याने वाचकाच्या माहितीत काय भर पडते? कित्येक वर्षे ते असे मोटारीतून जात येत आहेत.ते म्हणतील मोटारवाल्यांनी तुमच्याकडे किंवा सरकारकडे काही तक्रार केलीय का? काहीही लिहायचे आपले!


तुम्ही चालत गेला होता का बसने? मध्येच थांबे कुठून आले? काढून टाका तो सर्व मजकूर. बरं इतका वेळ तुम्हाला हा घाटाचा रस्ता चालवत नव्हता. मग एकदम ती चढण रम्य मनोहारी वगैरे कशी काय झाली?


पुढे, “पाय एक दो… “ लिहिले आहे.परेड करत होता का चालत होता? इतका वेळ एका ओळीतही पाण्याचा ओहोळ राहू द्या थेंबही नव्हता. मग ही डोंगर चढाचीच चंद्रभागा(म्हणजे काय ?!!)कुठून उगम पावली?खोडून टाका ते. बाबा तुम्हाला शाळा तर कधीही आवडत नव्हती. नेहमी ती बुडवत होता तुम्ही. कशाला ती कार्लमाॅन्ट का फाॅन्टची शाळा पाहिजे? बंद करा ती. त्यातही “अर्ध चंद्राकार काय … आज दुसऱ्या बाजूने आलो… “. तुम्हाला कुणा पोलिसाने अडवले होते का काय तिथे? कशाला हवा तो कबुली जबाब.”मी ह्या बाजूने आलो त्या बाजूने गेलो…?” खराय ना. गाळा तो मजकूर. आणि कुणाचा तरी आनंद शिळा असतो का हो? तुमचाच तेव्हढा ताजा? हल्ली काहीही शिळे नसते. बातमी,विनोद सुद्धा. आणि हो! ती ल्युनार्डी म्हणजे काय देऊळ आहे का रेल्वे स्टेशन की पार्क आहे का सरडा? कुणाला माहित आहे ल्युनार्डी? का जगातले कितवे आश्चर्य आहे ती ल्युनार्डी का खोटारडी? नको तिथे भरपूर खुलासेच्या खुलासे, विशेषणांची खैरात आणि ल्युनार्डी जसे काही कोथरुडच्या येनापुरे वडापाववाल्याही माहित अशा पद्धतीने लिहिले आहे. अहो तुमच्या ह्या पत्रापेक्षा मोटारीतला GPS चांगला की. शेवटी, फिरून घरीच येताना नेहमी? आणि सुखरूप ते काय? आजच सुखरूप आलात का? मग ते वाक्य लिहिण्याने विशेष काही सांगितले जाते का?

तुमच्या लक्षात येते का माहित नाही. तुमचे हे संपूर्ण पत्र फक्त दोन शब्दांचे आहे. “ फिरून आलो.”आणि हे शब्द फोनवरूनही पटकन पाठवता आले असते.

मुलांचे हे उत्तर वाचले आणि पत्रकाराची गोष्ट आठवली:-

वृत्तपत्रविद्येच्या वर्गात पत्रकाराने कमीत कमी शब्दात पण आशय तर स्पष्ट व्हावा असे लिहावे ह्यावर भर देत असतात. अशाच एका तासाला निरिक्षक म्हणून काही अनुभवी पत्रकारही आले होते.
प्राध्यापक शिकवत असता त्यांनी एक प्रश्न दिला. एका मच्छिमाराने मासे विकण्यासाठी दुकान टाकले. ताजे मासे विकत होता. चारी बाजूंनी काचा असलेल्या पाण्याच्या पेट्यांत निरनिराळ्या जातींचे मासे ठेवलेले. व्यवस्थित ठेवले होते. आणि दुकानाच्या समोर लोकांना माहिती व्हावी असा एक फलक त्याला ठेवायचा होता. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तो फलक लिहायला सांगितला.

विचारासाठी दिलेला वेळ संपल्यावर एक एक विद्यार्थी येऊन लिहू लागला. कुणी पाच सहा ओळींचा तर कुणी चार ओळींचा काही जणांनी तर कमालच केली. निबंध लिहावा तसे लिहिले. मुले,सर व ते अनुभवी पत्रकार सगळे चर्चा करत ते तपासून दुसऱ्या मुलांना लिहायला सांगत. होता होता एका हुषार विद्यार्थ्याने मात्र फक्त एकच वाक्य लिहिले. सगळे विद्यार्थी एकदम ओह! वाह वा म्हणू लागले. सर व निरीक्षकांचेही समाधान झाले असावे. वाक्य होते:

‘Fresh Fish Are Sold Here’

तरीही सरांनी हे आणखी सुटसुटीत करता येईल का असे अनुभवी निरीक्षक पत्रकारांना विचारले. त्यावर एक पत्रकार फळ्याकडे आले व म्हणाले, “हे बघ तुझ्या दुकानासमोर हा बोर्ड लावणार ना?” “ हो” मग here कशाला हवा? “ असे म्हणत त्यांनी त्यातला तो शब्द काढला. “Fresh Fish are sold “
“ आता पहाare कशाला हवा? तो नसला तरी अर्थ तोच राहतो ना?” “ हो सर. “ त्यांनी are काढून टाकला.

“Fresh Fish sold “

मग ते निरीक्षक म्हणाले, हे पाहा मासे ताजे नसले तर त्याचा कुबट दुर्गंध येतो. तसा वास आला तर कोणी फिरकेल का?” “ नाही सर.” “ हे पाहा तुमचे मासे चांगले ताजे आहेत हे सगळ्यांना दिसते. ताज्या माशांसाठीच लोक येतात. मग fresh शब्द अनावश्यक आहे. हो की नाही?” “ yessSSir!”
“तर आता वाक्य बघा कसे होते ते.”

Fish Sold”.

पुढे त्यांनी विचारले,” तुम्ही मासे लोकांना फुकट वाटायला दुकान टाकले आहे ?
“नाही सर. विकण्यासाठीच टाकले”
“ मग ते Soldकशाला लिहिले?”आता बघा कसे थोड्याच म्हणजे एकाच शब्दात लोकांना समजते ते.”

“FISh”

प्रोफेसरांनी, विद्यार्थ्यानी बाके वाजवली. अनुभवी पत्रकारांनी डस्टर टेबलावर ठेवून विचारले, “हे दुकान मासे विकण्याचेच आहे हेतर स्पष्ट दिसतेय. हो नां ?” सगळेच “होऽऽ ! म्हणाले. मग हा Fish शब्द तरी का हवा? म्हणत त्यांनी तोही खोडून टाकला!

माझ्या मुलांनीही माझ्या पत्राचे अनुभवी पत्रकारासारखेच केलेले संपादन तुम्ही अगोदर वाचलेच. केले. त्यांनी ता.क. लिहिला; तो असा:-


ता.क. बाबा तुम्ही रोजच फिरायला जाता, म्हणून ‘फिरून’ हा शब्द काढून टाका. तुम्ही फिरून आल्यावर पुन्हा ‘आलो’ हे निराळे का सांगायला हवे? तोही शब्द काढून टाका.बघा बरं आता वाचायला किती छान सोपे झाले.


पुन्हा ता.क. लिहू नका!

एक लहानसे चढणे

मी बरेच दिवसांपासून जायचे जायचे म्हणत होतो त्याला आज शनिवारी मुहुर्त लागला. Twin Pines Park मध्ये फिरायला गेलो. घरा जवळ मोठ्या रहदारीच्या रस्त्याला लागून. सतीश म्हणालाच होता की trail फार लहान आहे. त्याचे म्हणणे खरे ठरले. ट्रेल अशी नाहीच. पण ज्येष्ठ वृक्षांची मांदियाळी मन शांत करते. निलगिरी,आणि पाईनची गगनाला भिडताहेत की काय असे वाटायला लावणारी रुंद धडाची झाडे पाहिली की आपण आपोआप गप्प होतो.

हे पार्क नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या व सभागृहाच्या इमारतींमधून शिल्लक राहिलेली जागा वाटते.
पण तिथे म्हाताऱ्या वयस्क नागरिकांसाठी सुसज्ज इमारत आहे. लोकांना लहान प्रमाणावर काही कार्यक्रम करायचे असतील तर त्यासाठीही छोटीश्या दोन इमारती आहेत. एक कला दालन आहे. पार्क मध्ये पिकनिक साठी हिरवळ आहे. तर दोन वेगळ्या जागी मोठ्या शेडस व टेबलांना जोडलेली बाके आहेत. ह्या सर्व गोष्टीभोवती झाडांनी फेर धरलेला असतो! सतीशच्या घरामागील ओढा तिकडेच वाहात येत पुढे जातो. गेला आठवडा पावसाचा होता. त्यामुळे ओढाही थोडा ऐटीत खळाळीची शिटी वाजवत चालला होता.


पार्कमध्ये मोठ्या खडकांवर सुंदर पितळी पाट्यांवर गावातील ज्या लोकांनी नगरसेवक मेयर म्हणून बरीच वर्षे गावासाठी मोठी लोकोपयोगी कामे केली त्यांचा गौरवपर उल्लेखाच्या सन्मानदर्शक प्लेटस आहेत. अशाच एका मोठ्या खडकावर सैनिकांच्या स्मरणार्थ कोरलेले वचन माझ्या पक्के लक्षात राहिले. “All Gave Some. Some Gave All.”

सर्व पार्क मध्ये असतात तशी इथेही काही नागरिकांनी लोकांच्या सोयीसाठी सुंदर बाक वाटेवर ठेवले आहेत. राल्स्टन अॅव्हेन्यूच्या दोन्ही बाजूला उंच टेकड्या आहेत. त्यावर घरेही आहेत आणि भरपूर झाडीही आहे. तर पार्कही एका टेकडीच्या आधारानेच वसले आहे.


एका मोठ्या पिकनिक शेडच्या मागे उंच टेकडीची चढती पाठ आहे. तिच्यावर जायला शाळा काॅलेजच्या मुलांनीच एक दोन पायवाटा केल्या आहेत. आज गर्दी नव्हती. आई वडिलांबरोबर आलेली लहान मुले झोके घसरगुंड्या खेळत होती, तीन चार जोडपी व काही म्हातारे फिरत होती तिथल्या पार्कमध्ये.

मी विचार केला जावे टेकडीवर जेव्हढे जाता येईल तितके.पाऊस पडून गेलेला. खाली पडलेली साचलेली पाने; त्यात भर वरून वाहात आलेली काटक्या पानांची भर पडलेली.पण ही सर्व पावसाने दबलेली. पायवाट ओलसर. पण निघालो. हळू हळू चढत, थांबत वर जात होतो. एक वेळ वर जाईन पण उतरतांना घसरू नये म्हणजे झालं असं स्वत:ला सावध करत जात होतो. मध्ये मध्ये थांबत होतो.पुढे वर, मागे, आजूबाजूला व जिथून आलो तिकडे खाली पाहू लागलो. वर अजूनही झाडातून टेकडी दिसते आहे आणि खाली पाहिले तर ती शेड बाके स्पष्ट दिसत होती! हात्तिच्या! मला वाटत होते की मी पुष्कळ वर आलोय. पुन्हा चढू लागलो. समोर आता वरचे उन्ह दिसत होते. आणखी थोडा वर वर गेलो. टेकडी डोंगराचा माथा जवळच वाटत होता. तरी मीच नको म्हणालो.

आपल्यालाच खालीही उतरायचे आहे. घसरायचे नाही. त्यामुळे असल्या क्षुल्लक पराक्रमाचा मोह टाळून उतरायला सुरवात केली. म्हटले सतीश वगैरे सर्वांच्याबरोबर पुढच्या शनिवार रविवारी पुन्हा येऊ. सगळ्यांबरोबर वर चढून जाऊ. ‘जपून टाक पाऊल जरा’ असे पावलागणिक बजावत हळू हळू पण न घसरता ‘धोपट मार्गा’ न सोडता’ व्यवस्थित खाली आलो!

परत जायला निघालो तर हायस्कूलची वाटणारी चार मुले टेकडीवरच चालली होती. त्यांना विचारले तुम्ही ‘हिल’चढून जाता? टेकडी उतरून पलीकडेही जाता? दोन्ही प्रश्नांना ते होच म्हणाले. रोज जात असावेत.
गावातच, हमरस्त्याच्या बाजूलाच, सुंदर झाडीची हिरवळ असलेले व त्यात लहानशी का होईना trail असलेले निसर्गरम्य ठिकाण पाहिल्यावर मला सुधीरच्या गावातल्या YMC शेजारीच असलेल्या दाट झाडीतील मैल दीड मैलाची रम्य वाट आठवली.हे पार्क हम रस्त्याजवळ असूनही आत आलो की जगाचा संपर्क तुटतो!
मी पार्कमधे आल्यावर काही फोटो काढले.घरून पार्कमध्ये येताना Notredame uni. चे व घरी परत जाताना Ralston Ave चे फोटो घेतले.


मी इतके ड्रामेबाज वर्णन केले पण टेकडी फार तर ४००-५०० फुटापेक्षा थोडी कमी असेल! घराच्या पायऱ्या चढतानाही असावा बरोबर म्हणून झेंडा घेऊनच चढतो. चार पायऱ्यांचा जिना चढून गेलो की मी लगेच झेंडा घेऊन फोटो साठी शेरपा तेनझिंग सारखा उभा राहतो. त्यामुळे दीडदोनशे फूट का होईना टेकडी चढून गेलो;त्याचे एव्हढे नाटक खपून जाईल असे वाटले.त्याचे लिहिणेही केले! चला!एक लहानसे चढणे झाले.