Author Archives: Sadashiv Kamatkar

पारले-जी

माझ्या कमावत्या काळात सगळ्यांत जास्त संबंध दोनच गोष्टींशी आला. एसटीची तांबडी बस आणि ग्लुकोजची बिस्किटे. नुसती ग्लुकोजची म्हटले तरी ती पारलेचीच हे सर्वांना माहित आहे. कारण ग्लुकोजची बिस्किटे म्हणजेच पारले व पारले म्हटलेकी ग्लुकोजची बिस्किटे ही समीकरणे लोकांच्या डोक्यांतच नव्हे तर मनांतही ठसली आहेत. ग्लुकोजची बिस्किटे जगात पारलेशिवाय कुणालाही करता येत नाहीत ह्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण देशात ह्या एकाच गोष्टीवर मतभेद नाहीत.


१९५६ सालची गोष्ट असेल. दादर किंवा चर्चगेटहून मालाडला यायला निघालो की पेंगुळलेल्या डोळ्यांना जाग यावी किंवा मुंबईचा वास नाहीसा होऊन खऱ्या अर्थाने मधुर चवीचा वास येऊ लागला की डब्यातली सर्व गर्दीही ताजीतवानी व्हायची. पारले स्टेशन आले ह्याची खात्री पटायची. विलेपारलेच्या पूर्वेला राहणारे प्रवासीही घरी जाताना पारलेच्या ग्लुकोज बिस्किटाच्या फॅक्टरी कडे आत्मीयतेने पाहात, दिवसभराचे श्रम विसरून,ताज्या ताज्या ग्लुकोज बिस्किटांचा मधुर चवीचा वास पोट भरून घरी न्यायचे.आम्ही पुढे जाणारेही तो चविष्ट सुगंध एकदोन स्टेशने जाईपर्यंत साठवत असू.पार्ले बिस्किटांची ही प्रत्यक्ष ओळख अशी झाली.


फिरतीची नोकरी. जिल्ह्याच्या गावी आणि,तालुक्या तालुक्यातूनच नव्हे तर लहान मोठ्या गावांनाही जावे लागे. एसटीतून उतरल्यावर लगेच लहान मोठ्या थांब्यावरच्या कॅंटीन उर्फ काहीही म्हणता येईल अशा हाॅटेलात जायचे. गरम वडे किंवा भजी तळून परातीत पडत असत. शेजारी पातेल्यात तेलात वाफवलेल्या अख्ख्या मिरच्या असत. मालक किंवा पोऱ्या वर्तमानपत्राच्या कागदात एक पासून चार चार वडे किंवा भजी आणि मिरच्यांचे तुळशीपत्र टाकून पटापट गिऱ्हाईकी करत असायचे. गरमागरम भज्या वड्यांचा मोह टाळता येत नसे. तो खाल्ला की गरम व मसालेदार वड्यांनी हुळहुळलेल्या जिभेचे आणखी लाड करण्यासाठी एक हाप किंवा कट किंवा तसले प्रकार नसलेल्या गाडीवर एक चहा आणि पारले जी चा दोन रुपयाचा पुडा घेऊन त्या केवळ पोटभरू नव्हे तर कुरकुरीत व खुसखुशीत गोड बिस्किटांची मजा लुटायला सुरवात करायची!


भले पारले जी पोटभरू असतील. पण त्याहीपेक्षा आणखी काहीतरी नक्कीच होती. चविष्ट गोड असायची. दोन खाऊन कुणालाच समाधान होत नसे. तो लहानसा पुडा चहाबरोबर कधी संपला ते ग्लुकोज बिस्किटांच्या तल्लीनतेत समजत नसे.


मला पारले-जीची ओळख व्हायला पंचावन्न -छपन्न साल का उजाडावे लागले? त्या आधी बिस्किटे खाणे हे सर्रास नव्हते. बरे मिळत होती ती हंट्ले पामरची मोठी चौकोनी तळहाताएव्हढी. पापुद्रे असायचे पण मुंबईच्या बेकरीतील खाऱ्या बिस्किटांसारखे अंगावर पडायचे नाहीत. फक्त जाणीव होत असे खातांना. पण साहेबी थाटाची, चहा बरोबर तुकडा तोंडात मोडून खायची. त्यामुळे ती उच्चभ्रू वर्गासाठीच असावीत असा गैरसमज होता. पण खरे कारण म्हणजे ‘पाव बटेर’ पुढे बिस्किटांची गरजही भासत नसे. बरे बेकरीत तयार होणारी नानकटाई लोकांच्या आवडीची होती.

बेकरीची गोल, चौकोनी बिस्किटेही खपत होती. पण तीही रोज कोणी आणत नसे. शिवाय बिस्किटे हा मधल्या वेळच्या खाण्याचा किंवा येता जाता तोंडात टाकायचा रोजचा पदार्थ झाला नव्हता. बिस्किटे चहाबरोबरच खायची अशी पद्धत होती. खाण्याचे पदार्थ म्हणजे शेव,भजी, चिवडा, भाजलेले किंवा खारे दाणे, फुटाणे आणि डाळे चुरमुर. हे ब्लाॅक बस्टर होते.


डाळे चुरमुऱ्यांचीही गंमत आहे. आगरकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला हे प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या बरोबरीचे व नंतरची मोठी झालेली माणसेही रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत होतो हे लिहू लागले. रस्त्यावरच्या दिव्याप्रमाणे माधुकरी मागून शिक्षण केले हा गरीबीतून कसे वर आलो सांगण्याचा प्रघात होऊ लागला. पण सर्वांना, गरीबांना तर होताच होता, गरीबी सांगण्यासाठी ‘“ कित्येक दिवस तर नुसत्या डाळंचुरमुऱ्यांवर काढले” असे म्हणणे प्रचलित होते. सांगायची गोष्ट अशी की डाळे चुरमुरेही सर्वप्रिय होते. येव्हढ्या गर्दीत बिस्किटांचा सहज प्रवेश होणे सोपे नव्हते.


खाल्लीच बिस्किटे तर लोक बेकरीत मिळणारी खात असत. त्यातही मध्यंतरी आणखी एक पद्धत प्रचलित झाली होती. आपण बेकरीला रवा पीठ तूप साखर द्यायची व बेकरी तुम्हाला बिस्किटे बनवून देत.त्यासाठी ते करणावळही अर्थातच घेत. तरीही ही बिस्किटे स्वस्त पडत. ह्याचे कारण ती भरपूर वाटत. गरम बिस्किटांचा आपलाच पत्र्याचा डबा घरी घेऊन जाताना फार उत्साह असे. आणि ‘ इऽऽऽतकीऽऽऽ बिस्किटे’ खायला मिळाणार ह्या आनंदाचा बोनसही मिळे!
त्या व नंतरचा काही काळ साठे बिस्किट कं.जोरात होती. त्यांची श्र्युजबेरी बिस्किटे प्रसिद्ध होती. पण पारले बिस्किट कंपनी आली आणि चित्र बदलले. स्वातंत्र्य मिळाले होते. त्या अगोदरच पारले कं.सुरु झाली होती. पण इंग्लिश कंपन्यांपुढे अजून तिचा जम बसत नव्हता. पण विक्रीची जोरदार मोहिम, विक्रेत्यांचे जाळे वाढवत नेणे आणि जाहिरातींचा मारा व स्वस्त किंमत ह्यामुळे नंतर नंतर पारलेने जम बसवला.


पारलेला प्रतिस्पर्धी पुष्कळ निर्माण झाले. त्यातला सर्वात मोठा म्हणजे ब्रिटानिया. त्यांनी पारले ग्लुकोजला तोड म्हणून टायगर ब्रॅन्ड आणला पण पारले जी पुढे त्या वाघाची शेळी झाली. स्पर्धेला तोंड देताना पारलेने व्यापारी क्लृप्त्याही वापरल्या. महागाईतही कमी किंमत कायम ठेवण्यासाठी पुड्यांतील बिस्किटांचे वजन कमी करणे,बिस्किटांचा आकार लहान करणे हे केलेच. त्यामुळे आजही दोन रुपये,पाच व दहा रुपयांची पाकीटे मिळतात. परवडतात. पूर्वी पारलेच्या बिस्किटांचा आयताकारी चौकोन मोठा होता. आता बराच लहान केला आहे.तरीही आजही ग्लुकोज म्हणजे पारले-जी च ! काही असो पारलेजी! तुम्ही लोकांसाठी आहात , लोकांचेच राहा.


पारलेने,पाकीटबंद बिस्किटे ही उच्चवर्गीयांसाठीच असतात ही कल्पना लोकांच्या मनातून काढून टाकली! कोणीही बिस्किट खाऊ शकतो हे पारलेने दाखवले.. त्यामुळे कमी किंमतीची लहान पाकीटे पारलेनेच आणली. दोन रुपयाचे पारले-जीचे बिस्किटांचे पाकीट गरीबही घेऊ लागला. चहा बरोबर बिस्किट खाऊ लागला! ‘चहा साखर पोहे ’ या बरोबरच पारले-जी चा पुडाही किराण्याच्या यादीत येऊन बसला. तर ‘धेले की चायपत्ती धेले की शक्कर’बरोबरच गोरगरीब मजूरही पारले-जी का पाकेट’ मागू लागले. दुकान किराण्याचे,दूध पाव अंड्यांचे असो,की पानपट्टीचे, जनरल स्टोअर किंवा स्टेशनरीचे असो पारले ग्लुकोजची बिस्कीटे तिथे दिसतीलच.तसेच हाॅटेल उडप्याचे असो की कुणाचे, कॅन्टीन,हातगाडी,टपरी काहीही असो जिथे चहा तिथे पारले-जी असलेच पाहिजे.


पॅकींगवर कंपनीने ग्लुको लिहिले असले तरी सगळेजण बिस्किटाला ग्लुकोजच म्हणतात! सर्व देशात प्रचंड प्रमाणात आवडीने खाल्ला जाणारा एकच पदार्थ आहे पारले-जी. मग भले अमूल आपले’ दूध इंडिया पिता है’म्हणो की ‘इंडियाज टेस्ट’ असे स्वत:चे वर्णन करो; देशातल्या जनतेची एकमेव पसंती पारले- जी ची ग्लुकोज बिस्किटे! गरीबालाही श्रीमंती देणारी ही बिस्किटे आहेत.


चहाचा दोस्त आणि भुकेला आधार असे डबल डेकर पारले ग्लुकोज बिस्किट आहे. म्हणूनच मी तीस चौतीस वर्षाच्या नोकरीच्या काळात एसटीतून उतरलो की चहा आणि पारलेचा एक पुडा संपवायचो. एक पुडा कामाच्या बॅगेत टाकायचो. दिवस मस्त जायचा. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. उन्हाळ्यात ,”लोकहो विचार करा चहापेक्षा रस बरा” ह्या सुभाषिताचे मी एकनिष्ठेने पालन करायचो. तरीही पारलेची ग्लुकोज सोडली नाहीत. ती नुसती खाण्यातही मजा आहे!


आजही मुले माझ्यासाठी, बाजारातून येताना आठवणीने पारले- जी ग्लुकोज बिस्किटे आणतात. ह्या पेक्षा दुसरा आनंद कोणता असेल!

संत कान्होपात्रा

पंढरपुरपासून मंगळवेढा १४-१५ मैलावर आहे. म्हणजे जवळच आहे. आपल्याला मंगळवेढे, दुष्काळात उपासमारीने गांजलेल्यांसाठी बादशहाचे धान्याचे गोदाम ज्यानी स्वत:च्या जबाबदारीवर खुले केले; अनेकांचे प्राण वाचवले त्या भक्त दामाजीमुळे माहित आहे. दामाजीचे मंगळवेढे अशी त्याची ओळख झाली.

त्याच मंगळवेढ्यात श्यामा नावाची सुंदर वेश्या राहात होती.तिला एक मुलगी होती. ती आपल्या आईपेक्षाच नव्हे तर अप्सरेपेक्षाही लावण्यवती होती. तिचे नाव कान्होपात्रा होते.

व्यवसायासाठी श्यामाने आपल्या ह्या सौदर्यखनी कान्होपात्रेला गाणे आणि नाचणे दोन्ही कला शिकवल्या. नृत्यकलेत आणि गायनातही ती चांगली तयार झाली. सौदर्यवती असली तरी समाजात गणिकेला काही स्थान नव्हते.

पण श्यामाला मात्र आपली मुलगी राजवाड्यात राहण्याच्याच योग्यतेची आहे असे वाटायचे. राजाची राणी होणे कान्होपात्रेला अशक्य नाही ह्याची तिला खात्री होती. तिला राजदरबारी घेऊन जाण्याचे तिने ठरवले. कान्होपात्रेला ती म्हणाली, “ अगं लाखात देखणी अशी तू माझी लेक आहेस. तुला राजाची राणी करण्यासाठी आपण राजदरबारात जाणार आहोत. तयारी कर.” त्यावर कान्होपात्रा म्हणाली, “ आई, माझ्याहून राजबिंडा आणि तितकाच गुणवान असणाऱ्या पुरुषालाच मी वरेन. पण मला तर माझ्या योग्यतेचा तसा पुरुष कोणी दिसत नाही.” थोडक्यात कान्होपात्रेने आईच्या विचारांना विरोध केला.

काही दिवस गेले. एके दिवशी कान्होपात्रेच्या घरावरून वारकऱ्यांची दिंडी, आपली निशाणे पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर, विठ्ठलाचे भजन करीत चालले होते. तीही त्या तालावर ठेका धरून डोलत होती.तिने वारकऱ्यांना विचारले, “ तुम्ही कुठे निधाले आहात? इतक्या आनंदाने आणि तल्लीन होऊन कुणाचे भजन करताहात?”

“ माय! पुंडलिकाच्या भेटी जो पंढरीला आला, आणि इथलाच
झाला त्या सावळ्या सुंदर, राजीव मनोहर अशा रूपसुंदर वैकुंठीचा राणा त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी चाललो आहोत!”
वारकरी कान्होपात्रेला सांगत होते. त्यांनी केलेल्या विठ्ठ्लाचे रूपगुणांचे वर्णन ऐकून कान्होपात्रेने त्यांना काहीशा संकोचानेच विचारले,” अहो,तुम्ही वर्णन केलेला हृषिकेषी माझ्यासारखीचा अंगिकार करेल का?” हे ऐकल्यावर वारकी तिला मोठ्या उत्साहाने सांगू लागले,” का नाही? कंसाची कुरूप विरूप दासी कुब्जेला ज्याने आपले म्हटले तो तुझ्यासारख्या शालीन आणि उत्सुक सुंदरीला दूर का लोटेल? आमचा विठोबा तुझाही अंगिकार निश्चित करेल ! तू कसलीही शंका मनी आणू नकोस. तू एकदा का त्याला पाहिलेस की तू स्वत:ला विसरून जाशील. तू त्याचीच होशील !”

वारकऱ्यांचे हे विश्वासाचे बोलणे ऐकल्यावर कान्होपात्रा घरात गेली. आईला म्हणाली,” आई! आई! मी पंढरपुराला जाते.”
हिने हे काय खूळ काढले आता? अशा विचारात श्यामा पडली. कान्होपात्रेला ती समजावून सांगू लागली.पण कान्होपात्रा आता कुणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. केव्हा एकदा पंढरपूरला पोचते आणि पांडुरंगाला पाहते असे तिला झाले.

कान्होपात्रा धावत पळत निघाली. दिंडी गाठली. आणि रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।। म्हणत आणि वारकऱ्यांच्या पाठोपाठ ते म्हणत असलेले अभंग भजने आपल्या गोड आवाजात म्हणू लागली.तिचा गोड आवाज ऐकल्यावर एकाने आपली वीणाच तिच्या हातात दिली !

वारकऱ्य्ंबरोबर कान्होपात्रा पंढरीला आली. विठठ्लाच्या देवळाकडे निघाली.महाद्वारापशी आल्याबरोबर हरिपांडुरंगाला लोटांगण घातले.राऊळात गेल्यावर तिला जे विठोबाचे दर्शन झाले तेव्हा ती स्वत:ला पूर्णपणे विसरली.तिच्यात काय बदल झाला ते तिला समजले नाही. पण ती पंढरपुरातच राहिली.

कान्होपात्रा रोज पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर महाद्वारापाशी कीर्तन करू लागली.दिवस असे जात असताना एका दुर्बिद्धीने बेदरच्या बागशाहाला कान्होपात्रेच्या अप्रतिम लावण्याचे मीठ मसाला घालून वर्णन केले. बादशहाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांगितले.

बादशहाचे शिपाई पंढरपुरात आले तेव्हा कान्होपात्रा कीर्तन करत होती. तिच्या सौदर्याला आता भक्तीचा उजाळा आला होता.बादशहाचे शिपाई तिला पाहिल्यावर आपण कशासाठी आलो हे विसरून कान्होपात्रेकडे पाहातच राहिले.नंतर भानावर येऊन तिला जोरात म्हणाले,” बादशहाने तुला बोलावले आहे.चल आमच्या बरोबर. कान्होपात्रा घाबरली.शिराई तिला पुढे म्हणाले,” निमुटपणे चल नाहीतर तुला जबरदस्तीने न्यावे लागेल.” ती दरडावणी ऐकल्यावर कान्होपात्रेला तिच्या विठोबाशिवाय कुणाची आठवण येणार? ती शिपायांना काकुळतीने म्हणाली,” थोडा वेळ थांबा. मी माझ्या विठ्ठ्लाचे दर्शन घेऊन येते.” कान्होपात्रा तडक राऊळात गेली आणि विठोबाच्या चरणी डोके टेकवून त्याचा धावा करू लागली.भक्त दुसरे काय करू ऱ्शकणार?

“पांडुरंगा, तू चोखा मेळ्याचे रक्षण केलेस मग माझे रक्षण तू का करत नाहीस? एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून तू गोपींचे गोपाळांचे, गायी वासरांचे संपूर्ण गावाचे प्रलयकारी पावसापासून रक्षण केलेस आणि मला का तू मोकलतो आहेस? विठ्ठ्ला, माझ्या मायबापा! अरे मी तुला एकदा वरले, तुझी झाले आणि आता मला दुसऱ्या कुणी हात लावला तर कुणाला कमीपणा येईल? विठ्ठला तुलाच कमीपणा येईल. बादशहाने मला पळवून नेले तर सर्व साधुसंत तर तुला हसतीलच पण सामान्यांचा तुझ्यावरच निश्वास उडेल. ती धावा करू लागली. “नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धाव हे जननी विठाबाई।। पांडुरंगा, माी सर्व आशा,वासना कधीच सोडल्या आहेत. आता तरी “घेई कान्होपात्रेस हृदयात” ही कान्होपात्रेची तळमळून केलेली विनवणी फळाला आली. कान्होपात्रेचे चैतन्य हरपले. विठ्ठलाच्या पायावर ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही. विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला !

देवळातल्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी लगेच देवळाच्या आवारात दक्षिणदारी कान्होपात्रेला घाईगडबडीने पुरले.आणि काय चमत्कार! लगेच तिथे तरटीचे झाड उगवले.

बाहेर बादशहाचे शिपाई कान्होपात्रेची वाट पाहात ताटकळले.त्यांनी पुजाऱ्यांना आवाज दिला. भेदरलेले पुजारी धावत आले.त्यांनी शिपायांना कान्होपात्रा गेली. आम्ही तिचे प्रेत पुरले. लगेच तिथे झाडही उगवले!” हे ऐकल्यावर शिपाई संतापाने ओरडले, “ हरामजादों ! तुम्हीच तिला लपवून ठेवले. आणि मेली काय, लगोलग पुरली काय आणि वर झाड उगवले म्हणता? सरासर झूट.” असे म्हणत त्यांनी पुजाऱ्यांना पकडून बादशहाकडे निघाले. तेव्हढ्यात एक पुजारी सटकला. देवळाकडे जाऊ लागला. त्याच्या मागे शिपाई धावले.कुठे पळतोस म्हणत त्याच्या पाठीवर दोन कोरडे ओढले. पुजारी म्हणाला,” बादशहासाठी प्रसाद आणायला चाललो होतो” हे ऐकल्यावर शिपाई ओरडले,” तू भी अंदर जाके मर जायेगा! आणि तिथेच बाभळीचे झाड उगवले म्हणून तुझेच हे ऱ्भाईबंद सांगतील.” पण शेवटी गयावया करून तो पुजारी आत गेला. नारळ बुक्का फुले घेऊन आला.

पुजाऱ्यांना राजापुढे उभे केले.पुजाऱ्यानी आदबीने बादशहापुढे प्रसाद ठेवला. शिपायांनी घडलेली हकीकत सांगितली. ती ऐकून बादशहा जास्तच भडकला. “ काय भाकडकथा सांगताय तुम्ही. कान्होपात्रा अशी कोण आहे? एक नाचीज् तवायफ! आणि तुम्ही सांगता तुमच्या देवाच्या पायावर डोके ठेवले और मर गयी?” वर तरटीका पेड भी आया बोलता?” असे म्हणत त्याने प्रसादाचा नारळ हातात घेतला. त्याला त्यावर कुरळ्या केसांची एक सुंदर बट दिसली. “ये क्या है? किसका इतना हसीन बाल है?” म्हणूनओरडला; पण शेवटच्या तीन चार शब्दांवर त्याचा आवाज हळू झाला होता. पुजारी गडबडले. काय सांगायचे सुचेना. कान्होपात्रेचा तर नसेल? असला तरी सांगायचे कसे? शेवटी विठोबाच त्यांच्या कामी आला. ते चाचरत म्हणू लागले,” खा-खाविंद! वो वो तो आमच्या पांडुरंगाची बट है !” शाहा संतापला.” अरे अकलमंदो! दगडी देवाला कुठले आले केस? क्या बकवाज करते हो?!” पुजारी पुन्हा तेच सांगू लागल्यावर बादशहाने फर्मान सोडले.ताबडतोब पंढरपुरला जायचे. केसाच्या बटेची शहानिशा करायची. पुजाऱ्यांच्या पोटात गोळाच उठला.पण करतात काय!

बादशहाचा लवाजमा निघाला.दोरखंड बाधलेले पुजारी भीतीने थरथर कापत चालले होते. जस जसे पंढरपुर जवळ आले तशी पुजाऱ्यांनी विठ्ठलाची जास्तच आळवणी विनवणी सुरू केली.देऊळ आले.पुजाऱ्यांचे प्राण कंठाशी आले होते. राजा सभामंडपातून थेट मूर्तीपाशी गेला.आता काय होईल ह्या भीतीने पुजारी मटकन खालीच बसले.

राजाने ती सावळी सुंदर हसरी मुर्ती पाहिली.विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकुट प्रकाशाने झळाळू लागला. त्यातूनच विठ्ठलाच्या केसांचा रूळत असलेला संभार दिसू लागला! पांडुरंगाचे दर्शन इतके विलोभनीय आणि मोहक होते की बादशहाच्या तोंडून,” या खुदा! कमाल है! बहोत खूब! बहोत खूब! “ असे खुषीत येऊन बादशहा म्हणाल्यावर पुजारीही विस्फारलेल्या डोळ्यांनी पंढरीनाथमहाराजांकडे पाहू लागले. त्यांचा विश्वास बसेना.डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.

बादशहाने कान्होपात्रेचे तरटीचे झाड पाहिले.ते पाहिल्यावर कान्होपात्रेची योग्यता त्याच्या लक्षात आली. त्याच बरोबर त्याने प्रत्यक्ष जे पाहिले त्यामुळे त्याला मोठे समाधान आणि आनंदही झाला होता.

अतिशय सुंदर असली तरी कान्होपात्रा समाजातील खालच्या थरातली होती.सौदर्य हाच तिचा मानसन्मान होता.प्रतिष्ठा राहू द्या पण समाजात तसे काही स्थान नव्हते.सौदर्य हीच काय ती तिची प्रतिष्ठा होती! अशी ही सामान्य थरातली कान्होपात्रा अनन्यभक्तीमुळे विठ्ठलमय झाली होती. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात तसे तिच्या ‘ध्यानी मनी पांडुरंग होता तर ‘हरि दिसे जनी वनी’ अशी तिची अवस्था होती.

कान्होपात्रेच्या आईला तिची कान्होपात्रा राजाची राणी व्हावी अशी इच्छा होती. पण आमची सामान्य, साधी कान्होपात्रा वारकरी हरिभक्तांची सम्राज्ञी झाली. संत कान्होपात्रा झाली!

पंढरपुरच्या विठोबाच्या देवळाच्या परिसरात आजही तिथे तरटीचे झाड आहे.प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सान्निध्यात, देवळाच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे— ती आहे संत कान्होपात्रेची !

अप्रूप

आमचे पहिले घर टेकड्यांमध्ये होते. अनेक घरे टेकड्यांवर होती. काही खोलगट भागात होती. टेकड्या झाडावृक्षांनी नटलेल्या तसेच खोलगट भागही वृक्षराजींने भरलेला असायचा. त्यामुळे घरांची संख्या कमी होती असे नाही. किंवा घरे लहान किंवा आलिशान महाल होते असेही नव्हते. सर्व प्रकारची घरे होती. कौलारू होती. उतरत्या साध्या पत्र्यांची होती. सिमेंटची होती. तांबड्या विटाची होती. पांढरी होती. पिवळी होती. निळसर होती. विटकरी होती. काचेच्या खिडक्यांची होती. लाकडी दरवाजांची होती. काही अतिशय देखणी होती. बरीचशी चारचौघींसारखी होती. काही दहा जणांत उठून दिसणारी होती. तर काही दोन-चार असामान्यही होती. पण सगळी झाडां झुडपांचे अभ्रे घातलेली असल्यामुळे हे टेकड्यांवरचे,टेकड्यांमधले गाव दिवसाही पाहात राहावे असे होते. त्यातच निरनिराळ्या ऋतुत फुलणारी विविध फुले अनेक रंग भरून टाकीत! रंगीत फुले गावची शोभा दुप्पट करत!
रात्री तर गाव घराघरांतल्या लहान मोठ्या दिव्यांनी, त्यांच्या सौम्य ,भडक, मंद प्रकाशांच्या मिश्रणाने स्वर्गीय सौदर्याने खुलत जायचे! काही रात्री तर गावाच्या ह्या सौदर्यापुढे आपण फिके पडू ह्या भीतीने चंद्र -चांदण्या,तारे ढगांच्या आड लपून राहत!


गॅलरीत उभे राहिले की ‘आकाशात फुले धरेवरि फुले’ त्याप्रमाणे आकाशात चंद्र तारे नक्षत्रे व समोर, खाली, सभोवतालीही,तारे, नक्षत्रे ह्यांचा खच पडलेला दिसे! आकाशातून दुधासारखे चांदणे खाली येऊन टेकड्यांवरच्या गावातील निळसर दुधाळ प्रकाशात सहज मिसळून पसरत असे. हात नुसते पुढे केले की चंद्राच्या गालावरून हळुवारपणे सहज फिरवता येत असे. तर मूठभर चांदण्यांची फुले गोळा करून ओंजळ भरून जात असे! आपल्या प्रेयसीला ओळी ओळीतून चंद्र आणून देणारे, येता जाता तारे-नक्षत्रे तोडून तिच्या केसांत घालणारे जगातले सर्व कवि इथेच राहात असावेत. किंवा एकदा तरी इथे राहून गेले असावेत! इतके अप्रूप असे आमचे गाव होते.

आज पंधरा वर्षांनी पुन्हा त्याच गावात राहायला आलो.थोडे काही बदल झाले असणारच. पण गाव आजही बरेचसे पूर्वीप्रमाणेच होते. मोठ्या उत्सुकतेने मी रात्री गॅलरीत गेलो. सगळीकडे नजर फिरवत पाहिले. आनंद झाला. पण मन पहिल्यासारखे उचंबळून आले नाही. काही वर्षे रोज पाहिले असल्याने, मधली वर्षे ह्या गावाच्या फार दुर राहात नसल्यामुळेही सवय झालेली असावी. सवय, संवेदना बोथट करते. त्याहीपेक्षा सवय, उत्कटता घालवते ह्याचे जास्त वाईट वाटते!


हे लघुनिबंधाचे गाव राहू द्या. ह्या पंधरा वर्षांपूर्वीच्या गावापेक्षा साठ पासष्ठ वर्षांपूर्वीच्या गावात जाऊ या.

नव्या पेठेतल्या दुकानांच्या, व्यवसाय आणि लोकांच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर मोकळे मोकळे वाटते. नविन वस्ती सुरु झाली हे सांगणाऱ्या उंबरठ्यावर आपण येतो. थोडा त्रिकोणि थोड्या अर्धवर्तुळाकाराच्या चौकांत आपण येतो. आणि समोरचा बंगला पाहून हे हाॅटेल असेल असे वाटतही नाही. बरीच वर्षे ह्या हाॅटेलच्या नावानेच हा चौक ओळखला जात असे. लकीचा चौक किंवा लकी चौक!

लकी रेस्टाॅरंट अर्धगोलाकार होते. गोलाकार सुंदर खांबांनी जास्तच उठून दिसे. आत गेले की समोर चार पायऱ्या चढल्यावर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंच्या दोन दोन खांबांमध्ये लहानसे चौकोनी टेबल व समोरासमोर दोन खुर्च्या. इथे बसायला मिळाले की आगगाडीत,बसमध्ये खिडकीची जागा मिळाल्याचा आनंद होई.रस्त्यावरची गंमत पाहात बसायला ही फार सोयीची टेबले होती. मघाशी चारपायऱ्या चढून आल्याचा उल्लेख केला. तिथल्या दोन गोलाकार खांबांवर मधुमालती होत्या. आमच्या गावात मधुमालती बरीच प्रिय होती. वेल व तिची फुले!
ह्या व्हरांड्याच्या समोरची गोलाकार जागा,जाई जुईच्या वेलांच्या मांडवांनी बहरलेली असायची. त्यांचेही आपोआप चौकोन होऊन त्याखाली तिथेही गिऱ्हाईके बसत. ती जागा ‘प्रिमियम’च म्हणायची. कारण जवळच्या वेलींनी केलेल्या कुंपणातून रस्त्यावरचे दृश्य दिसायचे; शिवाय खाजगीपणही सांभाळले जायचे.


चार पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मालकांच्या गल्ल्याचे टेबल. मालकांचे नाव भानप. भानप अगदी जाडजूड नव्हते पण बऱ्यापैकी लठ्ठ होते. आखूड बाह्यांचा शर्ट घातलेला. काळ्या पांढऱ्या केसांचे राखाडी मिश्रण. त्यांचा सकाळी भांग पाडलेला असणार. पण दुपारपर्यंत हात फिरवून त्याच्या खुणा राहिलेल्या दिसत. ओठ जाडसर. सिगरेट प्याल्याने काळसर पडलेले. ते कधी कुणाशी गप्पा मारतांना दिसले नाहीत. मालक नेहमीच्या गिऱ्हाईकांशी सुद्धा ‘कसे काय’इतकेच बोलत. कारण बहुतेक सर्व गिऱ्हाईके नेहमीचीच. न कळत त्यांच्या बसण्याच्या जागाही ठरलेल्या.व्हऱ्हांड्याच्या दोन्ही बाजूच्या कोपऱ्यात एक एक फॅमिली रूम होती. पासष्ट वर्षांपूर्वी हाॅटेलातली फॅमिली रूम वर्दळीची नव्हती. काॅलेजमधली मुले मुलीही ते धाडस करत नसत. असा माझा समज आहे.


वऱ्हांड्यातील खांबांमधील टेबलांचे आकर्षण असण्याचे कारण म्हणजे रस्त्यावरच्या वर्दळीची गंमत पाहात चहाचे घुटके घ्यावे ह्यासारखे सुखकारी काही नव्हते. सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढायला बंदी नव्हती. पण जी पोरे लवकर सिगरेट प्यायला लागायची ती टोळक्याने जाईच्या मांडवाखाली बसून पीत. व्हरांड्यातील खांबामधल्या एका टेबलावर ठराविक खुर्चीवर आमच्या मावशीचे सासरे बसलेले असत. चहाचा कप समोर आणि करंगळी व तिसऱ्या बोटामध्ये विडी किंवा कधी सिगरेट धरून ते दमदार झुरके घेत बराच वेळ बसलेले असत. रोज. भानपही इतके नियमितपणे त्यांच्याच लकीत येत नसतील. अण्णा बसलेले असले की आम्हाला लकीत जाता येत नसे. कारण लगेच “हा हाॅटेलात जातो!” ही बातमी वाऱ्यासारखी पसरणार व तो शिक्का कायमचा बसणार ही भीती! अर्थात काही दिवसांनी ही भीती मोडली तरी पण मावशीचे सासरे नसताना जाणेच आम्ही पसंत करत असू.

त्या वेळी बटाटे, फ्लाॅवर, मटार ह्या भाज्या मोठ्या विशेष असत. भाज्यांमधल्या ह्या खाशा स्वाऱ्या होत्या! काॅलीफ्लाॅवर व मटार थंडीच्या दिवसांतच मिळायचा. बटाटे त्या मानाने बरेच वेळा मिळत. पण बटाट्याची भाजी ही सणासुदीला व्हायची. विश्वास बसणार नाही पण लकीमध्ये बटाटा-भाजी हा वेगळा, स्वतंत्र पदार्थ होता! स्पेशल डिश म्हणा ना!


लकीने आमच्या दृष्टीने क्रांतीच केली होती. लकीची बटाट्याची भाजी केवळ बटाटा अप्रूप होता म्हणून नव्हे तर चवीनेही अप्रूप होती. मी लकीच्या मधल्या हाॅलमध्ये गोल टेबलाच्या खुर्चीवर बसून ती मागवत असे. किंचित लिंबू पिळलेले, एक दोन कढीलिंबाची पाने सहजरीत्या कुठेतरी तिरपी पडलेली. कोथिंबिरीची पाने त्यांना लाजून आणखीनच आकसून काही फोडींना बिलगून बसलेली, अंगावर एखादा दागिना हवा म्हणून एक दोन मोहरीचे मणि बटाट्यांच्या फोडींना नटवत.केशरी पिवळ्या तेलाचा ओघळ प्लेटचा एखादा कोन, भाजी ‘अधिक ती देखणी’ करायचा. साखरेचे एक दोन कण मधूनच चमकायचे. लकीतली बटाट्याची भाजी शब्दश: चवी चवीने खाण्यासारखी असायची.भाजी संपत येई तसे शेवटचे दोन घास घोळवून घोळवून खायचो! आता पुन्हा कधी खायला मिळेल ह्याची शाश्वती नसल्यासारखी ते दोन घास खात असे. नंतर कळले की मीच नाही तर जे जे लकीची बटाट्याची भाजी मागवत ते ह्याच भरल्या गळ्याने,भावनाविवश होऊन खात असत. प्रत्येक वेळी!


एकमेव ‘लकीचे’ वैशिष्ठ्य नसेल पण तिथे चकल्याही मिळत. कांड्या झालेल्या असत. पण चहा बरोबर ब्रेड बटर खाणाऱ्यांसारखेच चहा आणि लकीची खुसखुशीत चकली खाणारे त्याहून जास्त असत. तशाच शंकरपाळ्याही. घरच्या शंकरपाळ्यांच्या आकारात नसतील पण हल्ली बरेच वेळा घट्ट चौकोन मिळतात तशा नव्हत्या. चौकोन होते पण डालडाने घट्ट झालेले नसत.


घरीही सणासुदीला श्रीखंड,बासुंदी, पाकातल्या पुऱ्यांचा बेत असला की बटाट्याची भाजी व्हायचीच. तीही लकीच्याच नजाकतीची किंवा त्याहून जास्त चविष्ट असेल. मुख्य पक्वान्ना इतक्याच आदबीने व मानाने बटाट्याची भाजी वाढली जायची. तितक्याच आत्मीयतेने पुरी दुमडून ती खाल्लीही जायची. लगेच श्रीखंडाचा घास किंवा बासुंदीत बुडलेल्या पुरीचा घास. बटाट्याच्या भाजीचे अप्रुप इतके की लहान मुलगाही तिला नको म्हणत नसे की पानात टाकत नसे.


लकी चौक, सुभाष चौक म्हणून ओळखला जाऊ लागला. बटाट्याची भाजी बारमाही झाली. सणासुदीचा वेगळेपणा तिला राहिला नाही. तिने दुसरी रूपेही घेतली. ती सार्वत्रिक झाली. चवीचेही वेगळेपण विसरून गेली. आजही सणवार होतात. सवयीने बटाट्याची भाजी त्या दिवशीही होते. सुंदर होत असेल पण दिसत नाही. चविष्टही असेल पण तशी ती जाणवत नाही. अप्रूपतेची उतरती भाजणी म्हणायचे!

आजही बटाट्याची भाजी आहे. पण लकी नाही. बटाट्याची भाजी दैनिक झाली. सवयीची झाली. अप्रूपता राहिली नाही.


अर्थशास्त्रातल्या घटत्या उपयोगितेचा किंवा उपभोक्ततेचा नियम आमच्या टेकडीवरच्या दाट वृक्षराजीत लपलेल्या, रात्री आकाशातून तारे चांदण्या ओंजळी भरभरून घ्याव्यात इतके ‘नभ खाली उतरु आले’ अशा स्वप्नवत गावाची अप्रूपता घटली तर बटाट्याच्या भाजीचीही अप्रुपता आळणी व्हावी ह्यात काय नवल!
हाच आयुष्यातील Law of Diminishing Joy असावा!

पहिले पाढे

प्रत्येक पहिली गोष्ट रोमांचक असते. अविस्मरणीय असते. शाळेचा पहिला दिवसही विसरु म्हणता विसरला जात नाही. तशीच पहिली शाळासुद्धा आपण विसरत नाही. त्यातही ती मुन्शीपाल्टीची असली तर विचारुच नका. काळ्या दगडावरच्या रेघेसारखी तहहयात ती आपल्या बरोबर असते.

आमच्या शाळेचे नाव पाच नंबरची शाळा. शाळा अकरा वाजता सुरू व्हायची. मधल्या सुट्टीपर्यंत थोडे फार शिक्षण होई. बेरजा, वजाबाकी, मराठीच्या पुस्तकातील धडा. शुद्धलेखन; मग पुन्हा मास्तर बेरजेची कधी वजाबाकीची गणिते घालायचे. सोडवून झाली की “तोंडे फिरवून पाटी पालथी टाका ” ही बसल्या जागी कवायत करायची. लवकर पाटी पालथी टाकणारी दोनच प्रकारची पोरं होती. हुशार आणि ढ. बाकीची सगळी डाव्या हाताची बोटं मुडपून मुडपून ती तुटेपर्यंत कशाची मोजदाद करत ते अजूनही मला आणि त्यांनाही समजले नाही. कधी भेटलेच ते तर ह्या बोटे दुमडण्याच्या आठवणीतच भेट संपते! पाटी पुन्हा पुन्हा पुसण्यात, पाणी किंवा ओले फडके चाळीस पोरांत एक दोघांकडेच असायचे. ते कशाला देतील दुसऱ्याला. मग बोटे जिभेवरून फिरवून किंवा पाटी तोंडाजवळ नेऊन चक्क पटकन थुंकी लावून पुसायची.

ह्या कर्मकांडांत ही मधली पोरे व्यग्र असत. तोपर्यंत मास्तर शेजारच्या वर्गातील मास्तरांशी सुपारीच्या खांडाची किंवा एकाच पानाच्या विड्याची देवाण घेवाण करत. तोपर्यंत सगळी पोरे तोंडे फिरवून पाट्या पालथ्या टाकून आपापासात सुरवातीला हळू, मग भीड चेपली की ‘अबे!काय बे’ची द्वंद्व युद्धे सुरू व्हायची. त्याची “ आता तुला मधल्या सुट्टीत बघतो! तू बघच बे” ह्याने सांगता व्हायची. मधल्या सुट्टीत तरटाच्या रस्साीखेची झाल्या की मग भांडणाला सुरुवात व्हायची. त्याचीही सांगता “शाळा सुटल्यावर कुठं जाशील बे?” मंग बघ; न्हाई दाताड मोडलं तर ..” ह्या वीररसाच्या संवादाने व्हायची. शाळा सुटल्यावर त्या दोघा चौघांचे दोस्त मिळून दहा बारांची जुंपायची. जास्त करून शाब्दिक किंवा फार तर ढकला ढकलीने जुंपायची. “ अबे जातो कुठं बे तू?आं? उद्या शाळेत येशीलच की साल्या! मग बघ काय होतं त्ये!” हे भरतवाक्य होऊन दिवसभराच्या शाळेवर पडदा पडायचा. ही त्यावेळची त्रिकाळ संध्या होती! तिन्ही वेळेला सौम्य ते किंचित तिखट फुल्यांचा मारा होत असे. पण त्यामुळे तिन्ही खेळातील संवाद खटकेबाज आणि चटकदार होत. ह्या तिन्ही युद्धात माझ्या सारख्याची भूमिका दिग्दर्शकाची किंवा साऊंड इफेक्ट वाढवायची होती.

ह्या चकमकी, लढायांची कारणेही महत्वाची असत. कुणी कुणाची शाईची दौत सांडली- तीही दप्तर किंवा चड्डीवर – मग तर विचारूच नका-हे म्हणजे महायुद्धाचे कारण होते- कोणी कुणाची पाटीवरची पेन्सिल तोडली, तोडून तुकडा घेतला, कुण्या तत्वनिष्ठाने म्हणजे खडूसने सोडवलेली वजाबाकी दाखवली नाही. ही ह्या दैनिक लढायांची कारणे असत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोडवलेली बेरीज कुणी कुणाला दाखवलीच पाहिजे अशी सक्ती नव्हती. ते कायमच्या तहातील एक कलम होते!

मधली सुट्टी संपली की मास्तरांसकट पोरेसुद्धा जरा आळसावल्यासारखी होत. पुजारी मास्तरांची एक डुलकी झाल्यावर मला पाणी आणायला सांगत. आव्वाचे घर समोरच होते. तेव्हढ्या वेळात मी आणखी स्वत:चा वेळ घ्यायचो. पाण्याचा तांब्या, वर तिरक्या टोपीसारखा ठेवलेल्या पेल्यासह, आणून मास्तरांना दिल्यावर सगळी पोरे रोज क्षणभर -क्षणभरच- मला दबून असत. मास्तरांचे पुन्हा शेजारच्या वर्गातील मोरे किंवा पवार मास्तरांच्या बरोबर जलपान आणि सुपारीच्या खांडांची अदलाबदल झाली की पुजारी मास्तर गोष्ट सांगत. झकास सांगत. ती झाली की मग शहराच्या भूगोलाचा धडा. तो लवकर आटपायचा. मग पाढे म्हणायला सुरुवात. पहिल्यांदा मास्तर “बें एकें बें” ह्या नांदीने सुरुवात करीत. त्यांच्या मागोमाग चाळीस पोरे आपापल्या स्वतंत्र गायकीत म्हणत. असे तीन चार पाढे झाले की शाळेत पुन्हा जीव यायचा. कारण कमी जास्त प्रमाणात साथीच्या रोगाप्रमाणे बहुतेक वर्गांत पाढे सुरू झालेले असत.

पाढे म्हणणे सोपे नाही.एक मुलगा बेचा पाढा म्हणतांना ‘ बे एके बेअे’ इतके सफाईने व झटक्यात म्हणायचा की त्याच्या पुढचा मुलगा ‘तीन एके तीऽनं’ची मनात सुरुवातही करायचा. पण बे दुणे आले की हा पुन्हा क्षणभराने ‘बे दोनी’ निराळ्या आवाजात म्हणायचा. असे हे ‘बे दोनी’ तीन वेळा झाले की मग हा निराळा सुर लावून पुन्हा ‘ बे दोन्ही’ निराळ्या ढंगाने म्हणू लागायचा. त्याच्या पुढचा मुलाच्या मनातल्या मनातले ‘तीन एकं तीनं’ कधीच थांबले असत. ह्या ‘बे दोनी’ कडे सगळा वर्ग आनंदाने तल्लीन होऊन पाहात,ऐकत राही. मास्तर मात्र “अरे पुढे” पुढे काय?” असे टेबलावर छडी आपटत विचारायचे. पण ह्याची निरनिराळ्या ढंगाने,अंगाने अर्धा तास “बाबुल मोरा”म्हणणाऱ्या कुण्या बडे खाॅंसारखे ‘ बे दुणे,बे दोनी,बे दोन्ही’ चालूच राही! पुजारी मास्तर झाले तरी त्यांच्या सहनशक्तीलाही मर्यादा होतीच की. ते पुढच्या मुलाला म्हणायचे “हां, तू म्हण रे पुढे ; “बे दोनी? “ हा भाऊ त्याच्या तीनच्या पाढ्यात गुंग झालेला. तो सहज म्हणू लागला,”बे दोनी साहा!” बे त्रिक नऊ “ फटकन छडी बसली तेव्हा पुढचे ‘बे चोक बारा’ कळवळण्यातच विरून जायचे.

रोज असे व्हायचे. त्यामुळे काही दिवस आमच्या वर्गाला कविता ओरडायला मिळाल्या नाहीत. तेव्हा लच्छ्या शिंदेनीच सांगितले,”मास्तर त्या तोतऱ्याला शेवटी ठेवा. म्हणजे नंतर आम्हाला कविता तरी म्हणता येतील.” मास्तरांनाही पटले.

काही वेळा संपूर्ण वर्गाला एकसाथ पाढे म्हणायला लावत मास्तर. हे बऱ्याच जणांना फायद्याचे होते. काहीजणांच्या दुधात ह्यांचे पाणी बेमालूम मिसळून जाई. त्यातही एक लई खारबेळं होतं. कुठलाही पाढा असला तरी हा नेहमी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव करत पंच्याण्णव पासून घाई करत ‘धावर पूज्य शंऽऽभर “ म्हणत मांडी ठोकायचा. पुढच्या वर्गात गेला की “धा एक्के धा करत ‘धाही धाही शंभर” हाच पाढा घाई घाईत म्हणायचा. त्याही पुढच्या वर्गात पुन्हा हा “वीसेके वीस” करीत वीस धाय दोनशे” म्हणत उडी मारायचा. त्याने असे “ तीस धाय तीनशे” पर्यंत मजल मारली होती! ह्यानेच पुढे “पाढे मेड ईझी” हे पुस्तक लिहिले! का लिहिले तर तो नंतर खरंच एका लघु उद्योगाचा का होईना मालक झाला होता.

आमच्या पाढ्यांची आणखीन एक खासीयत होती.सुरुवातीला सगळी मुले “एक्कोण चाळीस, एक्कूण चाळीस पर्यंत व्यवस्थित म्हणत. पण एके चाळीस ची गणती सुरू झाली की सगळा वर्ग ‘एकेचाळ’ , बेऽचाळ… , स्हेचाळ,… अठ्ठेचाळ असेच म्हणत. मग त्यात शिंदे, कोठे,जाधव, रशीदसह पट्या,गुंड्या,उंड्या,सोहनी,सावकार, देशपांडे हे सुद्धा आले!

शेवटच्या तासाला खरी शाळा सुरु होई! सगळ्या गावाला समजे की इथे शाळा भरते. कारण कविता म्हणायला सुरुवात झालेली असे. “पाखरांची शाळा भरे …” ही कविता वर्गाला असो नसो पण कुठलेही दोन तीन वर्ग ह्या कवितेतच हमखास ओरडत असत. त्यानंतर दुसरी हिट कविता म्हणजे “धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे!”

कविता म्हणायला सगळी मुले एका पायावर तयार असत. एरव्ही मुकी बहिरी असणारी मुलेही कवितेच्या आवाजात आपला आवाज बिनदिक्कत मिसळत. मोर्चा, मिरवणुकीत भित्राही शूर होतो त्याप्रमाणे ही मुखदुबळी मुलेही कवि होत काव्यगायन करू लागायचे. बरं, चाल एकच असली तरी म्हणणारा ‘आयडाॅल’ आपल्या पट्टीत थाटात म्हणणार. त्यामुळे ‘धरू नका ही बरे’ ह्या ओळीपासूनच कुणाच्या गळ्यामानेच्या तर कुणाच्या कानशीलापासल्या शिरा फुगलेल्या असत! निरनिराळ्या वर्गातून काही त्याच तर काही वेगळ्या कवितांचा कोलाहल ऐकू येत असे.

कवितेमुळे शाळेत निराळेच वारे भरले जायचे! शाळाही आताच भरल्यासारखी वाटायची. शाळा भरूच नये असे शाळेला जाताना वाटायचे. पण शाळा सुटूच नये असे फक्त ह्या शेवटच्या तासाला वाटायचे.

पाढ्यांवरून सुरवात झाली पण शेवट आम्ही ‘ पोरे भारी कवितेचा गोंगाट करी” ह्या ओळीच्या गोंगाटातच करावा म्हणतो !

आई : तुमची आमची आई

रेडवूड सिटी

आई हा शब्द नाही, हाक आहे.
स्वरव्यंजनांनी शब्द होतात
आई मात्र होत नाही
शब्दांत ती मावत नाही.
कोणीतीही भाषा,असो लिपी
आई कधी लिहिता येत नाही.

आई कधी काही सांगत नाही
सदैव मात्र पाहात असते.
डोळ्यांनी तुम्ही आम्ही पाहात असतो
आई हृदयाने पाहात असते.
डोक्यांत जळमटे आमच्या विचारांची
आईच्या डोक्यात एकच असतो
मुलाबाळांचाच तो सतत असतो.

मागितलेले द्यावेसे असेल तर हो म्हणते
नसेल तसले तर नाही म्हणते
फार तर बघू म्हणते.
लाड जमेल तेव्हढेच करते
शाळेत मात्र ओढत नेते.
झालो पास,डोक्यावर हात फिरवते
प्रगति पुस्तक मागत नसते
पुढे केले सही साठी की
लिहिताी वाचती असूनही
‘त्यांच्याकडे’ बोट करते.

ती रागावली तरी ते आठवत नाही
रागावली ते समजतही नाही.
आई शब्दही नाही, हाक ती एक असते
दिली नाही तरी तिला ती ऐकू येते.

माया-ममता लाड-कौतुक वत्सल-प्रेम
आणखीही अनेक चिकटवले तिला
पण सहन सोशिकता हे सोबती कायमचे.
घरातील असो चाळीतली, फ्लॅटमधली वा टपरीतली
असो झोपडीतली शिवारातली, पुलाखालची
कि नाक्यावरची,परीक्षा रोज तिला द्यावी लागते.
तोंडी परीक्षा देतच नाही, माहिती उत्तरही देत नाही
तसेही रोजचे बोलणे मोजकेच असते.
लेखी परीक्षा रोजच असते, वेळेपूर्वी पेपर देते,
पोळपाटावरती लिहित असते
तव्यावरती टाकत असते
ताटांमध्ये वाढत असते
गेल्यावर सगळे, एकटी ती जेवत असते.

दुपारची डुलकी झाली; येतील आता सगळे म्हणत
चिवडा चुरमुऱ्यांचा करावयाला घेते.
नाही राग, लोभ नाही, इतकी ती संतही नसते
सोसणे अति होता नशीबालाच ती दोष देते.
पदराने तोंड पुसत किंचित ताठ होत
कामात पुन्हा गुंतुन घेते.

शिका चांगले, व्हा मोठे, आनंदात राहा
इतकेच ती म्हणत असते,मागणे तिचे लई नसते.
विचार मुलांचेच असतात तिच्या मनात
श्वासनिश्वासही त्यांच्यासाठीच तिचे असतात.
आई शब्दही नाही, ती एक हाक असते
दिली नाही तरी ती ऐकत असते !

सदाशिव पं. कामतकर
२६एप्रिल २०२०

संत सेना न्हावी

विठ्ठलाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी निरनिराळ्या रूपाने मदत केली. ते पाहिले म्हणजे तो खरा ‘बहुरूपी’ होता हे पटते.दामाजीसाठी महाराचे रूप घेऊन विठ्ठलाने सरकारी रकमेचा भरणा केला.त्याने संत जनाबाईसाठी लुगडी धुतली.संत सखूसाठी दळण कांडण केले. संत तुकारामाच्या कीर्तीला बट्टा लागू नये म्हणून हजारो शिवाजींच्या रूपाने यवनी सैन्यात मोठा गोंधळ उडवून दिला. चोखोबाच्या घरी झोपडी बाहेर जेवत असता पुजाऱ्यांनी थोबाडीत मारली चोखोबाला, पण गाल सुजून काळा निळा पडला विठोबाचा!
नामदेव लहान असल्यापासून विठोबा त्याने दिलेला नैवेद्य हा आपल्या ‘भक्ताचाच कृपाप्रसाद’ या भावनेने रोज खात असे. पण देव इथेच थांबला नाही. त्याने नामदेवाचा सगुण भक्तीमार्ग हा ज्ञान आणि योगमार्गा इतकाच श्रेष्ठ आहे हे
तीर्थयात्रेत खुद्द ज्ञानेश्वरांना सिद्ध करून दाखवले !

अनेक रूपे घेऊन आपल्या भक्तांना संकटातून सोडवणाऱ्या विठ्ठलाच्या आणखी एका रूपाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे.

सेना न्हावी यवनी बादशहाच्या नगरात राहात होता.तो बादशहाचा न्हावी होता. बादशहाचे बोलावणे आले की समोरचे काम सोडून त्याला पळत जावे लागे. विशेषत: सेना पूजेला बसला की नेमके बादशहाचा निरोप यायचा.

आता हे फारच झाले हे जाणून, बादशहाचा निरोप आला की ,” सेना घरी नाही; बाहेर गेला” म्हणून सांगत जा असे बायकोला बजावून ठेवले. असे तीन चार वेळा घडले. आपण बोलावले की सेना बाहेर कसा गेलेला असतो? असा प्रश्न बादशहाला पडला असता एकदा शेजारीपाजाऱ्यांनी,” “खाविंद ! सेना खोटे बोलता है. वो घरीच देवपूजा करते बैठा असतो!” हे समजल्यावर बादशहाने सेनाला पकडून आणण्यासाठी शिपाई पाठवले.

पांडुरंगाला ही खबर न लागली तरच नवल ! तो लगोलग उठला. क्षणार्धात त्याने आपले किरीट,कुंडले, कौस्तुभमणि उतरून ठेवले. सेनासारखाच वेष केला.सेनासारखेच बिनगुंड्याचे बिन बाह्यांचे काळे तोकडे जाकीट घातले. गुडघ्या पर्यंत येणारे धुतलेले स्वच्छ धोतर नेसला. पांढरा रूमाल डोक्याला बांधला. सेनाच्या घरी आला. खुंटीवरची सेनाची धोपटी खांद्याला अडकवली. आणि ‘ झाला नाभिक पंढरीनाथ’ बादशहाचे शिपाई निघण्या आधीच राजाकडे आलाही !

सेना आलेला पाहून बादशहाचा राग निवळला. सेनाने आपले कसबी काम सुरू केले.बादशहाने मध्येच एखादे वेळी “स्स्स” केले की तिथे गुलाबपाणी लावायचा.वस्तरा पिंडरीवर चटपट चटपट करून धार लावायचा. बादशहाची हजामत करून झाली.

अभ्यंगस्नानासाठी राजेशाही हमामखान्या जवळच बादशहासाठी चांदीचे चांदतारे बसवलेला चंदनाचा मोठा चौरंग मांडला. रत्नजडीत भांड्यात सुगंधी मोगरेल ओतले. राजाच्या पाठीमागे उभा राहून सेनारूपी जगजेठी बादशहाच्या डोक्याला मोगरेलाने मालिश करू लागला. सेनाचा हात फिरू लागला तसा बादशहा सुखावला.त्याचे डोळे अर्धवट मिटू लागले. सेनाजगदीशने मस्तकावरून हात नेत त्याची वरच्यावर टाळी वाजली की राजा डोळे उघडे. त्याने मोगरेल तेलाच्या भांड्यात पाहिले आणि त्याला देदीप्यमान अशा विठ्ठलाचे मनोहर रूप दिसले. विस्मयचकित होऊन बादशहा मागे पाहायचा तर त्याला आपला नेहमीचाच सेना दिसे. असे दोन तीनदा झाले. ते दिव्य रूप पाहून बादशहा चकित झाला.सेना डोक्याला पाठीला मालिश करे त्याने तो सुखावला. सेना न्हाव्यावर खूष होऊन बादशहाने त्याला ओंजळभर सोन्याच्या मोहरा दिल्या.
सेनाजगन्नायक बादशहाला कुर्निसात करून निरोप घेऊन जाऊ लागला. पण बादशहा त्याला सोडेचना. इथेच राहा असा आग्रह करू लागला. पण “ मी घरी जातो; आणि लगेच येतो”
असे सांगून तो भक्तवत्सल, सर्वव्यापी पांडुरंग, सोन्याची नाणी धोपटीत टाकून निघाला.

सेनाच्या घरी जागच्या जागी धोपटी खुंटीला अडकवून पांडुरंग वैकुंठी गेलाही! दोन दिवस झाले आता येतो असे सांगून गेलेला सेना हजाम अभीतक आया नही ? असं स्वत:लाच विचारत बादशहाने सेनाला आणण्यासाठी शिपाई पाठवले. एकदम पाच सहा शिपाई आल्याचे बायकोकडून समजल्यावर सेना मुंडासे बांधत बाहेर आला.धोपटी अडकवण्या अगोदर वस्तरा आरसा वगैरे आहे ना हे पाहण्यासाठी धोपटीत हात घातला तर हातात सोन्याच्या मोहरा आल्या. सेना मनात दचकला. चमकला! आपल्याला अडकवण्यासाठी हा कसला डाव तर नाही ना ? अशी शंका त्याला आली. इकडे शिपाई दरडावून घाई करू लागले.

सेना बादशहाकडे पोचला. परवापासून बादशहा सेनावर खूष होताच. आजही त्याने सेनाचे हसून स्वागत केले. सेनाने कामाला सुरुवात केली. तेल मालिशची वेळ आली. चौरंगावर बसल्यावर राजा म्हणाला, “सेना, दो दिन पहले जैसा मालिश किया वैसाही करना.” “ आज भी हम तुझे सोनेकी अशर्फी देंगे.” सेना पुन्हा बुचकळ्यात पडला. पण त्याने आपले काम सुरू केले. थोडा वेळ गेल्यावर बादशहाने विचारले, “ सेना आज तुझे क्या हुआ है? परसों जैसा तुम्हारा हात नही चल रहा. क्या बात है?” हे विचारत असताना राजा रत्नजडीत पात्रात पाहात होता.

हळू हळू सेनाच्या डोक्यात प्रकाश पडू लागला. त्याचा गळा दाटून आला. “ अरे त्या परम दयाळू विठोबाने माझ्यासाठी रूप घेऊन हजामाचे काम केले. बादशहाच्या रोषातून मला वाचवले .” ह्या विचाराने त्याला रडू आले. हात जोडून तो म्हणाला,” जहाॅंपन्हाॅं! त्या दिवशी मी आलो नव्हतो. मुझे बचाने माझा विठोबा आया. तुमची सेवा करून गेला ! माझ्या पांडुरंगाने माझी लाज राखली, बादशाहा !” असे म्हणत खाली बसून गुडघ्यात मान घालून रडू लागला. गदगदून रडू लागला.

बादशहाने पुन्हा त्या मोगरेल तेलात पाहिले; आणि त्याला पुन्हा परवाचे “ सुंदर साजिरे रूप सावळे “ असा जगजेठी पांडुरंग दिसला! काय झाले असावे ते बादशहाच्या लक्षात आले. शिपायांना खुणेनेच सेनाच्या पाठीवर हात फिरवून त्याला उठवायला सांगितले.

सेना उठला पण विठ्ठलाची कृपा आठवून आठवून पुन्हा पुन्हा सदगदित होऊन स्फुंदत होताच. बादशहाला मुजरा करून परत जाण्यासाठी त्याची इजाजत मागू लागला. बादशहाने परवानगी दिली. सेना निघाला तेव्हा तो म्हणाला, “ सेना मेने भी तुम्हारे विठोबाको परसों देखा. मनमें कुछ अजीबसा होता था. बहोतही प्यारा और खुबसुरत है वो !” “ और देखो, कभी भी अपने भगवान को इतनी तकलीफ मत देना.उससे दुॲा मांगो. हमारे लिये भी !” हमारे लिये भी!”

एक रूपयाचा देव

चिन्नू मुठीत एक रुपयाचे नाणे धट्ट धरून जात होता. एक दुकान दिसल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील चिंतेची छटा कमी झाली. मोठ्या अधीरतेने त्याने दुकानदाराला विचारले, “ काका, तुमच्याकडे देव मिळतो का हो? मी विकत घेईन. मला एक देव पाहिजे.असला तर लवकर द्या हो.” दुकानदाराने चिन्नूकडे कोण चक्रम आहे हा अशा मुद्रेने पाहात हातानेच नाहीय्ये जा म्हणून धुडकावले. चिन्नू निराश होऊन दुसऱ्या दुकानात जाऊन,” दादा, मला एक देव पाहिजे. आहे का तुमच्या दुकानात? मी पैसे देईन त्याचे.” असे तळमळून विचारले. “ ए पोरा काय येडबीड लागलंय का तुला? जा देव बिव काही नाही मिळत इथं, पळ!” चिन्नू हिरमुसला झाला. एव्हढेसे तोंड करून पुढच्या चौकातल्या दुकानात गेला. तिथेही हाच प्रकार! तीच चौकशी, तेच उत्तर, व हडत हुडत करून घालवून देणे हेच घडले. होता होता एकूण चाळीस दुकाने फिरून झाली पण चिन्नूला देव तर मिळाला नाहीच पण टिंगल, हेटाळणी व उडवा उडवीची उत्तरेच ऐकायला मिळाली. चिन्नू रडकुंडीला येऊन एका खांबाखाली तोंड झाकून हुंदके देत बसला.

थोड्या वेळाने उठून तो पुन्हा कुठे देव मिळतो का पाहात एका दुकानात शिरला. इतका वेळ रुपया मुठीत धरल्यामुळे तळहात घामाने ओला झाला होता. तळवाही तांबडा झाला होता.ओला रुपया खिशात ठेवला. हातही खिशाच्या आतच पुसला.

दुकानात गेला. तिथे कोणी दिसले नाही. “ कुणी आहे का?” चिन्नूने दबकतच विचारले. एका शोकेस मागून एक हसतमुख म्हातारा आला.”काय पाहिजे बाळ तुला?” असे नेहमीच्याच आवाजात त्याने चिन्नूकडे पाहात विचारले. “बाबा! मला देव विकत घ्यायचाय हो.” चिन्नू मोठ्या आशेने दुकानदाराकडे पाहात म्हणाला. “ अरे वा! देव मिळेल पण पैसे आणले आहेस का ?” चिन्नूला आश्चर्य वाटले. इतकी पायपीट करीत किती दुकाने हिंडलो असेन. ह्या बाबाने निदान थोडी चौकशी तरी केली. “ आणले आहेत ! आणले आहेत! एक रूपया आहे माझ्या जवळ!” हे सांगताना चिन्नूने छाती फुगवायची तेव्हढी राहिली होती. “छान! नेमकी इतकीच किंमत आहे देवाची. पण तुला देव कशासाठी हवा?” चिन्नूचा चेहरा उतरला. तो खिन्न होऊन म्हणाला,” माझे काका हाॅस्पिटलमध्ये आहेत. मला ते एकटेच जवळचे आहेत.” “ आई बाबा कुठे आहेत?” “ माझे आई बाबा मी अगदी लहान असतानाच वारले. ह्या काकांनीच माझा सांभाळ केला. काका बांधकामावर जातात. काल ते उंच फरांच्यावरून खाली पडले. दवाखान्यातले डाॅक्टर म्हणाले. आता फक्त देवच काय करील ते खरं!” म्हणून मी एक रुपया घेऊन देव आणायला आलो.” चिन्नूने सांगितले ते ऐकल्यावर दुकानदार बाबा म्हणाले,” अरे देवाची किंमतही नेमकी एकच रुपया आहे.” असे म्हणत त्यांनी एक टाॅनिकची बाटली काढून चिन्नूला दिली.

देव मिळाल्याच्या आनंदात चिन्नू धावत पळत दवाखान्याकडे निघाला. काकाला,डाॅक्टरांना देव केव्हा दाखवेन असे त्याला झाले होते. रात्र झाली होती. चिन्नू धापा टाकत काकाजवळ आला. बाटली काकाजवळ ठेवत म्हणाला, “काका काका,मी देव आणलाय. आता तुला भीती नाही. देव मिळाला मला.!” सांगता सांगता दमल्या भागल्या चिन्नूला केव्हा झोप लागली ते समजले नाही.

दुसरे दिवशी सकाळी चिन्नू उठला. पण पलंगावर काका दिसला नाही. तेव्हा तो घाबरून काका कुठे आहे असे नर्सला विचारू लागला. “मोठ्या शहरातले पाच सहा डाक्टर्स आले आहेत. ते तुझ्या काकाला तपासताहेत.” नर्सने सांगितल्यावर चिन्नू मुकाटपणे काकाच्या पलंगापाशी येऊन बसला.

मोठ मोठ्या तज्ञ डाॅक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. एक आॅपरेशन केले. यथावकाश चिन्नूचा काका बरा झाला.बिल आले. ते पाहून काकाला आपण हार्टफेलने मरणार असे वाटू लागले. तो बिलाकडे पाहात मनात म्हणत होता,” चिन्नू एक रुपयात देव मिळत नसतो रे!” काकाचे डोळे पांढरे होण्याच्या आत नर्स आली. ती म्हणाली,”ते बिल आहे ; बिलाचे सर्व पैसे मिळाले आहेत.त्याची ही पावती!”

काकाने सुटकेचा निश्वास टाकला.काका आणि चिन्नू बाहेर पडतांना बिलाच्या खिडकीपाशी आले. “साहेब, माझ्या बिलाचे एव्हढे पैसे कुणी भरले ते सांगता का? त्याच्या पाया तरी पडतो.” बिलाचे काम पाहणाऱ्याने कागदपत्रे वर खाली करीत तपासून पाहिली. तो म्हणाला,” एका श्रीमंत माणसाने तुमचे पैसे भरले आहेत. औषधाचे मोठे दुकान आहे त्यांचे. येव्हढे मला माहित आहे.” इतके सांगून त्याने दुसरा कागद पाहून, चिन्नूच्या काकाला त्या मालकाचे नावही सांगितले.

चिन्नूने “औषधाचे मोठे दुकान आहे” हे ऐकले होते. चिन्नू आपल्या हातातला देव दाखवत काकाला म्हणाला,” काका ज्यांनी मला हा देव दिला त्या बाबांचेच दुकान असेल.मला माहित आहे,चला.”
काका आणि चिन्नू त्या देवमाणसाला भेटायला निघाले. चिन्नूच्या हातातला एक रुपयाचा देव काकाने घेतला. त्या देवाकडे पाहात ते दुकानदार बाबाला शोधत त्या दुकानात आले.तिथे दुकानदार बाबा नव्हते. नोकर म्हणाला, “मालक सुट्टी घेऊन प्रवासाला गेले आहेत. पंधरा वीस दिवसांनी येतील. पण त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी दिले आहे.”

काका पत्र वाचू लागला. जसे वाचू लागला तसे त्याचे डोळे भरून येऊ लागले. “ मला माहित आहे तुम्ही माझे आभार मानायला आला आहात. पायही धरू लागाल माझे. पण तसे काही करण्याची गरज नाही. तुमच्या, एक रुपयाच्या देवाचे,चिन्नूचे आभार माना.”

( युट्युबवर सहज समोर आलेल्या लहानशा गोष्टीच्या आधारे.)

माझी पहिली कमाई

दोस्त प्रभाकर जोशीने मला सांगितले, “ चल, माझ्या बरोबर.” दोस्ताने चल म्हटल्यावर कोणता मित्र निघणार नाही? मी आणि जोशी निघालो. जोशीला त्याच्या न्यू हायस्कूल मधले सगळे मित्र लाल्या म्हणत.मी हरिभाईचा. माझी आणि जोशीची मैत्री काॅलेज मध्ये झाली. मी कसा त्याला लाल्या म्हणणार? मी त्याला जोशीच म्हणत असे.

मी आणि हा जोशी नाॅर्थकोट हायस्कूल मध्ये आलो. तिथे त्यावेळच्या व्ह.फा. ची म्हणजे प्राथमिक शाळेचे शेवटचे वर्ष सातवीचे याची वार्षिक परीक्षा होती. त्या काळी प्राथमिक शाळेत व्ह.फालाही मॅट्रिक सारखेच महत्व होते. तो एका साहेबांशी बोलला. माझी ओळख करून दिली. साहेब म्हणाले,” या तुम्ही उद्या सकाळी १०:०० वाजता.” मी आणि जोशी बाहेर आलो. मी त्याला विचारले,”काम कसले आहे? काय करायचे असते?” “ अरे,व्ह.फा.ची परीक्षा आहे.आपण पेपर लिहित असतो त्यावेळेस सुपरव्हायझर करतो तेच आपणही करायचे!”

दुसरे दिवशी सकाळी मी ९:३० लाच नाॅर्थकोटशाळेच्या ॲाफिसमध्ये गेलो. बरीच गडबड दिसत होती. आज साहेबांच्या जागी बाई होत्या. त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर मी नमस्कार करून माझे नाव पत्ता सांगितला. त्यांनी तो तपासून पाहिला. मग म्हणाल्या,” कामतकर तुम्ही ह्या वर्गावर जायचे. बाहेर व्हरांड्यात पाण्याचा डेरा भरलेला आहे का ते पाहायचे. मला त्यांनी एक उत्तरपत्रिका दिली.ती कशी भरायची व मुलांनी कशी भरायची त्या सूचना सांगितल्या. ह्या सूचना विद्यार्थ्यांना द्यायच्या हेही सांगितले. पेपर संपताना दिल्या जाणाऱ्या घंटा, त्यांचा अर्थ काय व काय करायचे तेही सांगितले. मी वर्गाकडे निघणार तेव्हढ्यात जोशीही आला. त्याचेही त्यांच्याशी बोलणे झाले. मधून ते दोघेही माझ्याकडे पाहात. जोशी मला त्याच्या वर्गावर जातो,पेपर संपल्यावर भेटू असे सांगून गेला. मीही निघालो. बाईं तेव्हढ्यात मला म्हणाल्या,” आणि एक मात्र अजिबात विसरू नका. मुलांना उत्तरे सांगणे, हे चुकले तसे लिही, अशी कसलीही मदत करू नका. मुलांना पास व्हायचे आहे हे विसरू नका!” म्हणजे माझा शैक्षणिक आलेख जोशांनी बाईंना सांगितला वाटते!त्याला मनातल्या मनात प्रभ्या,जोश्या,लाल्या सा… आणि फुल्या फुल्या म्हणत वर्गाकडे निघालो.त्यानेच मला हे काम मिळवून दिले हे इतक्यातच विसरलो. हे लक्षात आले आणि माझा मलाच राग आला. चूक लक्षात आली.

वर्गात आलो. सगळीकडे पाहिले. “व्ह.फा”ची मुलं मुली होत्या.हिरव्या पानांच्या गर्दीत काही कळ्या दिसाव्यात तशा डेस्कांच्या प्रत्येक रांगेत एक दोन मुली बसल्या होत्या. त्या सर्वांबरोबरच मलाही परिक्षेचे tension आले होते. कोण काॅपी करेल कशी करेल त्या सर्व कृल्प्त्या आठवत होतो. सगळ्यांचे हात बाह्या वर करून पाहिले. कुणाजवळ वही पुस्तक वगैरे नाही ह्याची डेस्काच्या खालच्या कप्प्यात डोकावून हात फिरवून खात्री करून घेतली. इतक्यात कुणा शिक्षकाने माझ्याजवळ उत्तरपत्रिकांचा गठ्ठा दिला. घंटा झाली. मी त्या प्रत्येकाला दिल्या. मुलांना मी वरचा भाग कसा भरायचा ते सांगू लागलो. कुणीही लक्ष देत नव्हते. त्यांचे ते भरत होते. त्यांना माहित झाले होते कसे भरायची ती उत्तरपत्रिका. तेव्हढ्यात दुसरे शिक्षक आले. त्यांनी मला प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा दिला. घंटा झाल्याशिवाय वाटू नका असे बजावून गेले. प्रश्नपत्रिका म्हटल्यावर मला माझ्या परिक्षा आठवल्या व घाम फुटला. पोरं ढिम्म होती. त्यांना,परीक्षा कुणाची आणि मला का घाम फुटला ते समजेना. एका धीट पोराने विचारलेच, “ सर, तुम्ही काॅपी केली होती का?” इतर पोरंपोरी हसू लागल्या. घंटा झाली! मी प्रश्नपत्रिका वाटल्या. पोरे ती वाचू लागली. काहीजण लगेच तर काही थोड्या वेळाने पेपर लिहू लागले.

मी रांगे रांगेतून हिंडू लागलो. टेबलाजवळ येऊन वर्गाकडे बारकाईने पाहू लागलो. पंधरा वीस मिनिटात कोण काॅपी करायला सुरवात करतोय ह्या विचाराने निश्चिंत होऊन पुन्हा फेऱ्या मारू लागलो. थोड्या वेळाने त्या वरिष्ठ बाई चष्म्यावरून पाहात माझ्या वर्गात आल्या. पोरं मान खाली घालून लिहित होती. काही विचारात पडली होती. तोंडात बोट घालून शून्यात पाहात होती. बाई आलेल्या पाहून ‘आता आणखीन काय’ह्या विचाराने मीच घाबरून गेलो. बाईंनी जमतेय ना विचारले. मनात म्हणालो ह्यात काय जमायचे? मी हो म्हणालो. बाई “कुणालाही उत्तरासाठी मदत करायची नाही” हे पुन्हा बजावून गेल्या. नोकरी एक दिवसाची असली तरी तिच्यातही अपमान होतोच हे लक्षात आले. पण माझी शैक्षणिक प्रगति आठवून बाईंना मुलांच्या निकालाची काळजी वाटणारच हे मी समजून घेतले!

अर्धा पाऊण तास झाला . मीही सरावलो होतो. रांगांतून फिरता फिरता मुलांच्या पेपरात डोकावू लागलो. प्रश्न ‘संधी आणि समास ह्यातील फरक स्पष्ट करा” असावा. एकाने लिहिले होते, “ संधी ची सुरवात अनुस्वाराने होते. समासाची होत नाही.” दुसऱ्याचा पेपर पाहिला त्यात त्याने जास्त खुलासेवार लिहिले होते,”आधी संधी आणि जोडाक्षरांतील फरक पाहिला पाहिजे. मी मनात विचारले,”का रे बाबा?” त्याने पुढे स्पष्ट केले होते,” जोडाक्षरात दोन अक्षरे एकत्र येतात. उदा. ‘आणि’ तर संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिवसरात्र. समासातही दोन शब्द एकत्र येतात. उदा. दिनरात.” हे अफाट ज्ञान वाचून माझा चेहरा उदगार चिन्हासारखा झाला. पुढे गेलो. मुलगी हुषार असावी. तिने लिहिले होते,” संधी म्हणजे सोडणे व साधणे ह्यांचे नाम आहे.”तिने पुढे लिहिले होते की ‘ संधी सोडायची नसते आणि समास हा सोडवायचा असतो. दोघात हा स्पष्ट फरक आहे.” मी टाळ्या वाजवणार होतो पण आवरले स्वत:ला. दुसऱ्या रांगेतील एका मुलाने प्रश्न फार सहज व सोपा करून टाकला होता. त्याने लिहिले होते,”सं+धी ही दोन अक्षरे मिळून संधी होतो तर समास ह्या शब्दात दोन स मध्ये मा हे अक्षर येते. त्यात कुठेही धी नाही. हा स्पष्ट फरक आहे.” मला माझ्या उत्तरांची आठवण झाली! खिडकी जवळच्या रांगेतील एका मुलीने अत्यंत व्यावहारिक उत्तर लिहिले होते. तिने लिहिले होते की,” संधी चा संबंध वेळेशी जोडला आहे. आणि लिहिताना समास हा सोडावाच लागतो. दोन्हीतील हा फरक स्पष्ट आहें” एकाने लिहिले होते,” संधी व साधु हे दोन वेगळे शब्द आहेत पण संधीसाधु हा एकच शब्द आहे. संधी आणि समास मध्येही असाच स्पष्ट फरक आहे.”

माझा पहिला दिवस पार पडला. उद्याचा शेवटचा दिवस होता. मला बाईंनी उद्याही बोलावले. पेपर सुरू झाला. आज इतिहासाचा पेपर होता. लिहिणे खूप असते. थोरवी व योग्यता हा प्रश्न तर हमखास असतोच. तसा आजही होता. वर्गात फेऱ्या घालताना उद्याचा इतिहास आजच निर्माण करणारे हे आधारस्तंभ काय लिहितात हे पाहावे म्हणून डोकावू लागलो. एकीने झाशीच्या राणीविषयी लिहिताना, पहिलेच वाक्य ,”झाशीची राणी ही एक थोर पुरूष होऊन गेली.” लिहिलेले पाहून थक्क झालो. पण बऱ्याच मुलांमुलींनी तसेच लिहिले बोते.सवयीचा परिणाम. अहिल्याबाई होळकरांसंबंधी लिहितानाही “त्या एक थोर पुरुष होऊन गेल्या” असेच लिहिलं होते. झाशीची राणी असो की अहिल्यादेवी होळकर असो, दुसरे वाक्य “त्यांची योग्यता मोठी होती.” असेच बहुतेकांनी लिहिले होते. झाले उत्तर! सम्राट अशोकांनी कारकीर्दीत काय केले व शेरशहांनी काय सुधारणा केल्या ह्यांच्या दोन्ही उत्तरात रस्ते बांधले, दुतर्फा झाडे लावलीआणि विहिरी खोदल्या हेच साचेबंद उत्तर सगळ्यांनी लिहिले होते! माझ्या मदतीची कुणालाही गरज नव्हती !

व्ह.फा.च्या परीक्षेतील शेवटचे दोनच दिवस मला सुपरव्हायझिंगचे काम मिळाले. माझ्या आयुष्यातील ही पहिली नोकरी किंवा मोबदला मिळालेले पहिलेच काम होते. मित्र प्रभाकर जोशींनी “चल रे” म्हणून नेले हा त्याचा मोठेपणा! बारा चौदाच रुपये मिळाले असतील.पण मला ती फार मोठी रक्कम वाटली ह्यात आश्चर्य नाही. त्याबरोबरच मुलांची उत्तरे वाचताना ज्ञानात आणि करमणुकीत जी भर पडली त्याचे मोल कसे करणार?

मधूची सायकल

टीव्हीवर बातम्या पाहात होतो. मध्ये मोटारीची जाहिरातही आली. तिच्यातल्या सुंदर मोटारी पाहून मी सतीशला म्हणालो, “काय सुंदर चकचकीत दिसतात ह्या मोटारी.! “ नव्या आहेत त्या बाबा.” सतीश म्हणाला.

त्यावर मी माझी एक आठवण सांगत म्हणालो,” आमचा आतेभाऊ मधू त्याच्या सायकलची इतकी देखभाल करायचा! हा कंटाळत कसा नाही वाटण्या इतकी तो रोज घासून घासून पुसायचा. तेलाची धार एकाच ठिकाणी पण चेन गरगर फिरवित सगळ्या चेनला व्यवस्थित तेल पाजायचा. मग लहान बाळाचे तोंड पुसावे तितक्याच काळजीने चेन वरच्यावर पुसुन घ्यायचा.

दोन्ही चाकांची मडगार्डस तर बाहेरून कुणीही चकाचक करेल. मधुच्या सायकलची मडगार्डस आतूनही स्वच्छच नव्हे तर चमकतही असत! रात्री खाली रस्त्यावर त्या मडगार्डसचा प्रकाशच चाकाबरोबर फिरत येई. सीटही तो मेण लावून चमकवत असे. मग सायकलचा साचा -मधला त्रिकोणही-स्वच्छ का नसणार? चाकांची प्रत्येक तार व रिमही चमचम चांदीची वाटत असे. प्रत्येक स्पोक तो एकदा कोरड्या फडक्याने मग किंचित ओल्या फडक्याने व ते झाल्यावर रुमालावर अत्तराचा थेंब टाकावा तसा तेलाचा थेंब टाकलेल्या फडक्याने प्रत्येक तार (स्पोक) पुसायचा. ही फडकी काही शेमाॅयची किंवा पिवळी मऊ फ्लॅनेलची नसत. जुन्या गंजीफ्राकाची चार फडकी असत. हे घासून पुसून झाले की तो हबकडे वळे. तिथेही हीच किमया करू लागे.

आम्ही एकदा, बिरबलाने बहुरुप्याच्या नंदीबैलाची परीक्षा घ्यावी तसे, त्याच्या सायकलच्या ब्रेकस्चे रबरी मोजे किंवा शूज स्वच्छ आहेत की नाही ते पाहू लागलो. ब्रेकसची रबरे राहू द्या दोन्ही टायर्सवरही धुळीचा एक कण नव्हता!

मधुला सायकलची देखभल करताना कुठे किती जोर लावून घासावे, खरारा कितपत आणि कुठे करावा हे माहित होते.काही भागांना, लहान बाळाचे नॅपकिनने स्पंज करावे तितक्या हळुवारपणे तो करायचा! उपजत म्हणतात ते ज्ञान मधूचेच असावे !

त्यावेळी सायकलला लावायचे दिवे लहान असले तरी कंदीलासारखे वातीचे असत. त्यांचीही तो निगा राखत असे. त्याच्या दिव्याची भिंगासारखी काच स्वच्छ असे.यामुळे त्याच्या दिव्याचा प्रकाशाला कधीही काविळ होत नसे! नंतर तर डायनॅमोचे किंवा बॅटरीचे दिवे आले. त्यामुळे मधुच्या उत्साहाला आणखीच भरती येत असे. नशीब! मधु, दिव्यातून पडणारा प्रकाशही घासून पुसून स्वच्छ करत नव्हता!

आम्हा सगळ्यांनाच संशय असे की मधु त्याची सायकल रस्त्यावर चालवत नसणार. आवडत्या कुत्र्याला फिरवून आणावे तशी तिला तो फिरवून आणत असावा.

रात्री मधुच्या घरी गेलो तर, अंधारात घड्याळातील रेडियमचे काटे चमकावेत तशी,त्याची सायकल चकचकत असे. मधुच्या सायकलमुळेच, त्यांच्या वाड्यापुरती तरी अमावस्याही पौर्णिमा होत असे!

एका लग्नाची अदभुत इव्हेन्ट!

शीव/ चुनाभट्टी

नरसी मेहता नेहमी आपल्याच नादात असायचा भजन कीर्तन लेखन ह्यात तो हरवलेला असे. ध्यानातच कष्णाचे गुण आवडीने गात असे. हिसाबकिताबात त्याचे मन लागत नसे. नरसी मेहत्याच्या घरी कोण मुलगी देणार! पण मुलगा लग्नावाचून राहात नाही आणि मुलीचे लग्न झाल्याशिवाय राहात नाही ह्या सत्याप्रमाणे नरसी मेहत्याच्या मुलाचे स्थळही कुणाच्या तरी नजरेस आले.

हा असा तसा कुणी सोमाजी गोमाजी कापसे नव्हता. जुनागडजवळच श्यामापुर नावाच्या गावात त्रिपुरांतक -देवाचेच विशेषण शोभावे – अशा भारदस्त नावाचा धनाढ्य सावकार होता. त्याची मुलगीही लग्नायोग्य झाली. मुलीचा बाप कितीही मोठा, सावकार असला तरी अखेर मुलीचाच बाप. त्यानेही आपल्या पुरोहिताला म्हणजे कुळाच्या उपाध्यायाला स्थळ शोधायला सांगितले.

कृष्णंभट आपल्या यजमनाच्या मुलीसाठी स्थळं पाहू लागले. ते जुनागडला आले असता गावात चौकशी करू लागले. एक दोघांनी बिचकत अडखळत नरसी मेहत्याचा मुलगा लग्नाचा असल्याचे सांगितले. पण नरसी मेहत्याच्या घरची दामाजीचीही अवस्था सांगितली.

कृष्णंभट स्वत:शी म्हणाला,”मी नरसी मेहत्याला कसा काय विसरलो?“ तो नरसी मेहत्याच्या घरी आला. नरसी त्याच्या जीवीचा विश्राम अशा कृष्णाचे गुणगान करत होता.”तूच माझा विसावा। तूच माझा सखा। कष्णा, तूच मजला एक एकला। तुझ्यासारिखा अन्य कोण मज।। असे भजन करीत होता.

नरसीला घरी येणारा प्रत्येकजण साधु सज्जन वाटायचा. कष्णंभटाला गूळपाणी झाले. सुपारीही कातरून दिली. कृष्णंभटही काही काळ नरसी भगतच्या सहवासात स्वत:ला व सभोवताल विसरून गेला होता. सावध झाल्यासरसा त्याने नरसी भगतचा मुलगा सावकाराच्या मुलीसाठी निश्चित केला.खरा वैष्णव पाहिल्यावर नरसी मेहत्याच्या घरी धनसंपदा किती, शेती आहे का नाही हा विचार न आणता नरसी खरा वैष्णव आहे हीच त्याची थोरवी आहे, हे जाणून तुमचा मुलगा पसंत आहे हे नरसी मेहत्याला सांगितले. पण ही मुलगी कुणाची हे त्याने विचारल्यावर कृष्णंभटाने उत्तरा दाखल, “मुलगी त्रिपुरांतक सावकाराची आहे” सांगितल्यावर,दीनआणि राव, राजा आणि भिकारी,शत्रु आणि मित्र समान मानणाऱा नरसी भगत हरखून गेला नाही की चिंतेतही पडला नाही. त्याने हसतमुखाने कृष्णंभटाला निरोपाचा विडा दिला.

कृष्णंभट समाधानाने श्यामापुराला आला. आपण मुलगा निश्चित केल्याचे वर्तमान त्याने त्रिपुरांतक सावकराला सांगितले. सावकाराला आनंद झाला. सोयरे कोण चौकशी केली. नरसी मेहत्याचा मुलगा हे ऐकल्यावर मात्र सावकराचा चेहरा खर्रकन उतरला. आपल्या तोलामोलाचे घर, नातेवाईक नाहीत समजल्यावर आतून संतापला पण आता काही करणे अशक्य आहे हे तो जाणून होता. कारण त्या काळी पुरोहिताने निश्चित केलेले लग्न मोडता येत नसे.

पण सावकार धूर्त होता. त्याने कृष्णंभटाला सांगितले,” उपाध्याय ! लगोलग जा आणि व्याह्यांना सांगा मुहुर्त उद्याचा दिवस सोडून परवाचा आहे. वऱ्हाड हत्ती घोडे छत्र चामरे उंची वस्त्रे, वाजंत्र्यांसह या म्हणावे.” हे ऐकून नरसी मेहता लग्न मोडेल अशी त्याची धारणा होती

कृष्णंभट लगेच निघाला. त्याने नरसी मेहताला, लग्न परवाच करायचे ठरले आहे तर सर्व तयारीनिशी, शोभेशा इतमामाने या.” येव्हढाच मोघम निरोप दिला. हे ऐकून नरसी भगतच्या घरांत गोंधळ सुरु झाला. एका दिवसात कुठे लग्नाची तयारी होते का? वऱ्हाडाची मंडळी तरी कशी जमणार? वगैरे कलकलाट सुरु झाला. पण नरसी मेहता मात्र शांतपणे “हरिके गुन गाऊ मैं” म्हणत “हे नाथ वासुदेव हरे मुरारे; गोविंद नारायण मधु कैटभहारे ” म्हणत आपल्या भजनात पुन्हा गुंग झाला.नंतर कृष्णंभटाला जेवायला घालून सावकराला होकार कळवायला सांगितले.

कृष्णंभटाने धोरणीपणाने नरसीच्या प्रेमापोटी आपल्या मालकाच्या अटी मात्र नरसीला सांगितल्या नव्हत्या. काय होत्या त्या अटी?

“लग्न लगेच परवाच करायचे. वऱ्हाडाने हत्ती घोडे मेणे छत्र चामरे, वाजंत्र्या चौघड्यासहित थाटामाटात यावे. आमचीही प्रतिष्ठा राखली पाहिजे की नाही?“ कृष्णंभटाने यजमानाला नरसी मेहत्याचा होकार कळवला. सावकार खट्टू झाला. पण करणार काय!

नरसी मेहत्याला परिस्थितीचे आचके लागत नव्हते. पण तिकडे द्वारकेत कृष्णाला मात्र उचकी लागली. त्याच्या लक्षात आले. त्याने रुक्मिणी सत्यभामेला बोलावून नरसीच्या मुलाच्या लग्नाच्या तयारी करण्यास सांगितले. तसेच त्याने आपल्या नामांकित भक्तांना पाचारण करण्यास सुरुवात केली. उद्धव अक्रूर तुंबर। शुक वाल्मिकी प्रल्हाद थोर।भीष्म बिभीषण आणि विदुर ।मारुति सत्वर पाचारिला।। इतकेच काय आपला मित्र सुदामा आणि लहानपणीचा सवंगडी पेंद्यालाही बोलावले. स्वत: पुन्हा आत जाऊन सत्यभामा रुक्मिणीला वऱ्डाड मंडळी जमली आहेत. नरसी मेहता श्यामापुराच्या सीमेत पोचण्यापूर्वीच आपण सर्वांनी पोचले पाहिजे असे बजावले.

नरसी मेहत्याच्या मुलाचे वऱ्हाड द्वारकेतून, स्वर्गलोकींच्या पाहुण्यासह निघाले. त्वरित श्यामापुराच्या सीमेपाशी आले. सर्वांनी अर्थातच आपली रूपे बदलली होती. पण तेज आणि सौदर्याची, ज्ञानाची आणि सौहार्दाची झळाळी कशी लपवता येणार.

विश्वकर्म्याने मंडप बांधण्यास घेतला. त्याची सजावटही वैभवशाली केली. ऋतुपर्ण राजाने सुगंधी वनस्पती, हिरवी पाने व सुगंधी फुलांची आरास झटक्यात केली. सजवलेले हत्ती घोडे मेणे पालख्यांची गणना नव्हती! सर्व वऱ्हाड्यांची वस्त्रे अलंकार भूषणे डोळे दिपवणारी होती. सीमंत पूजनाचा हा थाट पाहून गावकरी सावकाराला हे अदभुत सांगू लागले. इकडे नरसी मेहता आपल्या वैष्णव भक्तांसह हरिगुण संकीर्तन करत आला.नरसी मेहत्याची बायको मेण्यातून आली.ती दागिन्यांनी मढली होती.

त्रिपुरांतक सावकार आपला थाट दाखवत येऊ लागला. आपले दोन वाजंत्र्याचे जोड, आपल्यापरीने उंची वस्त्रे ल्यालेली दागदागिने घातलेली मुलीकडच्या मंडळीसह तो आला. पण नरसीचे वैभव पाहून लाजल्याहून लाजल्यासारखे झाला. स्वत: कृष्णाने सर्वांचे स्वागत केले. त्याची सारखी धावपळ चालू होती. समारंभ आटोपल्यावर रंभा उर्वशी तिलोत्तमा ह्यांचे नृत्य गायन झाले.

दुसरा दिवस तर प्रत्यक्ष लग्नाचा! कवि वाल्मिकीने केलेली मंगलाष्टके यक्ष गंधर्व गाऊ लागले. त्यांना संगीताची साथ स्वत: नारद आणि तुंबर करत होते. लग्नातील स्वैपाकासाठी स्वत: अन्नपूर्णा हजर होती.द्रव्याच्या, वस्त्रांच्या आहेरावर देखरेख कुबेर करत होता. तर सवाष्णींना खणा नारळाच्या ओट्या रुक्मिणी जांबवती सत्यभामा, मित्रविंदा,याज्ञजिती, लक्ष्मणा,भद्रावती ह्या कृष्णाच्या अंत:पुरांतील स्त्रिया भरत होत्या! आणि ह्या सगळ्यांत सुसुत्रता, कुणाला काय हवे नको ते स्वत: ‘नारायण’ करत होता. अखेर झाल धरण्याच्या वेळी त्रिपुरांतक सावकाराने त्याची ओळख विचारली तेव्हा “ मी नरसी मेहत्याच्या पेढीचा, द्वारकेचा गुमास्ता, सावळाराम .” असे तो जगज्जेठी म्हणाला.

नरसीच्या मुलाचा लग्नसोहळा पाहायलाच नव्हे तर वऱ्हाडी म्हणून आलेली स्वर्गलोकीची सर्व मंडळी जुनागडला आली. आणि नरसीच्या गुमास्त्याचा निरोप घेऊन अंतर्धान पावली. कृष्ण परत निघताना नरसीला येव्हढेच म्हणाला,” नरसी काहीही अडचण आली तर माझी आठवण कर. मी तुला विसरत नाहीस. आणि तुही मला! “
नरसी ह्यावर काय बोलणार? हे अदभुत अघटित पाहून डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहात असता तो इतकेच म्हणाला असेल,” हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।

सदाशिव पं. कामतकर