कधी भेटशील

माझे लग्न होउन एकोणीस वर्षे झाली. संसार सुखात चाललाय.बरं, मी काही पत्रकार नाही.शोधपत्रकारिता तर माझा प्रांतही नाही. कुणाच्या प्रेमात पडले आहे,पडायचे आहे; कोणी मित्र, सखा जिवलग शोधायचा आहे असेही नाही. असले काहीही कारण नाही. मला तसा मित्र माझा जिवलग मिळालाही आहे माझा नवरा. मग अजूनही रोज मी वर्तमानपत्रातल्या ‘त्या’ जाहिराती का पहात असते? तो एक माझा जुना छंद आहे. अशा ‘वैयक्तिक’ जाहिरातीतून सामान्य माणसातील दुर्दम्य इच्छा, आशा, स्वप्ने आणि सोशिकतेचे, प्रतिक्षेचे चित्र दिसत असते. माणूस आशेच्या बळावर एखाद्याची वाट पहात असतो की आपले स्वप्न आज ना उद्या पुरे होईल या विश्वासापोटी अशा ‘व्यक्तिगत’ जाहिराती देत असतो.याचे रोज नवीन उत्तर शोधत असते. अनेकांच्या रोजच्या आयुष्यातील नाट्य त्या जाहिरातीतून अनुभवत असते.

माझ्या ओळखीच्या हिला किंवा त्याला ही जाहिरात दाखवली पाहिजे असे वाटते. त्या.ना पोस्ट बॉक्स नंबर देते. पहा ,तिथे उत्तर पाठवा असे कधी त्यांच्या पाठीमागे लागते. पण हे क्वचितच. केवळ कुतुहल आणि त्या ‘जाहिरातींच्या’ हृदयात काय चालले असेल ह्याचा अंदाज बांधणे इतकाच खेळ त्यामागे असतो. पण रोज त्या वाचत असते आणि थोडा वेळ घालवते.

परवा मात्र एका जाहिरातीपाशी थांबले.पुन्हा पुन्हा मी ती वाचत होते. “हे खरे असेल?”, असा विचार वारंवार येत होता. जाहिरातीतील आयर्व्हिंग काय म्हणत होता? “हेन्रीएटा, तुला आठवतय ?आपण १९३८ साली “कॅम्प टर्मिमेंट”मध्ये होतो. तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडलो. अजूनही मी तुला विसरलो नाही. मला फोन कर. आयर्व्हिंग…”त्याने फोन नंबरही दिला होता. सहसा अशा जाहिरातीत बॉक्स नंबर असतो. मला प्रथम ही एक कुणाची तरी चेष्टा, लबाडी असावी किंवा एकूणच ती जाहिरात फसवी आहे असे वाटले.पण दिवसभर आयर्व्हिंगच्या त्या जाहिरातीने माझा पिच्छा सोडला नाही.

“अशा जाहिराती खर्चिक आसतात.उगीच मजेखातर कोण पैसा खर्च करेल?आणि फसवणूक असेल हे तरी कशावरून? अशा उलट सुलट विचारात रात्र गेली. सकाळी ठरवले. खरे काय ते पाहायचे. आपणच फोन करू या असे म्हणत धैर्य एकवटून मी त्या नंबरवर फोन लावला.

एका पुरुषाचा परिपक्व आवाज पलीक्डून ऐकल्यावर लगेच वाटले, सगळे खरे आहे. थोता.ड नाही. त्या माणसाचा आवाज ऐकल्यावर आणि बोलण्याची पद्धत पाहूनच, खरे काय ते सांगून टाकावे असे वाटले. एका क्षणापुरती तरी त्याची अपेक्षा का वाढवायची? “अं… म्हणजे असं आहे…मी हेन्रिएटा नाही. पण तुमची जाहिरात वाचली आणि राहवले नाही. प्रथम मला कुणीतरी कुणाला फसवू पाहतेय असे वाटले. पण तुमचा आवाज ऐकलयावर माझे मत बदलले.तुमची हरकत नसेल तर आणि इच्छा असेल तरच, काय घडले ते सांगाल का?” अतिशय शांतपणे तो आपली कहपडलो. पण तिच्या आइ वडिलाना हे पसंत पडले नाही. इतक्या लहान वयात लग्ना बेडीत तिने अडकून पडू नये असे त्या.ना वाटत होते. त्या.नी तिला दूर युरोपात नातेवाईकांकडे पाठवले. आमची ताटातूट झाली. ती तिकडेच बरीच वर्षे रहात होती. तिथे तिने लग्नही केले. माझा प्रेमभंग झाला होत.

काळाच्या प्रवाहात माझेही लग्न झाले. आमचा संसार नीट नेटका चालला होता. माझी बायको चांगली होती. ज्या उत्कटतेने मी हेन्रिएटावर प्रेम केले तसे प्रेम काही मी बायकोवर करू शकलो नाही. पण आमचा संसार चारचौघांसारखा आनंदाचा होता. माझी पत्नी तीन चार वर्षांपूर्वी वारली. मी एकटा,एकाकी पडलो. हेन्रिएटाची फार आठवण होवू लागली. पण असेही वाटयचे ती अजून असेल का? आणि असली तर अजून तिचा संसारही चालू असेल. तीही एकटीच असेल असे कशावरून? पुन्हा तिची आणि माझी भेट होईल का? आणि ती कुठे असेल? असे माझ्या मनात सारखे येते. माझा मूर्खपणाही असेल पण हेन्रिएटा भेटावी ही तर तीव्र इच्छा आहे. काय होईल ते होवो. प्रयत्न तरी करून पहावा म्हणून मी अखेर जाहिरात दिली. हेन्रिएटा जाहिरात वाचेल अशी वेडी आशा बाळगून आहे. किंवा तिच्या ओळखीच्या कुणीतरी जाहिरात पाहिली तरी तिला कळेल. शक्यता फार कमी आहे. एक प्रयत्न केलाय. बघू या, कधी भेटेल ती.”

अशा असफळ प्रेमकथा आणखीही असतील. प्रेमभंगाचे, विरहाचे दु:ख हृदयात जपून ठेवत किती तरी हृदये अमर आशेवर वाट बघत दिवस काढत असतील. असे बरेच काही माझ्या मनात घोळत होते. आशेची अमरवेल हृदयात जपत सत्तर वर्षाचा आयर्व्हिंग एकाकी दिवस काढतोय हे माझ्या मनात सारखे यायचे. त्याच्याविषयी आस्था वाटू लागली.

आयर्व्हिंगचा नंबर माझ्यापाशी होताच. मी महिन्याभरात एक डोनद त्याच्याशी बोलले. पण बिचाऱ्याला अजूनही हेन्रिएटाचा फोन आला नव्हता. अशी दोन वर्षे गेली.

मी न्यूयॉर्कच्या सबवेतून जात होते. नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रातील ‘व्यक्तिगत’ स्तंभातील जाहिराती वाचण्यात गुंग होते. माझ्या जवळून कोणी हसल्याचा आवाज आला. शेजारीच बसलेल्या बाई हसत म्हणाल्या,”काय स्वत:साठी स्थळं पाहतेस वाटतं?” मी एकदम हसले,”तसं काही नाही. माझी ही सवय आहे. नेहमी वाचते ह्या.” त्म्ही कधी वाचता की नाही?” “नाही, अजिबात नाही. काही जाहिराती तर फार रडवेल्या असतात. मला तसले काही आवडत नाही. त्याच गोष्टीविषयी अनेकांची निराळी दृष्टी असते.खरं की नाही?” मला बाईंचे म्हणणेथोडे पटले. खरे आहे तुम्ही म्हणता ते.”मी म्हणाले आणि मी दोन अडीच वर्षंपूर्वी ऐकलेली, माहित असलेली आयर्व्हिंग आणि हेन्रिएटाची हळूवार प्रेम कहाणी सांगू लागले.

त्यांची प्रेमकथा, आयर्व्हिंगची हेन्रिएटाला भेटण्याची ‘भेटीलागी जीवा’ तळमळ ती बाईसुद्धा मंत्रमुग्ध होउन ऐकत होती. सांगून झाल्यावर मी म्हणाले,” आयर्व्हिंगला हेन्रिएटा भेटली असा गोड शेवट सांगायला मी फार आतुर आहे. पण हेन्रिएटा काही त्याला अजून भेटली नाही.” असे मी खिन्नपणे म्हणाले. पुढे मीच म्ह्णाले,”मला वाटते हेन्रिएटा आपल्या संसारात गुंतली असेल.किंवा ती या जगात असेल की नाही याची खात्री कोण देणार/? किंवा ती जाहिराती पहातही नसेल. काय सांगावे! ती बाई म्हणाली,”तुझा तिसरा अंदाजच खरा आहे. माझ्यावर विश्वास ठेव,”ती बाई माझा हात थोपटत म्हणत पुढे हळूच तिने विचारले,”आयर्व्हिंगचा नंबर देतेस का मला?”

वाटेवरचे दिवे

आदित्य आणि यश  मला  कधी  कधी  पुस्तक-खुणा  देत  असत.  त्यानंतर सोनियाही देऊ लागली. तिच्या अशा पट्टया विविध तऱ्हेनी सजवलेल्या असत. रंग, मखमल, चमकी वापरून सोनिया त्या करीत असे. दुकानातही, पुस्तकांबरोबर अशा पुस्तक खुणेच्या पट्टया देतात. बहुधा त्यावर  पुस्तके, वाचन वाचनाची महत्ता पटविणारी   थोरा  -मोठ्यांची वचने  असतात .  विनोदातून गर्भित, सूचक इशारा देणारीही काही असत. कथा-कादंबऱ्या -चरित्रांवरून अनेक चित्रपट निघतात . त्या संदर्भातील पुस्तक-खुणेची ही  पट्टी मिस्कीलपणे मला बजावत होती,”Don’t judge a book by its movie .”

परमेश्वराच्या निर्मिती सामर्थ्याचे वर्णन करणारे , शब्दाचा गौरव करणारे बायबलमधील ” In the beginning was the Word, and the word was with with God , and the Word was God .”  हे बायबलमधील वचन आपल्याला माहित आहे. एक पुस्तक-खुणेची पट्टी, त्याच श्रेणीत शोभणारा शब्द सांगत होती – READ.  सृष्टी निर्मितीतील पहिला शब्द ‘आवाज’च होता. तो पहिला हुंकार पहिल्या माणसाने ऐकल्यावर, तो त्याचाही असेल, तो उच्चारल्यावर, तो भयचकित आश्चर्यचकित आणि तितकाच आनंदितही झाला असेल! त्या पुस्तक-खुणेच्या पट्टीवरील ठळक अक्षरातील READ  वाचल्यावरही वाचकाला तसेच वाटले असणार.  READ-वाच-  ह्या एका शब्दापासून स्फूर्ती घेऊन माणसाने केव्हढी प्रचंड प्रगती केली आहे!

READ  हा आदेशात्मक शब्द वाचल्यावर मला मुहम्मद पैगंबराच्या आयुष्यातली त्या प्रसंगाची आठवण झाली . मुहंम्मद पैगंबर एकदा स्वस्थ, स्वस्थचित्त बसला असता त्याच्या मनावकाशातून  त्याला धीर गंभीर आवाजात “म्हण” अशी आज्ञा झाली . हा काय प्रकार आहे हे त्याला प्रथम समजेना . तो पहिल्यांदा भ्याला; नंतर चकित झाला . “हं , म्हण”, “कर सुरवात” असे पुन्हा त्याला ऐकू आले. प्रथम तो अडखळत , चाचरत म्हणू लागला . मग हळू हळू, त्याच्या न कळत तो नीट  म्हणत  गेला .  तो जे म्हणत होता तेच आजचे कुराण  होय !     पुस्तक-खुणेच्या पट्टीवरील READ  हा शब्दही आपल्याला त्याच तोलामोलाची अपौरुषेय आज्ञा आहे !

ह्या पट्ट्यांवरून मला शाळा-कॉलेजात असताना  (कधीतरी)  अभ्यास करताना आपणही पुस्तकात खुणा करत होतो याची आठवण झाली. अनुक्रमणिकेत काही धड्यांवर, काही पानांवर काही ना  काही खुणा करत असे. काही ओळी कंसात तर काही चौकोनी कंसांच्या कोंदणात बसवत असे. तर कधी एखाद्या परीचछेदाशेजारी उभी रेघ काढून बाजूला IMP  लिहून ठेवित असे. कधी एक दोन ओळीखाली रेघा मारायच्या. परीक्षेच्या अखेरच्या क्षणी तयारीच्या वेळी ह्या खुणा उपयोगी पडत.  ह्या खुणा अभ्यासाच्या वाटेवरील दिवेच होते .

पुस्तक-खुणेच्या ह्या पट्टया (bookmarks) , पुस्तकात केलेल्या ह्या उणाखुणांवरून ती. अण्णांच्या अनेक पुस्तकांतील, विशेषत: दोन ग्रंथराज, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ह्यांची आठवण झाली . हजारो ओव्यांचे  हे ग्रंथ म्हणजे मराठीचे ऐश्वर्य आहे . ही  दोन्ही पुस्तके वाचताना , अण्णांनी खुणा केलेल्या , ओव्यांखाली  ओढलेल्या कडक-सरळ, सुंदर रेघा, समासात त्यांनी दिलेले संदर्भ, शब्दार्थ हे सर्व माझ्यासाठी वाचन किती सहज सोपे करीत होत्या ! अडखळणे नाही की वाट चुकणे नाही ! एखादे प्रसंगी अण्णा  ज्ञानेश्वरीतील त्यांना आवडलेल्या ‘मन हे मीच करी’ किंवा ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी  घातले ‘ ह्या ओव्यांविषयी सांगत. किंवा ‘ God is Imagination ‘  ह्या विवेकानंदांच्या  वचनाचा  गूढार्थ स्पष्ट करण्याच्या ओघात ते एकनाथांच्या भागवतावरील भावार्थ टीकेतील  ‘ मन हेच सुखदु:खाचे कारण ।’ ‘मनकल्पित संसार जाण । मन कल्पिले जन्म मरण ।’ अशा काही ओव्या सांगून त्याचे विवरण करीत. एखादे वेळी अनन्यता. मनाची एकाग्रता किती पराकोटीची असावी ह्या संबंधातील एकनाथ महाराजांनी दिलेला दृष्टान्त  ‘परदेशी गेला बहुतकाळ  भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके कांता । तैशिया अति एकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ।।’ ही  भिक्षुगीतेचे महत्व पटविणारी ओवीही ऐकवीत .

त्यावेळी आम्हाला अण्णा  असे जे काही सांगत ते डोक्यावरून जात असे . त्यांचे सांगणे उत्तम असे पण आमच्या डोक्यात काही ते शिरत नसे. मनापासून फारसे लक्षही नसे. कारण हा विषय समजण्याचे  त्यात रस असण्याचे, घेण्याचे आमचे वयच नव्हते .

मन लावून, रस घेऊन ऐकले नसले तरी अण्णा सांगत त्यातील काही शब्दकण कर्णरन्ध्रातल्या कर्मतंतूनी अडवून ठेवले असावेत . मेंदूतील आठवणींच्या कप्प्यात ते कुठेतरी पहुडले असले पाहिजेत .आज ज्ञानेश्वरी  किंवा एकादश स्कंधातील ओव्या वाचताक्षणी अण्णा  जे सांगत ते त्यांचे सुंदर भाष्य होते ; त्यांचे ते सांगणे म्हणजे त्यांचे ते एक एक  निरूपणच होते; व्याख्याने होती ह्याची तीव्रतेने जाणीव होते . मी ग्रंथ बंद करतो. डोळे  मिटून घेतो . स्वस्थचित्त होण्याचा प्रयत्न करतो. पण गळा दाटून यायचा तो येतोच .

तर पुस्तकातील अशा खुणा म्हणजे माझ्यासाठी वाटेवरचे दिवे होतात. आकाशातील तारे होतात. आणि माझ्या वाचनाची लहानशी वाटचाल राजमार्गावरून होऊ लागते .

तत्वज्ञान जगणारा नाटककार

माझ्या थोरल्या भावाने संशय कल्लोळ नाटकात फाल्गुनरावाचे आणि चुलत भावाने भादव्याचे काम केले होते. दोघांनीही आपल्या भूमिका उत्कृष्ठ वठवल्या होत्या. कवडी चुंबक नाटकाचा एक प्रयोग एकदम आगळ्या वेगळ्या कलावंतांनी केला होता . कवडी चुंबकाच्या त्या प्रयोगात प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकारांनी भूमिका केल्या होत्या. त्यात आचार्य अत्रे ह्यांनी मुख्य भूमिका केली होती! खुद्द कवडी चुंबक चिक्कू शेठजीचे पात्र अत्र्यांनी रंगवले होते. प्रयोग अर्थातच खूप गाजला.

मोलीयेविषयी वाचत असताना हे दोन्ही प्रयोग डोळ्यांसमोर आले .

“हस्तलिखिते जळून नष्ट होत नसतात ” असे मिखाइल बुल्गाकोव्ह ने त्याचे ‘द मास्टर and मार्गारिटा” ह्या पुस्तकात म्हटले आहे. पण तो ज्याचा चाहता होता, ज्याचे त्याने “The Life of Monsieur de Moliere” हे चरित्र लिहिले त्या मोलीयेची अनेक पत्रे, काही अप्रसिद्ध लिखाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले !इतकेच नव्हे मोलीयेचे अतिशय उत्कृष्ट गणले गेलेले अखेरचे पुस्तक L’Homme du Courही जळून भस्मसात झाले.

मोलिये हा फ्रेंच नाटककार, लेखक होता . तो इ.स. १६२२ साली जन्मला. आणि वयाच्या ५१ व्या वर्षी इ.स. १६७३ साली मरण पावला . त्याचे खरे नाव Jean-Baptiste Poquelin पण तो मोलिये या त्याच्या साहित्यिक नावानेच अजरामर आहे. जसे मार्क ट्वेन ओ हेन्री हे त्यांच्या टोपण नावानेच ओळखले जातात!

मोलिये हा अत्यंत यशस्वी नाटककार होता. त्याची नाटके सामाजिक दंभावर व्यक्तींच्या विक्षिप्तपणावर, लोभ-लालसा यावर हसत खेळत विनोदात टीका करणारी आहेत. विनोदी संवाद आणि उपरोधातून त्यातील विसंगती, हलकेच खेळकर शैलीत उलगडून दाखवणारी असल्यामुळे त्याची नाटके लोकप्रिय झाली. त्यातील प्रासंगिक नाट्यमय घटना आणि त्यातून निर्माण झालेले विनोदी प्रसंग यांनी ती नटलेली असत.

अनेकांप्रमाणे मोलीयेलाही आपण नट व्हावेसे वाटत होते . तो रंगमंचावरही आला . पण एक अडचण होती. मोलिये तोतरा होता प्रेक्षकांनी त्याची हुर्यो केली. त्याला शहाणपण सुचले. तो आपल्या ताकदीच्या, खऱ्या प्रांताकडे वळला. मोलिये लेखक झाला. नुसता साधारण नाही तर यशस्वी , लोकप्रिय प्रसिद्ध नाटककार म्हणून गाजला.

मोलीयेने स्वतची नाटक कंपनी काढली. त्याने ती चांगली चालविली.पण काही काळात अशी परिस्थिती आली कीं त्याची नाटक कंपनी बुडाली. मोलिये रस्त्यावर आला. पण त्यातूनही तो बाहेर येऊन चिकाटीने पुन्हा उभा राहिला. यश त्याच्याकडे पुन्हा आपसुख आले. मोलीयेला समृद्धी आली. मोलीयेवर प्रेक्षकच नव्हे तर राजघराण्यातील मंडळीही खूष होती.

असा हा मोलिये मोठा नशीबवान म्हणायला हवा. एकदा त्याच्या काही विधानांनी त्याला लोकक्षोभाला तोंड द्यावे लागले. पण त्यातूनही तो आपल्या बुद्धिबळावर बाहेर आला. अनुकूल -प्रतिकूल परिस्थितीचे हेलकावे खात असतानाही त्याच्या यशाचा झोका उंचच जात होता. पण यामागे केवळ त्याच्या नशिबाचा भाग नव्हता . त्याचे स्वभाव वैशिष्ठ्य म्हणजे अडचणींना संकटांना फजितीला तोंड द्यावे लागले तेव्हा त्यावर तो आपल्या विनोद-बुद्धीच्या जोरावर मात करू शकला. अडचणी-संकटाचे त्याने हसतमुखाने आणि बुद्धीच्या जोरावर संधी मध्ये रुपांतर केले. टीकेचे घावही त्याच्यासाठी फुलांचे हार होत असत.

ह्यामागे होता तो त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन; हेच त्याच्या आनंददायी विनोद-प्रचुर लिखाणाचेही मुख्य गमक होते. माणसांच्या दुर्गुणा कडेही तो त्यांच्या चुका, गफलती असे समजून पाहत असे . गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या घटनाही हास्यकल्लोळात बुडवून त्या एकदम हलक्या फुलक्या करणाऱ्या विनोदी माणसाने-लेखकाने चिमटे काढले तरी कोणी फारसे ओरडत नाही . ओरडले तरी त्यातून ते नकळत काही तरी शिकतात, धडे घेतात .

मोलीयेच्या या स्वभावविशेषा मागे त्याच्यावर असणाऱ्या ऱोमन तत्वज्ञानी ल्युक्रेशसचा मोठा प्रभाव ! त्याकाळच्या विद्यार्थ्यांना तत्वज्ञानी ल्युक्रेशस वाचावा लागे. ल्युक्रेशसच्या मते,” देव ही संकल्पना अनावश्यक आहे. माणसाचे दोष, त्याच्या चुका घोडचुका हीच त्याला मोठी शिक्षा आहे. परिस्थिती विरुद्ध तक्रारी न करता, कुरकुरत न बसता आपण पुढे जावे. दुख: टाळावे. त्यावर अति कुढत बसू नये. आनंद आपणहून आपल्याकडे येतो ” असे त्याचे तत्वज्ञान थोडक्यात सांगता येईलस्वर्गाचे अस्तित्व न मानणाऱ्या ल्युक्रेशसच्या जीवन दृष्टीने स्वर्ग नसतानाही इथेच आनंद, सुख मिळवता येते.

मोलीयेवर ल्युक्रेशसचा मोठा प्रभाव होता यात शंका नाही. मोलिये ह्या तत्वज्ञानानुसार जगला.

मोलीयेने ल्युक्रेशसच्या लाटिन ग्रंथाचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले होते . १८६१ साली ते पसिद्ध करू असे तो म्हणत होता पण ते काही प्रसिद्ध झाले नाही !ख्रि.पू. ९८ साली जन्मलेल्या ल्युक्रेशसचे On Nature of the Universe/things हे एक दीर्घ काव्य आहे. त्याने आपल्या मृत्युच्या आधी हे लिहिले तो त्याकाळी देव-धर्माविषयी अश्रद्ध,समजला जात होता. तो ख्रि.पू. ५५ साली वारला.
मोठ्या दु:खाची आणि विचित्र गोष्ट अशी की तत्वज्ञानी ल्युक्रेशसला आपल्या विचारांमुळे एखादे संकट येणार याची खात्री होती. त्यासंबंधात त्याला माहितीही झाली असावी. पण त्या येणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी, त्याचे परिणाम टाळण्यासाठी, या तत्वज्ञानी ल्युक्रेशसने आत्महत्या केली !

मोलिये मात्र कुणीही आपल्या आयुष्याचा असा शेवट करण्याच्या ठाम विरोधी होता. मोलीयेचे आयुष्य हे,बऱ्याच अंशी, ल्युक्रेशसच्या तत्वज्ञानाचा वस्तुपाठच होता. तो संकटाने डगमगला नाही .दु:खात कुढत बसला नाही.

मोलीयेने लिहीलेल्या नाटकांपैकी रंगभूमीवर यशस्वी ठरलेली काही नाटके The Miser, The School for Lovers, Le Misanthrope ही होत. मराठी वाचक-प्रेक्षकांना मोलिये जवळचा वाटतो कारण त्याची दोन नाटके, मोलिये इतक्याच प्रतिभावंत अशा दोन मातब्बर मराठी नाटककारांनी मराठीत आणली. ती सुद्धा मराठी रंगभूमीवर गाजली. ह्या दोन्ही नाटकानी मराठी प्रेक्षकांना मनमुराद हसवले. गो. ब. देवल यांचे संशय कल्लोळ आणि आचार्य अत्र्यांचे कवडी चुंबक. ही नाटके पहाताना वाचताना ती रुपांतरीत आहेत असे क्षणभरही जाणवत नाही. इतकी ती स्वतंत्र मराठी नाटके वाटतात. संशय कल्लोळचे एक लहानसे वैशिष्ठ्य आहे. यातील मुख्य पुरुष पात्रांची नावे मराठी महिन्यांची आहेत.फाल्गुनराव, वैशाखशेठ आणि भादव्या. स्त्री पात्रांची नावे रेवती कृत्तिका अशा नक्षत्रांची आहेत.

देवलांनी तर त्या काळच्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन संशय कल्लोळ संगीत नाटक केले.त्यातली “कर हा करी धरिला शुभांगी” ह्या सारखी गाणी अजूनही कार्यक्रमात म्हटली जातात अत्र्यांच्या कवडी चुन्बकात नायक-नायिकेच्या नावांभोवती एक सुगंधी परिमल दरवळतो! कारण त्यांची नावे! केशर आणि कस्तुरी ! आचार्य अत्र्यांचे कवडी चुंबक आताही रंगभूमीवर आले तर आजही संपूर्ण नाट्यगृह सतत हसत राहील !

शब्दब्रम्हाचा किमयागार

मला डॉल्बी म्हणजे काय हे बरेच दिवस माहित नव्हते. चार पाच शब्ब्दांची पहिली अक्षरे घेऊन हा शब्द झाला असावा असे वाटे .नंतर डॉल्बी साउण्ड, डॉल्बी Surround, Dolby Atoms हेही फक्त ऐकून, वाचून माहित झाले. पण म्हणजे नेमके काय ते लक्षात येत नव्हते.

मागच्या महिन्यात गुरुवारी १३ सप्टेंबरला रे डॉल्बी यांचे निधन झाले.तेव्हा डॉल्बी म्हणजे Dolby Sound System आहे आणि रे डॉल्बी हा तिचा जनक हे मला समजले.

गेल्या काही दशकापासून चित्रपटातच नव्हे तर सर्व ध्वनि साधनांत Dolby ध्वनि तंत्रच वापरले जाते. डॉल्बीच्या यशाला सीमा नाहीत. डॉल्बी तंत्र आज ७ . ४ बिलियन्स (अब्ज) इलेक्ट्रिक साधनांत वापरले जात आहे !

जे ऐकून, वाचून माहित होते ते थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिल्यावर डॉल्बी ही काय चीज आहे ते जाणवले. डॉल्बी म्हणजे आवाज स्पष्टापेक्षाही सुस्पष्ट करणारी, आवाज निर्भेळ स्वरूपात ऐकायला देणारी डॉल्बी सिस्टिम. म्हणजे ध्वनि-पद्धती. पण हे भाषांतर झाले. चित्रपट पहाताना आवाजातून उमटणाऱ्या भाव-भावना आणि अभिनयही जाणवू लागल्यावर डॉल्बी साउण्ड सिस्टीम ही केवळ ध्वनि -पद्धत नसून शरीरातील मज्जा-संस्था, श्वसन-संस्थेसारखीच ती आपल्या देहातील ध्वनि संस्थाच झालेली असते ! परवाच Gravity हा चित्रपट पाहिला तेव्हा आवाजाच्या सामर्थ्याचा पुन:-प्रत्यय आला .

डॉल्बीने आवाजातील धिस्स, हिस्स , खर्र खर्र वगैरे गोंगाट (chaos, static sound) असतात ते पूर्णतया काढून टाकले. एवढेच नव्हे तर ध्वनीच्या सर्व लहान मोठया, परमाणु इतक्या सूक्ष्म पैलूंचा विचार करून ध्वनीला नियमित, नियंत्रित करता येणे त्याने आपल्या तंत्राने शक्य केले. डॉल्बी तंत्रामुळे आवाजाचा हवा तो नेमका परिणाम साधता येतो. एका अर्थाने डॉल्बी तंत्राने ध्वनीला सगुण मूर्त रूप दिले! विश्वास बसणार नाही पण गेल्या २५-३० वर्षांपासून डॉल्बी तंत्राने आणलेल्या नित्य नव्या शोधांनी आपण ऐकावे कसे हे ठरवून दिले! सिनेमा नाटकाचे प्रेक्षकच नाही तर इतर अनेक गोष्टींचे श्रोते ऐकणाऱ्या विषयाशी केवळ आवाजामुळे समरस होतात. म्हणूनच Star Warsचा जनक जॉर्ज ल्युकास डॉल्बी पद्धतीचा आणि तिचा निर्माता रे डॉल्बीचा गौरव करताना म्हणतो, “Star Warsशी प्रेक्षक इतके तन्मय होतात त्याचे रहस्य डॉल्बीच्या आवाजाच्या शक्तीत आहे ! रे डॉल्बी आवाजाशीच पूर्णपणे मिसळून जातो इतकी त्याला ध्वनी या विषयाची तीव्र आवड आहे. नुसती आवडच नव्हे तर ध्वनी विज्ञानचा एकूणच तो एकदम ‘दादा’ आहे; ‘बापमाणूस’ आहे हो तो!’

रे डॉल्बी रेडवूड सिटी मधील सिकोइया हायस्कूलमध्ये शिकला. ८-९वीत असल्यापासून त्याने संगीताच्या चुंबकीय फितीवर होणाऱ्या ध्वनि मुद्रणात सुधारणा करण्यास सुरुवात केली .हायस्कूलमध्ये असतानाच रेडवूड सिटी इथल्याच Ampex कंपनीत तो तंत्रज्ञ म्हणून काम करत होत. मग त्याने स्टन्फ़र्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला . त्या काळात तो Ampex कंपनीत Chief Designing Engineer या पदावर पोचला होता.! १९५७ साली तो Stanford University तून इले. इंजिनिअर होऊन बाहेर पडला . पण त्याआधीच १९५६ साली बाजारात आलेल्या Video audio Recorderमधील सर्व इलेक्ट्रोनिक भागांची आखणी आणि रचना रे डॉल्बीनेच केली होती. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या केम्ब्रिजमधून क्ष-किरणांच्या दीर्घ लहरींचे सूक्ष्म विश्लेषण यावर डॉक्टरेट मिळवली. १९६३ ते १९६५ तो हिंदुस्थानात सरकारचा तंत्रज्ञान विज्ञानाचा सल्लागार होता.

डॉल्बीने आपली कंपनी स्थापन केली. Dolby, In Dolby, Dolby Surround , किंवा अगदी अलीकडे Dolby Atoms अशी अक्षरे दिसली की प्रेक्षकांना आपल्याला आज जबरदस्त ऐकायला मिळणार याची खात्री असते. “आज सिलिकॉन व्हली नाव सर्वतोमुखी आहे. पण त्या अगोदर कितीतरी वर्षे सर्व जगाला Digitalचा अनुभव, आनंद डॉल्बी देत होता” असे ज्याच्या Right Stuff या चित्रपटाला चार ऑस्कर मिळाली तो, १३ चित्रपटांचा दिग्दर्शक फिलिप कॉफमन म्हणतो ते निर्विवाद सत्य आहे. रे डॉल्बीचे मोठेपण यात आहे.

Invasion of the Body Snatchers चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तर “डॉल्बी आवाज” हाच एका दृश्याचा प्राण कल्पून; “आवाज” हेच मुख्य पात्र कल्पून त्या संपूर्ण दृश्याचे चित्रण केले.

ब्रॉडवेच्या बोगद्यातून मोटार-सायकली आणि मोटारी जात आहेत असे ते दृश्य होते प्रेक्षकांना ते ‘ दृश्य’ ऐकून’ आपण बोगद्यातच आहोत; आपल्या पुढून, मागून ,आजूबाजूने मोटारी, मोटार-सायकली रोंरावत,घोंघावत भरधाव वेगाने जात आहेत असे वाटत होते.

‘डॉल्बी’च्या चित्रपटात प्रेक्षक ‘प्रेक्षक’ न राहता श्रवणकुमारच होतत. डॉल्बीने आपण पूर्ण वेढलेले असतो. व्याप्त झालेले असतो. डॉल्बी आवाज कानापुरातच मर्यादित नसतो. सर्वांगाला व्यापून टाकतो. हृदयाचे ठोके चुकतात. छाती धडधडते. थिएटरभर डॉल्बीची हुकमत असते.’ डॉल्बी’ कानातच नसतो. शरीरात संचारत असतो. इतर आवाज श्रुती तर ‘डॉल्बी’ अनुभूती असते!

ह्याच फिलिप कॉफमनने डॉल्बी धडाक्याचा एक गंमतीदार किस्सा सांगितला.” Right Stuffचा खेळ सुरु होण्यापूर्वी मी ऑपरेटरला जाऊन सांगितले आज माझ्या शेजारी हेन्री किसिंजर (हे अमेरिकेचे गाजलेले परराष्ट्र मंत्री) आहेत. रॉकेट सोडण्याचे दृश्य पहाताना किसिंजरना घाम फुटला पहिजे. चेहरा हनुवटीसकट थरथरला पाहिजे”. आणि ऑपरेटरनेही त्याच धडाक्याने रॉकेटस सोडली!

रे डॉल्बी केवळ बुद्धिवान संशोधक, यशस्वी उद्योजक नव्हता. मोठा हौशी होता . त्याने जगण्याचा चौफेर आनंद घेतला.

डॉल्बीला मोटर आणि मोटार सायकलीची फार आवड होती. इंग्लंडमध्ये असताना त्याने मोटरसायकलीवरून बरेच वेळा युरोप पालथा घातला होता. हिंदुस्तानातील आपला कार्यकाळ आटोपल्यावर तो इंग्लंडमध्ये आला. तेव्हा बायकोला बरोबर घेऊन त्याने मोटारीतून युरोपची सफर केली. मोटरच काय डॉल्बी विमानही चालवायचा. त्याचे स्वत:चे सेसना-सायटेशन १२ विमान होते. हा बहाद्दर अमेरिकेतल्या पन्नास राज्यात आणि तीस देशात हे विमान स्वत: चालवून गेला अहे. सतरा वेळा स्वत: विमान चालवत अटलन्टिक महासागर ओलांडला आहे!

Rock Bandची बस असते तशी रंगीबेरंगी चाळीस फुटी बस त्याने करवून घेतली. ह्या बसमधून बायको मुले नातवंडांसह सहली-प्रवासाचा आनंद उपभोगला.

डॉल्बी इंग्लंडमध्ये असताना तिथेच भेटलेली विद्यार्थिनी Dagmarशी त्याचे लग्न झले.त्या दिवसांपासून ही दोघे सदैव जोडीनेच राहिली. कुठल्याही सभा-संमेलनाला, सिनेमा-नाटकाला किंवा पार्ट्या-उत्सवाला दोघेही एकत्रच असायचे. त्यांना लोकांनी कधी एकेकटे असे पाहिलेच नाही. दोघे असूनही त्यांची एकच सावली पडायची!

प्रत्येकाला आपले आयुष्य जसे असावे, लाभावे असे वाटते तसे आयुष्य रे डॉल्बी यांना लाभले.

१९९७ साली रे डॉल्बी यांना त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते National Medal of Technology and Innovation हे मानाचे पदक मिळाले. त्यावेळी डॉल्बी यांनी अत्यंत साध्या शब्दांत जे सांगितले ते लाख मोलाचे आहे. त्यांत त्यांची शालीनातही दिसून येते. ते म्हणतात , “आयुष्याचा पहिला भाग शिक्षणाचा, शिकण्याचा असतो. दुसरा भाग कष्ट आणि मेहनतीचा असतो. आणि मग मग तुम्ही लोकांसमोर येता. आणि लोक तुम्हाला मान-सन्मानाची पदके देऊ लागतात.”

चित्रपटाचे प्रेक्षक संगीतासाठी, कधी आपल्या हृदयाची धडकन असणाऱ्या नटीसाठी, आवडत्या नायकासाठी चित्रपट पहायला गर्दी करतात. पण ‘जिवंत’ आवाजाने घाबरण्यासाठी, चित्त थरारण्यासाठी, हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या भरधाव वाहनांच्या आवाजासाठी, पानांची सळसळ ऐकताना कावरेबावरे होण्यासाठी, चालताना पाचोळ्याचा आवाज ऐकताच एकदम मागे वळून पाहण्यासाठी, मध्येच पक्षी चित्कारत गेला की… पुढे काय… अशा उत्कन्ठ्तेने प्राण कंठात आणणाऱ्या अनुभवासाठी लोकांना चित्रपटाला खेचून आणणाऱ्या ‘डॉल्बी आवाजाला’ तेव्हढ्याच ताकदीचा ‘प्रमुख कलाकार’ बनविणाऱ्या रे डॉल्बीने आवाजाच्या प्रदेशात क्रांती केली यात शंका नाही.

संस्कृतात ‘शब्द’ म्हणजे ध्वनि, आवाज असा अर्थ आहे. डॉल्बी पद्धतीमुळे सर्व सामान्य माणसांना या शब्दब्रम्हाचा साक्षात्कार होऊ शकतो याचे श्रेय रे डॉल्बी या ‘शब्दब्रम्हाच्या किमयागाराला ‘ आहे.

आयुष्यात सर्व राजयोग लाभलेल्या रे डॉल्बी नावाच्या एका बुद्धिमान कुटुंबवत्सल यशस्वी उद्योजकाच्या आयुष्याची कहाणी गुरुवार ता. १३ सप्टेंबर रोजी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.

हेमिंग्वे

हेमिंग्वेची बायको स्वित्झर्लंडहून परत आली ती फक्त हातातल्या एका लहानशा बेगेनिशी ! हेमिंग्वेने काही विचारण्या अगोदरच तिने इतर सर्व बेगा सामान-सुमान चोरीला गेल्याचे सांगितले. हेमिंग्वेच्या तोंडून एक शब्द फुटेना.

१९२२ साली हेमिंग्वेची बायको Hadley आपल्या भल्या मोठ्या बगासह स्वित्झर्लंडला चालली होती. एका बेगेत हेमिंग्वेने लिहिलेले सर्व लिखाण होते. इतर सामानाबरोबर ती ट्रंकही चोरीला गेली ! उमेदीच्या वर्षांत केलेले सगळे लेखन गेले. ही घटना त्याच्या मनात कायमचे घर करून राहिली .

Ezra Pound आणि Gertrude Stein ह्या सारख्या त्याच्या मित्र-मैत्रिणीने त्यावेळी हेमिंग्वेला धीर दिला. “जे काही लिहिले होतेस ते विसरून जा. पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात कर.” असा मोलाचा सल्लाही दिला.

आपले सर्व लिखाण चोरीला गेल्याचे बायकोकडून समजल्यावर हेमिंग्वेला राहवेना. तो लगेच पुन्हा स्वित्झर्लंडच्या प्रवासाला निघाला. त्याने वाटेत ठिकठिकाणी कसून चौकशी केली. तपास केला. पण त्याच्या हाती काही लागले नाही. आपण लिहिलेला कागदाचा कपटा न कपटानाहीसा झाला याची पुरती खात्री पटल्यावर तो परत आला.

“घरी परत आल्यावर मी काय केले ते मला चांगले आठवते ” असे हेमिंग्वे म्हणतो पण त्याने काय केले ते मात्र कुठेही लिहिले नाही. तो संतापाने चिडला, चडफडला की त्याने राग दुसऱ्यांवर काढला; का निराश होऊन तो सुन्न बसून राहिला; मनाला बसलेला धक्का, दु:ख त्याने दारूच्या पेल्यामागून पेल्यांत बुडवले किंवा दु:खाने रडला, आक्रोश केला ते कुणालाच समजणार नाही.

खूप वर्षानंतर ह्याविषयी तो म्हणाला,”मेंदूची शस्त्रक्रिया करून ती आठवण नष्ट करता येणार असती तर तशी शस्त्रक्रियाही मी करून घेतली असती.”
वाचकांचे दैव बलवत्तर म्हणून हेमिंग्वेने आपल्या हितचिंतक मित्रांनी दिलेला सल्ला ऐकला . नव्या हुरुपाने त्याने पुन्हा लिहायला सुरवात केली.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. तसे लेखकाच्या प्रतिभेच्या पाऊलखुणा शाळेच्या नियतकालिकात दिसत असाव्यात . हेमिंग्वे हायस्कूलमध्ये असताना शाळेच्या नियतकालिकाचा आणि वार्तापत्राचा तो लेखक आणि संपादकही होता. शाळेतून बाहेर पडल्यावर त्याने काही दिवस वार्ताहराचेही काम केले .
पहिल्या महायुद्धात तो लष्करात भरती झाला. तिथे तो रुग्णवाहिका चालक होता. त्याला इटलीच्या आघाडीवर पाठवले. तिथे लढाईत त्याला गोळी लागली. हेमिंग्वे गंभीर जखमी झाला होता. पण तशाही अवस्थेत, खंदकात पडलेल्या जखमी सैनिकाला खांदयावर घेऊन त्याने त्याला इस्पितळात आणले. ह्या धाडसी कृत्याबद्दल इटलीने हेमिन्ग्वेला शौर्यपदक दिले. युद्ध आघाडीवरून जखमी होऊन परतलेल्या हेमिंग्वेला कही महिने रुग्णालयात काढावे लागले .

युद्धाच्या अनुभवावर त्याने आपली गाजलेली फेअरवेल टू आर्मस Farewell To Arms ही कादंबरी लिहिली. त्यानंतर तो काही काळ पत्रकार म्हणून काम करत होता. या बाबतीत हेमिंग्वेचे मार्क ट्वेन याच्याशी साम्य आढळते. मार्क ट्वेन प्रमाणेच कादंबरीकार म्हणून प्रसिद्धीला येण्यापूर्वी हेमिंग्वेही वार्ताहर होता.

१९३७ मध्ये हेमिंग्वे स्पेनच्या युद्धात परदेशी वार्ताहर म्हणून आघाडीवर गेला .ह्या युद्धाच्या अनुभवाची परिणितीही एका प्रख्यात कादंबरीत झाली. १९४० साली हेमिन्ग्वेची सर्वांना माहित असलेली फॉर हूम द बेल् टोल्स ही कादंबरी प्रकाशात आली. ह्यावर निघालेला सिनेमाही लोकप्रिय झाला होता.
दुसऱ्या महायुद्धातही तो वार्ताहर म्हणून गेला. नॉर्मंडीच्या महाप्रचंड मोहिमेत तो होता . फ्रान्समधील प्रतिसरकारच्या एका अत्यंत लहानशा तुकडीचे पुढारीपण करत इतर विजयी सैनिकांबरोबर त्याने पारीसमध्ये प्रवेश केला .

हेमिंग्वेचे वडील डॉक्टर होते. वाङ्ग्मय , इतिहास हेही त्यांचे आवडीचे विषय होते . त्याशिवाय ते शिकारीलाही जात. मासेमारीचाही छन्द जोपासत होते. उघड्या वातावरणातील जगण्याच्या ह्या आवडी निवडी हेमिंग्वेमध्येही उतरल्या होत्या.

हेमिंग्वेची आई फार कजाग होती. आपल्या नवऱ्याला ती वाटेल तसे टाकून बोलायची. सारखे त्याला टोचून बोलायची. हैराण करायची. हेमिंग्वेचे वडील तिचे असले हे भांडकुदळ स्वभावाचे वागणे बोलणे, तिचा संताप, चिडचिड सहन करायचे. पण अखेर असह्य होऊन त्यांनी आत्महत्या केली.

हेमिंग्वे आपले गाव, घराभोवातीचा परिसर ह्याविषयी लिहिताना म्हणतो, “Lawns were wide and minds were narrow.” “घरे मोठी पण मने कोती.” हे लिहिताना हेमिंग्वेच्या डोळ्यांसमोर त्याची आईच असावी!

हेमिन्ग्वेला डोंगर- दऱ्यातून, रानावनातून भटकणे , शिकारीला जाणे , समुद्र , मासेमारीची आवड मुष्टियुद्ध करणे ह्या गोष्टी फार आवडत असत. आपल्या वडलांकडून त्याला साहित्याची आवड मिळाली तसेच त्यांच्याकडून राकट आयष्य जगण्याचा गुणही प्राप्त झाला असावा. अशा अनुभवातूनच त्याची Old Man and the Sea ही नोबेल पारितोषिक विजेती कादंबरी निर्माण झाली असणार.

हेमिंग्वेच्या वडलांप्रमाणेच हेमिंग्वेच्या बहिणीने आत्मत्या केली. स्वत: हेमिन्ग्वेनेही आत्महत्या केली. त्याहून दु:खाची गोष्ट अशी की हेमिंग्वेच्या नातीनेही आत्मघातच केला! हेमिंग्वेच्या बहुतेक सर्व कादंबऱ्या नावाजल्या गेल्या . त्यावर निघालेले चित्रपटही तितकेच यशस्वी झाले. त्यामुळे हेमिंग्वेचे नाव सर्वसामान्यालाही माहित झाले . साहित्याचे जगातील सर्वोच्च पारितोषिक मिळून मोठा गौरव झाला . यश लाभले, कीर्तिहि मिळाली.

हेमिंग्वेचे एक वचन इथे सांगण्याचा मोह आवरत नाही. इतर काही न लिहिता असे एखादे वचन लिहूनही तो मोठा ठरला असता. “All things truly wicked start from innocence.” आपण ह्यावर जितका विचार करू तसे आपल्याला हे केवळ वाक्य अथवा वचन न वाटता ते गहन गूढ गभीर अर्थाचे एक सूक्त आहे असे वाटू लागेल. हेमिंग्वेचे मानवी स्वभाव, विचार, कार्यकारणभाव यांचे किती सखोल चिंतन असेल याची आपण कल्पना करू शकतो.

हेमिंग्वे प्रत्येक गोष्टीत स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन आयुष्यात रस घेत जगला. प्रतिभावंत, मुक्तपणे स्वच्छंदात जगणारा, मानमरातब, नावलौकिक लाभलेल्या हेमिंग्वेचा असा दुर्दैवी शेवट व्हावा हे समजल्यावर आपण वाचक हळहळण्या शिवाय काय करू शकतो !

साहित्यिक सम्राट

रोमन साम्राज्याच्या सम्राटांची , त्यांचे पराक्रम , त्यांची
प्रेम-प्रकरणे किंवा त्यांचा विक्षिप्तपणा इतकीच ओळख आपल्याला ज्युलियस,
ऑगस्टस , निरो किंवा क्लोडियस या सीझर राजांची आहे.

शेक्स्पिअर पासून ते अलीकडच्या अल्बर्ट कामू या आधुनिक नाटककारापार्यंत
अनेक नाटककारांनी रोमन सम्राटांवर नाटके लिहिली.

साहित्याचे विषय हे राजे झाले पण खुद्द ह्यांच्यापैकी बरीच सीझर मंडळी
साहित्यिक होती याची आपल्याला फारशी माहिती नाही.
अनेक वर्षे , पिढ्यान पिढ्या, पाश्चिमात्य विद्यार्थ्यांना लाटिनची ओळख
रोमन सम्राट ज्युलियस सीझरची आणि त्याच्या Conquest of Gaul या
पुस्तकापासूनच व्हायची!

ज्युलियस सीझरची (इ.स. पूर्व १०० ते इ.स पूर्व ४४ ) एवढ्यावरच लेखक
म्हणून ओळख संपत नाही. त्याने नाटके लिहिली आणि कविताही केल्या. आपल्या
रोम आणि स्पेनच्या चोवीस दिवसांच्या सफरीची The Journey या दीर्घ काव्यात
वर्णने केली . पण हा काव्य खंड हरवला ! आल्पस पर्वत ओलांडून केलेल्या
प्रवासाचेही ज्युलियस सीझरने काव्यातच वर्णन केले आहे . ज्युलियस
सीझरच्या भाषाशैलीची त्याच्या समकालीन लेखकांनीही वाखाणणी केली आहे.

सिसेरोने तर (सिसेरो हा इ.स.पूर्व १०६ ते इ.स. पूर्व ४३ या काळातला रोमन
तत्वज्ञानी , उत्तम वक्ता, कायदेपंडित आणि घटनाकार होऊन गेला.)सीझरच्या
शब्दसंपत्तीची आणि एकूणच त्याच्या राजेशाही भाषाशैलीची उदात्त या शब्दात
गौरव केला आहे . ज्युलियस सीझरनंतर झालेल्या ऑगस्टस सीझरच्या काळात (इ.स.
पूर्व ६३-इ.स.पूर्व १४ ) साहित्य वांग्मयाला चांगलाच बहर आला होता.

ऑगस्टसच्या दरबारी वर्जिल , होरेस आणि ऑविद सारखे चतुरस्त्र साहित्यिक
होते . ऑगस्टसला साहित्याची उत्तम जाण होती . वरील सर्व साहित्यिकांनी
आपापापल्या ग्रंथातून ऑगस्टसची स्तुतीच केलेई आहे. अशा प्रतिभावान
साहित्यिकांच्या प्रभावळीत. ऑगस्टस सीझरने आपले लिखाण फाडून नष्ट केले
किंवा आपले सीसिली काव्य हरवले याची खंतही बाळगली नाही यात नवल काय? पण
ह्या सम्राटाने १३ खंडात लिहिलेले आपले आत्मचरित्र आणि आपल्या
कार्याविषयी लिहिलेला ग्रंथ टिकून राहिला. पण त्याचे उत्तम म्हणून गणले
जाणारे Encouragement to Study of Philosophy हे मात्र काळाच्या ओघात
नाहीसे झाले!

टायबेरियस सीझर नंतर केलीग्युला या टोपण नावानेच जास्त माहित असलेला सीझर
झाला (इ.स. पू १२-इ.स. पू ४१ ) ह्याला साहित्याची काही फारशी जाण
नव्हती पण इतर विद्वान, साहित्यिक यांच्याविषयी अत्यंत कोती मते आणि
वृत्ती होती. त्याने Atellan या विनोदी लेखक-कलावंताचे नुसते लिखाणच
नव्हे तर त्या विनोदी लेखकालाही जाळून टाकले ! इतकी (च) त्याची “ज्वलंत
साहित्य सेवा !”

ह्या केलीग्युला नंतर त्याचा काका क्लोडियस हा गादीवर आला. ह्याचीही एक
वेगळीच तऱ्हा ! तिला स्वतंत्र वृत्ती म्हणायचे का नाही ते आपण ठरवायचे .
क्लोडियस सीझरच्या मनात लाटिन भाषेत नवीन मुळाक्षरांची भर घालण्याचे मनात
आले. त्याने तीन नवीन वर्णाक्षरांची भर घातली . आपल्या सम्राटाने संशोधन
करून काढलेली मुळाक्षरे म्हटल्यावर राजा बोले दळ हाले या न्यायाने
राजपत्रात आणि सरकारी खात्यात वापरायला सुरवात झाली . तुघलकी हुकमाने
संपूर्ण राजधानी हलवली गेली तसाच हा प्रकार. पण Claudius मेल्यानंतर
त्याची हीं तीन मुळाक्षरेही त्याच्याबरोबरच गेली!

पण ह्या क्लोडियस सीझरचे लिखाण फार प्रचंड होते . ह्यामध्येही त्याचा
स्वतंत्र बाणा दिसून येतो . त्याने Etruscan ह्या इतिहासाचे वीस खंड आणि
Carthaginian इतिहासाचे आठ खंड आपल्या लाटिन भाषेत न लिहिता ग्रीक भाषेत
लिहिले!

त्याने आणखी लिहिलेल्या पुस्तकांची गर्दी इतकी अफाट झाली म्हणता की
अलेक्स्झांड्रिया लायब्ररीची इमारत वाढवावी लागली . Claudiyan नावाची
नवीन इमारत मूळ इमारतीला जोडून बांधावी लागली!

रोमन सम्राट नीरो तर त्याच्या स्वत:विषयीच्या अवास्तव कल्पना, विक्षिप्त
आणि विचित्र वागणूक यामुळे कुप्रसिद्ध झाला. त्याचे क्लोडियस पॉलियो वरील
जहरी टीकेने भरलेले The One Eyed Man हे पुस्तक नीरोबरोबरच नष्ट झाले.

आपल्याकडेही काळाच्या प्रवाहात साहित्यिक राजे महाराजे होऊन गेले.
काहींचा भविष्य पुराणासारख्या इतर पुराणांत उल्लेख आढळतो . काहींच्या
बाबतीत तो राजा होता की कवी? किंवा एकाच नावाचे दोन असू शकतील असे वाद
आढळतात ; उदा . भर्तृहरीच्या बाबतीत असे वाद झाले. पण तो राजाही होता
आणि कवीही होता असेच आता मानले जाते .पण जे राजे निर्विवाद लेखक आणि
राजेहि होते त्यापैकी दोन ठळक नावे समोर येतात ती म्हणजे राजा शूद्रक आणि
राजा हर्षवर्धन!

राजा शुद्रकाचा काळ इ.स. पूर्वी २ रे शतक ते इ.सनाचे ५वे शतक यामधील
असावा असे समजले जाते . शुद्रकाचे सर्वांना माहित असलेले सदाबहार नाटक
‘म्रुच्छकटिक ‘ . चारुदत्त आणि वसंतसेना यांचे प्रेम आणि त्यातील वेगळाच
असा खलनायक शकार , आणि नाटकातील नाट्यमय घटना यांना कोण विसरेल? नाटककार
देवल यांनी याचे मराठीत सुरेख नाट्यपूर्ण रुपांतर केले आहे .

इ.स. ते ६४७ मध्ये नर्मदेच्या उत्तरेकडील बहुतेक सर्व भूप्रदेश ज्याच्या
ताब्यात होता तो पराक्रमी तितकाच सुसंस्कृत , रसिक, साहित्यिक राजा
हर्षवर्धन ! याने रत्नावली आणि प्रियदर्शी अशी दोन सुखान्त नाटके
लिहिली. ह्याच्या दरबारी त्याकाळचे प्रख्यात तत्वज्ञानी, कवी ,नाटककार
होते. हर्षचरितम लिहिणारा आणि ‘कादंबरी’ लिहिणारा कवि बाण उर्फ बाणभट्ट
हा त्याच्या दरबारी कवि होता.

इ.स. १६व्या शतकाच्या आगे-मागे बरेच जगन्नाथ पंडित होउन गेले. त्यापैकी
एक जगन्नाथ पंडित राजा होता. तो साहित्यिक होता की नाही याचा उल्लेख
आदळत नाही. पण तो कुशाग्र बुद्धीचा गणिती होता.त्याने भूमितीवर ग्रंथ
लिहिला आहे .

सीझरच्या सम्राटांची साहित्यिक संपदा पाहिल्यावर आपल्या तंजावरच्या
मराठी राजे सरफोजी भोसले या राजांच्या मराठी नाटकांची, संस्कृत
साहित्याची आठवण होते . या भोसले घराण्यातील राजांनी यक्षगान पद्धतीत
सुधारणा करून लिहिलेली स्वतंत्र अशी बावीस मराठी नाटके तसेच त्यांचे इतर
वांग्मयही आजही तंजावर येथे शाबूत आहे , उपलब्ध आहे . राजा शुद्रकाची
नाटके , भर्तृहरीच्या शतकत्रयीतील नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक हे
तीनीही काव्ये आजही आपल्याला वाचायला मिळतात. तुलनेने ही सर्व पुस्तके
रोमन काळाच्या मानाने अलीकडची आहेत हे खरे . पण तरीही ती फार जुन्या
काळातील आहेत हे नि:संशय. ह्या बाबतीत आपण आतापर्यंत तरी भाग्यवान आहोत
हे काय कमी समाधान आहे?

ऱोमन सम्राट ज्युलियस, ऑगस्टस आणि क्लॉडियस सीझर हे साहित्यिक होते .
ज्युलियस सीझर तर शैलीदार लेखक म्हणून नावाजला गेला . पण दुर्दैव असे की
त्यांची ही सर्व ग्रंथ संपत्ती त्यांच्या रोमन साम्राज्या बरोबरच लयास
गेली!

कालाय तस्मै नम: ।

महाकादंबरीचे बारसेही बारा वेळा तेरा काळ!

नाशिक रोडला असताना शनिवार रविवारी देवळाली कॅम्पला जात असे. बहुतेक वेळा हडपसरकर बरोबर असायचाच. एखादे वेळेस एम. जी. कुक असायचे. कुक म्हणजे कुलकर्णी. कॅम्पमध्ये भटकणे, मग अडल्फी किंवा कॅथी मध्ये इंग्रजी सिनेमा पाहणे. हॉटेलात जाणे. असा कार्यक्रम असे.

देवळाली कॅम्प मध्येच Brothers Karamazov पाहिल्याचे आठवते. त्या वर्षा -दोन वर्षात चर्चेत असलेला युल ब्रायनर त्यात होता. सिनेमा डोस्टोयव्ह्स्कीच्या त्याच नावाच्या अतिशय प्रख्यात कादंबरीवर होता. त्यामुळे कथा जबरदस्त प्रभावी असणार ह्यात शंकाच नव्हती. त्या आधी काही वर्षांपूर्वीच डोस्टोयव्हस्कीच्या The Idiot , Crime and Punishment या कादंबऱ्याही मी वाचल्या होत्या.

डोस्टोयव्हस्किच्या कादंबऱ्या, कथा वाचताना मध्येच पुस्तक मिटून शांत बसावे असे वाटे. पुस्तक संपवल्यावरही असेच व्हायचे. काही न बोलता थोडा वेळ शांत बसून, असे का व्हावे , असे व्हायला नको होते असे विचार येउन एखादा दुसरा प्रसंग, घटना पुन्हा समोर यायचे. मन खिन्न व्हायचे. काही दिवस ते पुस्तक डोक्यात सतत घोळत असे. ब्रदर्स कारामाझोव सिनेमा पाहून बाहेर आल्यावरही थोडा वेळ आमचे असेच झाले. आम्ही गप्पच होतो. हॉटेलात आल्यावर मग हळू हळू सिनेमाविषयी बोलणे सुरु झाले. गप्पाही झाल्या. केवळ रशियातीलच नव्हे, पाश्चात्य युरोपीय देशातच नव्हे, जगातील वाचकावर डोस्टोयव्हस्कीचा मोठा प्रभाव आहे . आणि त्यामुळेच जगातील थोर लेखकांत डोस्टोयव्हस्कीची गणना होते.

साहित्यिक, कादंबरीकार, डोस्टोयव्हस्कीच्या संकल्पित महाकादंबरीची वेळोवेळी रूपे बदलली पण प्रत्यक्षात ती कधी जन्मालाच आली नाही; ती एका अप्रतिम कादंबरीत मात्र विलीन होत गेली. परंतु त्या अखेरच्या अप्रतिम कादंबरीचा डोस्टोयव्हस्कीने योजलेला दुसरा भागही प्रकट झाला नाही. ही सर्व हकीकत ऐकण्यापूर्वी डोस्टोय्व्हयवस्कीच्या जीवनाची, झारच्या सत्तेखाली असलेल्या रशियात होऊ पाहणाऱ्या स्थित्यंतराची थोडीशी माहिती होणे आवश्यक आहे.

डोस्टोयव्हस्कीचा जन्म इ.स. १८२१ साली रशियात झाला . तिथेच तो लहानाचा मोठा झाला . रशिया आणि रशियन माणसातूनच, त्यांच्याविषयी त्याने आपली लघुकथा कादंबऱ्या लिहिल्या . तो कादंबरीकार म्हणूनच जास्त ओळखला जातो . पण त्याच्या साहित्याने जागतिक वाङ्गमयावर आपला कायमचा ठसा उमटवला आहे. डोस्टोयव्हस्कीचे वडील गरीबांसाठी असलेल्या एका मोठ्या रुग्णालयात काम करत. रुग्णालयाच्या आवारातच ते कुटुंब रहात असे. ह्या रुग्णालयात अनेक रोग-व्याधींनी, आजारांनी गांजलेले रुग्ण असत. ह्यात विशेष काही नाही . पण तिथेच वेड्यांसाठीही सोय होती. वेडे झालेले रोगीही तिथेच असत.त्यामध्येच एक अनाथालयही होते. आणि हे सर्व कमी म्हणून की काय त्या आवारातच दफनभूमीही होती! अशा ‘आरोग्यपूर्ण’ वातावरणातच आपले आई- वडील, बहिण भावांसह डोस्टोयव्हस्की वाढला. राजपुत्र सिद्धार्थाच्या थेट विरुद्ध परिस्थितीत फेडोर डोस्टोयवस्की वाढला!

वयाच्या नवव्या वर्षी त्याला अपस्माराचा- Epilepsy- त्रास सुरु झाला. पुढे डोस्टोयव्हस्की सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होता त्यावेळीही त्याला ह्या आजाराचाही थोडा त्रास भोगावा लागला. अपस्माराच्या अनुभवाचा उपयोग त्यानंतर त्याने आपल्या साहित्यातही केला आहे.

सोळाव्या वर्षी डोस्टोयव्हस्की आपल्या भावाबरोबर लष्कराच्या इंजिनीअरिंग विद्यालयात गेला. तेथून बाहेर पडल्यावर तो काही काळ सैन्यात सेकंड लेफ़्टनंट पदावर होता. ह्यानंतर तो लिहू लागला. पश्चिम युरोपातील क्रांतीचे वैचारिक पडसाद रशियातील बुद्धिवंतांमध्ये पडत होते. अशा नवविचारांच्या लोकांमध्ये डोस्टोयव्हस्कीची उठ बस होऊ लागली आणि त्याच वेळी त्याची Poor Folks ही कादंबरी प्रसिद्ध झाली.

रशियन साहित्य जगात ह्या कादंबरीने खळबळ उडवून दिली . त्या काळचा प्रख्यात समीक्षक बेलीन्स्कीलाही ही कादंबरी आवडली. त्याने अनुकूल अभिप्राय लिहिला. बेलीन्स्कीने चांगले म्हटल्यावर रशियात तो लेखक एकदम नावाजला जाई इतके महत्व बेलीन्स्कीच्या मताला त्यावेळी होते. डोस्टोयव्हस्की प्रकाशझोतात आला तेव्हा तो बेलीन्स्कीच्या जहाल विचारांचा समर्थक होता . १८४९ साली झारच्या राजसत्तेने डोस्टोयव्हस्कीला गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा ठोठावली. त्याला गोळीबाराच्या पथकासमोर उभे करण्यात आले. पण अचानक चक्रे फिरली. डोस्टोय्व्हस्कीला त्याऐवजी चार वर्षे सायबेरियात हद्दपार केले आणि परत आल्यावर चार वर्षे सैन्यात नोकरी करण्याची सक्तीही झाली.

सायबेरियात हकालपट्टी म्हणजे दुसरे मरणच. पण डोस्टोय्व्हस्की त्यातून धडपणे बाहेर आला. सायबेरियातील काळात त्याच्या विचारांत फार बदल झाला. मुळात त्याचा धर्माकडे असलेला कल पुन्हा तिकडे वळला. पूर्वीच्या विचारांचा प्रभाव हळू हळू वाढला.

इतके सगळे घडूनही डोस्टोयव्हस्की हा हाडाचा, प्रतिभावंत लेखकच राहिला. त्याच्या कादंबऱ्या आणि इतर लेखन वाचले की प्रकर्षाने जाणवते ते त्याचे मनुष्य स्वभावाचे , माणसाचे , आजूबाजूच्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण . माणसाच्या मनातील गुंतागुंतीच्या विचारांचे त्या त्या व्यक्तिरेखेनुसार विश्लेषण, त्याच्या कादंबरीच्या पात्रांमध्ये, मग ती धार्मिक असो की गुन्हेगारी वृत्तीची, ईश्वरवादी किंवा निरीश्वरवादी, अराजकी किंवा विवेकी त्यांच्या मुळाशी काही आदर्श, श्रद्धा तत्वनिष्ठा, काही ठाम विचार होते. त्याच्या सायबेरियाच्या काळापूर्वीच्या आणि त्या नंतरच्या मतांतराचा एकत्रित प्रतिभाविलास त्याच्या गाजलेल्या कादंबऱ्यात आढळतो. त्याच्या मूळ स्वाभाविक विचारांमुळे, मते बदलली, विचार बदलले तरी तो खरा लेखक असल्यामुळेच Crime and Punishment ,The Idiot , The gambler, The Brothers Karamazov सारख्या चिरकाल कीर्ति मिळवणाऱ्या कादंबऱ्या लिहू शकला.

डोस्टोयव्हस्कीने आणि त्याच्या भावाने Time नावाचे मासिक काढले. त्यात त्याने सायबेरियातील अनुभवावरील कादंबरी प्रकरणाश: प्रसिद्ध केली . हे सरकारने बंद केले. त्यानंतर दोघांनी Epoch मासिक चालू केले . थोड्याच दिवसात डोस्टोय्व्हस्कीचा भाऊ मरण पावला. पैशाचा तुटवडा होताच त्यातच पैशांची आघाडी सांभाळणारा भाऊ गेला. त्याच्या बायको मुलांची जबाबदारी डोस्टोयव्हस्कीवर आली. कसलाही विधिनिषेध नसलेल्या प्रकाशकाच्या कर्जात आणि त्याने बांधून घेतलेल्या कराराच्या तावडीत डोस्तोयव्हस्की सापडला . कर्ज फेडून प्रकाशकाच्या हातून आपल्या पूर्वीच्या आणि भविष्यातीलही लेखनाचे ‘सर्व हक्क स्वाधीन’ Copy Right सोडवून घ्यायचे होते!

सेक्रेटरीला दररोज तोंडी सांगून डोस्टोयव्हस्कीने आपली The Gambler ही कादंबरी लिहून संपवली. प्रकाशकाला देऊन टाकली . ह्या सेक्रेटरीशीच त्याने लग्न केले. पैसा जमवून युरोपात जाण्याचे ठरवले. पैसे जमवण्यासाठी त्याने The Drunkard कादंबरी लिहिली . क्रमश: प्रसिद्ध करण्यासाठी त्याने त्या काळचे तीन हजार रुबल्स मागितले. पण कोणी दिले नाहीत. पण डोस्टोयव्हस्की कसला मागे हटतो? Drunkards मधले मार्मडोव्ह हे मुख्य पात्र थोडाफार बदल करून तो लिहित असलेल्या Crime and Punishment कादंबरीत समाविष्ट केले.

डोस्टोयव्हस्की आपल्या बायकोबरोबर युरोपात आला. ह्या देशातून त्या देशात भ्रमंती करत होता. तिथे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हतीच . त्यातच त्याला जुगाराचे व्यसन लागले. जुगार खेळण्यात त्याचा वेळ जाऊ लागला. अशा परिस्थितीतही त्याच्या डोक्यात एक महाकादंबरी घोळत होती. १८६८ मध्ये त्या काळात कादंबरीचे नाव Atheism असे ठरविले होते. “एका चाळीस वर्षाच्या सनदी नोकरच देवावरचा विश्वास उडतो. अनेक धर्मोपदेशक , भिक्षु, तरुणांच्या , युरोपियन रशियन कट्टर धर्मनिष्ठांच्या सहवासात तो राहतो . पण त्याचा देवाधर्माचा तिटकारा कायम राहतो . पण पोलिश जेझुइटांच्या सहवासात मात्र त्याच्यात अमुलाग्र बदल होतो. धर्मावरची आणि येशुवरची श्रद्धा आणि रशियावरचे त्याचे प्रेम पुन्हा दृढ होते.” असा आराखडाही तयार होतो.

Atheism हि महा कादंबरी त्याच्या हातून कधीच लिहून झाली नाही. आपण डोस्टोयव्हस्कीच्या संकल्पित कादंबरीला मुकलो . पण ह्या महाकादन्बरीतील काही कल्पना, घटना The Devils मध्ये आढळतात. महाकादंबरी लिहिली गेली नाही पण या कादंबरीचे नाव मात्र वेळोवेळी बदलत गेले. पुन्हा तिचे बारसे होऊन ती आता The Life of A Great Sinner झाली . ही तीन किंवा पाच कादंबरीका अशा स्वरुपात लिहायची तो ठरवतो. पण ह्या नवीन नावाने येणाऱ्या कादंबरीचेही अनेक वेळा बारसे होऊन तिला विष्णुसहस्त्र नामासारखी अनेक नावे मिळाली. उदा. The Forties , A Russian Candidate , A Book of Christ , वगैरे. इतक्या वेळा महाबारशी होऊनही ती कादंबरी लिहिली गेली नाही . पण ह्या संकल्पित कादंबरीकांचा बऱ्याच प्रमाणात The Brothers Karamazov ह्या कादंबरीतील समावेश झाला आहे. म्हणूनच ती इतकी गाजली असावी! ह्यातील संत वृत्तीचा भाऊ Alyosha मठात राहत असतो. डोस्टोयव्हस्की ह्या कादंबरीचाही दुसरा भाग लिहिणार होता . तसे त्याने तिच्या प्रस्तावनेत म्हटलेही आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा भागच जास्त महत्वाचा. पण दुर्दैवने हा महत्वाचा दुसरा भागही त्याच्या हातून पूर्ण होऊ शकला नाही!

डोस्टोय्व्हस्की एकदा म्हणाला होता की “दुसऱ्या भागात हा संत-स्वभावाचा Alyosha मठ सोडून जाईल. अराजकवादी बनेल. आणि हाच सत्प्रवृत्त Alyosha झारची हत्या करेल. डोस्टोयव्हस्की २८ जानेवारी १८८१ रोजी वारला. आणि योगायोग म्हणायचा की डोस्टोयव्हस्कीचे भाकित म्हणायचे ! १८८१च्या फेब्रुवारीत झार दुसरा अलेक्स्झांडर याची कुणा
मारेकऱ्याने हत्या केली !

अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या लिहून दिगंत कीर्ती मिळवलेल्या डोस्टोयव्हस्कीला, थोर विचारवंत लेखक, इतकेच काय तत्वज्ञानीही मानणारे अनेक होते.पण तो श्रेष्ठ कादंबरीकार म्हणूनच जगभराच्या वाचकांत ओळखला जातो. प्रख्यात रशियन लेखक पुश्किन. तत्वज्ञानी, साहित्यिक नित्श्झे आणि जेन पॉल सार्त्र यांच्यावरही डोस्टोय्वहस्कीच मोठा प्रभाव आहे. नोबेल पारितोषिक विजेता अर्नेस्ट हेमिंग्वेही त्याचा मोठा चाहता होता. त्याची स्तुती करणाऱ्यांबरोबर त्याच्यावर टीका करणारेही होते.

डोस्टोयव्हस्की आणि लिओ Tolstoy हे रशियाचे कीर्तिमान लेखक. Tolstoyने डोस्टोयव्हस्कीच्य Crime and Punishment विषयी फार ‘ओह हो! वा!’ असे उद्गार कधी काढले नाहीत. उलट तो एकदा म्हणाला होता, ‘मी त्याची Crime and Punishment वाचायला घेतली पण पहिल्या चार पाच पानातच तिचा शेवट समजला.” पण ते दोघेही एकमेकांना खूप मानत असत. डोस्टोयव्हस्की वारल्याचे जेव्हा टोल्स्टोयला समजले तेव्हा तो रडला!

कै. पुस्तके: आवृत्त्यांची कहाणी

इब्न हशिम इ.स. ८३३ मध्ये बगदाद येथे वारला. तो व्याकरणकार आणि विद्वान होता. त्याच्यापुढे एक मोठे जिकिरीचे काम आले. साठ वर्षांपूर्वी एक थोर विद्वान इब्न इश्क़्ने लिहिलेल्या प्रेषित मुहम्मद पैगंबराचे सिरत रसूल अल्लाह या चरित्राची शुद्ध प्रत तयार करण्याचे ऐतिहासिक महत्वाचे काम त्याला पूर्ण करायचे होते. .

इब्न हशिमनॆ हे काम मनापासून केले. पण दुर्दैवाने, त्याने, इब्न इश्क़्ने लिहिलेल्या ‘सिरत रसूल अल्लाहची” -या चरित्राची- मूळ प्रत मात्र नष्ट करून टाकली !

मुहम्मद पैगंबर हा क्वुरैश जमातीचा . तो व्यवसायाने व्यापारी होता. मुहम्मद एकदा मक्केच्या बाहेर निवांत जागी शांतपणे डोळे मिटून बसला होता. असा ध्यानस्थ बसला असताना देवदूत जिब्राऐल त्याला दिसला. डोळे उघडून पाहतो तेव्हा त्याला सगळीकडे जिब्राऐलच दिसत होता . आकाशापासून जमिनीपर्यंत सर्वत्र एक जिब्राआईलच भरून राहिला होता.

“म्हण, म्हणायला सुरवात कर.” जिब्राऐलने मुहम्मदाला आदेश दिला. पहिल्यांदा चाचरत, अडखळत मुहम्मदाने म्हणायला सुरुवात केली. नंतर मात्र तो नीट, सरळ म्हणत राहिला. आणि तो म्हणतच राहिला. अशा तऱ्हेने मुह्म्मदाने संपूर्ण कुराण रचले!

जेव्हा मुह्म्मदाला सगळीकडे जिथे पाहावे तिथे जिब्राऐल दिसत होता आणि, “म्हण, सुरू कर पठण” हे त्याचे शब्द ऐकू आले आणि हळू हळू पठण करत मुहम्मदाकडून संपूर्ण कुराण रचून झाले त्यावेळी प्रेषित मुहम्मद इतका घाबरला होता की आपण जीव द्यावा असे त्याला वाटत होते; असे इतिहासकार अल ताबरीने नमूद केले आहे.

पुढील वीस वर्षे मुहम्मद पैगंबर कुराणातील सुरा आणि आयता लोकांना सांगत होता. कुराणाची शिकवण देत होता . कुरण सांगताना मुहम्मद पैगंबर निराळ्याच अवस्थेत जात असे. परमेश्वरानेच-अल्लाहनेच- आपल्याकडून कुरण रचून घेतले ही मुह्म्मदाची खात्री अधिकाधिक दृढ होत चालली.

व्यापाराच्या निमित्ताने क्वुरैश /क्वुरायिश (आपल्याकडे कुरेशी/क्वुरेशी आहेत ते हेच क्वुरायीश असावेत) लोकांचा ज्यू आणि ख्रिश्चन लोकांशी संबंध यायचा. त्या लोकांना हे क्वुरैश ‘पुस्तकी’, ‘पुस्तकी धर्माचे’ म्हणत. त्याला कारण टेस्टमेंट आणि बायबल हे ग्रंथ. हे ‘पुस्तकी’ लोक क्वुरैशीना आपल्या धर्माच्या देवानी कसे चमत्कार केले ते वर्णन करून सांगत.

आपल्याकडे का असे चमत्कार नाहीत, आपल्यातले कोणी का चमत्कार करत नाहीत असा प्रश्न क्वुरैशिना पडे. आणि ते मुहम्मद पैगम्बराला तसे विचारतही.
“तुला का चमत्कार करता येत नाहीत?” असे त्याला विचारल्यावर मुहम्मद म्हणे,” आपले कुराण हाच एक मोठा चमत्कार आहे. ह्यापेक्षा दुसरा काय चमत्कार असू शकतो? कुराणाप्रमाणे वागा. मग चमत्कारच चमत्कार होतील. चमत्कारांना महत्व देऊ नका, ” असे तो उत्तर देई.

मुहम्मद पैगम्बारामुळे कुराण हा पवित्र ग्रंथ मुसलमानांना मिळाला. त्यामधूनच त्यांना एकच देव आहे,देव एकच तो म्हणजे अल्लाह,याची खात्री पटली.

क्वुरैश जमातीतील मुहम्मद आणि त्याच्यामुळे मुस्लिम धर्म स्थापन झाला आणि त्याचा विस्तारही झाला. पण त्याचीही एक पूर्वपिठीका आहे. ज्यू आणि ख्रिश्चनांना
आपला देव अब्राहमचा मुलगा आयझाक /इस्साक मार्फतच मिळाला. ऐझाकमुळे ज्यू आणि त्यातून पुढे ख्रिश्चन हे धर्म स्थापन झाले.
पण अब्राहमला आयझाक /इसाक शिवाय एक थोरला मुलगा होता. त्याचे नाव इस्माईल. हा अनौरस पुत्र. इस्माईल आणि त्याची इजिप्शियन आई हगार Hagar ह्या दोघांनाही अब्राहमची राणी सेरा Sara हिने देशाबाहेर घालवून दिले होते. त्यावेळी देवाने त्यांना वर दिला. “आयझाक/इस्साक प्रमाणेच इस्माईलसुद्धा एक मोठा देश वसवेल व त्याचीही प्रजा खूप वाढेल.”

कुराणातही क्वुरायिश जमात ही इब्राहिमी वंशाची जमात असाच उल्लेख आढळतो.
जस जसा मुहम्मद पैगंबराने स्थापन केलेला एकेश्वरी धर्म फोफावू लागला तसे अनेक लोक कुराणातील वचने,अध्यायचे अध्याय तोंडपाठ करू लागले. म्हणू लागले. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यात अनेक पाठभेद होण्याची शक्यता वाढली.

मुहम्मद पैगंबराच्या निर्याणानंतर झालेल्या पहिल्या दोन खलिफांनी–हे दोघेही पैगंबराचे सासरेच-अबू बक्र आणि उमर– सर्वांच्या तोंडी असलेले, अनेक पाठभेद झालेले कुरण एकत्र लिहून काढले. त्यानंतर आलेल्या तिसऱ्या खलीफाने काही पाठभेद वगळून काही शुद्ध करून एक प्रमाणित प्रत तयार केली. पण इथेही जुने पाठभेद कायम असलेले,पहिल्या दोन खलिफांनी एकत्र केलेले कुराण ह्या तिसऱ्या खलिफाने उतत्तेमान याने नष्ट केले!

ह्याच वेळी,प्रेषित मुह्म्मदाविषयी, त्याच्या संबंधीच्या अनेक प्रसंग, आख्यायिका, सगळीकडे प्रचलित हॊत्या. एक थोर विद्वान मुहम्मद इब्न इश्क़ने (इ. स. ७०४-इ.स. ७६७) ह्या सर्व आख्यायिका, घटना यांचे तपशीलवार संशोधन केले. त्यानंतर, मुहम्मद पैगंबराची निरुपणे, वचने आणि त्याच्या जीवनाशी निगडित असलेले प्रसंग घटना या सर्वांची नोंद असलेला संग्रह(इस्नाद) तयार केला.

इब्न इश्क़्च्या इस्नादमधील सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या मुह्म्मदाच्या, कुराणातील मूळ शिकवणीशी विसंगत नाहीत ना हे अभ्यायासाचे काम साथ वर्षानंतर इब्न हश्मीकडे आले होते. शिरत रसूल अल्लाहच्या संपादनाचे हश्मने मनावर घेतले होते . मुस्लिम परंपरेने मान्य क लेल्या वचनांची, प्रसंगांची त्याने भरही घातली. आणि इब्न इश्क़ ह्या विद्वानाने लिहिलेला मुहम्मद पैगंबराचा सिरत रसूल अल्लाह हा चरित्र ग्रंथ प्रमा
णित झाला. पण, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
त्याने इब्न इश्क़्ने लिहिलेली मूळ प्रत नाहीशी करून टाकली!

सिरत रसूल अल्लाह हे मुहम्मद पैगंबराचे चरित्र. त्याला देवत्वाच्या जवळ नेउन ठेवणारे असले तरी त्यामध्ये त्याचे माणूसपण कायम ठेवले आहे. त्याला देव बनविले नाही. ह्या चरित्रातील पैगंबर आपल्यासारखा हसतो, गप्पा-गोष्टी करतो. रागावतो, चिडतो आणि घाबरतोही. तो आपल्यासारखीच दु:खे सहन करतो. अडचणी सोसतो. आणि संकटांना तोंड देतो. तसाच तो दयाळूही आहे. त्यालाही मुले आवडतात.

एकदा एका माणसाच्या हातून काही अपराध होतो. तो अपराधी गरीब होता. त्याला पैगंबरापुढे आणले. पैगंबराने त्याला,”तू गरीबांना दान दे. दान धर्म कर.” असे सांगितले. तो गरीब अपराधी म्हणाला,” माझ्याजवळ काही नाही तर मी दुसऱ्यांना काय देणार?”
मुहम्मद पैगंबराने त्याला ओंजळ भरून खजूर दिला आणि म्हणाला, “हा घे खजूर. तुझ्यापेक्षा गरीब असलेल्या कुणाला तरी हा दे.’ ह्यावर तो अपराधी म्हणाला,” अल्लाह रहेम करे. सरकार! हुजूर ! माझ्यापेक्षा कुणीही गरीब नाही!”

मुहम्मद पैगंबराला खूप हसू आले. हसता हसताच तो म्हणाला,”प्रायश्चित्त म्हणून तूच हा खजूर खाऊन टाक, जा.”

कै. पुस्तके: महाकाव्याचे महाभारत

अरबांनी पर्शिया जिंकून घेतल्यावर अहमद -अद -दक़िकीने (इ.स. ७३२-७७६) आपले झोराष्ट्रीयन(पारशी धर्माचे ) नाव बदलून अबू मन्सूर मुहम्मद असे मुसलमानी नाव घेतले. तरीही परंपरेने तो झोराष्ट्रीयनच-झरतुष्ट्रीच – राहिला असे मानले जाते.

आनंद आणि सुखासाठी फक्त “डाळिंबी ओठ, बासरीचे मधुर सूर आणि झरतुष्ट्रावरची श्रद्धा” अकेवळ ह्या गोष्टीच आवश्यक आहेत असे अहमद-अद -दक़िक़ी म्हणत असे. चारशे वर्षानंतर झालेल्या उमर खय्यामच्या साधारणत: याच अर्थाची रुबाया सर्वांना माहीत आहे.

अहमद-अद -दक़िक़ी हा बगदादचा राजकवी होता. सर्वोत्कृष्टचा समानार्थी म्हणजे अहमद -अद -दक़िक़ी इतकी त्याची ख्याती होती. त्याची स्तुती करणे म्हणजे “ह्झरला खजूर पाठवण्यासारखे आहे ” असे अनेक विद्वान समीक्षक म्हणतात. ह्या वरून “To bring Coal to New Castle” हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला आठवला. तर नवल नाही.

इतके यश, नावलौकिक मिळूनसुद्धा त्याच्या डोक्यात यशाचे वारे शिरले नव्हते. तो म्हणायचा, “माझे सर्व आयुष्य धीराचे, धीर धरण्यातच गेले. ह्याचे सुंदर रसाळ फळ उपभोगण्यासाठी मला पुढचे आयुष्य मिळावे.” जणू काही “धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी ” या काव्य वचनाचे त्याने पालन केले!

त्याच्या गझला आणि चतुष्पदीमुळे तो लोकप्रिय होता. राजाने त्याला महाकाव्य रचण्यास सांगितले. अद्द्कीने ते लिहायला घेतले. हजार एक ओळी लिहूनही झाल्या. पण … इराणचा हा नामवंत कवि महाकवि होण्यापूर्वीच अहमद अद्दकीला त्याच्या तुर्की नोकराने सुऱ्याने भोसकून ठार मारले! वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी हा नामवंत कवि जग सोडून गेला!!

त्याचा समकालीन कवि रुदाकीच्या कूलीला आणि दिमना ह्या काव्याप्रमाणेच अहमद अद्द्कीच्या हजार काव्यपंक्तीसुद्धा काळाच्या उदरात गडप झाल्या असत्या. पण तरुण कवि फिरदौसीमुळे (इ,स. ९४०-१०२०) त्या भावी पिढ्यांना मिळाल्या.

अहमद -अद्दक़िक़ीच्या अपूर्ण महाकाव्यातील हजार काव्यपंक्तीत इराणचे राजे गुस्तास्प (गुश्ताफ) पासून अरजास्प (अरजाफ) पर्यंतच्या राजांच्या गोष्टी आहेत. पण त्यातही त्याने त्याच्या अंतर्यामी असलेल्या झरतुष्ट्राचे कार्य आणि थोरवी गुंफली आहे.

फिरदौसीने अद्द्कीचे हे काव्य घरी आणले त्याच रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात, अद्द्की एका रम्य उद्यानात, हातात मदिरेचा प्याला घेऊन बसला होता. त्याने फिरदौसीला,” इराणच्या इतिहासाचे हे महाकाव्य पुढे लिहायला घे. त्यामध्ये माझ्या (अद्द्कीकीच्या ) काव्यपंक्तींचाही समावेश करायला त्याने परवानगी दिली. त्यामुळे माझे (अद्द्कीचे) नावही राहील” असे म्हणता म्हणता ते स्वप्न संपले.

फिरदौसीने आपले महाकाव्य लिहायला सुरुवात केली. त्या महाकाव्याचे महाभारतही ऐकण्यासारखे आहे.
फिरदौसीला हे महाकाव्य पूर्ण करायला थोडी थोडकी नाहीत तर पुरे पूर पस्तीस वर्षे लागली! तेच हे फिरदौसीचे सर्वज्ञात ‘शाह -ए-नामा ‘ ! पण दु:खाची, वाईट वाटण्यासारखी बाब अशी की अहमद-अद -दक़िक़ीला त्याने फारसा मोठेपणा दिला नाही की त्याच्याविषयी आदरही दाखवला नाही. उलट तो अद्द्क़िक़ीच्य हजार काव्य-पंक्तीतील बारीक सारीक दोषच दाखवत होता. इराणच्या इतिहासाचे त्याने वास्तव दाखवले नाही असे म्हणू लागला. पण जेव्हा त्याची ही शेरेबाजी अजूनही हयात असलेल्या राजपुरुषांच्या दिशेनेही होऊ लागली तेव्हा फिरदौसीला भयंकर परिणामांची जाणीव होऊ लागली!

सुलतान महमद गझनवीने फिरदौसीला आपण प्रत्येक कडव्याला एक सोन्याची मोहर देऊ असे सांगितले होते. पण फिरदौसीचे हे साठ हजार कडव्यांचे महाकाव्य पूर्ण झाले तेव्हा तेव्हा महमद गझनवीला एका कडव्याला एक सोन्याची मोहर कबूल केली ही आपण मोठी चूक केली असे वाटले. अविचाराने उतावळेपणाने निर्णय घेतला असेच त्याला वाटले असणार. त्याने सोन्याच्या नाण्याऐवजी साठ हजार चांदीच्या मोहरा फिरदौसीला दिल्या. फिरदौसी आतून संतापला. निराश होऊन आणि रागारागाने, तो ती नाणी घेऊन निघाला. वाटेत जे त्याला कोणी भेटले त्या पहिल्या दोघांना त्याने त्या चांदीच्या मोहरा देऊन टाकल्या. त्यापैकी एक होता हमामखान्यातला नोकर आणि दुसरा सरबत विकणारा होता !

फिरदौसीचे हे कृत्य समजल्यावर अपमानित झालेला सुलतान गझनवी संतापाने खवळला. फिरदौसीला हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची शिक्षा त्याने ठोठावली!

फिरदौसी घाबरून जो पळाला तो शेजारच्या हेरत राज्यात आला. तिथला राजा शहरीयार बिन शेरविनला त्याने आपले हे काव्य अर्पण केले. पण ते देताना त्यात महमद गझनवी वर टीका टवाळी करणारी शंभर ओळींची कविताही प्रास्तविक म्हणून घातली. शहरीयारने, ती वाचल्यावर, हे म्हणजे आपल्यावर बलाढ्य पर्शियाच्या सुलतानाचा हल्ला ओढवून घेणेच आहे.अशी त्याची खात्री झाली. भीतिही वाटली. त्याने कडव्याला एक हजार दिरहान या हिशोबाने फिरदौसीकडे ती मोठी रक्कम पाठवली. आणि इकडे शेरविनने सुलतान महमद गझनवीची निंदा करणारी फिरदौसीची ती कविता नष्ट करून टाकली.!

इतकी प्रचंड रक्कम फिरदौसीच्या नशिबी नव्हती असेच म्हणावे लागेल. रक्कम घेऊन येणाऱ्या जासूदाला फिरदौसी भेटण्याऐवजी फिरदौसीची अंत्ययात्राच पहावी लागली!

‘शाह-ए-नामा ‘ हे इराणचे महाकाव्य म्हणून गणले जाते. “आमच्या राष्ट्राचा इतिहास आणि आमची भाषा या शाह-ए-नामाने जतन करून ठेवली आहे,” असे प्रख्यात मिर्झा अहमद अली फिरंघीने म्हटले आहे. “शाह -ए-नाम्यामुळे आमचा महाकवी अहमद अद्द्कीचे नावही कायम तेवत ठेवले आहे. अहमद अद्दिकी जिवंत असता तर त्याने फिरदौसीलाही मागे टाकले असते. आज तो आपल्याला फिरदौसीच्या सुबक आणि नक्षीदार कोंदणात शोभून दिसतो आहे.

कैलासवासी पुस्तके

स्टुअर्ट केली लहान असताना एका नातेवाईकाने त्याला Mr. Men या पुस्तकांच्या मालिकेतील एक पुस्तक दिले. ते वाचून झाल्यावर त्याने त्या मालिकेतील सर्व पुस्तके घेऊन वाचली . Mr. Menचा संपूर्ण संच त्याने जमवला . त्या पाठोपाठ Dr. Whoचा संपूर्ण संच त्याने जमवला . आणि थोडा मोठा झाल्यावर अगाथा ख्रिस्तीची सर्व पुस्तके घेऊन त्याने ती वाचली . जमाही केली . ज्याचे एक पुस्तक वाचले त्या प्रत्येक लेखकाची सर्व पुस्तके आपल्याकडे पाहिजेत याचे त्याला जणू वेडच लागले!

स्टुअर्टच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडीलांनी त्याला Complete Works of Shakespeare आणि Selections of Wordsworth हे दोन संच आणून दिले. त्यानंतर त्याने पैसे साठवून ग्रीक साहित्याची पुस्तके घेण्यास सुरुवात केली . एकदा तो अरिस्टोफन Aristophanचे नाटक वाचत होता. त्याच्या प्रस्तावनेतील एका वाक्यापाशी तो थांबला . “हे नाटक जेव्हा प्रसिध्द झाले त्यावेळेस त्या काळचा दुसरा प्रख्यात नाटककार अगथोन Agathon हा एकेचाळीस वर्षांचा होता . त्याने लिहिलेली नाटके, लेख व्याख्याने यापैकी आज काहीही अस्तित्वात नाही!”

हे वाचणारा स्टुअर्ट केली केवळ पंधरा वर्षांचा होता ! तेव्हापासून त्याने आपण वाचलेल्या पुस्तकांच्या यादीबरोबरच ‘नष्ट, नाहीशी झालेली पुस्तके ‘ अशीही एक यादी करण्यास सुरुवात केली . दु:खाची गोष्ट अशी की कैलासवासी पुस्तकांची यादीच मोठी होत गेली !

हे ग्रीक वाङ्गमयाच्या बाबतीतच नाही, सर्व भाषेतील साहित्याच्या बाबतीत घडले आहे . शेकस्पिअरपासून ते अलीकडच्या एझरा पाउंड पर्यंत सगळ्यांच्या लिखाणातून काही न काही साहित्यसृष्टीने गमावले आहे .

बरेचसे वांग्मय लेखकाने स्वत:च जाळून टाकले किंवा नष्ट केले . एकोणिसाव्या शतकातील कवी जेरार्ड हॉपकिन्सने आपल्या सुरुवातीच्या सर्व कविता जाळून टाकल्या . कारण ? त्याचे चित्त देवाकडे, अध्यात्मात लागले होते. नामवंत लेखक जेम्स जॉयसने आपले Stephan Heroचे हस्तलिखित आणि Portrait of the Artistचे पहिले लिखाण सरळ जाळून टाकले . रशियन लेखक मिखाईल बाख्तिनला सायबेरियात हद्दपार केले होते . तेथे त्याने प्रख्यात रशियन कादंबरीकार डोस्तोयव्हस्कीवर स्वत: केलेल्या लिखाणाच्या कागदांत तंबाखू भरून त्या सिगारेटी ओढून थंडीची हुडहुडी कमी केली . त्या अगोदर त्याने बायबलची पाने जाळून केलेल्या सिगारेटी ओढून थंडीवर मात केली होती !

सॉक्रेटिस तुरुंगात आपल्या मृत्युची वाट बघत असताना त्याने इसापच्या कथांचे काव्यात रुपांतर केले. पण त्याने त्याही नष्ट केल्या . त्या काव्यातले आपल्यासाठी काहीही राहिले नाही .

Aristotleचा दुसरा खंड नाहीसा झाला . ज्याला आपण पहिला खंड म्हणतो तोही Aristotleच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या टीपणांवर आधारित आहे .

अगदी अलीकडे १९६२ साली घडलेली ही दुर्घटना . जॉन काल्डर हा बडा प्रकाशक . अचानक त्याला आपल्या कार्यालयाची जागा सोडावी लागली . घाईघाईने सामान हलविण्याच्या गडबडीत अनेक लेखकांची हस्तलिखिते सगळी त्या जुन्या इमारतीतच राहिली . आणि त्या मालकाने ती इमारत जमीनदोस्त केली . किती एक हस्तलिखितांचे त्यात दफन झाले त्याची कल्पना करवत नाही .

अनेक साहित्यकृती लेखकांच्या मृत्युमुळे अर्धवटच राहिल्या . त्या कधीही पुऱ्या होऊ शकल्या नाहीत .

सर फिलिप सिडनीने Arcadia एकदा लिहिले पण त्याला ते पूर्ण झाले असे वाटत नव्हते . त्याला अजून त्यात भर घालायची होती . पण Zutphenच्या रणांगणावर गोळी लागून तो मेला . पूर्वीचे गाजलेले लेखक आर . एल. स्टीव्हन्सनचे Weir of Hermiston , विल्यम Thackerayचे Denis Duval आहेत त्या स्वरूपातही उच्च दर्जाचे साहित्य आहे .

काही लेखकांच्या संकल्पित पुस्तकांच्या योजना कधीच पूर्ण झाल्या नाहीत . प्लेटो आणि अरिस्टोटल यांच्या विचारात तत्वज्ञानात साम्य होते असे तत्वज्ञ बोथियसचे म्हणणे होते. पण त्यासंबंधीचा ग्रंथ त्याच्या हातून कधीच लिहून झाला नाही . तो हे कधीच सिद्ध करू शकला नाही .

नाटककार शेरेडन सगळ्यांना सांगत असे, “मी School for Scandalचा पुढचा भाग Affectation लिहिणार आहे .” पण त्याच्या हातूनही ते कधी लिहून झाले नाही .

नोव्हालीसाचा ज्ञानकोश , त्याची अनुक्रमणिका हिच सूचि म्हणूनही वापरता येईल अशी करावी का नको या द्वंद्वातच अडकून त्याचा तो ज्ञानकोश जन्माला आलाच नाही .

पुस्तके उदंड झाली, गवतासारखी वाढली असे काही वेळा वाटते . पण असलेल्या पुस्तकांपेक्षा काळाच्या उदरात गडप झालेली पुस्तकांची संख्या अफाट आहे . असंख्य पुस्तके नष्ट झाली. काही हरवली ती पुन्हा कधी सापडलीच नाहीत . आपल्या इथेही पानशेत सारख्या आणि मुंबईत तिथे नदी आहे हेसुद्धा लोक विसरून गेले होते , त्या मिठी नदीला मोठा पूर आला होता तेव्हा मुंबईतील किती पुस्तके वाहून गेली असतील!

याला एक अपवाद आहे, तो सांगण्यासारखा आहे .

भास हा संस्कृत नाटककार . त्याच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे . त्याच्या काळाची निश्चिती नाही . ख्रिस्त पूर्व २ रे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक असावा असे मानले जाते . पण भास हा कालिदासाचा पूर्वकालीन आहे हे निश्चित .

कालिदासाच्या फार पूर्वीपासून भासाची श्रेष्ठ नाटककार म्हणून ख्याती होती . पण १३व्या -१४व्या शतकानंतर काय झाले ते कोणासही ज्ञात नाही . भासाची नाटकेच नव्हे त्याचे नावही लुप्त झाले . त्याची नाटके , भासाचे नावही कुठे आढळत नाही . भास आपल्या १३ नाटकांसह नाहीसा झाला!

आपले नशीब थोर म्हणून ७०० वर्षांनी १९१२ साली त्रिवेंद्रम येथील जुन्या पोथ्यांच्या संग्रहात विश्वस्तांना — म. म. गणपतीशास्त्री यांना भासाची नाटके सापडली! नाटककार भास हा ‘भास’ न राहाता सत्य ठरला . रसिक मोठे भाग्यवान . आज आपल्याला आवडणारी भासाची ‘स्वप्नवासवदत्त ‘ आणि ‘प्रतिमा’ ही दोन सुंदर नाटके वाचायला मिळतात .

कित्येक पुस्तके आगगाडीत विसरली हरवली चोरीला गेली . कित्येक आगीत जळून खाक झाली . प्राचीन काळातील ग्रंथालये जशी तक्षशीला नालंदा येथील तर अलेक्झांड्रीयाची जेत्यांनी नष्ट केली किंवा काळात नाहीशी झाली . कोणत्याही कारणाने असो, अशी नष्ट झालेली मूळ स्वरूप बदलून नव्या अवतारात आलेल्या , केवळ संकल्पातच राहिलेल्या अशा काही पुस्तकांची त्यांच्या लेखकांसह आपण, शक्य झाल्यास, ओळख करून घेऊ या.

आश्चर्य वाटेल पण त्या लेखकांत रोमन सम्राट ज्युलिअस सिझरही आहे !