समुद्र

मॅरिएटा

महाभारतातील समुद्राचे नाट्यमय वर्णन

महाभारताची थोरवी नुकतीच तुम्ही वाचली. आज महाभारताच्या सोन्याच्या लगडीसम वजनदार भाषेचा प्रभावी आविष्कार व्यासांनी केलेल्या समुद्राच्या वर्णनातून दिसतो तो भाग वाचण्यासारखा आहे. त्या वर्णन वाचण्या अगोदर त्यामागची पार्श्वभूमी एकदोन वाक्यात सांगतो:


विनता व कद्रू ह्या दोघी बहिणी बहिणी. त्या दोघीही कश्यप मुनीच्या बायका. बहिणी एकमेकींच्या सवती झाल्या. त्या दोघींमध्ये समुद्रमंथनातून निघालेल्या उच्चै:श्रवा ह्या रत्नाचा (घोड्याचा) रंग कोणता ह्यावर पैज लागली होती. विनतेचे म्हणणे तो संपूर्ण पांढरा आहे तर कद्रू म्हणत होती की उच्चै:श्रवा पूर्णपणे पांढरा नाही. जी पैज हरेल ती दुसरीची(आपल्या सवतीची) दासी होईल असेही ठरले होते.


उचै:श्रवाला प्रत्यक्ष पाहून खात्री करून घेण्यासाठी त्या दोघी समुद्र दर्शनाला निघाल्या. त्यांना समुद्र दिसतो. त्यावेळी समोर पसरलेल्या समुद्राचे वर्णन व्यासमुनी करतात. समुद्राचे त्याच्या गुणांसह, त्याचे स्वरूप, त्याच्या वृत्ती, समुद्राची गंभीरता, त्याच्या पोटातील प्राणी ह्याचे विशेष सुंदर शब्दांनी अलंकृत केलेले अप्रतिम वर्णन मोठे विलोभनीय आहे. वाचनाचा आनंद म्हणून जो असतो तो देणारा हे वर्णन आहे असा माझा अनुभव आहे. कोणत्याही नटाला आव्हान देणारे जणू ते स्वगत भाषणच आहे! मी ते थोडा फेरफार व काही काटछाट करून लिहित आहे. पण तसे करतांना व्यास आणि भाषांतरकारांवर कोणताही अन्याय किंवा त्यांना उणेपणा येईल असे मी काहीही केले नाही.


रात्र संपली. पहाट झाली. सूर्यही उगवला.तेव्हा पैज हरली तर दासी होण्याचे मान्य केलेल्या कद्रू आणि विनता ह्या दोघी बहिणी मोठ्या उत्सुकतेने उचै:श्रवा नेमका कसा आहे व कोणत्या रंगाचा आहे ते निश्चित करण्यासाठी निघाल्या. विनताचे म्हणणे तो पूर्ण पांढरा तर कद्रूचे म्हणणे त्याची शेपटी काळी आहे.


“ त्या दोघी सागरतीरी आल्या. समोर समुद्र अथांग पसरला होता. अथांग पाण्याने भरलेला, उसळत्या लाटांनी तांडव करणारा; प्रचंड गर्जना करीत लाटांनी पुढे सरकणारा, तिमिंगल, झष, मकर, आणि त्यांच्यापेक्षाही किती तरी अधिक भयानक, विचित्र व घोर जलचरांमुळे कोणासही भीतीमुळे आपल्या जवळपास येऊ न देणारा; रत्नांचा खजिना, वरूणाचे निवासस्थान, सर्व सरितांचा पती, भीषण असूनही पाहात राहावासा वाटणारा, वडवानलाचे माहेर,असुरांचा पाठीराखा, सर्व प्राणीमात्रांचा भयाने थरकाप उडवणारा, पाण्याचे विशाल आश्रयस्थान, कल्पनेच्या कल्पनेलाही अगम्य, विचारांच्याही पलीकडे, अदभुत, आणि भयंकर; भीतिदायक जलचरांच्या निनादामुळे अधिकच रौद्रभीषण, भयानक ध्वनींनी दुमदुमणारा,असंख्य भोवऱ्यांनी भरलेला, सर्व प्राण्यांना भयभीत करणारा, भरतीच्या उंच उसळणाऱ्या लाटा आणि वेगवान वाऱ्यांनी खवळलेला, क्षणाक्षणात खूप उंच उसळणारा, उचंबळून येणाऱ्या आपल्या उंच लाटांच्या प्रेक्षणीय नृत्याने मन मोहून टाकणारा, त्याच्या गर्जना ऐकत एकटक नजरेने पाहातच राहावसा वाटणारा, चंद्रकलांच्या वृद्धीबरोबर आणि त्यांच्या क्षयाबरोबर होणाऱ्या भरती ओहोटीच्या लाटांनी उफाळून येणाऱ्या लाटांनी प्रक्षुब्घ होणारा, अज्ञानी-ज्ञानी, सामान्य-असामान्य लोकांनाही आपला थांग लागू न देणारा, युगारंभी महातेजस्वी पद्भनाभ विष्णुला अध्यात्मयोगनिद्रेसाठी उपयोगी पडलेले शयनस्थान, आपल्यावर वज्रसंकट कोसळेल ह्या भीतीने काळजीत पडलेल्या मैनाक पर्वताचा आहार, आपल्या उदकाच्या आहुतीने वडवानलाला शांत करणारा, अगाध, अपार, अचिंन्त्य आणि विस्तीर्ण असा, परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या अनेक महानद्यांच्या प्रवाहामुळे मागे रेटला जातोय असे वाटणारा, देवमाशांनी, सुसरी मगरींनी गजबजलेला आकाशाप्रमाणे अतिविस्तीर्ण, आकाशाला चंद्र सूर्य ताऱ्यांसह प्रतिबिंबानी सामावून घेणारा, जळाचा अक्षय साठा असा जलनिधान”

– असा महासागर त्या दोघी बहिणींच्या दृष्टीस पडला!


उपमन्यु

मॅरिएटा

धौम्य ऋषींचे आरुणी, उपमन्यु आणि वेद हे तीन शिष्य होते. प्रत्येकाविषयी लहानमोठी कथा आहे. आज उपमन्युची कथा वाचू या:

धौम्य ऋषींनी उपमन्युला गायीची राखण करण्याचे काम सोपवले. गायी राखण्यासाठी उपमन्यु रानात जाऊ लागला. त्यांचे चरणे, पाणी पिणे विश्रांती झाली की सुर्यास्ताच्या वेळी गायींसह उपमन्यु गुरूच्या घरी येत असे.

थोड्या दिवसांनी उपाध्यायांच्या लक्षात आले की रानात जाऊन गायी राखण्याचे कष्टाचे कंटाळवाणे काम करूनही उपमन्यु गुटगुटीत झालाय. त्यांनी उपमन्युला विचारले, रानात तू काय खातो पितोस? चांगला धष्टपुष्ट झाला आहेस की?” त्यावर तो म्हणाला, “ मी भिक्षेवर उदरविर्वाह करतो.” त्यावर उपाध्याय म्हणाले, “ मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय ती तू खाणे बरे नाही.” त्यावर “ ठीक आहे ,” असे म्हणून दुसऱ्यादिवसापासून मिळालेली सगळी भिक्षा गुरूपुढे ठेवत जाऊ लागला. असे काही दिवस गेल्यावर, एकदा गुरूपुढे सगळी भिक्षा ठेवल्यावर त्यांना तो पूर्वीसारखाच धष्टपुष्ट दिसला. त्याच्याकडे खालीवर बारकाईने पाहून ते उपमन्युला म्हणाले, “ अरे उपमन्यु! तू आणलेली सर्व भिक्षा मी ठेवून घेतो. मग तुझे पोट कसे भरते?” त्यावर उपमन्यु म्हणाला, “ प्रथम मिळालेली भिक्षा मी तुम्हाला देतो. मग मी पुन्हाजाऊन भिक्षा मागतोो. त्या भिक्षेवर माझे पोट भागते.” “ अरे, असे कपटाने वागणे तुला शोभत नाही. दुसरी गोष्ट अशी की, अरे, तुझ्यासारखे इतरही कोणी भिक्षा मागून पोट भरत असतील त्यांच्या तोंडातला घास तू काढून घेतोस. त्यांची तू उपासमार करत नाहीस का? असे वागणे लोभीपणाचे तर आहेच पण बेपर्वाईचेही आहे.” “ ठीक आहे गुरुजी मी आता तसे करणार नाही.” खाली मान घातलेला उपमन्यु म्हणाला.

दुसऱ्या दिवसापासून तो एकदाच भिक्षा मागून धौम्य ऋषींजवळ देऊ लागला. रानात गुरे घेऊन जाऊ लागला. संध्याकाळी परत आल्यावर नेहमीप्रमाणे गुरूंना नमस्कार करून अभ्यास करायला बसायचा. हा क्रम चालू असता एका संध्याकाळी उपमन्यु गुरुंना नमस्कार करून जात असता गुरूंना उपमन्यु अजूनही तसाच टुणटुणीत आहे हे लक्षात आले. त्यांनी त्याला आजही विचारले, “ बाळा उपमन्यु! तू सगळी भिक्षा मला देतोस. पुन्हा दुसऱ्यांदा भिक्षाही मागत नाहीस तरी तू अजुनही गुबगुबीत कसा? तुझी भूक तू कशी भागवतोस?” “ गुरुजी, मी गायींचे दूध पिऊन राहतो.” त्यावर उपाध्याय धौम्य म्हणाले, “ गायीचे दूध पिण्याची मी परवानगी दिली होती का? माझी परवानगी न घेता गायीचे दूध पिणे योग्य आहे का?” “ नाही गुरूजी”, नम्रपणे उपमन्यु उत्तरला. “ तेव्हा आता तू गायींचे दूध पिणे थांबव,” आचार्य म्हणाले. त्यावर होय अशा अर्थी मान डोलवून उपमन्यु गेला.

उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”


“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.

उपमन्युचा रोजचा कार्यक्रम सुरू झाला. “उपमन्यु सगळी भिक्षा मला देतो; दुसऱ्यांदा पुन्हा भिक्षा मागून खात नाही; गायीचे दूधही पीत नाही. तरी सुद्धा उपमन्यु होता तसाच गट्टम गोल आहे “ हे धौम्य ऋषींच्या लवकरच लक्षात आले. तसे त्यांनी उपमन्युला विचारले. उपमन्यु म्हणाला, “ गायीच्या आचळांतू वासरे दूध पीत असताना त्यांच्या तोंडातून जे थोडे फेसासारखे दूध पडते तो फेस पिऊन दिवस भागवतो.”


“ उपमन्युचे उत्तर ऐकल्यावर , “ अरे ही गुणी वासरे तुझी कीव करून मुद्दामच भरपूर फेस बाहेर टाकीत असली पाहिजेत. त्यांच्या तोंडचा फेस पिऊन तू त्यांचे दूध तोडतोस. ते अर्धपोटी राहतात. तु आता दुधी फेसही पिऊ नकोस.” ह्यावर उपमन्यु हो शिवाय काय म्हणणार! तो हो म्हणाला.

उपाध्याय धौम्य ऋषींच्या आज्ञेनुसार उपमन्युने एकदा भिक्षा गुरुला अर्पण केल्यावर पुन्हा भिक्षा मागणे थांबवले होते. गायीचे दूध पिणे सोडले. आणि आता तर वासराच्या तोंडचा दुधाचा फेसही पिणे बंद केले. एकदा रानात उपमन्यु तहान भुकेने व्याकूळ झाला. भुकेल्या उपमन्युने रुईची पाने खाल्ली. ती झोंबणाऱ्या चवीची कडवट,नीरस आणि घातक रूईची पाने खाल्ल्यावर उपमन्युचे डोळे गेले. तो आंधळा झाला. तशाच स्थितीत तो रानात चाचपडत राहिला आणि शेवटी एका कोरड्या विहिरीत पडला.

संध्याकाळ झाली. सूर्य मावळूनही बराच वेळ गेला. तरी उपमन्यु रानातून परत आला नव्हता. धौम्य ऋषींना काळजी वाटून ते शिष्यांना म्हणाले, “ त्याच्या जेवणाच्या बाबतीत त्याची मी सर्व बाजूंनी कोंडी केली. तो माझ्यावर चिडला असला पाहिजे. म्हणूनच तो आज परत आला नसेल,” चला आपण त्याला शोधायला जाऊ.” धौम्य ऋषी शिष्यांना घेऊन रानात गेले. काही शिष्यांना दुसऱ्या बाजूने जाऊन शोध घ्यायला सांगितले. आणि काही शिष्यांना घेऊन तेही एका बाजूने उपमन्युला हाका मारत त्याचा शोध घेऊ लागले. गुरुजींचा आवाज ऐकल्यावर उपमन्यु मोठ्याने ओरडून, “ गुरुजी मी ह्या विहिरीत पडलो आहे असे म्हणू लागला. त्याचा आवाज ऐकून धौम्य ऋषींनी तो विहिरीत कसा पडला हे विचारल्यावर उपमन्यु सांगू लागला; “ गुरुजी मी भुकेने व्याकूळ झालो होतो. मी रुईची (रुचकीची) पाने खाल्ली. आणि आंधळा झालो. काही दिसेना. आणि मी विहिरीत पडलो.” हे ऐकून धौम्य ऋषींनी त्याला देवांचे वैद्य आश्विनीकुमारांची प्रार्थना करायला सांगितले. “ते तुला पुन्हा दृष्टी देतील.” असे म्हणाले.

उपमन्युने आश्विनी कुमारांची निरनिराळ्या प्रकारे स्तुती करून, त्यांचे मोठेपण वर्णन करीत त्यांची प्रार्थना केली.


आश्विनीकुमार प्रसन्न झाले. उपमन्युला ते म्हणाले, “ हा मांडा तू खा. तुझ्यासाठीच तो आणला आहे आम्ही.” पण उपमन्यु, आचार्यांना तो मांडा अर्पण केल्याशिवाय खाणार नाही असे वारंवार निक्षून सांगतो. त्यावर आश्विनीकुमार उपमन्युला सांगतात की एकदा फार पूर्वी असाच मांडा त्यांनी उपमन्युच्या गुरूनांही दिला होता. धौम्य ऋषींनी आपल्या गुरूंना न विचारता तो खाल्ला होता, असे उपमन्युला सांगितले. हा इतिहास सांगून ते उपमन्युला मांडा खाण्याचा पुन्हा आग्रह करतात. पण आपल्या गुरूनी परवानगी दिल्यावरच मांडा खाईन असे उपमन्यु पुन्हा सांगतो.

उपमन्युची गुरुभक्ती पाहून आश्विनीकुमार जास्तच आनंदित होऊन त्याला ते दृष्टी देतात. आणि विहिरीतून बाहेर काढतात. उपमन्युला पूर्ण ज्ञान प्राप्त होईल असा आशिर्वादही देतात.

उपमन्यु उपाध्यायांकडे येतो. घडलेला सर्व वृत्तांत सांगतो.धौम्य ऋषीही उपमन्युला,आश्विनी कुमारांनी वर दिल्याप्रमाणे, त्याला वेदशास्त्रांचे संपूर्ण ज्ञान होईल असे सांगतात व त्याला स्वगृही परत जाण्याची परवानगी देतात.

संत चोखामेळा

बेलमाॅन्ट

भक्तांच्या कथा ऐकताना फार बरे वाटते. अनेक वेळा त्या कथांमध्ये तर्कसंगती नसते, तर्कशुद्धताही नसते. पण माणसाच्या मनाला त्या वेगळ्याप्रकारे सुखावत जातात. त्यामागे, आपल्याला नेहमीच्या धबडग्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि तेही अद्भुत घडावे असे वाटत असते. रोजच्या जगण्यात तसे काही होत नसते आणि होणारही नाही हे माहित असते. आणि म्हणूनच ते घडावे अशी आपण अपेक्षा, कल्पना करीत राहतो. नेमके भक्तांच्या, संतांच्या कथा आपली ही साधी इच्छा पुरी करतात.

पण संतकवि महिपतिबुवा आपल्याला त्या कथा ऐकताना सांगतात की “ भक्तकथा ऐकता सुख । अंतरी विवेक ठसावे।। त्या कथांचे सुख अनुभवत असता आपण योग्य-अयोग्य, हित-अहित, चांगले आणि वाईट ह्यातील भेद ओळखण्याची बुद्धी ठेवावी. आणि त्याच बरोबर महिपतिबुवांनी भक्तकथेला अत्यंत गोड शब्दांत दिलेली नेमकी आणि समर्पक उपमाही लक्षात राहण्यासारखी आहे. ते भक्तकथेला “ शांतीवृक्षाचे अमृतफळ” म्हणतात! दोन अतिशय हव्याश्या अनुभवांचा संगम त्यांनी घडवला आहे!

आपण आज ‘उस डोंगा परि रस नव्हे डोंगा’हे सांगणाऱ्या संत चोखा मेळ्याच्या आयुष्यात त्याच्यावर गुदरलेल्या काही प्रसंगांच्या गोष्टी ऐकूया.

एकादशीसाठी सकळ संतांबरोबर चोखामेळाही आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाला. पंढरपुराला आल्यावर पांडुरंगाचे देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले तरी चोखा त्या सावळ्या परब्रम्हाच्या प्रेमात अडकून पडला. बायकोला म्हणाला आपण आता इथेच पंढरपुरीच राहायचे.

कुणाचे बोल नकोत ऐकायला म्हणून चंद्रभागेतच पण दूर लांब जाऊन आंघोळ करून तो रोज महाद्वाराशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून व हृदयात साठवून लोटांगण घालीत असे.

शूद्राला त्या काळी कोण देवळात जाऊ देत असेल! पण चोखामेळ्याने विठ्ठलाचे महाद्वाराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेणेही ढुढ्ढाचार्यांच्या डोळ्यांत खुपत होते. ते त्याला हिणवून टोमणा मारत “ अरे पांडुरंगाला तुला दर्शन द्यायचे असते तर तुला त्यानेच आत राऊळात नेले नसते का? उगीच रोज उगीच शिणतोस? आणि आमच्या वाटेत मधी मधी येतोस?” हां. शेवटचा प्रश्नच त्यांना सतावत होता! पुढे उपमा दृष्टांतांतून तत्वज्ञान सांगत त्याच्यावर छाप पडावी म्हणून बोलत. “अरे अल्पायुषी, आयुष्यहीन रानोरानी मारे भटकला तरी त्याला कल्पतरु भेटेल का? तसाच देवळात असूनही तुझ्यासार…तुला हा जगजेठी दिसणार नाही. व्यर्थ का दुरून श्रीमुख न दिसणाऱ्या विठ्ठलाला दंडवत घालतोस चोख्या?” ह्यावर आमचा अडाणी चोखा मेळा त्या कर्मठ बडव्यांना, आचार्यांना लीनतेने म्हणायचा,” माझे मायबाप हो, पांडुरंगाने मला देवळात नेऊन दर्शन द्यावे एव्हढे मोठे भूषण कशा करता पाहिजे ! अहो लक्षावधी कोसावरून सूर्य इथल्या तळ्यातील कमळाला फुलवतो; तसा दुरूनही पांडुरंग माझं रक्षण करतो. चोखा ढुढ्ढचार्यांच्याच शब्दांत माप घालतांना म्हणतो,” दोन लक्ष गावे निशापती। चकोरावरी अत्यंत प्रीती। तेवी अनाथनाथ कृपामूर्ती । माझा सांभाळ करीतसे।। इथेच न थांबता चोखोबा पुढे आणखी एका मात्रेचा वळसा त्यांना चाटवत सांगतो, कासवी कशी दुरून केवळ प्रेमळ नजरेने पाहात आपल्या पिलांना वाढवत सांभाळ करते तसे, मायबाप हो! विठोबाही माझ्याकडे इतक्या दुरून कृपादृष्टीने पाहतो!” चोखा मेळा त्यांना आता शेवटच्या मात्रेचे चाटण चाखवत विचारतो,” महाराज हो! चोवीस तास त्याच्याजवळ असले आणि मनात पांडुरंगाविषयी प्रेम भक्ती नसली इतकेच काय त्याचा विचारही मनात नसला तर त्याच्या जवळ राहण्याचा काय फायदा? चोख्याचे हा नम्र टोला खाऊन लाजलेली ती सर्व पंडीत मंडळी चला चला, लवकर निघा म्हणत लगबगीने काढता पाय घेत.

एके रात्री चोख्याच्या घरी अचानक पंढरीनाथ आले. ते गडबडून गेलेल्या चोखामेळ्याला म्हणाले,”चोखा चल; मी आताच तुला माझ्या राऊळात नेतो.” आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले. विठोबाने चोखोबाला आपुल्या ‘जीवीचे निजगुज’ बोलून दाखवले. “ अरे चोखा! रोज सकाळी मी तुला महाद्वारा बाहेर उभा असलेला पाहात असतो.,तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते; ठसका लागतो! तुझ्या आवणीनेच हे होते.” हे ऐकून चोखा काय बोलणार? त्याचे डोळे भरून आले! विठोबाचे पाय धरत तो इतकेच बोलू शकला,” विठ्ठ्ला मायबापा, तूच खरा आम्हा अनाथांचा नाथ आहेस!”

बाहेरच बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू आला. त्याने पांडुरंगाचा आवाज ओळखला नाही(त्यात आश्चर्य कसले?) पण चोखामेळ्याचा आवाज नात्र ओळखला. दाराला कडी कोयंडा कुलुप घातलेले असतानाही हा चोखोबा गाभाऱ्यात शिरला ही बातमी त्याने धावत पळत जाऊन इतर बडवे मंडळींना सांगितली. सगळे जमले.कलुप काढून आत गेले तर खरंच तिथे विठ्ठल मूर्तीपाशी हात जोडून चोखामेळा पुटपुटत असलेला दिसला. मग काय विचारता! “ कुलुप कसे काढलेस? आत कसा शिरलास? दरवाजे बंद करतानाच तू आत होतास का? अनेक प्रश्न धडाधड विचारत होते सर्वजण.

चोखा मेळा हात जोडून दीनवाणे सारखे इतकेच म्हणत होता,” अहो माझा काही गुन्हा नाही. मला स्वता पांडुरंगानीच हात धरून आत आणले. खरं त्येच सांगतोय मी. मला जाऊ द्या. दया करा माझ्यावर” असे म्हणत चोखामेळा जाऊ लागला. पण त्याला सगळ्या वरिष्ठांनी दरडावून सांगितले,”चोख्या आता जा. पण इथे पंढरपुरात राहायचे नाही. तू राहिलास इथे तर तू सांगतोस तसे पांडुरंग तुला देवळात घेऊन येईल रोज. विठ्ठ्लाला तुझा विटाळ नको. काय? पुन्हा इकडे यायचे नाही, लक्षात ठेव!” अशी त्याला तंबी दिली.

विठ्ठलाला तुझा विटाळ नको हे ऐकल्यावर मात्र चोखा थबकला; आणि म्हणाला,” महाराज मी पंढरीनाथाला बाटवले असे म्हणू नका हो.अहो शूद्राने आणि ब्राम्हणाने दोघांनीही गंगेत स्नान केले तर गंगेला कसे काय दूषण येते? गंगा कशी अपवित्र होईल? अहो दुर्जनाच्या अंगाला वारा लागला तर वारा दुष्ट होतो का? त्याला कसला दोष लागेल? पांडुरंगालाही सर्व जाती सारख्याच आहेत!तो आहे तसाच आहे!”

चोख्याचे हे बिनतोड विचार ऐकल्यावर तर पुजारी मंडळी अधिकच खवळली. आणि म्हणाले,” चोख्या,आम्हाला ब्रम्हज्ञान शिकवू नकोस. चल निघ इथून.” चोखा हिरमुसला आणि घरी परतला.विठ्ठलालाच आपला उबग आला की काय असे मनाला विचारत घरी परतला.

दुसरे दिवशी आपला प्रपंच पसारा होता तेव्हढा घेऊन नदीपल्याड राहायला लागला. कुठेही असला, राहिला तरी ऱ्भक्त हरिभजनाशिवाय कसा राहील? रोज पांडुरंगाची आठवण काढत तो हरिनामसंकीर्तनात राहू लागला. नंतर काही दिवसांनी विठोबाच्या देवळाला सन्मुख होईल अशी एक दीपमाळ त्याने बांधली.

एके दिवशी दुपारी लिंबाच्या झाडाखाली चोखोबा जेवायला बसला असता अचानक पांडुरंग आले! चोखोबाचा आनंद काय वर्णावा! बायकोला हे सांगितले. तिचीही धांदल उडाली. विठ्ठल आपल्याइथं जेवणार म्हणल्यावर दिवाळीही फिकी झाली की! चिवडा लाडू कुठुन असणार पण भाकरी आमटी दह्याचे गाडगे आणू ठेवू लागली. दोघे जेवायला बसले. देवा भक्ताच्या गोष्टी चालू होत्या. आणि जेवणही. तिकडून पंढरीचा पुजारी तिथे आला. आणि चोखोबा जेवतोय बायको वाढतेय हे तो पाहात होता. वाढताना चोखामेळ्याच्या बायकोच्या हातून दही सांडले असावे. कारण चोखा म्हणाला ,” अगं सावकाश. आज पंढरीनाथ महाराज जेवताहेत आपल्याकडे. आणि तू त्यांच्या भरजरी पितांबरावर दही सांडलेस की! जरा बेताने!” चोखा म्हणत होता. काही वेळाने झाडाकडे पाहात वर बसलेल्या कावळ्याला चोखोबा म्हणतो,” काकबा, हे काय करता? लिंबोळ्या नीट खा. खाली भगवंताच्या पानात टाकू नका.” म्हणत त्याने जवळ पडलेली निंबोळी उचलून फेकून दिली. हे ऐकून पुजारी कातावला. पितांबरावर दही सांडले काय म्हणतोय? कावळ्याला लिंबोळ्या अर्घवट खाऊन टाकू नको काय म्हणतोय! काय चाललेय काय हे सगळे त्याचे थेर? मला पाहून हा मुद्दाम मला खिजवण्यासाठीच करतोय.दुसरं काय?! “ असे स्वत:शी म्हणत तो पुढे झाला आणि चोखामेळ्याच्या अंगावर ओरडून म्हणाला,” काय रे चोख्या, हे काय पाखंडाचे थोतांड चालवले आहेस? कुठला विठोबाआणि त्याचा पितांबर? कावळ्याशीही काय बोलतोस!” असे म्हणत संतापाने पुढे होऊन चोखामेळ्याला एक सणसणीत मुस्काडात ठेवून दिली! चोख्याचा गाल चांगलाच फुगला होता. चोखा गालावर हात ठेवून कळवळत मागे कलंडला. त्याच्यावर आणखीनच दरडावत, “ ही नाटकं बंद कर.” असा दम देत पुजारी नदी पार करून विठ्ठल मंदिरात आला. गाभाऱ्यात गेला. तो हतबुद्धच झाला. दुसरे दोन तीन पुजारी होते तेही गप्प गप्प होते!

विठोबाच्या मूर्तीचा दगडी गाल सुजून चांगलाच फुगला होता. आणि विठोबाच्या पितांबरावर दही सांडलेलेही दिसले! ते पाहून पुजारी घाबरला. उलट पावली चोखामेळ्याकडे गेला. इतर ब्राम्हण व मजारी बडवेही त्याच्या मागोमाग निघाली. चोखामेळ्यासमोर तो पुजारी साष्टांग नमस्कार घालत म्हणाला,” चोखोबा (आता चोख्या म्हणाला नाही!) मला क्षमा करा. तुमच्या भक्तीभावाची मी कुचेष्टा केली. तुम्ही माझ्याबरोबर देवळात चला. विठोबाची समजुत घाला. मला वाचवा!”

चोखा म्हणाला, “ ममाझी जागा देवळाबाहेर ! आता तर तुम्ही गावाबाहेर काढले मला. विठोबा माझं काय ऐकणार! तुम्ही ब्रम्हज्ञानी माणसं. मी साधा शुद्रातला शूद्र. विठोबा माझं काय ऐकणार? “
पुजारी आणि आता इतर ब्रम्हवृंदही गयावया करू लागले. चोखोबा तयार झाला.

गाभाऱ्यात गेल्यावर विठोबाचा तो इतका सुजलेला गाल, की एक डोळाही दिसेना असा बारीक झाला होता. आपल्या पांडुरंगाचे असे श्रीमुख पाहून चोखोबा विठोबाच्या पायावर डोके ठेवून मुसमुसून रडू लागला. मनात सारखे घोकत होता,” पांडुरंगा, विठ्ठला मायबापा! अरे मी कोण कुठला.क्षुल्लक क्षुद्र माणूस.माझे घाव तुम्ही झेलले. माझ्यावरचे तडाखे तुम्ही खाल्ले, सोसले!
करूणाकरा, विठ्ला म्हणत त्याने पांडुरंगाच्या गालावरून आपला हात हळुवारपणे फिरवला. विठ्ठ्लाचा सुजलेला गाल पूर्ववत झाला. त्याचे सावळे सुंदर रूप पुन्हा नेहमीसारखे साजिरे गोजिरे मनोहर झाले!

चोखोबा बरोबर इतर सर्व मंडळी जय जय रामकृष्ण हरी ह्या भजनाचा घोष तल्लीनतेने करू लागले व नंतर त्यांच्या सुरांत आपलेही सूर मिसळून आपणही ‘पुंडलिक वरदाऽ हाऽऽरी विठ्ठल ! श्रीपंढरीनाऽऽथ महाराऽऽज की जय।। चा जय जयकार करू या!

वेगळी पुस्तके

बेलमाॅन्ट

आज रेडवुडसिटी लायब्ररीतील ‘माणूस ग्रंथालयात’ गेलो होतो. पंधरा दिवसांपूर्वी नाव नोंदवले होते. तीन मानवी पुस्तके निवडायला सांगितली होती. मी माझी आवड निवड कळवली. पण एकच वाचायला मिळेल बाकीची दोन आधीच कुणी तरी घेतली होती असे कळले. मी ठीक आहे असे मनात म्हणालो. त्यातही नेहमी प्रमाणे तिसऱ्या पसंतीचेच मिळाले होते.


ह्या पुस्तकांच्या यादीत वेगवेगळ्या विषयांवरचे मानवी ग्रंथ होते! यादी पाहा. आंधळा, व्यसनमुक्त बाप लेक, सुधारलेला गुंड, स्वप्ने पाहणारा!, संगणक शास्त्रज्ञ,पोलिस आॅफिसर, लिंगबदल झालेली व्यक्ति व आणखी काही दोन तीन पुस्तके होती.

परिक्षेत कोणत्याही पेपरात, एकही सोपा प्रश्न माझ्या वाट्याला न येणाऱ्या मला इथेही अवघड पुस्तकच वाचावे लागणार होते. लक्षात आलं असेलच की मला संगणक शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचायचे होते!

विषय समजल्यापासूनच धडधड सुरू झाली होती. मी काय वाचणार आणि मला काय समजणार?! सतीशला विचारायचो काय विचारू, काय बोलायचे वगैरे प्रश्न चालू होते माझे. नंतर लक्षात आले की सोनिया, तिच्या वर्गातील दुसरी मुले त्यांच्या project साठी काही जणांच्या मुलाखती घेतात ते किती अवघड असते! पण ती किती व्यवस्थित घेते. मी दहा बारा दिवस नुसता विचार न करताही घामेघुम होत असे. आणि आज सतीशने रेडवुडसिटी लायब्रीपाशी सोडले तेव्हा मी लगेच पळत घरी जायला गाडीत बसणार होतो. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेल्या आई बापाचा हात पोरगं सोडतच नाही; वर्गात जात नाही तसे माझे झाले होते. ‘ बाबा काही पुस्तक वाचायला जाणार नाहीत’हे सतीशला समजले असावे.

मी गाडीतून उतरल्याबरोबर त्याने इकडे तिकडे न पाहता फक्त All the Best पुटपुटत गाडी लगेच भरधाव नेली. मी रडकुंडीला येऊन गाडीमागे दोन पावले पळत गेलो.पण त्याने गाडी थांबवली नाही. मी त्यालाच आत पाठवणार होतो. पण मलाच आत जावेलागले. तिथे पोचणारा मीच पहिला होतो. अजून अर्धा एक तास होता. नेहमीप्रमाणे प्रथम तिथल्या दुकानात गेलो. नव्यासारखी दिसणारी, काही नवी, काही जुनी झालेली निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके पाहात थोडा वेळ घालवला.

रिडिंग हाॅल मध्ये जाऊन तिथे दिसेल ते पुस्तक वाचायचे ठरवले होते. पण पहिल्याच झटक्यात AIQ हे Nick Polson & James Scott ह्यांचे पुस्तक हाताला लागले! एकदम भरून आले. ‘केव्हढी कृपा’
‘चमत्कार चमत्कार तो हाच!’ ‘ह्यामागे काही तरी योजना असली पाहिजे’ ह्या भाबड्या बावळट विचारांच्या ढगांत फिरून आलो.महाराजांनी पेपर तर फोडलाच आणि वर मला हे AIQ चे गाईडही दिले!

पुस्तक वाचायच्या आधी परिक्षणे अभिप्राय तरी वाचावेत म्हणून मलपृष्ठ वाचू लागलो.पहिलाच अभिप्राय न्यूयाॅर्क टाईम्सचा. तो म्हणत होता, “लेखकांनी इतक्या हलक्या फुलक्या शैलीत लिहिले आहे की ते सदाशिव कामतकरांनाही समजेल! आम्हाला तर शंका आहे की त्यांच्यासाठीच ते लिहिले आहे! “ थक्क झालो! हे वाचल्यावर ट्रम्प, न्यूयाॅर्क टाईम्स वाॅशिंग्टन पोस्ट ह्यांना fake news म्हणणार नाही. पण मला आताच प्रश्न पडला की,न्यूयाॅर्क टाईम्सचे सोडून देऊ,त्यांना मी माहितच आहे; पण रेडवुड लायब्ररीला कसे समजले की मी वाचक आहे ते? थोडे डोके खाजवल्यावर लक्षात आले. “अरे शाळेत असतांना तू जसे गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये मला घ्याना मला घ्या ना बे; बॅटिंग बोलिंगही करतो ना मी. वाटल्यास फिल्डिंगही करीन. अशी दोन दिवस भुणभुण लावत त्या टीमभोवती फिरायचास? तसेच ह्या लायब्ररीलाही तू एकदा नाही तीन वेळा कळवलेस मी पुस्तक वाचायला येईन म्हणून!”

परीक्षेच्या हाॅल मध्ये जाण्यापूर्वी बहुतेक सगळेच अभ्यासावर शेवटचा हात फिरवितच आत जातात तसेच झाले की हे! असे म्हणत पुस्तक उधडले. वाचायला लागलो. भाताच्या प्रत्येक घासाला खडा लागावा किंवा भाकरीच्या पिठात खर आल्यामुळे भाकरीचा घासही वाळूची भाकरी खातोय की काय असे वाटावे तसे पहिल्या वाक्यापासून होऊ लागले. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळायला घ्यावा किंवा ‘देवा तुझे किती सुंदर… ‘ ह्या कवितेच्यापुढे मजल न गेलेल्या माझ्या सारख्याने मर्ढेकर, पु. शि. रेगे किंवा ग्रेस ह्यांच्या कविताचे रसग्रहण करण्यासारखे किंवा अनुष्टुभ, अबक मधील कवितांचा अर्थ समजून घेण्यासारखेच हे काम आहे हे समजून आले. पुस्तक जागेवर उलटे ठेऊन वरच्या हाॅलमध्ये गेलो.

नेहमीप्रमाणे मीच पहिला वाचक. इतर वाचक कोणीही नव्हते. त्यामुळे मला पाहून Jenny Barnes ला खरंच ‘Happy to see you’ झाले. तिने मला नाव न विचारता माझे “सुंदर ते ध्यान” पाहूनच माझ्या नावापुढे मी आल्याची खूण केली. आत घेऊन गेली व माझे टेबल दाखवले. माझे पुस्तक आले नव्हते. हळू हळू इतर वाचक आणि पुस्तके येऊ लागली. त्या अगोदर व्यसनमुक्त बाप लेका ऐवजी माय लेक(मुलगा)आले होते.त्यांच्याशी बोललो. तेव्हढेच Warm up !

बार्न्सने एक छापील पत्रक दिले होते. वैयक्तिक खाजगी माहिती विचारू नये; हरकत नसेलतर विचारा/ सांगा. बोलण्यापेक्षा बोलते करा, ऐका; नमुन्यादाखल काय विचारणे चांगले वगैरे सर्व सूचना त्यात होत्या. मला पुष्कळ धीर येऊ लागला. वेळ झाली. सगळी पुस्तके आली वाचक आले. आपापल्या टेबला वर गेले. पेपर वीस मिनिटांचा. १५व्या मिनिटाला पूर्व सूचनेची घंटा होईल हे सांगून झाले. आणि सुर करा असे जेनी बार्न्स म्हणाली. माझी दातखीळ बसली! बरे झाले,शास्त्रज्ञ बाईनेच स्वत:ची “ हाय्! मी एमिली!” कसे काय आहात?”विचारत माझ्या घामाच्या धारांना बांध घालायचा प्रयत्न केला. नुकतेच वाचलेले शीर्षकच AIQ म्हणून उत्तर दिले. घाबरल्यावर आवाज मोठा होतो हे आजच लक्षात आले. कारण त्या हाॅलमध्ये माझ्या AIQ चे तीन वेळा प्रतिध्वनी घुमले! सगळ्या वाचकांनी पुस्तके पटापट बंद केली व काय झाले असा चेहरा करून एमिली बाईंकडे सहानुभुतीने पाहू लागले.त्यांना काय माहित असे अजून बरेच वेळा होणार आहे ते! पण एमिली बाई प्रसंगावधानी. त्यांनी तोच धागा पकडून “ ह्या गोष्टींची सुरवात १७५० पासून झाली. १९२० साली नेव्हीतील अॅडमिरल बाईंनी ह्यावर बरेच काम केले होते. मी मग काही संबंध नसताना algorithms हे संध्येतील नाव घ्यावे तसे म्हणून लगेच आठवून आठवून step by step..असे काही तरी पुटपुटलो.म्हणजे मला वाटले मी पुटपुटलो; पण माझा घुमलेला आवाज ऐकून लगेच इतर वाचकांनी आणि नवल म्हणजे पुस्तकांनीही माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने रागाने पाहात लायब्ररीत शांतता पाळायची असते त्याची आठवण करून दिली. एमिली बाईंबरोबर माझाही उत्साह वाढू लागला असावा. मग रोबाॅट्सही चर्चेत आले.

ह्या बाई संगणक शास्त्रात डाॅक्टरेट आहेत. पण गंमत अशी की त्या ह्या शास्त्राकडे वळल्या त्यामागे त्यांची पहिली व आजही असलेली भाषेविषयीची आवड. त्यांना चार पाच भाषा तरी येतात. विशेष म्हणजे लॅटिन जास्त चांगली येते. म्हणजे आपल्या कडील संस्कृत तज्ञ. भाषेतील व्याकरण, शब्दोच्चार त्यातील उच्चारांचे टप्पे किंवा तुकडे. शब्दरचना व होणारे वाक्य; पिरॅमिडच्या शिखरावर शब्द व त्या खाली, खाली तो तयार होण्यासाठी त्यातील अक्षरे त्यांचे होणारे उच्चार ह्यांची बांधणी करत करत शब्द होतो. तसेच वाक्यही. तेच मी प्रोग्रॅमिंगमध्ये करते असे उदाहरणे देऊन सांगितले. त्या इंजिनिअर नसूनही संगणक शास्त्रज्ञ झाल्या. त्यांनी मला alexa, siri संबंधात थोडक्यात सांगितले.पहिल्या अर्ध्या मिनिटातच माझ्या आकलनशक्तीचीही व स्तराची त्यांना कल्पना आली असावी. त्यांच्या टेबलाकडे मी व जातांना त्या स्वेटर विणत होत्या. शेवटी शेवटी मी त्यांना तसे सांगितले. त्यावर त्या लगेच हसत म्हणाल्या knitting सुद्धा प्रोग्रॅमिंगच आहे. विणायचा स्वेटर घेउन लगेच त्यांनी दोन उलट एक सुलट पुन्हा एक उलट…टाके सुईवर घेत त्याही कशा algorithmic स्टेप्स आहेत ते मला प्रत्येक स्टेप घेऊन सांगू लागल्या. घंटा होऊन गेली होती. ‘पेपर’ वाचून (सोडवून) झाला होता. वेळ संपत आला. सगळ्यांच्या उठण्याच्या निघायच्या हालचाली सुरु झाल्या. माझेही वाचन संपले होते.

हा मुलाखतीचा किंवा प्रश्नोत्तरांचा प्रकार नाही. ह्यात वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्या नेहमीच्या पठडीतील लोकांपेक्षा वेगळ्या, आपल्याला ज्यांच्याविषयी, ज्यांच्या पेशा कामा विषयी फारशी माहिती नसते कुतुहल असते अशांची भेट. त्यांनाही मुख्य प्रवाहात इतरेजनांच्या सहवासात आणून संवाद साधण्याचा हा एक वेगळा सामाजिक कार्याचा प्रकार आहे.दोन वाक्यात सांगायचे तर तुम्हीही आम्हीच आहात. आणि व आम्हीही तुम्हीच आहात. हे जाणून घ्यायचा हा वेगळा एका अर्थी उद्बोधक आणि सुंदर सामाजिक उपक्रम आहे.

उपक्रमाला नावही (ज्या स्थळी हा आयोजित केला त्याचाही त्यात थोडा वाटा असेल ) वेगळे व लक्षवेधी आहे . Human Library. Civit ह्या संस्थेने केलेला उपक्रम आहे.

मी सर्वेक्षणात सहसा भाग घेत नाही. पण अखेरीला मी त्यांचा फाॅर्म भरून दिला. नविन पुस्तके सुचवा मध्ये मी weatherman(Meteorologist) fire fighter first responders सुचवले.

मला हा नविन अनुभव होता. समोरासमोर अनोळखी व्यक्तीशी (इंग्रजीतून!) संभाषण करण्याची ही माझी पहिलीच वेळ. वेळ चांगला गेला व कारणी लागला असे वाटले.

मी लिहिलेले ‘हे पुस्तक’ वाचनीय वाटेल की नाही ही शंका आहे. कारण सर्वेक्षणातील “तुम्हाला ‘पुस्तक’ व्हायला आवडेल का?” हा प्रश्न मी सोडून दिला!

संपता संपता, AIQ ची मी दोन चार पाने वाचली त्यावरून हे पुस्तक उत्तम आणि वाचावे असे आहे इतके सुचवतो.

म्हैपत, विठोबा आणि विठोबाचा विठोबा

म्हैपतचे किराणा मालाचे लहानसे दुकान होते. दुकान लहान आणि झोपडपट्टीच्या भागातले. त्याच्याकडे येणारी गिऱ्हाइके सुद्धा त्याच्यासारखीच! म्हैपत रोज घंटी सोडून दोन्ही मडगार्ड खडखडऽ वाजणाऱ्या, चारी दिशेने गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेल व चेनचे चाक कुंईंऽकुईंऽखटक् खटक् करणाऱ्या खडार्डम स्टाप सायकलवरून यायचा.

त्याची गिऱ्हाईकेही चालत चालतच यायची. कोणी दोन्ही पायांनी लंगडा असला तरी बूट पाॅलिशमधल्या डेव्हिड सारखा एकच कुबडी घेत पण दुप्पट लंगडत येई, तर लहान पोरं चड्डी नसल्यामुळे बापाचा किंवा थोरल्याचा मोठा सदरा घालून, पोरी डोक्याला सटी सा महिन्यात तेल लागलेले आपले झिंज्यापकाडीचे केस मिरवत, तर बायाबापड्या रोजच तेच दंड घातलेले लुगडे किंवा पातळ लेवून येत, बोळक्या तोंडाचे म्हातारे दाढी करणे परवडत नसल्यामुळे अनायासे वाढलेल्या दाढीने गालाचे खड्डे बुजवून येत, तर रशीद मामू धेलेका गूड उधार घ्यायला यायचा ते मात्र दाढीला मेंदी लावून!

गंगव्वा आजी छातीच्या फासळ्यावर गळ्यातले चांदीचे काळपट लिंग आदळत, तर बाबूची भारदस्त आई आपलेच वजन कसे बसे उचलत तीन महिन्याच्या उधारीतील फक्त एक आणा देऊन तांबड्या मिरच्या,मीठ आणि दोन कांद्याची तीन आण्याची नविन उधारी करून जाई, बौद्धवाड्यातले लोक येत,सुताइतकी जाड मेणबत्ती, नीळीची पूड घेऊन जात. ही गिऱ्हाइकं. स्कोडा जाऊ द्या मोडीत गेलेल्या मारुती ८०० मधून येणारे गिऱ्हाइक कुठून येणार? हां! आला तर झोपडपट्टीच्या व लहान लहान टपरींच्या वसुलीसाठी फटफटीवरून गाॅगल लावलेला रम्या यायचा. पण त्याला दिलेल्या सिगरेटच्या पाकिटाचे पैसे मागायला म्हैपतची काय छाती होती!

आता सांगा ह्याच्याकडे स्कोडात बसून येणारे कुणी गिऱ्हाइक कसे येईल? आणि म्हैपतीला त्याची गरजही नसे.

तो सकाळी आपली ‘खड खड खडा्र्ड’ प्रख्यात सायकल बाजूच्या बोळात ठेवत असे. दुकान उघडून करायची तेव्हढी झाडलोट करून विठोबाच्या तसबिरीला उदबत्ती दाखवून नमस्कार करून गिऱ्हाइकाची वाट बघत बसे. थोड्या वेळाने रस्ता झाडणारी,खराट्यापेक्षाही बारीक असलेली अक्की येई. कधीमधी खोकत, अर्धशिशीच्या डोकेदुखीमुळे बिब्याच्या फुल्यांनी रंगवलेल्या भुवया कपाळ दाबत रस्ता झाडायची. म्हैपत तिला हाक मारून कधी ज्येष्ठमधीच्या तुकड्या बरोबर काथाचा लहान खडा चघळायला देई. कधी लवंग तर कधी खडीसाखरेचा तुकडा देई. अक्की ते तुकडेकपाळाला लावून मानेनेच नमस्कार करून तोंडात टाकायची. काम चालू करायची. आलाच कधी ह्या वस्तीत तर कुणाची मनिआॅर्डर घेऊन पोस्टमन येत असे.

तो पत्ता विचारायला म्हैपत शिवाय कुणाकडे जाणार? त्याच्याच फळीवर बसणार. मग म्हैपत समोरून जाणाऱ्या पोराला अरे,” त्या लिंबेराव पोतराजाला पाठव रे दुकानात. पोस्टमनभाऊ आलेत म्हणावं; आन हां चाबूक नको आणू म्हणावं. काय? जा सांग.” तो यायचा. अंगठा द्यायचा. म्हैपत साक्षीदार म्हणून सही करायचा. दहा रुपये पाहून हरखलेला पोतराजा निघाला की म्हैपत त्याला,” अरे माझी उधारी कधी देणार? द्यायची विसरू नको बाबा.” इतकंच म्हणायचा. पोस्टमनला सुपारीचे लहान पाकिट द्यायचा.

पोस्टमनही ती लहान पुडी तिथेच फाडून त्यातले चार सुगंधी तुकडे चघळत कागद फेकून निघून जायचा. म्हैपतचे मग च्याची पत्ती, साखर, काडी पेटी, एक बिडी बंडल हिरवा दोरा, निरमाची लहान वडी, लाईफबाॅय, शेंगादाणे, मसुरची लाल डाळ,गोडबोले सातारी जर्द्याचा तोटा, कुणाला गाय छाप जर्दाच पाहिजे तर कुणाला अंमळनेरचा पटेल जर्दाच चालत असे पण हे सगळे पटापटा देणे सुरु होई. दिलेल्याचे पैसे घ्यायचे उरलेली चिल्लर मोड द्यायची;उधाऱ्याची उधारी लिहायची; लिहिताना “आता उधारी मिळणार नाय बघ.ही शेवटची!” असा रोजचा दम द्यायचा. म्हैपतचा दम फुसका हे गिऱ्हाइकालाही माहित असते. तो फक्त मान हलवत जायचा. ह्याचा अर्थ म्हैपतचा दिवस सुरू झाला.

पण म्हैपतचा एक कायदा होता. तो जर्दा तंबाखू सिगारेट कुणालाही कधीही उधार देत नसे. असं का विचारले तर म्हणायचा तेव्हढीच कमी खातात हो; कमी ओढतात रोख द्यायचे म्हटल्यावर! मग बिडी बंडल का देतो उधार? ह्यावर तो सांगेल,” अवो, बिडी ती केव्हढी! तिच्यात तंबाखू निम्मीच असते. आन बिडी ओढणारा किंवा ओढणारी बी जास्त करून गरीबच असतात.कितेकदा अर्धीच ओढून बंडलात ठेवतात!” म्हैपतचे हे इतकेच आर्थिक,नैतिक व सामाजिक तत्वज्ञान!

थोड्या वेळाने वेळाने झोपडपट्टीतून कोणी दोन माणसे साधु बनून शहरात फेरी मारायला निघायचे. त्यांना म्हैपती,” ए चंगू मंगू! माझे पैसे केव्वा देणार?” निघाले चिमटा वाजवत!”ते दोघे हसत पण केविलवाणे तोंड करत,काय म्हैपतभाऊ असली पैली भोनी करतो कायरे ? आधीच आम्हाला लोक हडत हुडुत करतात. मोटारवाले तर आमाला पाहिले की काचा वर करतात.,एक दोघे ट्रकवाले, रिक्षावाले काही द्येतात.पन काऽय रया नाही राहिली. सगळी नावं घेतो ज्या त्या वस्तीत, सोसायटीत. अलख निरंजन! बम् भोले नाथ!गुरूद्येव द्त्त! अवधूत चिंतन… ! घसा दुखतो. अान तू हे उधारीचे काढले.” असे म्हणत सटकतात.


म्हैपत दुपारी आपला डबा खायला बसणार ह्याचा सुगावा कोपऱ्यावरच्या एका पायावर उभे राहून काही न बोलता भिक मागणाऱ्या ‘ हटयोगी’ मौनी भिकाऱ्याला आणि पलिकडच्या मोरपिसाच्या झाडूवाल्या फकिराला कसा काय लागतो ते म्हैपतलाही समजले नाही. अर्धा डबा झाला की हटयोगी दोन्ही ढांगा भराभर टाकत आणि फकीर झाडू खाकोटीला मारत, क्या म्हैपतबाबा म्हणत आलाच. म्हैपतही डोळ्यांनीच या म्हणत डब्यातले जितके देता येईल तेव्हढे दोघांना देत असे. दिस संपला. रात्रीचे अकरा वाजता दुकान बंद करून गल्ला रेक्सिनच्या पाकिटात, पाकीट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी सायकलच्या गर्रकन चारी दिशेला फिरणाऱ्या हॅन्डवेललाअडकवत म्हैपत सायकलवर टांग मारून मडगार्ड खड खड खाडार्ड खड वाजवत,चेन व चाक कुईं कुईं खटक् करत घरी जाई.बायका पोरांची चौकशी करून अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिया दारी’ हा अभंग व सुंदर ते ध्यान’ भजन झाले की ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत हात जोडत झोपी जायचा.

एके रात्री म्हैपतीच्या स्वप्नांत विठोबा आला. आला तो डोक्यावर किरीट, तुळशी हार घातलेला, कानात मकर कुंडले, कंठी कौस्तुभ मणि विराजत असलेला मुक्तफळांचा कंठा घातलेला, झळाळता पिवळा पितांबर नेसलेला, अशा भरजरी रूपातच! विठोबाचे ते रूप पाहून म्हैपत इतर सर्व काही विसरला. विठोबा म्हणाला, “म्हैपत तुला भेटायला मी उद्या येणार आहे.” “म्हणजे मला दर्शन देणार?” माहित असलेले मोठे शब्द वापरून म्हैपत विठोबावर इम्प्रेशन मारत होता. विठोबा फक्त त्यालाच जमेल आणि शोभणारे मधुर हसत, न बोलता फक्त मानेने हो म्हणाला आणि गायब झाला. सकाळ झाली म्हैपत उठला पण विठोबाला आपण नमस्कारही करायचा विसरलो ह्या चुटपुटीने सारखा हळहळत होता.

म्हैपत आज त्याच खड खड खडार्ड आणि कुंईं कुंईं खटक् करणाऱ्या सायकल वरून येत होता. पण विठोबा भेटणार त्यामुळे त्याला आज ते आवाज ऐकूच आले नाहीत. हिरव्या रॅलेवरून येतोय ह्या थाटात दुकानापाशी आला. सायकल बाजूच्या बोळात ठेवली. रोजचा दिवस सुरू झाला.

पण आज रस्ता झाडायला अक्की आली नव्हती. तिच्या ऐवजी दुसरीच कुणी बदली आली होती. थोडा वेळ म्हैपत विचारांत होता. पण पांडुरंगाला उदबत्ती ओवाळण्यात त्याचा वेळ गेला. मग रस्याकडे पाहात असता ती बदलीबाई आली. विचारू लागली, “म्हैपतशेठ तुमीच का?” म्हैपतचा शेठ झाल्याने तो कोड्यात पडला. पण तो हो म्हणाल्यावर ती बाई म्हणाली, “शेठ अक्की लै बिमार हाये फार. डाॅक्टरकडे नेले पायजे तिला. पर… “ म्हैपतला समजले.त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला मेंदीबाबा रशिदमामू दिसला. “ओ मामू जरा दुकानाकडे ध्यान दे. मी आलोच.” अरे मै क्या ध्यान देणार? कुणी आलं गिऱ्हाईक तर?” “काडी पेटी बिडी बंडल साबुन अस दे . दुसरं काही देऊ नको.”इतके सांगून तो त्या बाई बरोबर अक्कीच्या झोपडीकडे गेला.

तिथलं चित्र पाहिल्यावर म्हैपतला आपण कुठं आलो ते समजेना. पण गटारी, ओघळ,शेवाळ, घाण चुकवत टपरीजवळ आला. अक्की शुद्ध नसल्यासारखी बोलत होती. म्हैपत दुसऱ्या बाई बरोबर डाॅक्टरकडे गेला. दादा बाबा करून डाॅक्टरला आणला. त्याने अक्कीला तपासले. दोन इंजेक्शने दिली. गोळ्या लिहून दिल्या. म्हैपत झपाट्याने दुकानाकडे गेला.औषधे आणली. दोन फळं घेतली. सर्व त्या बाईजवळ दिले. आणि म्हणाला. बाई आज तुम्ही तिच्याजवळ थांबा.मी तुमच्या मुकादमाला सांगतो.” म्हैपत दुकानात आला. मेंदीवाल्या मामूने विकलेल्या वस्तुचे पैसे त्याला दिले. आणि रशिद मामू गेला.


दिवस सुरू झाला होताच. रोखीची कमी,उधारी जास्तीची अशी रोजची विक्री सुरू झाली. तेव्हढ्यांत नरसू तेलगी एक पाय खुरडत खुरडत पोराला घेऊन आला. “ म्हैपतबाबा, हे माझा नातू. तेन्ला कारखान्यात बोलावलंय. पैसे नाहीत. कारखान्यात जायाला. रिक्षा लागंल, लांब हाये म्हनतो फार. आणि बघ, चहा पाव खायलाही काही लागतील. आज येव्ढी वेळ भागव. नोकरी लागली तर तुझे पैसे दुपटीने देईन”. म्हैपतने पैसे काढून त्या पोराला दिले. नरसू तेलगी आणि नातू म्हैपतला हात जोडून गेले. म्हैपतचे हात चालत होते. वस्तु देत होता. उधारी लिहित होता. कुणी रोख दिले ते घेत होता. पण आज काही झाले तरी एक आण्याचा आवळा देऊन चार आणे उधारीचा कोहळा घेऊन जाणाऱी बाबुची आई आली तर तिला उधारी द्यायचीच नाही असं तिला येताना पाहूनच त्याने ठरवले.

बाबुची आई आली. नेहमीच्या हळू आवाजात बोलून तिने दोन आणे दिले.आणि नविन वस्तु मागितल्या.म्हैपत ढिम्म बसला. पण तिने गयावया केल्यावर उधारी दिलीच! म्हैपत स्वप्न, विठोबा विसरला होता. पण आता लक्षात आले. अरे इतका वेळ झाला. पण विठोबा काही आला नाही. चुटपुट लागली. “नमस्कार करायचा विसरलो. विठोबा रागावला असेल. पण त्याला समजू ने का मी गांगरून गेलतो.” असे पुटपुटत गिऱ्हाइकी करत होता. मध्येच मोठ्या रस्त्याकडे पाहायचा, विठोबा तिकडून येईल म्हणून! मोठ्या रस्त्यावरून रोजची ट्रक बस रिक्षा मोटारी जातच होत्या. ती रहदारी तेव्हढी दिसली!

दुपार झाली. डबा खायची वेळ झाली. अर्धा डबा खाऊन झाला.तेव्हढ्यात एक कुत्रा आला. काटकुळा. मागचा एक पाय न टेकता चालत होता. कुत्रा रोज कधी दिसत नव्हता. पण म्हैपत खात होता, कुत्रा पाहात होता. म्हैपतने एक पोळी त्याला दिली. कुत्र्याने शेपटी हलवली. पोळी घेऊन गेला. ‘हटयोगी’ दोन्ही ढांगा टाकत व फकीर पंखा खाकोटीला मारत दोघेही आले. म्हैपतीने त्यांना रोजच्या प्रमाणे आपल्या डब्यातले खायला दिले. फकीर दुवा देत आणि ‘हटयोगी’ एक हात उचलून नमस्कार करत गेला. दुकान सुरू झाले. लिंगायत गंगव्वा आली ती रडतच. काय झालं असे विचारताच ती जास्तच रडू लागली.मग पुन्हा विचारल्यावर,” काय सांगायचं म्हैपतभाऊ!” म्हणत गावाकडे तिचे वडील वारल्याचे तिने सांगितले. म्हैपतने न बोलता पेटीतल्या थोड्या नोटा काढून दिल्यावर ती आपले हाडं आणि शिराच राहिलेले दोन्ही हात जोडून म्हैपतच्या पेटीवर डोके टेकून स्फुंदत स्फुंदत रडत काही तरी बोलली. पुन्हा पुन्हा हात जोडून ती माघारी गेली. दिवस संपत आला. रात्र झाली. अकरा वाजले. आज काही गल्ला नव्हताच. काय जो होता तो रेक्सिनच्या पाकिटात, पाकिट हिरव्या रेक्सिनच्या पिशवीत, पिशवी चारी दिशेला गरकन् फिरणाऱ्या हॅंडवेलला अडकवून सायकलवर टांग मारून खड खड खाडार्ड खड वाजवत, कुंईं कुंईं खटक् करत घरी आला.

बायका पोराची चौकशी केली.अंथरूणाला पाठ टेकायच्या आधी ‘देवाचिये दारी’ हा अभंग आणि ‘सुंदर ते ध्यान’ हे भजन म्हणून ‘पांडुरंगा विठ्ठला मायबापा’ म्हणत पडला. आणि आज विठ्ठलाने फसवले. भेटायला येतो,दर्शन देतो असे मधाचे बोट लावून गेला पण आला नाही! जाऊ द्या. तो देव आहे. आपण काही देव नाही. असं म्हणत झोपी गेला. स्वप्नात पुन्हा विठोबा आला. त्याला काही बोलू न देता म्हैपत एकदम बोलू लागला, “विठ्ठला,पांडुरंगा मला फशिवलस आज. येतो म्हणालास पण तू काही आला नाहीस. काल तुला नमस्कार करायचा विसरलो म्हणून आला नसशील. आता आधी मी नमस्कार करतो तुला”असे एका दमात म्हणत म्हैपतने पांडुरंगाला दंडवत घातले.पांडुरंग नेहमीप्रमाणे त्यालाच जमणारे व शोभून दिसणारे मधुर हसला. म्हणाला, “म्हैपत,मी तीन चार वेळा येऊन गेलो.” “ तीन चार वेळा? अरे एकदाही दिसला नाहीस तू मला विठ्ठला!आणि तीन चार वेळा काय म्हणतोस तू?” “ म्हैपतबाबा, अरे अरे अक्की आजारी आहे हे सांगणारी बाई आणि अक्कीच्या रूपाने, नरसू तेलगी आणि त्याचा नातू, रोज न दिसणारा कुत्रा, लिंगायत गंगव्वा आणि आणखी किती किती रूपानी मी तुला दर्शन देणार? “ हे ऐकल्यावर म्हैपतचा गळा दाटून आला. आपोआप हात जोडले गेले. विठोबा पुढे म्हणाला, “ खरं सांगू म्हैपत ! अरे त्या सगळ्यांच्या डोळ्यांनी मीही तुलाच पाहात असतो! अरे तूही माझा विठोबाच ! पांडुरंगच असे म्हणाल्यावर म्हैपतच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागले. त्याबरोबर त्याच्याही तोंडावर विठ्ठलालाच जमणारे आणि शोभून दिसणारे मधुर हसू उमटू लागले! म्हैपत आणि स्वत: पांडुरंग “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ‘ भजन केव्हा म्हणू लागले ते दोघांच्याही लक्षात आले नाही!

जय जय रामकृष्ण हरी।जय जय जय रामकृष्ण हरी!

जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार

मी एक ओळीत जन्मभरीच्या श्वासा इतुके लिहिले मी शब्द अपार… !
माणूस आयुष्यभर शिकत असतो. जन्मभर विद्यर्थी असतो हे अनुभवाचे बोल प्रत्येकाला पाठ असतात. हे बोल ऐकल्यावर अनेकांना गुरु दत्तानी एकवीस गुरू केल्याची कथाही आठवते. त्याच त्या चुका वारंवार करत जीवनाच्या शाळेतील मी किती पारंगत विद्यार्थी आहे हे सगळ्यांना माहिती झाले आहे.
अनेक चुकांतील एक माझी नेहमीची ठळक चूक कोणती ते…..


आज मी उन्हे उलटण्याच्या सुमारास म्हणजे सावल्या लांब पडण्यास सुरुवात झाली नव्हती पण लवकरच पडू लागतील अशा वेळे आधी निघालो. साडे चार वाजता. फाटकातून बाहेर पडलो आणि नाॅटरडेम हायस्कूलच्या दिशेने निघालो.चुला व्हिस्टा’च्या वळणापाशी आलो. जावे का ह्या चढाच्या रस्त्याने? स्वत:लाच विचारले. “पण चढ खूप मोठा आहे. आपण ल्युनार्डीवरून ‘चुला व्हिस्टाकडे’ वळून दोन तीनदा गेलोय. कारण काय तर इकडूनही चढच आहे. पण ह्यापेक्षा कमी म्हणून तिकडून आलो होतो. पण हा जमेल का चढून जायला?” मळ्यात जाऊन “काय वांगी घेऊ का ?” असे वांग्यांच्या झाडांनाच विचारून भरपूर वांगी तोडून घेणाऱ्या भिकंभटासारखे मीही स्वत:लाच विचारून, जाऊ का नको ते ठरवत होतो! शेवटी देवाचे नाव घेतले व चुला व्हिस्टाचा चढ च-ढ-त,च—ढ—त निघालो.


वर मध्ये स्वल्प विराम टाकलाय पण एक एकेक पावलानंतर अर्धविराम घेत मी चाललो होतो. एका बाजूने डोंगर,झाडी दुसऱ्या हातालाएकीकडे खोलगट दऱ्या. घाटातला रस्ता म्हणावा तसा. पण झाडी दोन्ही बाजूला.आणि दोन्ही बाजूला घरे! काही झाडीतून दिसणारी, काही डोकावणारी! व वरच्या चढा चढाच्या हाताला वर वर बांधलेली. इकडे खाली उताराच्या बाजूलाही घरे. सगळी सुंदर! मी ज्या घाटातल्या रस्त्यावरून चढत जाण्याचा प्रयत्न करत होतो तो रहदारीचा. पण फार वर्दळीचा नाही. तिथे राहणाऱ्यांच्याच मोटारींची रहदारी. चढण त्रासाची होती. हे लोक मोटारीतूनही कशी सारखी ही चढण पार करत असतील व उतरतही कशी असतील!


अखेर वाटेत तीन चार वेळा प्रत्येक थांब्याला अर्धा एक मिनिट थांबत, ती रम्य आणि मनोहारी चढण पाहात पाहात पठारावर आलो. आणि हे काय आता आलीच की ती कार्लमाॅन्टची शाळा म्हणत पाय एक दो-न करत पडू लागले. डोंगर-चढाच्या चंद्रभागेचा रस्ता चढून-उतरून घरी आलो. एक तास लागला असेल. घाटातली अर्धचंद्राकार वळणाची गल्ली तीच चुला व्हिस्टाचीच; आज दुसऱ्या बाजूने आलो इतकेच.पण शहरातल्या खंडाळ्यातून फिरून आलोय इतका ताजा आनंद झाला!
ल्युनार्डीवरून भर रहदारीच्या नेहमीच्या रस्त्याने घरी सुखरूप आलो.
………………


वरचा संपूर्ण परिच्छेद मी पत्राच्या रूपात मुलांना पाठवला. त्याला काय उत्तर आले आले ते पाहा.
“बाबा, “आज उन्हे उलटण्याच्या ……निघालो” ह्याची काय गरज आहे? साडे चार वाजता निघालो. इतके पुरे.


पुढचे फाटकातून वगैरे कशाला? तुम्ही नेहमी फाटकावरून उड्या मारून बाहेर पडता? “चुला व्हिस्टापाशी आलो. इतके बास.नंतर तुम्ही जावे की न जावे वगैरे लिहिलेय. हॅम्लेटचे नाटक लिहिताय का भूमिका करताय? पुढचे ते देवाचे नाव कशासाठी? फिरायला निघाला होतात का लढाईला? आं?चुला व्हिस्टा तिथला चढ वगैरे अगोदर येऊन गेलंय. पुन्हा ते शिवणाचे टाके घालत काय लिहिलेय! चढ चढत किती वेळा? चढ चढतच जायचा असतो. ते लिहायची आवश्यकता नाही.बरं ते मध्ये स्वल्प वि…. ..का काय ते व्याकरण का आणले? अनावश्यक. आतातुम्ही शहरात राहता. घरे असणारच. बरे डोंगरातल्या रस्त्यावरून जाता आहात. तुम्ही अमेरिकेत असता. तिथे भरपूर झाडी आहे हे इथल्या देगाव-दवंड्यांचे गावच्या लोकांनाही माहित आहे. पुढे रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे काय.? कशासाठी प्रयत्न? आता निघालात ना फिरायला? पुन्हा प्रयत्न कसला? रहदारीचा पण फार वर्दळीचा नाही म्हणजे काय समजायचे वाचणाऱ्यांनी? असे हेही नाही तेही नाही तऱ्हेचे वाचून कुणी तो रस्ता ओलांडून गेला तर काय होईल त्याचे? अहो तुमचे हे पत्र वाचून अमेरिकेतले लोक खटला भरतील तुमच्यावर. तसेच ते पुढचे ‘मोटारीतूनही कशी ही चढण…..असतील’ ह्या वाक्याने वाचकाच्या माहितीत काय भर पडते? कित्येक वर्षे ते असे मोटारीतून जात येत आहेत.ते म्हणतील मोटारवाल्यांनी तुमच्याकडे किंवा सरकारकडे काही तक्रार केलीय का? काहीही लिहायचे आपले!


तुम्ही चालत गेला होता का बसने? मध्येच थांबे कुठून आले? काढून टाका तो सर्व मजकूर. बरं इतका वेळ तुम्हाला हा घाटाचा रस्ता चालवत नव्हता. मग एकदम ती चढण रम्य मनोहारी वगैरे कशी काय झाली?


पुढे, “पाय एक दो… “ लिहिले आहे.परेड करत होता का चालत होता? इतका वेळ एका ओळीतही पाण्याचा ओहोळ राहू द्या थेंबही नव्हता. मग ही डोंगर चढाचीच चंद्रभागा(म्हणजे काय ?!!)कुठून उगम पावली?खोडून टाका ते. बाबा तुम्हाला शाळा तर कधीही आवडत नव्हती. नेहमी ती बुडवत होता तुम्ही. कशाला ती कार्लमाॅन्ट का फाॅन्टची शाळा पाहिजे? बंद करा ती. त्यातही “अर्ध चंद्राकार काय … आज दुसऱ्या बाजूने आलो… “. तुम्हाला कुणा पोलिसाने अडवले होते का काय तिथे? कशाला हवा तो कबुली जबाब.”मी ह्या बाजूने आलो त्या बाजूने गेलो…?” खराय ना. गाळा तो मजकूर. आणि कुणाचा तरी आनंद शिळा असतो का हो? तुमचाच तेव्हढा ताजा? हल्ली काहीही शिळे नसते. बातमी,विनोद सुद्धा. आणि हो! ती ल्युनार्डी म्हणजे काय देऊळ आहे का रेल्वे स्टेशन की पार्क आहे का सरडा? कुणाला माहित आहे ल्युनार्डी? का जगातले कितवे आश्चर्य आहे ती ल्युनार्डी का खोटारडी? नको तिथे भरपूर खुलासेच्या खुलासे, विशेषणांची खैरात आणि ल्युनार्डी जसे काही कोथरुडच्या येनापुरे वडापाववाल्याही माहित अशा पद्धतीने लिहिले आहे. अहो तुमच्या ह्या पत्रापेक्षा मोटारीतला GPS चांगला की. शेवटी, फिरून घरीच येताना नेहमी? आणि सुखरूप ते काय? आजच सुखरूप आलात का? मग ते वाक्य लिहिण्याने विशेष काही सांगितले जाते का?

तुमच्या लक्षात येते का माहित नाही. तुमचे हे संपूर्ण पत्र फक्त दोन शब्दांचे आहे. “ फिरून आलो.”आणि हे शब्द फोनवरूनही पटकन पाठवता आले असते.

मुलांचे हे उत्तर वाचले आणि पत्रकाराची गोष्ट आठवली:-

वृत्तपत्रविद्येच्या वर्गात पत्रकाराने कमीत कमी शब्दात पण आशय तर स्पष्ट व्हावा असे लिहावे ह्यावर भर देत असतात. अशाच एका तासाला निरिक्षक म्हणून काही अनुभवी पत्रकारही आले होते.
प्राध्यापक शिकवत असता त्यांनी एक प्रश्न दिला. एका मच्छिमाराने मासे विकण्यासाठी दुकान टाकले. ताजे मासे विकत होता. चारी बाजूंनी काचा असलेल्या पाण्याच्या पेट्यांत निरनिराळ्या जातींचे मासे ठेवलेले. व्यवस्थित ठेवले होते. आणि दुकानाच्या समोर लोकांना माहिती व्हावी असा एक फलक त्याला ठेवायचा होता. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तो फलक लिहायला सांगितला.

विचारासाठी दिलेला वेळ संपल्यावर एक एक विद्यार्थी येऊन लिहू लागला. कुणी पाच सहा ओळींचा तर कुणी चार ओळींचा काही जणांनी तर कमालच केली. निबंध लिहावा तसे लिहिले. मुले,सर व ते अनुभवी पत्रकार सगळे चर्चा करत ते तपासून दुसऱ्या मुलांना लिहायला सांगत. होता होता एका हुषार विद्यार्थ्याने मात्र फक्त एकच वाक्य लिहिले. सगळे विद्यार्थी एकदम ओह! वाह वा म्हणू लागले. सर व निरीक्षकांचेही समाधान झाले असावे. वाक्य होते:

‘Fresh Fish Are Sold Here’

तरीही सरांनी हे आणखी सुटसुटीत करता येईल का असे अनुभवी निरीक्षक पत्रकारांना विचारले. त्यावर एक पत्रकार फळ्याकडे आले व म्हणाले, “हे बघ तुझ्या दुकानासमोर हा बोर्ड लावणार ना?” “ हो” मग here कशाला हवा? “ असे म्हणत त्यांनी त्यातला तो शब्द काढला. “Fresh Fish are sold “
“ आता पहाare कशाला हवा? तो नसला तरी अर्थ तोच राहतो ना?” “ हो सर. “ त्यांनी are काढून टाकला.

“Fresh Fish sold “

मग ते निरीक्षक म्हणाले, हे पाहा मासे ताजे नसले तर त्याचा कुबट दुर्गंध येतो. तसा वास आला तर कोणी फिरकेल का?” “ नाही सर.” “ हे पाहा तुमचे मासे चांगले ताजे आहेत हे सगळ्यांना दिसते. ताज्या माशांसाठीच लोक येतात. मग fresh शब्द अनावश्यक आहे. हो की नाही?” “ yessSSir!”
“तर आता वाक्य बघा कसे होते ते.”

Fish Sold”.

पुढे त्यांनी विचारले,” तुम्ही मासे लोकांना फुकट वाटायला दुकान टाकले आहे ?
“नाही सर. विकण्यासाठीच टाकले”
“ मग ते Soldकशाला लिहिले?”आता बघा कसे थोड्याच म्हणजे एकाच शब्दात लोकांना समजते ते.”

“FISh”

प्रोफेसरांनी, विद्यार्थ्यानी बाके वाजवली. अनुभवी पत्रकारांनी डस्टर टेबलावर ठेवून विचारले, “हे दुकान मासे विकण्याचेच आहे हेतर स्पष्ट दिसतेय. हो नां ?” सगळेच “होऽऽ ! म्हणाले. मग हा Fish शब्द तरी का हवा? म्हणत त्यांनी तोही खोडून टाकला!

माझ्या मुलांनीही माझ्या पत्राचे अनुभवी पत्रकारासारखेच केलेले संपादन तुम्ही अगोदर वाचलेच. केले. त्यांनी ता.क. लिहिला; तो असा:-


ता.क. बाबा तुम्ही रोजच फिरायला जाता, म्हणून ‘फिरून’ हा शब्द काढून टाका. तुम्ही फिरून आल्यावर पुन्हा ‘आलो’ हे निराळे का सांगायला हवे? तोही शब्द काढून टाका.बघा बरं आता वाचायला किती छान सोपे झाले.


पुन्हा ता.क. लिहू नका!

रिकामा डबा, डबा भरलेला!

गाडीला आज गर्दी नव्हती.डब्यात येऊन बसण्यापूर्वी सगळी गाडी पाहातच आलो होतो. तुरळक गर्दी असेल नसेल. माझ्या डब्यात तर मी एकटाच होतो. कुणी तरी यावे असे मनात बरेच वेळा घोकून झाले. शेवटी मुंबईत दुकानांच्या समोर,” या साहेब चांगला कपडा आलाय; बघायला काय हरकत आहे;”या ताई एकदम नव्या फॅशनच्या साड्या आल्यात, कांजिवरम मधुबनी प्रिंट बघातर ताई!” असे गिऱ्हाईकांना हिंदीत बोलत बोलवतात तसा डब्याबाहेर जाऊन,” या या, डबा खराच आपलाच आहे! मोकळा, एकदम रिकामा; झोपा, पसरा, वरचा बर्थ घ्या,खालती बाकावर झोपा,सगळा डबा तुमचा,या या ! पटकन गर्दी होईल बसून घ्या बसून घ्या भाऊसाहेब!” असे ओरडून बोलवावे वाटू लागले. आणि खरंच उतरलो डब्यातून. उभा राहिलो. थोडे खाकरून घेतले. पण तो विक्रेत्याचा आवाज आणि स्टायलीत ओरडणे जमणार नाही हे समजायला अर्धा क्षणही लागला नाही. त्या गायकीचे ‘घराणे’च निराळे! तरी नोकरीत असताना आमचे एक जनतेसाठी असलेले “प्राॅडक्ट” विकण्यासाठी, दुकानांत माल सजवून रस्त्यात उभारून लोकांना हाकारून आणणाऱ्या विक्रेत्याच्या कामासाठी तरूण मुलांच्या मुलाखतीत अगोदर मी त्याचे प्रात्यक्षिक स्टाइलीने करून दाखवत असे. शिक्षणाची अट नव्हती. १०-२२वी ची मुलेही चालली असती. पण फारशी हाताला लागत नव्हती. दोन चार मिळायची. हे असू दे.

कोणी येतेय का आपल्या डब्याकडे हे मी जो दिसेल त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहात विचार करत होतो. कोणी येत नाही पाहून आज रेल्वेवर बहिष्कार तर नाही घातला कुणी अ.भा. संघटनने ही शंकाही मनात आणली. डब्यात येऊन खिडकीजवळच्या जागेवर बसलो. समोरच्या बाकावर पाय पसरून बसलो.पुन्हा असा योग केव्हा येईल ते कुणाला माहित.? मग वरच्या बर्थवर, ह्या वयात,कुणी नाही पहायला तोपर्यंत, कसाबसा चढून पसरलो.पुन्हा खाली आलो.डब्यात प्रत्येक सीटवरचे नंबर वाचत संपूर्ण डबा फिरून आलो. दूरच्या दरवाजाजवळच्या बाकावर एक माणूस पेंगत होता. पुन्हा ते नंबर उलट्या क्रमाने वाचत जागेवर येऊन बसलो. रामरक्षा म्हणावी का असा उगीच एक विचार आला.उगीच का म्हणायचे तर ती येत नव्हती मला. पण अशावेळी म्हणतात हे वाचल्याचे, सांगितल्याचे आठवले इतकेच.

गार्डाने शिट्टी वाजवली. अरे वा गार्ड तरी आलाय. त्याने एकदा शिट्टी वाजवली की गाडी लगेच सुटत नाही. प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. तसा इंजिनच्या ड्रायव्हरलाही असणारच की.त्याने शिट्टी वाजवली की इंजिनड्रायव्हर कधीच लागलीच गाडी चालू करत नाही. तो आपला राग फक्त इंजिनाची वाफ फस्स करत थोडावेळ सोडतो. गार्ड शिट्टी न वाजवता उगीचच दिवसासुद्धा दिवा हलवतो.ड्रायव्हर फक्त एक लघु शिट्टी कुक् करून वाजवतो. व वाफेचा जोरदार फवारा सोडून खदाखदा हसतो! हे सगळे आता माहित झाले होते. एएसएम एक वहीसारखी गुंडाळी हातात घेऊन गार्डापाशी जाऊन दमात घेतल्यासारखे फक्त दाखवत पण अजिजीने गार्डाला व त्याच्या शेजारी फर्स्ट सेकंडच्या स्लीपरच्या कंडक्टरला काही तरी सांगतो. हे इंजिनड्रायव्हरला सहन होत नाही. तो लगेच सगळ्या स्टेशनला हादरा बसेल अशी शिट्टी तर वाजवतोच पण चाकेही तिथल्या तिथेच वरच्यावर फिरवतो न फिरवतो तेव्हढ्यात माझ्या डब्यात दहा बारा तरुण मुलांचा घोळका मोठ्याने बोलत हसत ओरडत शिरतो. मला बरे वाटते. पण तितक्यात संपूर्ण डबा रिकामा असूनही, “ ओ आजोबा तुमच्या पादुका खाली घ्या ना!” “ दुसऱ्यांनाही बसायचं असतं.” मी म्हणतो, “अरे सगळी बाकं रिकामी आहेत तिथे बस.”रिकामी आहेत ना?” मग तुम्ही बसता का तिकडे?” तो मला खोट्या नम्रतेने सांगतो. मी पाय खाली घेतो. इतरांची आपापसांत काही तरी बोलणे,गप्पा चालू असतात. गाडी सुरू होऊन बराच वेळ झाला, हे मी आतल्या आत मुलावरच्या रागाने धुमसत होतो त्यात,लक्षातच आले नव्हते.

मुलांच्या गप्पा हसण्या खिदळणे गाणी ह्यातून त्यांचा विषय गाडीची साखळी ओढण्यापर्यंत येऊन पोचला होता. “ अरे व्हिकी, साखळी खेचायची का?” “का काय करणार खेचून? दंड कोण भरणार? तुझा होणारा सासरा?” “ तो कशाला भरेल? तूच भरायचा. नाहीतरी तुझं तिकीट शशानेच काढलंय की!” “ अबे तिकिट कितीचं आणि दंड केव्हढा माहित आहे ना? त्याला पाचशे रूपये म्हणतात. काय समजला का? किती शून्य असतात माहित तरी आहे का?” सगळं कुणाच्या ना कुणाच्या खिशात हात घालून चालतंय म्हणून बरं आहे.” हो ना करता सगळ्यांनी वर्गणी करून पैसे गोळा करायचे ठरले त्यांचे. दंड आणि तुरुंगाची हवा दोन्ही खायला लागती म्हणे कधी. त्या गार्डाच्या मनावर आहे ते: थोडे जास्तच टाका बे सगळ्यानो.” असं बोलत एकजण पैसे गोळा करू लागला.”अरे वा! १२००रुपये जमलेत!” एकूण १२०० रू. जमले. ते एका मुलाने खिशात कोंबले. मी हे सर्व पाहात होतो. आता साखळी कुणी ओढायची ठरले. तेव्हढ्यात एकाला शुद्ध हवा लागली असावी. तो म्हणाला, “अबे साखळी कुणी ओढली तर कुणाकडे बोट करणार?” अरे जो साखळी खेचेल त्याच्याकडे! ते ऐकल्यावर मग तू ओढ,तू खेच”सुरु झाले.

एक खरा हुषार होता. मला पाय खाली ठेवायला लावणारा तो. तो म्हणाला, अरे आपले आजोबा आहेत ना! ते येतील मदतीला!” “ हो रे हो” हो की, आपले आजोबा आहेतच मदतीला!” म्हणजे दंडही भरायला नको आपल्याला. काय?”त्यांच्या मोठ्या आरड्या आोरड्यात मी गयावया करून म्हणालो, “अरे साखळी ओढू नका रे. काय करणार साखळी ओढून? हा कसला खेळ चाललाय?”. नका ओढू रे.” मी असे म्हणाल्यावर तर ते जास्तच चेकाळले. “ अहो आजोबा आम्ही काही कुण्या बाईच्या गळ्यातली साखळी ओढत नाही! साध्या आगगाडीची ओढतोय. गंमत असते ती.” “अरे आजोबा घाबरले रे!” म्हणायला लागले. मी केविलवाणा होऊन म्हणालो, “अरे बाळांनो माझ्याकडे पैसेही नाहीत. म्हणजे मला तुरुंगातच पडावे लागणार.” माझ्या गयावया करण्याकडे लक्ष न देता मुलांनी साखळी जोर लावून खेचली. गाडी थांबली. पोरं खुषीत होती. पराक्रमाची पावतीही मिळाली. गाडी थांबली. गार्ड पोलिस तिकीट इन्स्पेक्टर आले.

साखळी कुणी ओढली चौकशी सुरू झाली. मुलांनी कुणी हसणे दाबत गंभीर चेहरे करून माझ्याकडे बोट दाखवले. पोलिस गार्ड सगळे माझ्यावर चालून आले.” येव्हढे म्हातारे झाला आणि साखळी ओढता!? अहो ह्या पोरांनी ओढली तर समजू शकतो. पण तुम्ही? येव्हढं वय झालं तरी खेळ सुचतात असले?” आणिही बराच संस्कार वर्ग घेतला माझा त्यांनी. ते ऐकल्यावर दोघे तिघे एकदम म्हणू लागले,” साहेब आम्ही सांगत होतो त्यांना आजोबा! साखळी ओढू नका नका म्हणून; पण त्यांनी ऐकले नाही.”हे ऐकल्यावर तर ती सगळी अधिकारी मंडळी आणखीच खवळली. मी त्यांना हात जोडून चेहरा केविलवाणा करत म्हणालो,” साहेब, मला साखळी ओढलीच पाहिजे होती हो. मला दमदाटी करून माझ्या म्हाताऱ्याचे बाराशे रुपये ह्या मुलांनी काढून घेतले की हो! काय सांगू! ते पहा त्या मुलाजवळ आहेत. तपासा त्याचे खिसे!” ते दोन पोलिस लगेच सरसावून त्यांनी त्या पोराला घेरून पकडले. त्याच्या खिशांत सापडले बाराशे रुपये. पोलिसांनी ते मला परत दिले. त्या पोरालाच नाही तर सगळ्यांना घेऊन ते निघाले. खाली उतरल्यावर ती मुलं माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने पाहात होते. माझ्या डोक्यावरील पांढऱ्या केसात हात फिरवत मी पैसे खिशात ठेवत,न हसता इतकेच म्हणालो,”अरे उगीच नाही चार पावसाळे जास्त पाहिले!”

(स्वामित्व नसलेल्या डाव उलटवण्याच्या एका चुटक्याची ही गोष्ट केली आहे.)

François-Marie Arouet (व्हाॅल्टेअर)

व्हाॅल्टेअरचे खरे नाव François-Marie Arouet. पण त्याने आपले नाव लेखनासाठी व्हाॅल्टेअर असे घेतले. आणि तो आजही जगभर ह्याच नावाने तो ओळखला जातो. व्हाॅल्टेअरचा जन्म १६९४ साली पॅरिसमध्ये झाला. त्याला उत्तम शिक्षण मिळाले. त्याने साहित्यिक व्हायचे ठरवले. त्याने नाटके लिहायला घेतली. त्याची अनेक नाटके खूपच यशस्वी झाली. पण त्याच सुमारास व्हाॅल्टेअरचा राजाच्या जवळच्या आणि मर्जीतल्या एका माणसाशी तंटा झाला. त्यामुळे व्हाॅल्टेअरला हद्दपार केले. ही १७२७ सालची घटना.

हद्दपार झाल्यामुळे तो इंग्लंडला आला. इंग्लंडमध्ये आल्यावर त्याला एका निराळ्या जगाची ओळख झाली. इंग्लंडमधील सार्वजनिक, खाजगी, सरकारी संस्था ह्या फ्रान्समधील संस्थांपेक्षा जास्त स्वतंत्र आहेत. त्या आपले धोरण,निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात हे व्हाॅल्टेअरच्या लक्षात आले.तसेच चर्चा वादविवाद ह्यावरही फारशी बंधने नव्हती. फ्रान्सपेक्षा येथील वातावरण खूपच मोकळे आहे हे त्याला जाणवले. ह्यामुळे इंग्लंडविषयी त्याचे मत खूपच अनुकूल झाले. इथे विज्ञानाचा अभ्यास खूपच पुढे गेला आहे हे सुद्धा लक्षात आले. व्हाॅल्टेअरवर न्यूटनचा खूपच प्रभाव होता. इंग्लंडमधील वास्तव्याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे व्हाॅल्टेअरचा विज्ञानवादी दृष्टिकोन जास्त दृढ झाला. त्याचप्रमाणे शेक्सपिअरचाही तो चाहता झाला. इंग्लंडमधील ह्या सर्व आधुनिक विचारांचे तो नेहमी गुण गात असे. ह्यामुळेच तो जेव्हा फ्रान्समध्ये परत आला तेव्हा त्याने संस्थांचे स्वातंत्र्य, भाषणाचे स्वातंत्र्य,ह्यावर बरेच लिहायला सुरुवात केली.धर्माच्या अधिकाऱ्यांवर, चर्चवर, खुळचट प्रथांना,श्रद्धेच्या आवरणाखाली लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतवून ठेवणे,तिला उत्तेजन देणे ह्याबद्दल धारेवर धरले. तसेच राजसत्तेने व चर्चनेही सहिष्णूतेचे धोरण स्वीकारावे ह्यासाठी एकप्रकारे व्हाॅल्टेअरने चळवळी सुरू केल्या.

व्हाॅल्टेअर हा इतिहासकार आणि इतिहासाचे तत्वज्ञान ह्यातील विद्वान म्हणून ओळखला जातो. त्याने लिहिलेल्या इतिहास विषयक पुस्तकांमुळे इतिहास कसा लिहावा ह्याचे धडे देणाराही मानला जातो. सर्व बाबतीत स्वतंत्रतेचा व सहिष्णूतेचा त्याने पुरस्कार केला. धर्म,राजकारभार ह्यांनी घातलेले निर्बंध काढावेत, विचार व उच्चार स्वातंत्र्य असावे; धर्म, राजसत्ता, राज्यकारभार ह्यापासून पूर्णपणे वेगळा असावा, त्यांचे परस्पर संबंध नकोत ह्या विचारांचा पुरस्कार करणारा म्हणून व्हाॅल्टेअर प्रसिद्ध होता. ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात याव्यात ह्यासाठी त्याने चळवळी केल्या. लेख तर हजारो लिहिले. व्हाॅल्टेअरने लिहिलेले History Of Charles XII(१७३१), The Age of Louis XIV(१७५१)आणि त्याचा Essay on the Customs and Spirit of the Nations(१७५६) ही इतिहासाची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. पूर्वीच्या इतिहासकारांप्रमाणे त्याने लष्करी कारवाया, लढाया, तह वाटाघाटी ह्यावरच भर न देता,त्या काळच्या सामाजिक परिस्थिती ती तशी का झाली, त्यावेळी विज्ञान, साहित्य, कला ह्यांत काय घडत होते ह्यासंबंधात जास्त लिहिले आहे. त्याच्या Essay on Customs…ह्या पुस्तकात त्याने संस्कृतीचा प्रवास आणि प्रगती ह्यांचा,फक्त देश समोर न ठेवता, जगाचा संदर्भ घेत मागोवा घेतला आहे. त्यामुळे केवळ एका राष्ट्राचा विशिष्ट संस्कृतीचा विचार येत नाही.किंबहुना राष्ट्राच्या संस्कृतीविषयी लिहूनही त्याने राष्ट्रवाद बाजूला ठेवूनच त्याने इतिहास, संस्कृति विज्ञान ह्या विषयी लिहिले आहे. हे सगळे लिहित असताना त्याने ज्ञात असलेल्या पुराव्यांची, संदर्भांची पुरेपुर छाननी करून व बुद्धिला प्रमाण मानून लिहिले आहे असे अनेक समीक्षकांचे मत आहे. वर अगोदर म्हटल्याप्रमाणे त्याने चर्चवर, त्यांचे इतर पंथ आणि धर्मासंबंधात जे असहिष्णूतेचे, वेळी क्रूरपणाचे वागणे होते; लोकांमध्ये श्रद्धेच्या आवरणाखाली अंधश्रद्धा जोपासण्याचे काम चालत असे, तसेच फसवणूकीचे वर्तन असे त्यावर कोरडे ओढले आहेत.

विशेषत: कॅथलिकांवर. राजसत्तेचे वाढते नियंत्रण घालण्याचे, विरोधी विचार मते ह्यांना दाबून टाकण्याचे, राज्यकारभारात चर्चचाही सहभाग असणे ह्या सर्वांवर त्याने पुस्तके, लेख लिहून तसेच आपल्या पत्रव्यवहारातूनही धारदार टीका केली आहे. ह्यामुळेच तो मत-विचार-भाषण-धर्म स्वातंत्र्याचा मुख्य पुरस्कर्त्यांपैकी मोठा मानला जातो. त्याच्या ह्या विचारांचा दूरगामी परिणाम झाला आहे. राजसत्तेच्या धोरणांमुळे इतरांप्रमाणे खुद्द व्हाॅल्टेअरलाही त्याचे चटके बसले आहेत. त्याचीही पुस्तके जाळली गेली.त्यालाही पोलिसांचा पाठलाग चुकला नव्हता.व्हाॅल्टेअरने आपली ही मते त्याच्या Treatise On Toleranc मध्येही चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहेत. व्हाॅल्टेअर इंग्लंडमधून परत फ्रान्समध्ये आल्यावर काही वर्षांने त्याने बाजारात पैसे गुंतवायला सुरूवात केली. त्यातून त्याने खूप संपत्ती मिळवली. त्याकाळी तो सर्वात श्रीमंत साहित्यिक होता. पैशाची सुबत्ता येण्यास राजा पंधरावा लुईची रखेल मादाम पाॅम्पिदूॅंशी असलेली त्याची मैत्रीही उपयोगी पडली असावी.

राजाच्या योजनांची माहिती ती व्हाॅल्टेअरला देत असे. पण मादाम पाॅंम्पिदूॅं किंवा दरबारातील मानाच्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या काहीजणांशी असलेल्या मैत्रीचा व्हाॅल्टेअरला फार फायदा करून घेता आला नाही. ह्याचे कारण त्याची धारदार वाणी आणि लेखणी. उपरोधिक विनोदाच्या वेष्टणातून बोलणे; उपहास विडंबनात्मक किंवा उपरोधिक लिहिणे ही त्याची वैशिष्ट्ये होती. पण सत्ता हाती असलेला राजा किंवा दरबारी माणसे त्यांच्यावरील टीका किती काळ सहन करतील! एकदा त्याने Le Encyclopedie मध्ये जिनिव्हा संबंधी लिहून त्यात स्विस लोकांचा अपमान केला. त्याचा उत्तम मित्र स्वत:ला व्हाॅल्टेअरचा विद्यार्थी मानणारा प्रशियाचा सम्राट फ्रेडरिक द ग्रेट बरोबरही व्हाॅल्टेअरने झगडा केला. त्यामुळे फ्रान्सचेच नव्हे तर स्वित्झर्लॅंडचे, जर्मनीचे पोलिसही त्याचा पिच्छा पुरवीत. एकदा म्हणण्यापेक्षा त्याला जास्तवेळा तुरुंगवासही घडला आहे. अशातच मादाम पाॅम्पिदूॅंचाही मृत्यु झाला. त्यामुळे फ्रेंच राजापाशी त्याची रदबदली करणारे बाजू घेणारे कोणी राहिले नाही.

सर्व अडचणी संकटे एकदम येतात तशी आली. त्यातली बरीच त्याने आपल्या स्वतंत्र विचार व धारदार लेखणी आणि वाणीने ओढवून घेतली होती. पण ह्या परिस्थितीतही व्हाॅल्टेअरने आपल्या चतुराईने व संपत्तीच्या बळावर मात केली. स्वित्झर्लॅंड व फ्रान्सच्या एकमेकांशी लागूनच असलेल्या सरहद्दीवर स्वित्झर्लॅंडच्या हद्दीत फर्नी येथे त्याने मोठा जमीन जुमला आणि घर घेतले. आणि दुसरे प्रचंड घरदार फ्रान्सच्या हद्दीत पण फर्नीला लागूनच टर्नी गावात घेतले. फ्रान्सचे पोलिस अधिकारी चौकशीला आले की हा,” माफ करा! मी दुसऱ्या परकी देशात राहात आहे.”असे सांगायचा. हेच उत्तर स्विस पोलिस अधिकाऱी आले की हा पटकन उंबरा ओलांडून ,” मी माझ्या देशात आहे.” असे खणखणीतपणे सांगायचा. त्याचा हा दोन्ही देशांतील सरकारांशी “तळ्यात की मळ्यात”खेळ चालू होता. व्हाॅल्टेअर त्याच्या अलिकडच्या व पलिकडच्या उंबरठ्यांच्या दोन्ही गावातील व आजूबाजूच्या गावातील सामान्य आणि गोरगरीबांसाठी, शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जायचा.फक्त लेख लिहून पत्रकांच्या द्वारेच नव्हे तर प्रत्यक्ष कोर्टकचेऱ्यांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवायचा. कोर्टात जाऊन उघड उघड अन्यायकारक व पक्षपाती निकालांविरुद्ध दाद मागून त्या निर्णयांवर पुन्हा विचार करायला भाग पाडायचा.गोरगरीबांना जाचक ठरणारे, भरडून काढणाऱ्या न्यायाधीशांची हकालपट्टी करवून घेतली.सामान्य लोक व गरीब माणसे व्हाॅल्टेअरच्या पाठीशी असत. जुलुम करणारे लहानांना छळतात. मोठे त्यांना दाद देत नाहीत किंवा सापडत नाहीत. हा नियम व्हाॅल्टेअर व सामान्यांनाही माहित होता. हे लोक वेळप्रसंगी व्हाॅलटेअरच्या बाजूने उभे राहात.

व्हाॅल्टेअरची ही दोन्ही घरे मोठी होती. व्हाॅल्टेअरची ख्यातीही दूरवर पसरली होती. त्याला भेटायला देशोदेशीचे विद्वान विचारवंत साहित्यिक येत असत. जवळपास वीस वर्षे व्हाॅल्टेअर फर्नी येथे एखाद्या संस्थानिकासारखा राहात होता. त्याचे घर “विचारवंतांचे माहेर”च झाले होते. आणि तो “बुद्धीमंतांचा राजा” अशा थाटात तिथे राहिला. बरेच वेळा पन्नास पन्नास नामवंत पाहुणे त्याच्या घरी पाहुणचार घेत असत! त्यांच्याशी व्यक्ति स्वातंत्र्य, धर्म, सहिष्णूता, तिच्याबरोबर येणारी बंधुता, साहित्य काव्य ह्यावर व्हाॅल्टेअरचे चर्चा सत्र, मता मतांतरातील वादविवाद सुरू असत.पाहुणचारासह अशा बौद्धिक मेजवान्याही झडत! अशीच चर्चा चालू असताना एकदा व्हाॅल्टेअर जे म्हणाला त्याची नोंद सर्व जगात आजही घेतली जाते. प्रत्येकाला आपले मत,विचार मांडण्याचा मूलभूत हक्क आहे ह्या तत्वावर तो किती ठाम होता त्यासंबंधीचा एक प्रसंग इतिहासात कायम नोंदला गेला आहे. एकजण बराच वेळ आपली बाजू मांडत आपल्या मताचे समर्थन करत होता. त्याचे सांगून झाल्यावर व्हाॅल्टेअर म्हणाला,” महाशय, तुम्ही मांडलेली मते व त्यासाठी केलेला युक्तिवाद बिनबुडाचा आहे. तो कुठेही टिकणारा नाही. मी तुमच्या विचारांशी सहमत नाही.” “ पण”, (पुढचे ऐका) व्हाॅलटेअर पुढे म्हणतो, “पण तुम्हाला तुमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुमचा तो हक्क कायम राहावा ह्यासाठी मात्र मी शेवटपर्यंत लढत राहीन.”

व्हाॅल्टेअर चांगला साहित्यिकही होता. त्याची सुरवातीची नाटके अत्यंत यशस्वी झाली होती. तो कविही होता. त्याच्या लेखनाची सुरवातही कवितेनेच झाली. त्याने एक मोठे दीर्घकाव्य लिहिले. त्याचे नाव Henriade. त्यानंतर तसेच एक Maid of Orleans हे आणखी एक काव्य लिहिले. आधुनिक काळात Henriade कुणी वाचणार नाही खरे. ते कंटाळवाणे वाटेल. पण त्याच्या काळात त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली होती. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात त्याच्या एकूण पासष्ठ आवृत्या प्रसिद्ध झाल्या होत्या! फ्रेंच राजा चौथ्या हेन्रीवर ह्या काव्याचा खूप प्रभाव पडला. त्याच्यात मोठा बदल घडून आला असे तो म्हणतो. त्या काव्यातील सहिष्णूता व उदारमतवाद ह्यांचा चौथ्या हेन्रीवर चांगला परिणाम झाला होता. त्याने आपल्या कारभाराचे धोरण ह्या तत्वावर आखले होते. त्याचे प्रतिबिंब त्याच्या Edict of Nantes ह्या आज्ञापत्रात पहायला मिळते! साहित्याचा परिणाम समाजावर फारसा कधी होत नाही किंवा साहित्याने क्रांति घडून येत नाही ह्या मताला हेन्रीच्या राज्यकारभाराचे धोरण ठरवणाऱ्या त्याच्या ह्या मार्गदर्शक राजाज्ञेतून उत्तर मिळते! ह्या बरोबरच व्हाॅल्टेअर धार्मिक स्वातंत्र्याचा, धर्म व राजसत्ता ही पूरणपणे वेगळी असावीत, विचार व उच्चार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ह्या बाबतीत तो लेखन व चर्चा करीत असे.

हा नागरी हक्कांचाही पुरस्कर्ता होता. त्यामध्ये सर्वांना समान न्याय हवा, जे दुबळे गरीब आहेत त्यांच्या बाबतीत तर तो कोर्ट कचेऱ्यात त्यांचे खटले स्पष्टपणे न्याय्य पद्धतीने चालून योग्य न्याय मिळावा ह्यासाठी झगडत होता. तसेच करपद्धतीत जी विषमता होती त्यात बदल व्हावा ह्यासाठीही तो सत्ताधाऱ्यांना सुनावत होता. फर्नी येथे असताना व्हाॅल्टेअरने आपली जगप्रसिद्ध Candide ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी म्हणजे त्या वेळी फार चर्चिल्या व मोठे पाठबळ मिळालेल्या आदर्श अशा आशावादाची चलती होती. आशावादाचे तत्वज्ञान सांगते की विश्वातील वेगवेगळ्या जगामध्ये हे आपले जग सर्वांत चांगले आहे आणि इथे सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच होते. हे तत्वज्ञान लोकप्रिय होते आणि त्याच काळात व्हाॅल्टेअरवर अनेक संकटे आली. संकटांना व इतर अडचणींना तो तोंड देत जगत होता. म्हणजे आशावादाने सांगितलेल्या विरूद्ध स्थितीत व्हाॅलटेअर दिवस काढत होता! म्हणून काही अंशी त्याची Candide कादंबरी ह्या आशावादी तत्वज्ञानाला व काही अंशी व्हाॅल्टेअरच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून लिहिली गेली.

कॅन्डाईडCandide हा राजपुत्र सिद्धार्थाप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुखातच वाढला. त्याच्या राजवाड्यासारखाच ह्याचाही प्रासाद. आईवडील प्रेमळ,चांगले. डाॅ.पॅनग्लाॅस हे सुद्धा त्याहून चांगले. त्यानींच कॅन्डाईडला हे जग चांगले; ह्यातील सर्व काही चांगले; घडते ते आपल्यासाठी चांगलेच अशी सगळी चांगली शिकवण दिली. आणि इथूनच महाभयंकर घटनांना सुरुवात होते.कॅन्डाईडवर लेखक व्हाॅल्टेअर इतके भयानक घोर-अघोरी प्रसंग आणतो. पण कॅन्डाईडचा चांगल्यावरचा विश्वास ढळत नाही. पण जवळचे सर्व काही गमावल्यावर अखेर तो एका बेटाला लागतो व तिथे तो व्हाॅल्टेअरच्या शब्दांत- “तिथे तो आपली बाग फुलवत राहतो”! आशावादी तत्वज्ञान उदयाला आले. सतत चर्चेत राहिले त्याच वेळेस व्हाॅल्टेअर विपरित प्रतिकूल परिस्थितीतून जात होता. त्यामुळेच त्याने प्रतिक्रिया म्हणून ही कादंबरी लिहिली. पण कादंबरीत त्याने आशावादाचे समर्थन केले नाही किंवा निराशवादाला उचलून धरले नाही. चांगले आणि वाईट दोन्ही लिहिले आहे.तटस्थपणे वस्तुस्थिती काय असू शकते हे लिहिले आहे. आजूबाजूचे भान ठेवून ज्याचे त्याने आपले नंदनवन फुलवावे असे म्हणत त्याने काय ठरवायचे ते वाचकांवरच सोपवले आहे. व्हाॅल्टेअरने वीस हजार पत्रे लिहिली, दोन हजार पुस्तके, पुस्तिका,लेख लिहिले. नाटके कविता सर्व लिहिले. पण आजही टिकून आहेत ती त्याची पत्रे व Candide! ही कादंबरी! त्यानेआपले इतर सर्व व्याप सांभाळत असताही, फक्त चारआठवड्यात ती लिहिली ! कथानक अतिशय वेगवान आहे. वाचायला घेतलीत तर दोन अडीच तासांत वाचून संपवालही. पण कित्येक दिवस विचार करत राहाल अशी आहे. वाचकासाठी हाच उत्कृष्ट वा•डमयकृतीचा हा बोनस असतो!

इतके सर्व चांगले होत असूनही प्रत्येक मोठ्या माणसाला टीकाकार असतातच. स्वत: व्हाॅल्टेअरने रूसाॅंवर बरेच वेळा टीका केली. त्याच्या कादंबऱ्य्वर उपरोधपूरण टीका केली. पण व्हाॅल्टेअर रूसाॅंचे साहित्य वैचारिक निबंध काळजीपूर्वक वाचत असे. रूसाॅंची वीस पंचवीस पुस्तके त्याच्या लायब्ररीत होती. त्यातील सर्व महत्वाच्या पुस्तकांत व्हाॅल्टेअरने केलेल्या टीपा टिपणीही आढळतात. रूसाॅंनेही व्हाल्टेअरवर तो ज्या सहिष्णुतेचा इतका डंका वाजवतो ती त्याने जिन्हिव्हाच्या संसदसभासदांबाबत का दाखवली नाही? असा प्रश्न विचारून सहिष्णुता बाळगणे व्हाॅल्टेअरलाच आवश्यक आहे असा टोला मारला आहे. तर व्हाॅल्टेअरने रूसाॅंच्या Discourse on the Origin of Inequality वर टीका करताना, “हे म्हणजे आता सगळ्यांनी चार पायांवर चालावे असे सांगण्यासारखे आहे; मी साठ वर्षाचा असल्यामुळे मला ती जुनी सवय पुन्हा अमलात आणणे शक्य नाही!” अशी खवचट टीका केली होती. इंग्लंडचा तत्वज्ञानी व इतिहासकार व्हाॅल्टेअरच्या इतिहासलेखन व मतांविषयी टीका करताना म्हणतो की त्याने इतिहास विषयाला इतिहासाला वाहून घेतलेले नव्हते; व लिहिले ते जास्त करून कॅथलिकांविषयीच्या विरोधामुळे लिहिले असे वाटते.

व्हिक्टर ह्युगो म्हणतो की ,”अठरावे शतक म्हणजे व्हाॅल्टेअर!” रूसाॅं हा जवळपास त्याचा समकालीन. तोही व्हाॅल्टेअरसारखाच प्रतिभावान. दोघांचेही कीर्तिसूर्य तळपत होते. पण डेव्हिड ह्यूमच्या मते काही काळ असा होती की रूसाॅंने व्हाॅल्टेअरला पूर्ण झाकले होते. आपल्यासाठी अर्थ इतकाच की दोघेही थोर होते. त्यासाठी फ्रान्स व जिन्हिव्हाने दोघांसाठी कृतज्ञता कशी व्यक्त केली ते सांगतो. ज्या Ferney येथे व्हाॅल्टेअरने वीस वर्षे वास्तव्य करून फर्नेला मोठे केले त्या फर्नीचे नाव फ्रान्सने व्हाल्टेअरच्या जन्मशताब्दीला कृतज्ञतेने ‘व्हाॅल्टेअरचे फर्नी’Ferney-Voltaire असे केले! तसेच अखेरच्या वर्षांत ज्या अर्मनव्हिल येथे रूसाॅं राहात होता तिथल्या सुंदर पार्कला रूसाॅंचे नाव दिले आहे. आणि जिनिव्हाने तिथल्या सरोवराकाठी रूसाॅंचा पुतळा उभा केला आहे. १९४४ साली दुसऱ्या महायुद्धात जेव्हा नाझींच्या ताब्यात गेलेल्या फ्रान्सची मुक्तता झाली त्यानंतर फ्रान्सने आणि रशियातही व्हाॅल्टेअरची २५० वी जयंती साजरी केली. त्यावेळी रशियाने म्हटले होते की व्हाॅल्टे्अरचे नावच नाझी फॅसिस्टांचा थरकाप उडवित असे! व्हाॅल्टेअर “, नागरी हक्क,विचार स्वातंत्र्य, न्याय ह्यांचे प्रतिक होता.” रशियाची सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट म्हणाली,की “ती सोळा वर्षाची असल्यापासून व्हाल्टेअरचे विचार वाचत असे.” व्हाॅल्टेअरच्या अखेरच्या वर्षांत तिचा त्याच्याबरोबर पत्रव्यवहारही चालू होता. तिच्या पत्रातून ती विद्यार्थिनीच्या भूमिकेतून लिहिते असे दिसते.

व्हाॅल्टेअर गेल्यावर त्याचा सर्व ग्रंथ संग्रहालय तिने विकत घेतला. त्यानंतर तो आता रशियाच्या राष्ट्रीय संग्राहालयात पीटस्बर्गमध्ये आहे. व्हाॅलटेअर जसा प्रतिभावंत साहित्यिक होता तितकाच बुद्धिमान विचारवंत होता. साहित्यिक व्हाॅलटेअरवर फ्रान्सचा उपरोधिक विनोदी लिहिणारा नाटककार मोलिअे, शेक्सपिअर, स्पॅनिश कादंबरीकार सर्व्हॅंटिस, महाकवि होमर, वैज्ञानिक न्यूटन ह्यांचा प्रभाव होता. तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरवर फ्रान्सिस बेकन,जाॅन लाॅक,व धर्म संस्थापक झरतुष्ट्र ह्यांचा प्रभाव होता. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकेतील क्रांति, मार्क्स, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, कॅथरिन द ग्रेट आणि तीनशे वर्षानंतर आजही ह्या ना त्या रूपात दिसतो. त्या विचारांची चांगली फळेही आपण उपभोगत आहोत, हे विसरता येणार नाही.

Jean-Jacques Rousseau (रूसाॅं)

दिवाळीसारख्या सणासुदींच्या सुट्ट्यांत आम्ही सगळे नातेवाईक एकमेकांकडे एकत्र जमत असू. तेव्हा जेवणापूर्वी व नंतरही दुपारचा चहा होईपर्यंत चालू घडामोडी व इतर बऱ्याच विषयांवर गप्पा चर्चा होत असत. त्यातच कधी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातले टप्पे, त्या जुलैत झालेला उठाव अशा अनेक बाबींवर चर्चा होत असे. त्यावेळी आणि शाळेत परशुराम हरी बर्वे ह्यांचे इतिहासाचे भले जाडजूड पुस्तक उघडायला लावून सर,फ्रेंच राज्यक्रांती संबंधी सांगत त्यावेळीही रूसाॅं आणि व्हाॅल्टेअर ही दोन नावे कानावर पडत. त्यांचे विचार-स्वातंत्र्य, भाषण-स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य किंवा धर्म आणि राज्यसत्ता, व कारभार ह्यांचा एकमेकांशी संबंध, सरमिसळ असू नये असे ऐकल्याचे व संक्षिप्तात वाचल्याचेहीआठवते. आणि परीक्षेत तसे लिहिल्याचेही आठवते.व्हाॅल्टेर व रूसाॅं हे दोघे विचारी आणि जगाला त्यांच्या काळी काही नवीन विचार तत्वज्ञान देणारे असावेत इतपत माहिती असायची.

व्हाॅल्टेअर व रूसाॅं तसे समकालीन. व्हाॅल्टेअर १६९४ साली जन्मला तर रूसाॅंचा जन्म त्याच्यानंतर १८ वर्षांनी १७१२ साली झाला. पण योगायोग असा की ज्यांच्या विचारांचा प्रभाव तीन शतकंनंतर आजही टिकून आहे ते हे दोघे विचारवंत एकाच साली म्हणजे १७७८ साली वारले. दोघांच्या आयुष्यातील काही घडामोडीत पुष्कळच साम्य आहे. दोघांनीही बरेच वेळा देशांतरे करावी लागली. पण त्यातही रूसाॅंला तर फारच वेळा. व्हाॅल्टेअर रूसाॅंपेक्षा बराच जमीनीवर पाय रोवून उभा असायचा.म्हणायचेच तर रूसाॅं हा आयुष्यभर असमाधानी,अस्वस्थ आत्म्यासारखा होता. त्यात त्याचाही दोष नाही. तो त्याच्या काळाच्या फार पुढचा विचार करीत असे.,तो स्वतंत्र कल्पनाविश्वात विहार करणारा म्हणा किंवा स्वप्नवादी -इंग्रजीत Romantic म्हणतात तसा होता.पण तशा काळाच्या पन्नास वर्षे आधी तो जन्मला होता! रूसाॅं तितकाच बुद्धिवादी होता. व्हाॅल्टेअरला त्याच्या राजदरबारी चांगले संबंध असूनही दोन वेळा लहान मोठे तुरुंगवास भोगायला लागले. रूसाॅंवर तशी पाळी आली नाही. कारण अशा संकटकाळी त्याला बायकांनीच मदत केली. रूसाॅं जेथे गेला तिथल्या बायका, ह्या कलंदर पण फटकळ, दुसऱ्यांशी फार दिवस न पटवून घेणारा, मतभेदांचे रुपांतर भांडणात करणारा, पण बुद्धिमान व स्वतंत्र विचारांच्या ह्या तरूण व देखण्या विचारवंतावर फिदा असत.त्याची सोबत रूसाॅंला बरेच वेळा मदत करणारी ठरली. अनेक देशांतून त्याला बाहेर काढण्यात आले होते. बरेच आयुष्य देशांतरातच गेले. कारण त्याचे विचार त्या काळात स्फोटक होते. पण एक गोष्ट निर्विवाद होती की रूसाॅं हा युरोपमधील प्रसिद्ध माणूस होता. त्याला सगळे बुद्धिमंतही दबून होते. समाजातील कोणी महत्वाचे धार्मिक अधिकारी,धार्मिक पुढारी असो की निधर्मी मतांचे विचारी असोत, तो त्या धार्मिक व निधर्मी दोघांचाही नावडता होता. दोघांनाही रूसाॅंचा मोठा धसका होता.पण गंमत अशी की रूसाॅं दैवी देणगीला मानत होता. तो नास्तिक नव्हता पण धर्माबाबत त्याचे स्वतंत्र विचार होते. निसर्गाचा तो भोक्ता होता. निसर्गातील सौदर्याकडे , निसर्गाकडे त्याने समजाचे लक्ष पुन्हा वेधले. पण प्रस्थापित व्यवस्थेतील सगळ्या संस्थांना त्याची भीती वाटत असे. रूसाॅंला फार थोडे मित्र होते. त्याला आयुष्यात अनेक अपयशे पचवावी लागली. पुढच्या काळातील शेली, बायरन सारखे कवि आणि व्हिक्टर ह्युगो सारखे त्यावेळच्या अनेकांपेक्षा वेगळ्या प्रतिभेचे लेखक निर्माण झाले त्याचे श्रेय रूसाॅंच्या विचारांना आहे. त्याचा ह्या साहित्यिकांवर मोठा प्रभाव होता. रूसाॅंच्या A Discourse on the Origin of Inequality आणि The Social Contract ह्या दोन्ही पुस्तकातील विचार व तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आजच्या सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञावर आहे. त्याच प्रमाणे व्हाॅल्टेरच्या भाषण-स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व्यवहारातील मोकळेपणा, धर्माचा आणि सत्तेचा एकमेकांशी संबंध असू नये ह्या मतांचा पगडा आजही आहे.त्या दोघांच्या विचारंचा अलिकडच्या जडण घडणीत फार मोठा वाटा आहे. Jean-Jacques Roussaeu चा जन्म १७१२ साली जिन्व्हा येथे झाला. त्यावेळी ते स्वतंत्र होते. त्याच्या आईवडिलांना जिन्न्हीव्वाचा अभिमान होता.आई तर जिन्हिव्हा स्पार्टन सारखे Republic आहे म्हणायची. झाला उणेपुरे ५५-५६ वर्षाचे आयुष्य लाभलेला

रूसाॅं १७७८ मध्ये वारला. तो युरोपमधील प्रख्यात विचारवंत होता. पण त्याला एका देशात फार दिवस राहता आले नाही. ज्या ज्या देशात तो जाई तिथून त्याला बाहेर पडावे लागत असे.किंवा तो स्वत:हून बाहेर पडत असे. आयुष्यभर तो हद्दपाराचे जीवन जगला. त्याच्या,काळाच्या पुढच्या स्फोटक विचारांचा धसका धार्मिकांना आणि निधर्मींना दोघांनाही होता.प्रस्थापित व्यवस्थेला,संस्थांना,त्याच्या विचार व युक्तीवादाने तो केव्हाही खाली खेचू शकतो; सुरुंग लावून ते उध्वस्त करू शकतो ही त्यांची कायमची भीती होती. त्यामुळे रूसाॅं जेव्हा मेला त्यावेळी धर्मवाद्यांनी व निधर्मी विद्वानांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार ह्यात शंका नाही. पण पुढील अर्धशतक रूसाॅंच्या विचारांनी भारले होते.तसेच त्यानंतरच्या काळातही रुसाॅंच्या विचाराने तरूण पिढीही प्रभावित झाली होती. रूसाॅंचा जन्म स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथे झाला. पण त्याकाळी जिनिव्हा हे स्वतंत्र राज्य होते. ते प्राॅटेस्टंट राज्य होते. प्राॅटेस्टंट पंथाला रूसाॅंचा विरोध नव्हता. पण त्याचे वादळी व्यक्तिमत्व व विचारांना प्राॅटेस्टंटवादी समजू शकत नव्हते. रूसाॅंने जिन्हीव्हा सोडले.काही काळ तो फ्रान्समध्ये राहिला. पण नंतर लगेच तो त्यावेळी स्वतंत्र असलेल्या व्हेनिसमध्ये आला. पण व्हेनिस मधूनही तो लवकरच बाहेर पडला.

डाॅ. सॅम्युअल जाॅन्सन ह्या प्रख्यात इंग्लिश विद्वानाचा मित्र व त्यांचा चरित्रकार जेम्स बाॅस्वेलच्या सहाय्याने व लेखक तत्वज्ञ डेव्हिड ह्यूम यांच्या सोबतीने रूसाॅं इंग्लंडमध्ये वास्तव्यास आला. पण थोड्याच काळात त्याच्या स्वभावाप्रमाणे ज्यांच्या मदतीने व आधाराने तो इंग्लंडमध्ये आला होता त्या बाॅस्वेल व ह्यूम ह्यांच्याशीच वादविवाद घालून, भांडून,तो वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी पुन्हा फ्रान्समध्ये आला! पण ह्या मागे रूसाॅंला वाटणारीही कारणे होती. रूसाॅं इग्लंडमध्ये आल्यावर खूप लोकप्रिय होता. काही दिवसांनी जेव्हा त्याने त्याच्या मतांनुसार काही गोष्टींवर व लोकांवर टीका केली. त्यातून अनेक गोष्टी वाद निर्माण झाले. वर्तमानपत्रातून रुसीॅंवर वैयक्तिक टीका, नालस्ती व त्याने पूर्वी काही लिहिलेले लेख प्रसिद्ध होऊ लागले. ह्यात व्हाॅल्टेअरनेही लेख पुरवले होते. अशावेळी आपला मित्र ह्यूमने आपली बाजू घेऊन उभे राहायला हवे असे रूसाॅंला वाटत होते. पण ह्यूम गप्प राहिला. शिवाय रूसाॅंच्या काही व्यक्तीगत गोष्टी ह्यूमलाच त्याने सांगितल्या होत्या त्याही सार्वजनिक झाल्या.ह्याचा विषाद व राग रूसाॅंला येणे स्वाभाविक असे रूसाॅंच्या बाजूच्या लोकांचे म्हणणे आहे. त्या ुळे तो फ्रान्समध्ये परत आला. आणि काही वर्षे राहून तेथेच १७७८ साली पॅरिस जवळील अर्मनव्हिल येथील लहानशा बंगल्यात त्याचे निधन झाले.

रूसाॅंची साहित्यिक कारकिर्द त्याच्या वयाच्या सदतिसाव्या वर्षी सुरु झाली. Academy of Dijon ने निबंध स्पर्धा जाहीर केली होती. विषय होता Has the Progress of the Arts and Sciences Contributed more to the Corruption or Purification of Morals? त्यात भाग घेऊन आपल्या लेखात,रूसाॅंने त्यावेळी स्फोटक वाटणारा आपला विचार निबंधातून मांडला. त्याने संस्कृतीनेच- सुधारणेनेच नैसर्गिक चांगुलपणाचा नाश केला असा थेट हल्ला चढवला. रूसाॅंनेच स्पर्धा जिंकली हे निराळे सांगायला नको.त्याने बक्षिस व नाव दोन्ही मिळवले! ह्या निबंधामुळे L’ Encyclopedie चा संपादक तत्वज्ञानी व लेखक डाइडेराॅचे Diderot चे लक्ष वेधून घेतले. त्याने रूसाॅंकडे आपल्या एनसायक्लोपिडियेसाठी लेख मागितला.रूसाॅंने आपला Discourse on Political Economy हा राजकीय अर्थशास्त्रावर लेख लिहून पाठवला. हा लेख १७५५ साली प्रसिद्ध झाला.ह्या लेखामुळे रूसाॅं आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आला! ह्या यशानंतर त्याने आपली पहिली कादंबरी La Nouvelle लिहून प्रसिद्ध केली. कादंबरीत एका सामान्य परिस्थितीत वाढलेल्या मुलीची कथा आहे. ही कादंबरी वाचकांना आवडली. ह्या कादंबरी पाठोपाठ त्याची दुसरी कादंबरी Emile आणि त्याच बरोबर त्याचा आजही महत्वाचा मानला जातो तो The Social Contract हा वैचारिक तत्वज्ञानाचा ग्रंथ १७६२ मध्ये प्रकाशित झाला.

एमिल ही कादंबरीचे रूप घेऊन आलेली रूसाॅंच्या, निसर्गाशी जवळीक साधून त्याचे ज्ञान करून देणारी शिक्षण पद्धती असावी, ह्या विचारांची कथा आहे. रूसाॅचे शिक्षणपद्धतीविषयीचा आणखी एक महत्वाचा विचार आजही मानला जातो. लहान मुलांना शिक्षणाची सुरवात करतांना ते मूल हेच मध्यवर्ति केंद्र मानून अभ्यासक्रम असावा हे त्याचे मत होते. ते आजही आपल्याला माॅंन्टेसरी पद्धतीत पाहायला मिळते. त्याचे Confessions हे अति धक्कादायक आत्मचरित्रात्मक पुस्तक मात्र त्याच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झाले. धक्कादायक अशासाठी की आतापावेतो कोणत्याही मान्यवर लेखकाने स्वत:च्या वैयक्तिक बाबी, घटना, प्रसंग इतके उघड व स्पष्ट करून लिहिले नव्हते. पुस्तकातून रुसाॅंच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाज कळतात. ह्या अगोदर, १७४९मध्ये झालेल्या निबंध स्पर्धेनंतर १७५५ साली Dijon Academy ने आणखी एक स्पर्धा जाहीर केली. विषय होता How has a Condition Of Inequality among come about? ह्या प्रश्नाचे जे उत्तर रूसाॅंने आपल्या प्रबंधातून दिले ते रूसाॅंच देऊ शकेल असे आहे. त्याच्या पहिल्या प्रबंधात मांडलेल्या विचारांचाच विस्तार ह्या दुसऱ्या विचारपरिपूर्ण निबंधात आहे. रूसाॅं ह्यामध्ये प्रश्नाचे स्वरूप थोडेसे बदलून म्हणतो, माणसाच्या दु:खाचा,निराशेचा उद्भव, उगम कसा झाला हा मूळ प्रश्न आहे. माणूस मुळात स्वाभाविकरीत्या दु:खी होता की त्याच्या प्राथमिक अवस्थेतून सुधारणेच्या क्रियेतून जात असता (सुसंस्कृत होण्याच्या क्रियेतून)तो दु:खी होत गेला? प्राथमिक अवस्थेतला माणूस ज्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांतून गेला त्यातच माणसाच्या दु:खाचा उगम आहे असे रूसाॅंचे म्हणणे आहे. पुढे त्याचे विश्लेषणही तो करतो.

माणसाच्या स्वभाववृत्तीविषयी रूसाॅंसारखेच विवेचन हाॅब्स आणि जाॅन लाॅक या दुसऱ्या राजकीय तत्वज्ञांनीही केले. पण त्यांच्या मतात व रूसाॅंच्या मतात फरक आहे. हाॅब्सच्या “ प्रारंभी माणूस एकटा,गरीब,आोंगळ असभ्य, पशूसारखा रानवट व अपूर्ण होता”, किंवा लाॅकच्या “ प्रारंभी माणूस त्याच्या सभोवताी असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना घाबरत होता.” ह्या मतांशी सहमत नव्हता.तो उलट विचारतो,” माणूस त्याच्या त्या अवस्थेतही सुखी आनंदी होता असे का म्हणू नये? तो आनंदी समाधानी असण्यासाठी जरूर त्या सर्व गोष्टी त्याच्या जवळ होत्या. अन्न, स्त्री, आणि निद्रा, सर्व काही त्याला प्राप्त होते. शिवाय त्याची प्रगती आणि तो परिपूर्ण होण्याच्या क्रियांतून पुढे मिळणाऱ्या सोयींचे वा सुखाचे त्याला ज्ञानही नव्हते. त्यामुळे ती आता नाहीत ह्याचे दु:ख व निराश होण्याचे त्याला कारणही नव्हते. बरे दुसऱ्या कुणाशी तुलना करता तो असमाधानी होता म्हणायला त्याच्या सारखा दुसराही त्याच स्थितीत होता. फरक असेल तर उंची वजन, देहयष्टी, चालण्या पळण्याचा वेग ह्यामध्ये असेल!”

माणसात हा बदल कसा घडून आला, म्हणजेच माणूस दु:खी निराश कसा झाला? तर त्याचे खापर रूसाॅं सुसंस्कृततेच्या क्रिया प्रक्रिया ह्यावर फोडतो. तो आपल्याला परखड शब्दांत सांगतो,” ज्या क्षणी माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज वाटू लागली, ज्या क्षणी कुणाही एकाला दोघांसाठी तरतूद करावी वाटू लागले, त्या क्षणी समानता संपली व मालकी,मालमत्ता आली. काम करणे, राबणे आवश्यक झाले. विशाल जंगले तोडली जाऊ लागली. त्या ठिकाणी वाऱ्यावर डोलणारी हिरवी पिवळी पिकांची शेती दिसू लागली. शेतीत राबणे आले. आपला घाम गाळून पिकाला पाणी देणे भाग पडले. त्यातूनच पुढे शेतातल्या पिकांबरोबरच गुलामगिरी आणि वेठबिगारीही वाढू लागली! “ धातुशास्त्र आणि शेती ह्या दोन्हींमुळे माणसाच्या जीवनात क्रांति झाली. साहित्यिक,कवि सांगतात सोन्या चांदीमुळे क्रांति झाली.पण तत्वज्ञानी म्हणतात धातु म्हणजेच लोखंड आणि मका( तांदूळ गहू इ. कोणत्याही धान्याचे नाव चालेल) ह्या दोन वस्तूंनी प्रथम माणसात सुधारणा आणली.त्याला सुसंस्कृत केले आणि मानवाची मोठी हानि केली.रूसाॅंच्या मते प्रगतीने माणसात विषमता आणली व त्याला दु:खी केले. प्रगति,विकास हा माणसाला उध्वस्त करण्यास कारणीभूत आहे असे जाॅन डनला वाटते तसेच रूसाॅंलाही. नुकतीच औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली होती. समाजव्यवस्थेत मोठी उलथापालथ घडून येत होती. त्याचाही परिणाम रुसाॅंसारख्या संवेदनाशील बुद्धिमान व प्रतिभाशाली विचारवंतावर होणे अपरिहार्य आहे. असे असले तरी आपल्या ह्या उदास किंवा नकारात्मक निष्कर्षांनाही त्यानेच आपल्या The Social Contract ह्या वैचारिक प्रबंधात उत्तर दिले आहे.

माणूस प्राथमिक अवस्थेतच असावा असे त्याचे म्हणणे नव्हते.तरीही त्याच्या ह्या प्रबंधाला मोठा विरोध झाला. व्हाॅल्टेअरनेही केला. पण त्याही पेक्षा फ्रान्सच्या मंत्रिमंडळाने रूसॅांच्या निबंधावर टीकेचा भडिमार केला. त्यामुळे तो बरीच वर्षे फ्रान्सबाहेरच राहिला. रूसाॅं आपले विचार स्पष्ट थोडक्या आणि नेमक्या शब्दांत मांडणारा लेखक होता. त्याचे हे The Social Contract हे पुस्तक छोटे खानी फक्त पन्नास पानांचे आहे. रूसाॅंने पन्नास पानात जेव्हढे परिणामकारक लिहिले आहे तसे लिहायला दुसऱ्या कोणा लेखकाला पानेच्या पाने खर्चावी लागली असती! त्याची ही वाक्येच पहा-Man is born free; and everywhere he is in chains. One thinks himself the master of others,and still remains a greater slave than they. How did this come about? I don’t know. What can can that make it legitimate ? That question I think I can answer. स्पष्ट, चांगल्या लिखाणाचा हा एक सुंदर नमुना आहे. पण वाचक रुसाॅंच्या केवळ शैलीसाठी त्याचे प्रबंध वाचत नसतो.तो विचारतो ते प्रश्न व त्यांची जी उत्तरे तो देतो त्यासाठी तो रुसाॅंच नव्हे तर जाॅन लाॅक, व्हाॅल्टेअर, जाॅन स्टुअर्ट मिल सारख्यांचे विचार वाचतो.अर्थात शैली आणि विचारांतील व लेखनातील स्पष्टता हे सुद्धा वाचकाला आकर्षित करतात.पण विचार महत्वाचे. लो. टिळकांची प्रसिद्ध गर्जना “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ह्याचे मूळ रूसाॅंच्या पहिल्याच “Man is born free’ मध्ये आहे. रूसाॅंला माणसाने प्रगती केली आहे, करत आहे हे मान्य आहे.पण त्यामुळे होणारे समाजाला घातक ठरणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी काही केले पाहिजे ह्याचेही भान त्याला आहे.

माणूस एकट्याने जे करील त्यापेक्षा सर्व एकत्रित होऊन जे काम करतील त्याचे फळही तितकेच मोठे असणार. आपल्या “गाव करेल ते राव काय करेल” ह्या म्हणीची आठवण होईल. ह्या बरोबरच काही प्रश्न निर्माण होतात. त्या साठी सर्वांनी एकत्र येणे,प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार श्रम, कौशल्य, धन हे समुहासाठी देणे हा मार्ग तो सुचवतो. पण हातभार लावण्यात कुणाचाही अपवाद असणार नाही(ह्या अटीत समानतेचे तत्व अध्याहृत आहे). प्रत्येकाच्या सहभागातून सामूहिक उत्पादन व त्याचे मोठे फळ समुहाला मिळेल. प्रत्येकाला त्याच्या सहभागापेक्षा जास्त फळ मिळेल.सुह व सामूहिक प्रयत्नांचे फळ हे, ‘ते ते सगळ्या गावाचे’असे कविवर्य बोरकर म्हणतात. सामुहिक सहभागाच्या विचारांचा कार्ल मार्क्स व एन्गल्स वर प्रभाव पडला असणार. त्यामधूनच मार्क्सला शेतकरी, कामगारांचे, मजुरांचे श्रम कष्ट हे सुद्धा त्यांनी गुंतवलेले भांडवलच आहे हा विचार सुचला असावा. रशिया, चीन मधील ‘कम्युन’ चा उगमही रुसाॅंच्या विचारांत आहे. आपल्या महाराष्ट्रातील अर्थतज्ञ डाॅ.धनंजयराव गाडगीळांनी व औपचारिक शिक्षण फार न झालेल्या विखे पाटलांनी ती ‘सहकार’, ‘सहकारी संस्था’ ह्या रूपाने प्रत्यक्षात आणली. यशवंतराव चव्हाणांनी सहकारी चळवळीला सरकारचे धोरण म्हणून आणखी वाढवले. एकत्रित आलेल्या समुहाचे संघटनेत रूपांतर होते. मग त्या संघटना, संस्था ह्यांचे स्वरूप वेगवेगळेही असेल. सामुहिक कार्याचे फळ प्रत्येक घटकाला जास्तच मिळेल. पण प्रत्येक घटकांने (व्यक्तीने) त्यासाठी आपले पूर्ण बळ दिले तरी आपले -स्व -स्वातंत्र्य गमावता कामा नये. कोणत्याही संघटनेतील, संस्थेतील एकाच्या अथवा इतर दुसऱ्या काही जणांच्या म्हणण्यास संस्था, संघटना, त्यातील काही व्यक्ती किंवा गटाविषयीच्या श्रद्धेमुळे किंवा आस्थेमुळे, हो ला हो करू नये. आपण होयबा होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. त्यासाठी स्वत:ही विचार करून मत ठरवणे आवश्यक आहे.,रूसाॅंची ही सूचना महत्वाची आहे. तो धोक्याची घंटा वाजवतोय.

राजकीय तत्वज्ञानी रूसाॅंवर प्लेटो, हाॅब्स, जाॅन लाॅक Diderot , व्हाॅल्टेअर ह्यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर रूसाॅंचा प्रभाव हा पाश्चात्य जगातील प्रबोधन काळावर पडला. हा ज्ञानप्रकाशाच्या काळत रूसाॅंचा मोठा वाटा आहे. रूसाॅंचा ज्यांच्यावर प्रभाव पडला त्यात तत्वज्ञ कान्ट, फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकन राज्यक्रांति, फ्रान्सचा राॅब्सपियेर, डेव्डिड ह्यूम, कार्ल मार्क्स, एन्गल्स, लिओ टाॅलस्टाॅय, बाल शिक्षणतज्ञ माॅन्टेसरी अशा अनेक मोठ्या व्यक्तीं व त्याच्या विचारसरणीवर पडला आहे. आज हे विचार आपल्याला विशेष वेगळे स्फोटक वाटत नाहीत. कारण आपण त्यांचीच फळे चाखत आहोत हे माहित नसते. पण आपल्याला ते विचार माहित आहेत असे वाटते. पण रूसाॅं, व्हाॅल्टेअर,लाॅक,मिल, चाणक्य, कणाद, चार्वाक अशा सारख्या तत्वज्ञानी विचारवंतांनी असे कितीतरी वेगळे विचार अनेक शतकांपूर्वी सांगितले आहेत. मधल्या काळातील विद्वानांनी, विचारवंतांनी त्यात काळानुरूप बदल करत त्यामध्ये भर घातली. ते सुविचार काळाच्या प्रवाहातून झिरपत आपल्यापर्यंत आले. त्यांची फळे आज आपल्याला चाखायला मिळतात.

रूसाॅंवरही त्याच्या काळात टीका झाली. विशेषत: रूसाॅं ज्याचा नेहमी आदरपूर्वक मान ठेवायचा त्या व्हाॅल्टेअरने तर रूसाॅंच्या कादंबऱ्यांवर उपरोधातून कडक टीका केली. रूसाॅं व व्हाॅल्टेअर हे दोघेही मोठे बुद्धिमान व थोर विचारी होते.फ्रान्सच्या राज्यक्रांतीवर ह्या दोघांचा प्रभाव होता. दोघांनाही क्रांतीतील सर्व पुढारी मानत होते. पण त्यांच्या काळांत ते दोघे एकमेकांचे विरोधक होते असे वाटते. विरोधक असूनही, रूसाॅं व्हाॅल्टेअरविरूद्ध कोणी वावगे बोलले किंवा काही लिहून दाखवायला अाला तर तो त्यांना कठोर शब्दांत सुनवत असे व व्हाॅल्टेअर हा फार मोठा माणूस आहे ह्याची जाणीव करून देत असे. रुसाॅं वारला. त्यानंतर, फ्रान्मधील सर्व थोरामोठ्या श्रेष्ठ लोकांच्या समाध्यांच्यारूपाने जिथे स्मारक उभे बअसते, त्या Pantheion मध्ये व्हाॅल्टेअरच्या शेजारी, स्वत:ला नेहमी Citizen of Geneva असे अभिमानाने म्हणवून घेणाऱ्या रूसाॅंचे,अवशेष सुंदर समाधीच्या रूपात जतन केले आहेत. त्यांच्या काळात विरोधक असलेले विद्वान शेजारी शेजारी चिरनिद्रा घेत आहेत. रूसाॅंवर बरेच वेळा अन्याय झाले. मित्र,विरोधक, चाहते ह्यांच्या वैयक्तिक टीकेला तोंड द्यावे लागले.व्हाल्टेअरला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो,” माझ्या मनात तुमच्या अनेक चांगल्या गोष्टीविषयी प्रेम व आदर होता. पण आता आणि अजूनही फक्त तुमच्या बुद्धिमत्तेविषयी आणि तुमच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या लिखाणाविषयी प्रेम आहे.”

अखेरच्या दिवसांत रूसाॅंला एक माणूस भेटायला आला होता. तो लोकांविषयी काही बोलत असता रूसाॅं जे म्हणाला ते विसरता येण्यासारखे नाही. रूसाॅं म्हणाला,”हो, माणसे वाईट आहेत पण माणूस चांगला आहे!” Yes, Men are bad, but Man is good !” असा हा चतुरस्त्र प्रतिभेचा विचारवंत अलिकडच्या आधुनक राजकीय तत्वज्ञानाची कोनशिला रचणारा राजकीय त्त्वज्ञानी,, बुद्धिमान लेखक, संगीतकार, विज्ञानप्रेमी वनस्पतिशास्त्राचा अभ्यासक शिक्षणतज्ञ,व । अनेक मोठ्यांचेही पाय मातीचेच असतात हे दाखवणारा, व सामान्यांतील एखादा असामान्य गुण पुढे आणून त्यांचा गौरव करणारा,स्वत:ची बाजू स्पष्ट करण्यासाठी आत्मचरित्रात्मक ग्रंथ Confessions लिहून त्या काळी खळबळ उडवणारा रूसाॅं, त्याच्या बरोबरीचा व तोडीचा विचारवंत तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरच्या मृत्युनंतर दोन महिन्यांनीच वारला!

तालेवार भाषांतरकार

Translation is an art of critical interpretation. No two languages ever dovetail perfectly but they can be linked by translation.

भाषांतर करणे सोपे नाही. विशेषत:एका भाषेतील साहित्य कृतीचे दुसऱ्या भाषेत भाषांतर कठिण असते. लेखाच्या सुरवातीलाच भाषांतरा संबंधातील कोणा मोठ्याचे विचार आणि सुरवातीची प्रस्तावना पाहून अाज मी असा भाषांतराकडे का वळलो असा प्रश्न पडला असणार.

शाळेच्या परीक्षा, प्रश्नपत्रिकेची आठवण झाली का हीशंका सुद्धा आली तर नवल नाही. कारण प्रारंभीच्या वर्गात हिंदीचे मराठीत आणि मराठीचे हिंदीत तर नंतर आठवीपासून संस्कृतचे मराठीत व त्याविरुद्ध मराठीचे संस्कृतात हे प्रश्न हमखास असत. संस्कृताचे हे दोन्ही प्रश्न नापास करण्यासाठीच असत असे आम्हा सर्वांचेच मत होते. गाईडमुळे संस्कृतचे मराठीत भाषांतराचा प्रश्न पाठांतर केले असल्यानुळे, सोडवण्याचा प्रयत्न तरी करत असू. पण मराठीचे संस्कृत? अरे बापरे. तो प्रश्न कधी सोडवल्याचे आठवत नाही! कारण सांगायचे तर शरदचंद्र चटर्जींच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची प्रसिद्ध नाटककार भा.वि. उर्फ मामा वरेरकरांनी भाषांतरे केली नसती तर आपण वाचनाच्या किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो ह्याची जाणीव आता होते.

अमृता प्रितम, प्रेमचंद मुन्शी,किंवा सआदत हसन मंटो, पंजाबी उर्दू हिंदीतून लिहिणारे प्रख्यात लेखक राजेंद्रसिंह बेदी ह्यांच्या कथांचे कादंबरीचे भाषांतर जर कुणी केले नसते तर आपल्याला त्या परिणामकारक, विचार करायला लावणाऱ्या कथानकांचा अनुभव आनंद घेता आला असता का? “पण वर म्हटल्याप्रमाणे कोणत्याही भाषेतून आपल्या भाषेत भाषांतर करणे सोपे नाही. त्यासाठी साहित्यिक जाण व भाषांतरकार स्वत:ही जर लेखक असले तर ते जास्त चांगले होते. म्हणूनच मी वर वरेरकरांनी केलेल्या शरदचंद्र चटर्जींची ‘श्रीकांत’ चे तिन्ही भाग किंवा सानेगुरुजींनी केलेले कृष्णा हाथिसिंग यांच्या With No Regrets चे केलेले ‘ना खंत ना खेद’, प्रसिद्ध कादंबरीकार व मराठीतील शैलीदार लेखक ना.सा. फडके ह्यांनी आर्मेनियन लेखक विल्यम सारोयान ह्यांच्या कादंबरीचे ‘ जीवन-संगीत’ ह्या नावाने उत्कृष्ट भाषांतर केले होते त्याचा उल्लेख केला .तसेच रामानंद सागर ह्यांच्या ‘ और इन्सान मर गया’ ह्या कादंबरीचे मनोहर तल्हार ह्यांनी केलेले ‘आणि माणसाचा मुडदा पडला’ हे सुरेख भाषांतर अथवा अलिकडे पुपुल जयकर ह्यांनी इंदिरा गांधींविषयी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचे अशोक जैन यांनी केलेले भाषांतर ही सर्व अप्रतिम पुस्तके वाचतांना ती भाषांतरे न वाटता स्वतंत्र कृति वाटतात. असीकडे चांगली भाषांतरे बरीच होत आहेत. लोकवाड.मय प्रकाशन आपल्या येथील निरनिराळ्या भाषांतील पुस्तकांची, काव्यसंग्रहांची भाषांतरे प्रसिद्ध करीत असते. तीही वाचनीय असतात.

हे सुद्धा आठवण्याचे कारण, दोन वर्षापूर्वी वारलेल्या प्रख्यात अनुवादक Gregory-Rabassa ह्यांच्या संबंधी, वाड.मयाचे नोबेल पारितोषिक विजेते मारियो गार्सिया ह्यांनी काढलेले उद्गार वाचनात आले. ते म्हणाले, “ उत्तम भाषांतर म्हणजे ती स्वतंत्र निर्मितीच असते. आणि तसे उत्कृष्ट व अनुरूप भाषांतर करणारे ग्रेगरी रेबासा होते!” ग्रेगरी रेबासांमुळे मारियो गार्शिया, ज्युलिओ काॅर्टाझार, मारिओ व्हर्गाझ लोसा अशा बऱ्याच नामवंत स्पॅनिश व पोर्च्युगीझ भाषेतील लेखकांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या, कथांची ओळख जगातील इंग्रजी वाचकांना झाली! लॅटिन अमेरिकेतील बऱ्याच प्रतिभावंत व दर्जेदार लेखकांना जगाच्या वाड.मयात स्थान मिळवून देण्यात ग्रेगरी रेबासाचा फार मोठा हातभार आहे. त्यामुळेच ते लेखक रेबासाला खूप मानतात.

ग्रेगरी रेबासा दोन वर्षापूर्वी वयाच्या ९४व्या वर्षी वारला.

त्याचा जन्म अमेरिकेतील न्यू याॅर्कच्या याॅन्कर्स येथे १९२२ साली झाला. त्याचे शिक्षण न्यू हॅम्पशायर जवळच्या डार्टमाऊथ काॅलेजमध्ये झाले.त्याचे वडील क्युबन होते. आई न्यू याॅर्कच्या बारमध्ये काम करायची. त्याने पदवीसाठी Romance( ह्यातील प्रमुख भाषा आहेत इटालियन, फ्रेंच,स्पॅनिश, पोर्च्युगीझ आणि रुमानियन. ह्यांचा उगम,त्या काळी रोजच्या व्यवहारात सामान्य माणसे बोलत त्या गावठी- अनागरी लॅटिन भाषेत आहे.)भाषांचा अभ्यासक्रम घेतला होता. त्यामध्ये त्याने पहिली पदवी मिळवली होती. त्यामुळे त्याला फ्रेंच, स्पॅनिश,पोर्च्युगीझ व इटालियन भाषेत बरीच गति व ज्ञान होते. दुसऱ्या महायुद्धात त्याची शत्रूंचे सांकेतिक भाषेतील गूढ संदेश उलगडण्याच्या महत्वाच्या कामावर नेमणूक झाली. मुळातच त्याला भाषेची आवड होती. हे कामही त्याच्या आवडीचे झाले. युद्ध संपल्यावर त्यामुळेच त्याने कोलंबिया विद्यापीठात स्पॅनिशमध्ये एम. ए. केले व पोर्च्युगीझ भाषा व वाड.मयात डाॅक्टरेट मिळवली! त्याच विद्यापीठात व नंतर काही वर्षे क्विन्स काॅलेजमध्ये अशी २२ वर्षे त्याने प्राध्यापक म्हणून काम केले. भाषा हे ग्रेगरी रबासाचे खास ‘प्रेम प्रकरणच’ होते! विद्यापीठात असतानाच त्याने स्पॅनिश आणि पोर्च्युगीझ लेखांचे व कथांचे भाषांतर केले. ते ओडिसी रिव्ह्यू ह्या साहित्याला वाहिलेल्या त्रैमासिकात प्रसिद्ध होऊ लागले. वाचकांना तर ते आवडलेच पण Pantheon ह्या प्रसिद्ध प्रकाशकांचेही लक्ष वेधून घेतले. रबासाचे ह्या दोन्ही भाषांवरील त्याच बरोबर इंग्रजीवरील प्रभुत्व त्यांच्या पारखी नजरेत भरले. त्यांनी रबासावर एक मोठे काम सोपवले. ज्युलिओ काॅर्टेझाच्या स्पॅनिश Rayvuela कादंबरीचे भाषांतर रबासाने हाती घेतले. रबासाने भाषांतर केलेली ही कादंबरी Hopscotch नावाने प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीला त्या वर्षीचे नॅशनल बुक अॅवार्ड मिळाले. ह्याच सुमारास ज्याने साहित्यात अदभुत वास्तवता आणली;अद्भुततेच्या कोंदणात बसवलेल्या वास्तववादी लिखाणाचे युग सुरू केले त्या मारिओ गार्शियाने आपली One Hundred Years of Solitude ही कादंबरी लिहून संपवली होती.

भाषांतर करण्या अगोदर तो ते पुस्तक आधी वाचत नाही. वाचून बघेन मग भाषांतर करायचे ठरवेन असे म्हणत नाही. वाचायला घेतो.पण काही शब्दांवाक्यांवर मात्र रेबासा बराच चिकित्सापूर्वक विचार करतो. मूळ भाषेतील शब्दांच्या हव्या त्याच अर्थछटा इंग्रजीतही आल्या पाहिजेत अशा शब्दांची तो निवड करतो. वर सांगितलेल्या मारिओ गार्शियाच्या कादंबरीतील पहिल्याच वाक्यात स्पॅनिश मधील firing squad ह्या अर्थाच्या शब्दाचे भाषांतर इंग्रजीत firing partyअसेही करता आले असते. पण अमेरिकन वाचकांना जास्त सवयीची व जवळची वाटेल अशी firing squad शब्दयोजना त्याने केली. कादंबरीचे स्पॅनिश नाव Cien Anos de Soledad चे इंग्रजीत नामांतर करताना त्याने One Hundred Years Of Solitude असे केले. स्पॅनिश Cien चा अर्थ “ One hundred “ आणि “a hundred” असाही होतो. पण त्याने one hundred च पसंत केले. त्याचे कारण सांगताना तो म्हणतो कादंबरी वाचल्यावर लक्षात येते की गार्शियाच्या मनात एक विशिष्ट असाच काळ होता. त्यामुळे तितकी ती शंभरच वर्षे दर्शविण्यासाठी One hundred हे शब्द वापरले. कादंबरीच्या नावातील दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे Soledad. त्याचेही भाषांतर Loneliness आणि Solitude ह्या दोन्ही शब्दांनी करता आले असते. पण त्याने वर्णिलेल्या काळातील महत्वाचा भाव येण्यासाठी त्याने तो शब्द का निवडला ह्याचा खुलासा केला,तो आपल्या मराठीतील ‘एकटेपणा’/ ‘एकटेपण’आणि ‘एकान्तवास’ ह्या शब्दांत जो फरक आहे त्यावरून कळेल.

गार्शिया,काॅर्टेझा, लोसा किंवा आॅगस्टो माॅन्टेरसो ह्या लेखकांच्या कादंबऱ्या कथांचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. पण रबासा संबंधी बोलतांना गार्शिया म्हणतो , “ फक्त रबासाने मला कधीही एखाद्याही शब्दाचा किंवा वाक्यांच्या बाबतीत खुलासा,संदर्भ विचारला नाही!” गार्शियाच्या काही पुस्तकांचे एडिथ ग्राॅसमन ह्या दुसऱ्या नामवंत भाषांतरकारानेही, इंग्रजीत भाषांतर केले आहे. तीही प्रसिद्ध आहेत. “स्पॅनिश पोर्च्युगीझ भाषांच्या बाबतीत रबासा हा आम्हा सर्वांचा पितामह आहे!” असे ग्राॅसमनने त्याच्याविषयी म्हटले आहे.एडिथ ग्राॅसमन ह्याने प्रख्यात स्पॅनिश लेखक सर्व्हॅन्टिसची तितकीच प्रख्यात सार्वकालीन अभिजात कादंबरी Don Quixote चे भाषांतर केले ते सगळ्यात जास्त वाचकप्रिय आहे. अशा लेखकांनी रबासाविषयी हे गौरवोद्गार काढले आहेत. पण रबासाचा खरा गौरव नोबेल विजेता मारियो गार्शियानेच केला.

गार्शियाने वर उल्लेखलेली आपली कादंबरी लिहून पूर्ण केली. रबासानेच आपल्या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करावे असे त्याला वाटत होते. पण रबासाच्या हातात काम होते. ते संपायला तीन वर्षे लागणार होती. गार्शिया तीन वर्षे थांबला. तो इतकी वर्षे रबासासाठी का थांबला ते सांगताना तो म्हणतो,” उत्तम भाषांतर म्हणजे दुसऱ्या भाषेतील ती स्वतंत्र निर्मितीच असते! माझ्या कादंबरीचीही इंग्रजीत अशीच साहित्यकृति व्हावी, म्हणूनच ग्रेगरी रबासाविषयी माझ्या मनात असलेल्या नितांत आदरापोटीच, मी तीन वर्षे थांबणे पसंत केले !” भाषांतरकारांना साहित्यात मूळ लेखकाइतकेच मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या या तालेवार भाषांतरकार रबासाचे १३ जून २०१६ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.