Category Archives: Real Life Stories

Jean-Jacques Rousseau (रूसाॅं)

दिवाळीसारख्या सणासुदींच्या सुट्ट्यांत आम्ही सगळे नातेवाईक एकमेकांकडे एकत्र जमत असू. तेव्हा जेवणापूर्वी व नंतरही दुपारचा चहा होईपर्यंत चालू घडामोडी व इतर बऱ्याच विषयांवर गप्पा चर्चा होत असत. त्यातच कधी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातले टप्पे, त्या जुलैत झालेला उठाव अशा अनेक बाबींवर चर्चा होत असे. त्यावेळी आणि शाळेत परशुराम हरी बर्वे ह्यांचे इतिहासाचे भले जाडजूड पुस्तक उघडायला लावून सर,फ्रेंच राज्यक्रांती संबंधी सांगत त्यावेळीही रूसाॅं आणि व्हाॅल्टेअर ही दोन नावे कानावर पडत. त्यांचे विचार-स्वातंत्र्य, भाषण-स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य किंवा धर्म आणि राज्यसत्ता, व कारभार ह्यांचा एकमेकांशी संबंध, सरमिसळ असू नये असे ऐकल्याचे व संक्षिप्तात वाचल्याचेहीआठवते. आणि परीक्षेत तसे लिहिल्याचेही आठवते.व्हाॅल्टेर व रूसाॅं हे दोघे विचारी आणि जगाला त्यांच्या काळी काही नवीन विचार तत्वज्ञान देणारे असावेत इतपत माहिती असायची.

व्हाॅल्टेअर व रूसाॅं तसे समकालीन. व्हाॅल्टेअर १६९४ साली जन्मला तर रूसाॅंचा जन्म त्याच्यानंतर १८ वर्षांनी १७१२ साली झाला. पण योगायोग असा की ज्यांच्या विचारांचा प्रभाव तीन शतकंनंतर आजही टिकून आहे ते हे दोघे विचारवंत एकाच साली म्हणजे १७७८ साली वारले. दोघांच्या आयुष्यातील काही घडामोडीत पुष्कळच साम्य आहे. दोघांनीही बरेच वेळा देशांतरे करावी लागली. पण त्यातही रूसाॅंला तर फारच वेळा. व्हाॅल्टेअर रूसाॅंपेक्षा बराच जमीनीवर पाय रोवून उभा असायचा.म्हणायचेच तर रूसाॅं हा आयुष्यभर असमाधानी,अस्वस्थ आत्म्यासारखा होता. त्यात त्याचाही दोष नाही. तो त्याच्या काळाच्या फार पुढचा विचार करीत असे.,तो स्वतंत्र कल्पनाविश्वात विहार करणारा म्हणा किंवा स्वप्नवादी -इंग्रजीत Romantic म्हणतात तसा होता.पण तशा काळाच्या पन्नास वर्षे आधी तो जन्मला होता! रूसाॅं तितकाच बुद्धिवादी होता. व्हाॅल्टेअरला त्याच्या राजदरबारी चांगले संबंध असूनही दोन वेळा लहान मोठे तुरुंगवास भोगायला लागले. रूसाॅंवर तशी पाळी आली नाही. कारण अशा संकटकाळी त्याला बायकांनीच मदत केली. रूसाॅं जेथे गेला तिथल्या बायका, ह्या कलंदर पण फटकळ, दुसऱ्यांशी फार दिवस न पटवून घेणारा, मतभेदांचे रुपांतर भांडणात करणारा, पण बुद्धिमान व स्वतंत्र विचारांच्या ह्या तरूण व देखण्या विचारवंतावर फिदा असत.त्याची सोबत रूसाॅंला बरेच वेळा मदत करणारी ठरली. अनेक देशांतून त्याला बाहेर काढण्यात आले होते. बरेच आयुष्य देशांतरातच गेले. कारण त्याचे विचार त्या काळात स्फोटक होते. पण एक गोष्ट निर्विवाद होती की रूसाॅं हा युरोपमधील प्रसिद्ध माणूस होता. त्याला सगळे बुद्धिमंतही दबून होते. समाजातील कोणी महत्वाचे धार्मिक अधिकारी,धार्मिक पुढारी असो की निधर्मी मतांचे विचारी असोत, तो त्या धार्मिक व निधर्मी दोघांचाही नावडता होता. दोघांनाही रूसाॅंचा मोठा धसका होता.पण गंमत अशी की रूसाॅं दैवी देणगीला मानत होता. तो नास्तिक नव्हता पण धर्माबाबत त्याचे स्वतंत्र विचार होते. निसर्गाचा तो भोक्ता होता. निसर्गातील सौदर्याकडे , निसर्गाकडे त्याने समजाचे लक्ष पुन्हा वेधले. पण प्रस्थापित व्यवस्थेतील सगळ्या संस्थांना त्याची भीती वाटत असे. रूसाॅंला फार थोडे मित्र होते. त्याला आयुष्यात अनेक अपयशे पचवावी लागली. पुढच्या काळातील शेली, बायरन सारखे कवि आणि व्हिक्टर ह्युगो सारखे त्यावेळच्या अनेकांपेक्षा वेगळ्या प्रतिभेचे लेखक निर्माण झाले त्याचे श्रेय रूसाॅंच्या विचारांना आहे. त्याचा ह्या साहित्यिकांवर मोठा प्रभाव होता. रूसाॅंच्या A Discourse on the Origin of Inequality आणि The Social Contract ह्या दोन्ही पुस्तकातील विचार व तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव आजच्या सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञावर आहे. त्याच प्रमाणे व्हाॅल्टेरच्या भाषण-स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व्यवहारातील मोकळेपणा, धर्माचा आणि सत्तेचा एकमेकांशी संबंध असू नये ह्या मतांचा पगडा आजही आहे.त्या दोघांच्या विचारंचा अलिकडच्या जडण घडणीत फार मोठा वाटा आहे. Jean-Jacques Roussaeu चा जन्म १७१२ साली जिन्व्हा येथे झाला. त्यावेळी ते स्वतंत्र होते. त्याच्या आईवडिलांना जिन्न्हीव्वाचा अभिमान होता.आई तर जिन्हिव्हा स्पार्टन सारखे Republic आहे म्हणायची. झाला उणेपुरे ५५-५६ वर्षाचे आयुष्य लाभलेला

रूसाॅं १७७८ मध्ये वारला. तो युरोपमधील प्रख्यात विचारवंत होता. पण त्याला एका देशात फार दिवस राहता आले नाही. ज्या ज्या देशात तो जाई तिथून त्याला बाहेर पडावे लागत असे.किंवा तो स्वत:हून बाहेर पडत असे. आयुष्यभर तो हद्दपाराचे जीवन जगला. त्याच्या,काळाच्या पुढच्या स्फोटक विचारांचा धसका धार्मिकांना आणि निधर्मींना दोघांनाही होता.प्रस्थापित व्यवस्थेला,संस्थांना,त्याच्या विचार व युक्तीवादाने तो केव्हाही खाली खेचू शकतो; सुरुंग लावून ते उध्वस्त करू शकतो ही त्यांची कायमची भीती होती. त्यामुळे रूसाॅं जेव्हा मेला त्यावेळी धर्मवाद्यांनी व निधर्मी विद्वानांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार ह्यात शंका नाही. पण पुढील अर्धशतक रूसाॅंच्या विचारांनी भारले होते.तसेच त्यानंतरच्या काळातही रुसाॅंच्या विचाराने तरूण पिढीही प्रभावित झाली होती. रूसाॅंचा जन्म स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथे झाला. पण त्याकाळी जिनिव्हा हे स्वतंत्र राज्य होते. ते प्राॅटेस्टंट राज्य होते. प्राॅटेस्टंट पंथाला रूसाॅंचा विरोध नव्हता. पण त्याचे वादळी व्यक्तिमत्व व विचारांना प्राॅटेस्टंटवादी समजू शकत नव्हते. रूसाॅंने जिन्हीव्हा सोडले.काही काळ तो फ्रान्समध्ये राहिला. पण नंतर लगेच तो त्यावेळी स्वतंत्र असलेल्या व्हेनिसमध्ये आला. पण व्हेनिस मधूनही तो लवकरच बाहेर पडला.

डाॅ. सॅम्युअल जाॅन्सन ह्या प्रख्यात इंग्लिश विद्वानाचा मित्र व त्यांचा चरित्रकार जेम्स बाॅस्वेलच्या सहाय्याने व लेखक तत्वज्ञ डेव्हिड ह्यूम यांच्या सोबतीने रूसाॅं इंग्लंडमध्ये वास्तव्यास आला. पण थोड्याच काळात त्याच्या स्वभावाप्रमाणे ज्यांच्या मदतीने व आधाराने तो इंग्लंडमध्ये आला होता त्या बाॅस्वेल व ह्यूम ह्यांच्याशीच वादविवाद घालून, भांडून,तो वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी पुन्हा फ्रान्समध्ये आला! पण ह्या मागे रूसाॅंला वाटणारीही कारणे होती. रूसाॅं इग्लंडमध्ये आल्यावर खूप लोकप्रिय होता. काही दिवसांनी जेव्हा त्याने त्याच्या मतांनुसार काही गोष्टींवर व लोकांवर टीका केली. त्यातून अनेक गोष्टी वाद निर्माण झाले. वर्तमानपत्रातून रुसीॅंवर वैयक्तिक टीका, नालस्ती व त्याने पूर्वी काही लिहिलेले लेख प्रसिद्ध होऊ लागले. ह्यात व्हाॅल्टेअरनेही लेख पुरवले होते. अशावेळी आपला मित्र ह्यूमने आपली बाजू घेऊन उभे राहायला हवे असे रूसाॅंला वाटत होते. पण ह्यूम गप्प राहिला. शिवाय रूसाॅंच्या काही व्यक्तीगत गोष्टी ह्यूमलाच त्याने सांगितल्या होत्या त्याही सार्वजनिक झाल्या.ह्याचा विषाद व राग रूसाॅंला येणे स्वाभाविक असे रूसाॅंच्या बाजूच्या लोकांचे म्हणणे आहे. त्या ुळे तो फ्रान्समध्ये परत आला. आणि काही वर्षे राहून तेथेच १७७८ साली पॅरिस जवळील अर्मनव्हिल येथील लहानशा बंगल्यात त्याचे निधन झाले.

रूसाॅंची साहित्यिक कारकिर्द त्याच्या वयाच्या सदतिसाव्या वर्षी सुरु झाली. Academy of Dijon ने निबंध स्पर्धा जाहीर केली होती. विषय होता Has the Progress of the Arts and Sciences Contributed more to the Corruption or Purification of Morals? त्यात भाग घेऊन आपल्या लेखात,रूसाॅंने त्यावेळी स्फोटक वाटणारा आपला विचार निबंधातून मांडला. त्याने संस्कृतीनेच- सुधारणेनेच नैसर्गिक चांगुलपणाचा नाश केला असा थेट हल्ला चढवला. रूसाॅंनेच स्पर्धा जिंकली हे निराळे सांगायला नको.त्याने बक्षिस व नाव दोन्ही मिळवले! ह्या निबंधामुळे L’ Encyclopedie चा संपादक तत्वज्ञानी व लेखक डाइडेराॅचे Diderot चे लक्ष वेधून घेतले. त्याने रूसाॅंकडे आपल्या एनसायक्लोपिडियेसाठी लेख मागितला.रूसाॅंने आपला Discourse on Political Economy हा राजकीय अर्थशास्त्रावर लेख लिहून पाठवला. हा लेख १७५५ साली प्रसिद्ध झाला.ह्या लेखामुळे रूसाॅं आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आला! ह्या यशानंतर त्याने आपली पहिली कादंबरी La Nouvelle लिहून प्रसिद्ध केली. कादंबरीत एका सामान्य परिस्थितीत वाढलेल्या मुलीची कथा आहे. ही कादंबरी वाचकांना आवडली. ह्या कादंबरी पाठोपाठ त्याची दुसरी कादंबरी Emile आणि त्याच बरोबर त्याचा आजही महत्वाचा मानला जातो तो The Social Contract हा वैचारिक तत्वज्ञानाचा ग्रंथ १७६२ मध्ये प्रकाशित झाला.

एमिल ही कादंबरीचे रूप घेऊन आलेली रूसाॅंच्या, निसर्गाशी जवळीक साधून त्याचे ज्ञान करून देणारी शिक्षण पद्धती असावी, ह्या विचारांची कथा आहे. रूसाॅचे शिक्षणपद्धतीविषयीचा आणखी एक महत्वाचा विचार आजही मानला जातो. लहान मुलांना शिक्षणाची सुरवात करतांना ते मूल हेच मध्यवर्ति केंद्र मानून अभ्यासक्रम असावा हे त्याचे मत होते. ते आजही आपल्याला माॅंन्टेसरी पद्धतीत पाहायला मिळते. त्याचे Confessions हे अति धक्कादायक आत्मचरित्रात्मक पुस्तक मात्र त्याच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झाले. धक्कादायक अशासाठी की आतापावेतो कोणत्याही मान्यवर लेखकाने स्वत:च्या वैयक्तिक बाबी, घटना, प्रसंग इतके उघड व स्पष्ट करून लिहिले नव्हते. पुस्तकातून रुसाॅंच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाज कळतात. ह्या अगोदर, १७४९मध्ये झालेल्या निबंध स्पर्धेनंतर १७५५ साली Dijon Academy ने आणखी एक स्पर्धा जाहीर केली. विषय होता How has a Condition Of Inequality among come about? ह्या प्रश्नाचे जे उत्तर रूसाॅंने आपल्या प्रबंधातून दिले ते रूसाॅंच देऊ शकेल असे आहे. त्याच्या पहिल्या प्रबंधात मांडलेल्या विचारांचाच विस्तार ह्या दुसऱ्या विचारपरिपूर्ण निबंधात आहे. रूसाॅं ह्यामध्ये प्रश्नाचे स्वरूप थोडेसे बदलून म्हणतो, माणसाच्या दु:खाचा,निराशेचा उद्भव, उगम कसा झाला हा मूळ प्रश्न आहे. माणूस मुळात स्वाभाविकरीत्या दु:खी होता की त्याच्या प्राथमिक अवस्थेतून सुधारणेच्या क्रियेतून जात असता (सुसंस्कृत होण्याच्या क्रियेतून)तो दु:खी होत गेला? प्राथमिक अवस्थेतला माणूस ज्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांतून गेला त्यातच माणसाच्या दु:खाचा उगम आहे असे रूसाॅंचे म्हणणे आहे. पुढे त्याचे विश्लेषणही तो करतो.

माणसाच्या स्वभाववृत्तीविषयी रूसाॅंसारखेच विवेचन हाॅब्स आणि जाॅन लाॅक या दुसऱ्या राजकीय तत्वज्ञांनीही केले. पण त्यांच्या मतात व रूसाॅंच्या मतात फरक आहे. हाॅब्सच्या “ प्रारंभी माणूस एकटा,गरीब,आोंगळ असभ्य, पशूसारखा रानवट व अपूर्ण होता”, किंवा लाॅकच्या “ प्रारंभी माणूस त्याच्या सभोवताी असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना घाबरत होता.” ह्या मतांशी सहमत नव्हता.तो उलट विचारतो,” माणूस त्याच्या त्या अवस्थेतही सुखी आनंदी होता असे का म्हणू नये? तो आनंदी समाधानी असण्यासाठी जरूर त्या सर्व गोष्टी त्याच्या जवळ होत्या. अन्न, स्त्री, आणि निद्रा, सर्व काही त्याला प्राप्त होते. शिवाय त्याची प्रगती आणि तो परिपूर्ण होण्याच्या क्रियांतून पुढे मिळणाऱ्या सोयींचे वा सुखाचे त्याला ज्ञानही नव्हते. त्यामुळे ती आता नाहीत ह्याचे दु:ख व निराश होण्याचे त्याला कारणही नव्हते. बरे दुसऱ्या कुणाशी तुलना करता तो असमाधानी होता म्हणायला त्याच्या सारखा दुसराही त्याच स्थितीत होता. फरक असेल तर उंची वजन, देहयष्टी, चालण्या पळण्याचा वेग ह्यामध्ये असेल!”

माणसात हा बदल कसा घडून आला, म्हणजेच माणूस दु:खी निराश कसा झाला? तर त्याचे खापर रूसाॅं सुसंस्कृततेच्या क्रिया प्रक्रिया ह्यावर फोडतो. तो आपल्याला परखड शब्दांत सांगतो,” ज्या क्षणी माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज वाटू लागली, ज्या क्षणी कुणाही एकाला दोघांसाठी तरतूद करावी वाटू लागले, त्या क्षणी समानता संपली व मालकी,मालमत्ता आली. काम करणे, राबणे आवश्यक झाले. विशाल जंगले तोडली जाऊ लागली. त्या ठिकाणी वाऱ्यावर डोलणारी हिरवी पिवळी पिकांची शेती दिसू लागली. शेतीत राबणे आले. आपला घाम गाळून पिकाला पाणी देणे भाग पडले. त्यातूनच पुढे शेतातल्या पिकांबरोबरच गुलामगिरी आणि वेठबिगारीही वाढू लागली! “ धातुशास्त्र आणि शेती ह्या दोन्हींमुळे माणसाच्या जीवनात क्रांति झाली. साहित्यिक,कवि सांगतात सोन्या चांदीमुळे क्रांति झाली.पण तत्वज्ञानी म्हणतात धातु म्हणजेच लोखंड आणि मका( तांदूळ गहू इ. कोणत्याही धान्याचे नाव चालेल) ह्या दोन वस्तूंनी प्रथम माणसात सुधारणा आणली.त्याला सुसंस्कृत केले आणि मानवाची मोठी हानि केली.रूसाॅंच्या मते प्रगतीने माणसात विषमता आणली व त्याला दु:खी केले. प्रगति,विकास हा माणसाला उध्वस्त करण्यास कारणीभूत आहे असे जाॅन डनला वाटते तसेच रूसाॅंलाही. नुकतीच औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली होती. समाजव्यवस्थेत मोठी उलथापालथ घडून येत होती. त्याचाही परिणाम रुसाॅंसारख्या संवेदनाशील बुद्धिमान व प्रतिभाशाली विचारवंतावर होणे अपरिहार्य आहे. असे असले तरी आपल्या ह्या उदास किंवा नकारात्मक निष्कर्षांनाही त्यानेच आपल्या The Social Contract ह्या वैचारिक प्रबंधात उत्तर दिले आहे.

माणूस प्राथमिक अवस्थेतच असावा असे त्याचे म्हणणे नव्हते.तरीही त्याच्या ह्या प्रबंधाला मोठा विरोध झाला. व्हाॅल्टेअरनेही केला. पण त्याही पेक्षा फ्रान्सच्या मंत्रिमंडळाने रूसॅांच्या निबंधावर टीकेचा भडिमार केला. त्यामुळे तो बरीच वर्षे फ्रान्सबाहेरच राहिला. रूसाॅं आपले विचार स्पष्ट थोडक्या आणि नेमक्या शब्दांत मांडणारा लेखक होता. त्याचे हे The Social Contract हे पुस्तक छोटे खानी फक्त पन्नास पानांचे आहे. रूसाॅंने पन्नास पानात जेव्हढे परिणामकारक लिहिले आहे तसे लिहायला दुसऱ्या कोणा लेखकाला पानेच्या पाने खर्चावी लागली असती! त्याची ही वाक्येच पहा-Man is born free; and everywhere he is in chains. One thinks himself the master of others,and still remains a greater slave than they. How did this come about? I don’t know. What can can that make it legitimate ? That question I think I can answer. स्पष्ट, चांगल्या लिखाणाचा हा एक सुंदर नमुना आहे. पण वाचक रुसाॅंच्या केवळ शैलीसाठी त्याचे प्रबंध वाचत नसतो.तो विचारतो ते प्रश्न व त्यांची जी उत्तरे तो देतो त्यासाठी तो रुसाॅंच नव्हे तर जाॅन लाॅक, व्हाॅल्टेअर, जाॅन स्टुअर्ट मिल सारख्यांचे विचार वाचतो.अर्थात शैली आणि विचारांतील व लेखनातील स्पष्टता हे सुद्धा वाचकाला आकर्षित करतात.पण विचार महत्वाचे. लो. टिळकांची प्रसिद्ध गर्जना “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ह्याचे मूळ रूसाॅंच्या पहिल्याच “Man is born free’ मध्ये आहे. रूसाॅंला माणसाने प्रगती केली आहे, करत आहे हे मान्य आहे.पण त्यामुळे होणारे समाजाला घातक ठरणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी काही केले पाहिजे ह्याचेही भान त्याला आहे.

माणूस एकट्याने जे करील त्यापेक्षा सर्व एकत्रित होऊन जे काम करतील त्याचे फळही तितकेच मोठे असणार. आपल्या “गाव करेल ते राव काय करेल” ह्या म्हणीची आठवण होईल. ह्या बरोबरच काही प्रश्न निर्माण होतात. त्या साठी सर्वांनी एकत्र येणे,प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार श्रम, कौशल्य, धन हे समुहासाठी देणे हा मार्ग तो सुचवतो. पण हातभार लावण्यात कुणाचाही अपवाद असणार नाही(ह्या अटीत समानतेचे तत्व अध्याहृत आहे). प्रत्येकाच्या सहभागातून सामूहिक उत्पादन व त्याचे मोठे फळ समुहाला मिळेल. प्रत्येकाला त्याच्या सहभागापेक्षा जास्त फळ मिळेल.सुह व सामूहिक प्रयत्नांचे फळ हे, ‘ते ते सगळ्या गावाचे’असे कविवर्य बोरकर म्हणतात. सामुहिक सहभागाच्या विचारांचा कार्ल मार्क्स व एन्गल्स वर प्रभाव पडला असणार. त्यामधूनच मार्क्सला शेतकरी, कामगारांचे, मजुरांचे श्रम कष्ट हे सुद्धा त्यांनी गुंतवलेले भांडवलच आहे हा विचार सुचला असावा. रशिया, चीन मधील ‘कम्युन’ चा उगमही रुसाॅंच्या विचारांत आहे. आपल्या महाराष्ट्रातील अर्थतज्ञ डाॅ.धनंजयराव गाडगीळांनी व औपचारिक शिक्षण फार न झालेल्या विखे पाटलांनी ती ‘सहकार’, ‘सहकारी संस्था’ ह्या रूपाने प्रत्यक्षात आणली. यशवंतराव चव्हाणांनी सहकारी चळवळीला सरकारचे धोरण म्हणून आणखी वाढवले. एकत्रित आलेल्या समुहाचे संघटनेत रूपांतर होते. मग त्या संघटना, संस्था ह्यांचे स्वरूप वेगवेगळेही असेल. सामुहिक कार्याचे फळ प्रत्येक घटकाला जास्तच मिळेल. पण प्रत्येक घटकांने (व्यक्तीने) त्यासाठी आपले पूर्ण बळ दिले तरी आपले -स्व -स्वातंत्र्य गमावता कामा नये. कोणत्याही संघटनेतील, संस्थेतील एकाच्या अथवा इतर दुसऱ्या काही जणांच्या म्हणण्यास संस्था, संघटना, त्यातील काही व्यक्ती किंवा गटाविषयीच्या श्रद्धेमुळे किंवा आस्थेमुळे, हो ला हो करू नये. आपण होयबा होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. त्यासाठी स्वत:ही विचार करून मत ठरवणे आवश्यक आहे.,रूसाॅंची ही सूचना महत्वाची आहे. तो धोक्याची घंटा वाजवतोय.

राजकीय तत्वज्ञानी रूसाॅंवर प्लेटो, हाॅब्स, जाॅन लाॅक Diderot , व्हाॅल्टेअर ह्यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर रूसाॅंचा प्रभाव हा पाश्चात्य जगातील प्रबोधन काळावर पडला. हा ज्ञानप्रकाशाच्या काळत रूसाॅंचा मोठा वाटा आहे. रूसाॅंचा ज्यांच्यावर प्रभाव पडला त्यात तत्वज्ञ कान्ट, फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकन राज्यक्रांति, फ्रान्सचा राॅब्सपियेर, डेव्डिड ह्यूम, कार्ल मार्क्स, एन्गल्स, लिओ टाॅलस्टाॅय, बाल शिक्षणतज्ञ माॅन्टेसरी अशा अनेक मोठ्या व्यक्तीं व त्याच्या विचारसरणीवर पडला आहे. आज हे विचार आपल्याला विशेष वेगळे स्फोटक वाटत नाहीत. कारण आपण त्यांचीच फळे चाखत आहोत हे माहित नसते. पण आपल्याला ते विचार माहित आहेत असे वाटते. पण रूसाॅं, व्हाॅल्टेअर,लाॅक,मिल, चाणक्य, कणाद, चार्वाक अशा सारख्या तत्वज्ञानी विचारवंतांनी असे कितीतरी वेगळे विचार अनेक शतकांपूर्वी सांगितले आहेत. मधल्या काळातील विद्वानांनी, विचारवंतांनी त्यात काळानुरूप बदल करत त्यामध्ये भर घातली. ते सुविचार काळाच्या प्रवाहातून झिरपत आपल्यापर्यंत आले. त्यांची फळे आज आपल्याला चाखायला मिळतात.

रूसाॅंवरही त्याच्या काळात टीका झाली. विशेषत: रूसाॅं ज्याचा नेहमी आदरपूर्वक मान ठेवायचा त्या व्हाॅल्टेअरने तर रूसाॅंच्या कादंबऱ्यांवर उपरोधातून कडक टीका केली. रूसाॅं व व्हाॅल्टेअर हे दोघेही मोठे बुद्धिमान व थोर विचारी होते.फ्रान्सच्या राज्यक्रांतीवर ह्या दोघांचा प्रभाव होता. दोघांनाही क्रांतीतील सर्व पुढारी मानत होते. पण त्यांच्या काळांत ते दोघे एकमेकांचे विरोधक होते असे वाटते. विरोधक असूनही, रूसाॅं व्हाॅल्टेअरविरूद्ध कोणी वावगे बोलले किंवा काही लिहून दाखवायला अाला तर तो त्यांना कठोर शब्दांत सुनवत असे व व्हाॅल्टेअर हा फार मोठा माणूस आहे ह्याची जाणीव करून देत असे. रुसाॅं वारला. त्यानंतर, फ्रान्मधील सर्व थोरामोठ्या श्रेष्ठ लोकांच्या समाध्यांच्यारूपाने जिथे स्मारक उभे बअसते, त्या Pantheion मध्ये व्हाॅल्टेअरच्या शेजारी, स्वत:ला नेहमी Citizen of Geneva असे अभिमानाने म्हणवून घेणाऱ्या रूसाॅंचे,अवशेष सुंदर समाधीच्या रूपात जतन केले आहेत. त्यांच्या काळात विरोधक असलेले विद्वान शेजारी शेजारी चिरनिद्रा घेत आहेत. रूसाॅंवर बरेच वेळा अन्याय झाले. मित्र,विरोधक, चाहते ह्यांच्या वैयक्तिक टीकेला तोंड द्यावे लागले.व्हाल्टेअरला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो,” माझ्या मनात तुमच्या अनेक चांगल्या गोष्टीविषयी प्रेम व आदर होता. पण आता आणि अजूनही फक्त तुमच्या बुद्धिमत्तेविषयी आणि तुमच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या लिखाणाविषयी प्रेम आहे.”

अखेरच्या दिवसांत रूसाॅंला एक माणूस भेटायला आला होता. तो लोकांविषयी काही बोलत असता रूसाॅं जे म्हणाला ते विसरता येण्यासारखे नाही. रूसाॅं म्हणाला,”हो, माणसे वाईट आहेत पण माणूस चांगला आहे!” Yes, Men are bad, but Man is good !” असा हा चतुरस्त्र प्रतिभेचा विचारवंत अलिकडच्या आधुनक राजकीय तत्वज्ञानाची कोनशिला रचणारा राजकीय त्त्वज्ञानी,, बुद्धिमान लेखक, संगीतकार, विज्ञानप्रेमी वनस्पतिशास्त्राचा अभ्यासक शिक्षणतज्ञ,व । अनेक मोठ्यांचेही पाय मातीचेच असतात हे दाखवणारा, व सामान्यांतील एखादा असामान्य गुण पुढे आणून त्यांचा गौरव करणारा,स्वत:ची बाजू स्पष्ट करण्यासाठी आत्मचरित्रात्मक ग्रंथ Confessions लिहून त्या काळी खळबळ उडवणारा रूसाॅं, त्याच्या बरोबरीचा व तोडीचा विचारवंत तत्वज्ञानी व्हाॅल्टेअरच्या मृत्युनंतर दोन महिन्यांनीच वारला!

अफाट लेखक – बल्झॅक

बेलमाॅन्ट

नेपोलियनचा फ्रान्स विजेत्याच्या विजेत्याच्या मस्तीत आणि जेत्याच्या रूबाबात राहात होता. नेपोलियनचा पाडाव झाल्यावरही युरोपवर त्याचा प्रभाव होता. त्याच्या नंतरच्या काळातील फ्रान्स कसा होता हे आपल्याला प्रख्यात फ्रेंच लेखक Honore de Balzac (१७९९-१८५०) च्या कथा कादंबऱ्या, कादंबरीका ह्यामधून समजते.

बल्झॅक हा हाडाचा लेखक होता.”कोणी चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता” असे बऱ्याच कीर्तिवंतांच्या बाबतीत वाचतो. बल्झॅक तोंडात लेखणी धरूनच जन्माला आला होता म्हणावे इतके लेखन त्याने केले आहे! एखाद्या फलंदाजाची षटकार आणि चौकार ठोकतच खेळणे हीच त्याची सहज फलंदाजी असते. त्याप्रमाणे बल्झॅकचा लिहिणे हाच त्याचा धर्म झाला होता.
इतके भरमसाठ लिहूनही त्याने आपला उच्च दर्जा कायम राखला. पॅरिस आणि पॅरिसमधील लोक ह्यांच्याविषयी त्याने लिहिले. लिहिताना त्याने कोणतीही गाळणी वापरली नाही.जसे दिसले जाणवले तसे लिहिले.त्यामुळे कादंबऱ्या कथा असल्या तरी त्याच्या साहित्यात वास्तवता आहे. त्यामुळे त्याला ह्या पद्धतीचा प्रणेता मानले जाते.

बल्झॅकचा जन्म १७९९ साली झाला. विसाव्या वर्षा पर्यंत वडिलांच्या ऐकण्यात असल्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळे तो कायद्याचे शिक्षण घेऊ लागला.पण त्याला काही ते जमले नाही. त्यांने तो अभ्यास सोडला. वडिलांनी सांगितले काय शिकायचे असेल ते शिक पण पॅरिसमध्ये दिवस कसाबसा काढता येईल इतकेच पैसे पाठवता येतील असे कळवले. त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. त्यामुळे तो गरीबांना परवडेल अशा वस्तीत राहू लागला. बल्झॅक रोज “ दिसामाजी काही तरी लिहित” असे.त्याचा लिहिण्याचा झपाटाही जबरदस्त होता. दहा वर्षांत वीस कादंबऱ्या तरी नक्कीच लिहिल्या असतील.

काही वर्षांनी त्या कादंबऱ्या वाचल्यावर त्याला ह्या आपण लिहिल्या असे वाटले नाही. वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिलेली Choumans ही कादंबरी त्याला आपली वाटते. त्यानंतर तर तो वर्षाला तीन चार पुस्तके लिहित होता.आणि आयुष्याच्य अखेरपर्यंत तो ह्याच वेगाने लिहित होता. वर्षात तीन चार पुस्तके ! लिहिण्याच्या श्रमानेच तो मरण पावला असेल का हा प्रशन् पडतो.

बल्झॅक बायकांच्या बाबतीत फार रंगेल होता. स्त्रीसुखाचा भरपूर उपभोग घेत असे. बल्झॅक चर्चेचा विषय झाला नसता तरच नवल होते. त्याची दिनचर्याही अजब होती. फिरून आल्यावरसंध्याकाळी पाच सहा वाजता जेवायचा. मग एखाद्या मैत्रिणीला, बाईला घेऊन रात्र रंगवायचा. रात्री अकरा वाजेपर्यंत झोप काढायचा. बाईला जायला सांगायचा. आणि मग हा सारस्वत पुत्र लिहायला बसायचा. संपूर्ण रात्र लिहित असे. पण दिवस उजाडल्या नंतरही दुपारी तीन चारपर्यंत लिहित बसलेला असे! बल्झॅक रोज पंधरा सोळा तास लिहित असे. ह्या सोळा तासात त्यास काॅफीची सोबत असे. काॅफीच्या कपावर त्याची रोज सोळा तास लिहिण्याची तपश्चर्या चालत असे.

दुपारी चार वाजता बाहेर जायचा.सहा वाजता घरी आला की जेवण आणि मग…..पंधरा सोळा तास एक टाकी लिहित बसण्याचा हटयोग सुरू!

बल्झॅकला आता कादंबऱ्या नाटके लिहिण्यात रस नव्हता. त्याला माणसाविषयीच काही भरीव विशेष महाकाव्यासारखे काही लिहायचे होते चित्रकाराला अतिभव्य, विशाल चित्र रंगवायचे स्वप्न असते.तशी बल्झॅकला मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांचे; त्यातील नाट्याचे, संघर्षाचे,दिव्य दाहक आणि भव्य भयानक असे काही लिहायचे होते.नवरसांनाही मागे टाकेल असा आपल्या प्रतिभेचा ‘बल्झॅक’हा दहावा रस त्यात असेल अशी साहित्यिक कृति लिहायची होती ! प्रत्येक लेखकाचे आपण असे काही तरी लिहावे ही इच्छा असते. जगातील सर्व उत्कृष्ठ वाड.मय पाहिले तर आताच वर लिहिलेल्या “आपल्या प्रतिभेचा दहावा रस बल्झॅकचा” या वाक्यातील बल्झॅग च्या जागी त्या त्या ‘लेखका’चे नाव लिहावे लागेल!

बल्झॅगच्या मनात होते तितके भव्य दिव्य लिहिले गेले की नाही हे कोणी सांगू शकणार नाही. पण त्याने लिहिलेले La Comédie Humaine /Human Comedy हे त्याचे उत्कृष्ट पुस्तक मानले जाते.

मूळ फ्रेंच भाषेतील ला काॅमेडिए मध्ये नव्वद खंड आहेत. पण इंग्रजी प्रतिमध्ये संपादन करताना त्याचे चाळीस खंड केले आहेत. जाॅर्ज सेन्ट्सबरी ने इंग्रजीमध्ये भाषांतर व संपादित केलेली प्रत प्रमाण मानली जाते. बल्झॅकच्या ह्या ग्रंथात माणसाच्या आयुष्यात केवळ वयानुसार येणाऱ्या टप्प्यानुसारच नाही तर वास्तव्याचा परिसर, परिस्थिती अशा विविध टप्प्यानुसार भाग पाडले आहेत. त्यामध्ये लहान कादंबऱ्या येतात. काही भागांची नावे सांगायची तर Scenes of Private Life, Scenes of Provincial Life, Scenes of Paris Life ही सांगता येतील. पॅरिस लाईफ मधील Old Goriot ही कादंबरिका उत्कृष्ठ मानली जाते. ही वाचल्यावर बल्झॅकची लेखक म्हणून काय ताकद आहे ती समजते असे म्हटले जाते.

Old Goriot पॅरिसच्या गरीब वस्तीत घडते.मुख्य पाच पात्रे आहेत. खाणावळीची मालकीणबाई- मादाम व्हाॅकर, युजेन ड रॅस्टिनॅक – हा धडाडीचा तरुण, त्याच्या नात्यातील सुंदर व श्रीमंत बहिण मादाम डी बोझान्ट आणि स्वत: वृद्ध Goriot. रॅस्टिनॅक आणि वृद्ध Goriotगाॅरिओ ही दोन सगळ्यात महत्वाची पात्रे. गाॅरिओ श्रीमंत असतो. त्याच्या वैभवाला उतरती कळा लागली असते. त्यात त्याच्या दोन मुलींचा उच्च फॅशनेबल वर्तुळातील वावर हेही एक कारण असणार. गाॅरिओचे आपल्या मुलींवर खूप प्रेम असते. त्यामुळे त्यांच्यासाठी होणाऱ्या खर्चामुळेहीवत्याच्या व्यवसाय श्रीमंती बसत चाललेला असणार. तर युजनची प्रगतीची घोडदौड चालू असते. बल्झॅकने गोरिओच्या खालावत चाललेल्या परिस्थितीचे केलेले वर्णन वाचताना वाचकांच्या डोळ्यात पाणी उभे राहील तर रॅस्टिनॅकच् उत्कर्ष वाचक तितक्याच धडधडत्या छातीने उत्सुकतेने वाचत जातो.
कथानकात वाचक गुंगुन जातोच पण बल्झॅकने लेखकाच्या नजरेतून बारकाईने केलेले पॅरिसचे वर्णनही वाचक विसरु शकत नाही. ते वाचताना डिकन्सप्रेमी वाचकाना चार्ल्स डिकन्सची नक्कीच आठवण येईल. त्यानेही जगभरच्या वाचकांना आपल्या पुस्तकातून लंडनमध्ये इतके फिरवले आहे की तेही डिक्सनच्या व्यक्तीरेखांबरोबर लंडनचे रहिवासी होतात! डिकन्सची पुस्तके वाचलेला रसिक लंडनला गेला तर त्याच्या पुस्तकातल्या लंडनचे रस्ते,गल्ली,बोळ चुकणार नाही.स्वत: इतकेच डिकन्स वाचकाला त्याच्या लंडनशी एकजीव करतो.

पण चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्यातून संपूर्ण इंग्लंडचे दरशन होत नाही. लंडनमधील वरच्या वर्गाचे वर्णन डिकन्सला नीट जमले नाही. त्याने त्यांचे खरे चित्रण केले नाही. डिकन्स हा लंडनचा चरित्रकार तर बल्झॅक हा पॅरिसचा चरित्रकार म्हणता येईल. बल्झॅकला सर्व थरातील पॅरिस माहित होते. गरीब कनिष्ठांचे पॅरिस. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गाचे पॅरिस ह्या सर्वांची त्याला चांगलीच ओळख होती. ह्या सर्व थरांतील लोकांच्या जगण्यावर परस्परांचा होणारा परिणाम व प्रभाव कसा पडतो हे बल्झॅकने अनुभवले होते. सर्व थरांत होणारे चढ उतार, एका थरातून दुसऱ्या अशी वर खाली होणारी स्थित्यंतरे तो पाहात होता. हे उत्कर्ष आणि अपकर्ष त्याने आपल्या कादंबऱ्यातून हुबेहुब वर्णन केले आहेत. जसे डिकन्सला लंडनच्या वरिष्ठ वर्गाचे चित्रण यथार्थपणे करता आले नाही त्याच्या नेमके उलट बल्झॅकला बकाल गरीब पॅरिसचे चित्रण तेव्हढे नीट रंगवता आले नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे सामाजिक पायऱ्यांवर त्यांची स्थित्यंतरे डिकन्सपेक्षा बल्झॅकने उत्कृष्ठ केली आहेत.

शेवटी विचार करता ह्या भेदांना फारसा अर्थ राहात नाही. ह्या दोन्ही नामवंत लेखकांना लोकांविषयी जी जवळीक होती तीच महत्वाची ठरली. हे लोकांचे लेखक होते. त्या काळची लंडन व पॅरिस ही दोन मोठी शहरे होती. त्यांचा वेग उर्जा, चैतन्य व धडपड हे सर्व ह्या दोन महान लेखकांच्या साहित्यातही दिसते. त्यांच्या कथानकांच्या वेगात आपणही वाहात जातो. पण वाचक बल्झॅकच्या कथा कादंबऱ्यातून जास्त वेगाने पुढे जातो!

फ्रान्सिस बेकन – तत्वज्ञानी, मुत्सद्दी, वैज्ञानिक,विद्वान

पैसा सर्वस्व नाही पण पैशाशिवाय सर्व अडते. साठलेले पाणी आणि साठलेला पैसा दोन्हीही फार काळ उपयोगी पडत नाहीत. संपत्ती विषयी असे बरेच काही आपण वाचलेले असते. पण सोळाव्या शतकातील एका राजकारणी,मुत्सद्दी,आणि विद्वानाचे पैशाच्या बाबतीतले व्यवहार्य मत आजही लक्षात ठेवण्यासारखे आहे.तो आपल्या Of Seditions and Trouble निबंधात लिहितो,”Money is like muck(manure), not good except it be spread.” हे वाचकांना सांगणारा विद्वान म्हणजे लाॅर्ड फ्रान्सिस बेकन !

फ्रान्सिस बेकनचा जन्म १५६१ साली लंडनमध्ये झाला. राजदरबाराशी निगडीत असलेल्या उच्च घराण्यात झाला. फ्रान्सिस बेकनचे वडिल सर निकोलस बेकन हे होत. पहिल्या एलिझाबेथ राणीचे ते Lord Keeper होते. हे पद मोठ्या अधिकाराचे व जबाबदारीचे होते. राणीची सरकारी आज्ञा,हुकूम,संमती,कायदे अशा महत्वाच्या कागदपत्रांवर उमटवण्याची ‘राजमुद्रा’ ह्याच्या ताब्यात व अखत्यारित असे. ती कागदपत्रे कायदेशीर व अधिकृत करण्याचा त्याला अधिकार होता. ह्याच पदाचे विलीनीकरण लाॅर्ड चॅन्सेलरमध्ये झाले. हा काही काळ पार्लमेंटचा सभापतीही असे. न्यायखात्याचे सेक्रेटरीही ह्याच्याच अंतर्गत होते. कॅबिनेट मंत्रिपदही असे. थोडक्यात फ्रान्सिस बेकनला बाळपणापासून अनुकुल परिस्थिती होती.

फ्रान्सिस बेकनने कायद्याचे शिक्षण पुरे केल्यावर तो इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आला. तिथे त्याचा आणि अर्ल आॅफ इसेक्स Essexचा संबंध आला. बेकनला त्याच्या कामात वरच्या आणि त्याही वरच्या पदांवर जाण्यासाठी ह्या अर्लने खूप प्रयत्न आणि मदत केली. कारण अर्ल राणीच्या निकटवर्तियांमधील महत्वाचा माणूस होता.

त्यानंतर आलेल्या पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत फ्रान्सिस बेकनच्या कर्तृत्वाचा तारा तेजाने तळपू लागला.
हल्लीच्या पदाचे नाव वापरून सांगायचे तर साॅलिसिटर जनरल पदापासून तो लाॅर्ड चॅन्सलर ह्या मोठ्या अधिकारपदा पर्यंत पोहचला. पण दुर्दैवाने त्याच्या सोनेरी कारकीर्दीला ग्रहण लागले. इ.स.१६२१ मध्ये असे काही घडले की त्यामुळे फ्रान्सिस बेकनने पार्लमेंट,राजकारण उच्च पदांचा त्याग करून त्याने आपले पुढील सर्व आयुष्य लिहिण्यात घालवले.

बेकनवर लाच घेतल्याचा आरोप आला. चौकशी झाली. त्याने आपण लाच घेतल्याचे कबूल केले.लाॅर्ड आॅफ बकिंगहॅमला बदनामीपासून वाचवण्यासाठी बेकनला ह्यामध्ये पद्धतशीरपणे गोवले गेले. त्याला बळीचा बकरा केला गेला असे काही इतिहासकारांचे मत आहे. काही असो पण बेकनची चाळीस वर्षांची गौरवास्पद राजकीय कारकीर्द संपली हे खरे. फ्रान्सिस बेकन, बॅराॅन व्हेरुलेम व्हायकाउन्ट सेंट अल्बन्स…लाॅर्ड बेकन; पण अधिकृतरीत्या लाॅर्ड सेन्ट अल्बन्स, लाॅर्ड चॅन्सलर फ्रान्सिस बेकन इतकी मानाची बिरुदे किताब पदव्या असणारा उच्च अधिकारपदे भूषविणारा बेकन राजकारणाच्या धकाधकीतून आणि राज्यकारभारातून बाहेर पडला. त्याच्या लाॅर्ड, सर,अर्ल ह्या भूषणावह पदव्यांचे लोकांच्या लेखी महत्व नव्हते. ह्याचे कारण त्याच्या विद्वत्तेमुळे व त्याने लिहिलेल्या ग्रंथांतील ज्ञान आणि विचार ह्यामुळे तो आजही आदरपुर्वक फ्रान्सिस बेकन अशा साध्या नावानेच ओळखला जातो. त्याने मागे ठेवलेला वैचारिक वारसा पाहिला की बेकनने लाच घेतली हे एका अर्थी बरेच झाले असे वाटते.

राजाच्या मर्जीतला असल्यामुळे त्याला तुरुंगवास वगैरे काही घडला नाही. बेकनचा एक गुण उठून दिसतो. ज्यांनी त्याला मदत केली आपला म्हटले त्यांच्याशी तो प्रामाणिक राहिला.भावनात्मकतेने नव्हे तर त्याच्या विचारपूर्वक बनलेल्या मतांमुळेही असेल. कारण आपल्याला बेकनच्या कारकिर्दीची, त्याने लिहिलेल्या पुस्तकांची खूप माहिती मिळते पण त्याच्या हृदयातील मनांतील भावभावनांविषयी फारशी माहिती मिळत नाही.

बेकनने लिहिलेल्या ग्रंथांतून मांडलेल्या विचारांमुळे आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली हे निर्विवाद सत्य आहे. अधिकारपदावरून खाली आल्यावर बेकनने त्याचा मित्र पंतप्रधान बर्ली ह्याला एक पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिलेले एक वाक्य आपले लक्ष निश्चित वेधून घेते. ह्यानंतर बेकन आपण काय करणार आहोत हे स्पष्ट करताना म्हणतो, “I have taken all knowledge to be my province.” पूर्वीपासून चालू असलेल्या त्याच्या अभ्यासाची, विचारांची झेप व बुद्धीचा प्रचंड आवाका ह्यामधून व्यक्त होतो. अर्थातच इथे All Knowledge ह्या शब्दांतील Knowledge ह्या शब्दावर जास्त भर आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

वाड.मय त्यातील सर्व प्रकार, धर्म, व्यवहारातील अनुभवांवर आधारीत ज्ञान, ह्यांचा समावेश बेकनने ज्ञानात केला नाही.त्याचा भर विज्ञानावर आहे. ह्यामध्येही अर्थातच ज्ञानाचे अनेक विषय येतात.त्यात Logic ही येते.समस्त निसर्गसृष्टी येते. म्हणजे विज्ञान येते.

बेकनने आपल्या ज्ञान साम्राज्याचे,त्यावर वेळोवेळी झालेले, होणाऱ्या हल्ल्यांपासून(विरोधी मते,टीका) त्याचे रक्षण करणारी स्वत:ची बाजूही त्यामध्ये मांडली आहे. त्याने वरील पत्रात व्यक्त केलेल्या All Knowledge संबंधात त्याने पुस्तक लिहिले आहे. दुर्दैवाने तो ते पुरे करू शकला नाही. त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावर, त्या विषयाचा अफाट आवाका पाहिल्यावर हे एका माणसाचे काम नाही ह्याची खात्री पटते.बेकनच्या ह्या पुस्तकाचे नाव आहे Great Instauration , म्हणजे महान पुनर्बांधणी, पुनर्रचना. ह्या पुस्तकात बरेच विभाग आहेत.

पहिला भाग विषयाची ओळख करून देणारा आहे. ह्याची पाने थोडीच आहेत. “ती वाचताना आपण आपला श्वास रोखून वाचू इतक्या अप्रतिम व ओघवत्या शैलीत बेकनने लिहिले आहे. ती वाचताना शब्दांचे सौदर्य व सामर्थ्य काय असते ते बेकन आपल्या शब्दांतून प्रकट करतो!” असे चार्ल्स व्हान डाॅरेन सारख्या बऱ्याच विद्वान समीक्षकांचे आणि श्रेष्ठ वाचकांचे मत आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग Novum Organon अथवा Modern Logic असा आहे.आणि त्यानंतर येतो Advancement Of Learning हा भाग. त्यामध्ये निरनिराळ्या शास्त्रांचे, मनुष्याच्या बुद्धीच्या, आकलनशक्तीच्या आधारे वर्णन केले आहे. त्यानंतर बरीच प्रकरणे आहेत. त्यामध्ये तत्वज्ञानाला व विज्ञानाला जे प्रश्न पडतात किंवा सोडवायचे आहेत त्यांची चर्चा आहे. ही प्रकरणे, आणि बेकनचे इतर लेखन पाहिले तरी बेकनने काय करायचे योजले होते किंवा मानवजातीनेच काय केले पाहिजे त्याचा अंदाज येतो.

ह्यामध्ये New Logic आणि The Advancement of Learning हे दोन भाग विशेष वाचनीय आहेत.
नोव्हम आॅर्गॅनान मध्ये त्याने मनातील भ्रामक कल्पनांना, चुकीच्या समजुतींना,तर्कबुद्धीचा आधार नसलेल्या कल्पनां-विचारांना Idol म्हटले आहे.ह्यावर त्याने जे विश्लेषण केले आहे ते आजही मानले जाते. Idolविषयी लिहिताना तो म्हणतो की एखादी वस्तु काय आहे , कशी आहे, तिचे वेगवेगळे पैलू हे वस्तुनिष्ठपणे जाणून घेण्यात आपल्या मनातील असलेल्या पूर्व कल्पना किंवा त्यांच्यावर बुद्धीपेक्षा इतर बाबींचा प्रभाव(पूर्वसमजुती,ऐकीव माहिती इत्यादि) अडथळा आणतात.समाजमनावरही ह्यांचा मोठा प्रभाव असतो.माणसाचा कल त्याचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्याच गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडे असतो. त्याला जे दिसावेसे वाटते तेच तो पाहात असतो.निसर्गातही त्याला तीच ती नियमितता नित्य असावी असे वाटत असते. त्याला फारसा कशातही बदल नको असतो. आपल्या अनुभवांचे विश्लेषण विवेकबुद्धी, तटस्थ विचारांच्या आधारे करण्यापेक्षा दिसते,वाटते तेच खरे मानण्याचे तो पत्करत असतो.

सभोवतालच्या सृष्टीचे ज्ञान करून घेणे अवघड आहे पण अशक्य नाही हे बेकनला माहित होते. पण ह्यातूनही निसर्गावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे असे तो म्हणतो. त्यासाठी निसर्गाचे नियम पाळून त्याच्या कलाने घेत आपल्याला ते करता येईल. ज्ञान मिळविण्यासाठी त्याने प्रयोग, वस्तूंत अंतर्बाह्य होणाऱ्या क्रिया,प्रक्रिया, प्रतिक्रिया ह्यांच्या अभ्यासावर त्याचा भर होता. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी।हे नवमत लोका कळवु द्या’ इतक्या स्पष्टपणे म्हटले नाही तरी त्याने जे लिहिले त्याचा आशय हाच होता.वर सांगितलेल्या पायऱ्यांनी, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून, का व कसे ह्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत असे त्याचे म्हणणे होते. आलेली उत्तरे व निष्कर्षही कसोटीला लावून,म्हणजे त्यांचा वापर करून पाहावा ह्या मताचा त्याने पुरस्कार केला.
हे सांगत असतानाच, बेकन म्हणतो हे सगळे करणे,होणे शक्य आहे पण माणूस समजून घेणे हे त्याहूनही अवघड आहे हे सत्यही तो सांगतो.

पण बेकन माणसाला समजून घेण्याचे ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नातही बराच यशस्वी ठरला आहे. बेकनला माणसाविषयी झालेले ज्ञान त्याने आपल्या प्रख्यात Essays मध्ये मांडले आहे. बेकनच्या इतर पुस्तकांपेक्षा Essays जास्त वाचले जातात. Essays च्या प्रारंभी तो स्वत:च म्हणतो त्याप्रमाणे त्याचे निबंध “Would come home to men’s business and bosoms.” सर्वांना उपयोगी आणि आपलेवाटतात ! बेकनच्या ह्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यात थोडक्याच शब्दांत खूप अर्थपूर्ण आशय सांगणाऱ्या वाक्यांची मेजवानी आहे. त्याला काय म्हणायचे आहे त्याचे सार अशा वाक्यांतून येते. ह्या वचन सदृश वाक्यांतून बेकनचा मानवी स्वभावाचा आणि पदार्थांचा अभ्यास किती होता हे दिसून येते. बेकनच्या Essays मधील अशी अनेक वचने उदघृतांच्या पुष्कळ पुस्तकांत आढळतील.

The Truth ह्या निबंधातील सत्यासंबंधात बेकन म्हणतो,” A mixture of a lie doth ever add a pleasure!”ह्यातील गंमतीचा स्वाद घेतल्यानंतर,माणसाला अति शुद्ध प्राणवायु पेक्षा तो निवळलेला प्राणवायु श्वास घ्यायला सोपा जातो ते का हेही पटते! तसेच ” Revenge is a kind of wild justice!” हे वाचल्यावर बेकनच्या ह्या निबंधातून सत्य किती व कसे व्यक्त होते ह्याची कल्पना येईल.

Of Marriage and Single Life ह्या निबंधाची -“He that has wife and children hath given hostages to fortune; for they are impediments to great enterprises, either of virtue or mischief.”- ही सुरुवात वाचल्यावरच निबंध पुढे वाचावासा का वाटणार नाही? प्रेमाच्या सागरात डुंबत असलेले दोघे अतिशयोक्तीच्या लाटांवरच खेळत असतात हा बहुतेकांचा अनुभव आहे. कविता, हिंदी सिनेमातील गाण्यांतून, ‘तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणेन’ अशा ओळीतून तर अतिशयोक्तीचा सुखद अनुभव नेहमी येतोअाणि अतिशयोक्ति किंवा अवाच्या सवा बोलणे हे तेव्हढ्यापुरते ठीक आहे हे आपण जाणून असतो. बेकन म्हणतो “The Speaking in a perpetual hyperbole is comely in nothing but love.” हे वाचून आपणही संमती देत हसतो.

एक वेळ नाविन्याचा ध्यास नाही घेतला तरी चालेल पण निदान नविन ते माणसाने स्वीकारावे हे बेकनचे मत होते. तो स्वत: नविन होणाऱ्या बदलांना सामोरा जात असे. कोणत्याही काळात बदल, नविन विचार-वस्तु-शोध ह्यांना विरोध होत असतो. हे प्रत्येक काळात होणे चालूच असते. पण ‘नाविन्या’ला जे सामोरे जात नाहीत त्यांना सावध करण्यासाठी बेकन भाकित केल्याप्रमाणे इशारा देताना म्हणतो,”He that will not apply new remedies must expect new evils; for time is the greatest innovator.”

तो पुढे आपल्या “OF Beauty” मध्ये सौदर्यातील सत्य कशात आहे ते साध्या शब्दांत किती सुंदर करतो! वाचा, “ Virtue is like a rich stone, best plain set.”

बेकनच्याच एका सुगंधी फुला इतक्या सुंदर आणि पिकलेल्या फळासारख्या मधुर वचनाने लेखाचा शेवट करतो.”God Almighty first planted a garden, it is the purest of known pleasures.”

… गतिसी तुळणा नसे

रेडवुड सिटी

… गतिसी तुळणा नसे

स्त्रीचे कर्तृत्व आता क्षितिजापलीकडे गेले आहे. तिच्या कर्तृत्वाला सीमेचे बंधन नाही की लक्ष्मणरेखेचे बंघन नाही. ती स्वत:च जाणीवपूर्वक लक्ष्मण रेखा ओढते. कोणालाही ती ओलांडू देत नाही.हे खरे तिचे सामर्थ्य आहे.

शिक्षक,वकील, डाॅक्टर, इंजिनिअर प्राध्यापक, सिने-रंगभूमी ह्या पारंपारिक क्षेत्रांत दिसतेच पण पोलिस दल, आणि लष्काराच्या सर्व शाखांत, विज्ञान तंत्रज्ञान व कम्प्युटर क्षेत्रातही तिने आपला ठसा उमटवला आहे.कित्येक वर्षे मंगळागौरीच्या खेळात आणि फार तर लंगडी व खोखो सारख्या खेळापुरतीच दिसणारी स्त्री आता आॅलिंपिकमधील सर्वच खेळात दिसते. पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष ही पदेही तिने भूषविली आहेत! थोडक्यात पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही तिने प्रवेश केला आहे.

हे ‘नमनासाठी धडाभर तेल’कशासाठी? आणि कुणासाठी?

आमच्या गावात एक डबडा थेटर होते.पूर्वी मारामारीचे सिनेमे यायचे. त्यात प्रामुख्याने मा. ऱ्भगवान(अलबेला फेम) व बाबुराव ह्या जोडगोळीचे सिनेमा असत. त्याला स्टंटपट म्हणत. त्यावेळी हिंदी स्टंटसिनेमातील मारामारी हाताने केली जायची.मात्र अलिकडे स्टंटस्ची व्याख्या आणि स्वरूप पूर्ण निराळे आहे.त्यामध्ये डोंगरांच्या टोकांवरून,कड्यांवरून,गगनचुंबी इमारतीवरून, चालत्या आगगाडीवर उड्या मारणे. विमानाच्या उघड्या दारात उभे राहून बंदुकीने हल्ला करऱ्णे, हेलिकाॅप्टरमधून दोरीला लोंबकाळत मारामारी करणे,अति वेगवान जीवघेण्या शर्यतीच्या मोटारीतूनही बाहेर पडून घसरत जाणे. काय आणि किती प्रकार सांगायचे! जीवावर बेतणारे खेळ,कसरती करणारे अनेक धाडसी स्टंट्समनआहेत. इथे तर पुरुषच अनभिषिक्त सम्राट होते. पण ह्या क्षेत्रातही एक अजब, प्रचंड वेगाचेच आकर्षण असलेली महा धाडसी स्त्री अवतरली. तिचे नाव किटी ओ’नील !

डिसेंबर१९७६. अगदी कोरडा दिवस. ओरेगन मधील वाळवंटातल्या एका कोरड्या ठक्क पडलेल्या मोठ्या तलावात एका राॅकेट इंजिनावर चालणाऱ्या तीन चाकी SMI Motivator वाहनात किटी ओ’नील बसली. लहानशा दट्ट्यावर तिने दोनदा किंचित दाबल्या सारखे केले. इंजिन जागे झाले.समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहू लागली. तो बोटानेच दहा, नऊ, आठ…., ३,२,१आणि एकदम त्याने हात खाली आणल्याबरोबर दट्ट्याचा लहानसा दांड्या लगेच मागे ओढला. निमिषार्धही नसेल पण ते धडाडणारे इंजिन कालचक्रात अडकून बसल्यासारखे गप्प झाले. पण पुढच्याच क्षणी ते मोटिव्हेटर कुठे गेले ते समजले नाही. त्याच्याच प्रचंड आवाजाच्या मार्गात तो ठिपका दिसेनासा झाला.क्षणार्धात ६१८मैलाची गति गाठणाऱ्या मोटिव्हेटरने दुसऱ्या एका मैलाच्या टप्प्यात ५१२.७ मैलाचा वेग कायम राखला.आणि तिने स्त्रीयांनी अशा वाहनातून गाठलेला विक्रम सुमारे २००मैल प्रति तासाने मोडला. किटी ओ’नीलचा विक्रम अजूनही कुणी मोडला नाही!

हे सर्व एखादा प्रचंड स्ऱ्फोट व्हावा अशा राॅकेट इंजिनच्या आवाजात घडत होते. पण किटी ओ’नीलला त्याचा काहीही पत्ता नव्हता. ती बहिरी होती!

तिचा विक्रम म्हणजे तिने केलेल्या अनेक जीवघेण्या साहसी खेळात केलेल्या वेगागाच्या विक्रमांतील तुरा होता. केटी स्काय डायव्हिंग water skiing, अशा अनेक क्रीडा प्रकारात प्रविण होती. त्यातही तिला भरमसाठ वेगाचे मोठे आकर्षण आणि प्रेम होते. त्या प्रेमावा तुलना नव्हती. उदारणच द्यायचे तर १९७८ मधील एक प्रसंग सांगायला हवा.

अशीच राॅकेट इंजिन असलेली प्रख्यात काॅर्व्हेट गाडी बनवली होती. कॅलिफोर्नियातील सॅन बर्नांडिनो जिल्ह्यतल्या मोहावो वाळवंटासारख्या वैराण प्रदेशात तिला ही गाडी चालवायची होती. कमीत कमी वेळात पाव मैल अंतर पार करण्याचा विक्रम करण्यासाठी तिने सुरवात केली. ३५० मैल वेगापेक्षाही जास्त वेगाने चालवायला सुरुवात केली. आणि गाडी उलटीपालटी होत हवेत उडाली. हवेत तिने सहाशे फूट लांबझेप घेतली . पण गाडीने हवेतून मग जो सूर मारला ती बरोबर तिच्या नाकाच्या शेंड्यावरच पडली! किटीच्या खांद्याला थोडी दुखापत झाली. पण गाडीतून बाहेर आली ती हसतच! “हवेतील ते उड्डाण फार थरारक होते!” असे म्हणाली. किटीला भीती हा शब्दच माहित नव्हता. त्यामुळेच तिने हाॅलिवुडच्या सृष्टीत “स्टंटवुमन” म्हणून प्रवेश केला. नवीन क्षेत्र. नवीन जीवावरचे पराक्रम चालू झाले. टीव्हीवरही ती अशीच साहसी कामे करू लागली. ह्याकामातूनच ती वर सांगितलेल्या राॅकेट इंजिनाच्या वाहनातून वेगाचे विक्रम प्रस्थापित करण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागली.

१९७९ मध्ये तिच्या जीवनावर आधारितच Silent Victory: Kitty O’Neil Storyएक उत्तम टीव्ही कार्यक्रम निर्माण झाला. किटी रेसमध्ये भाग घेत होती. Smokey and the Bandit II , The Blues Brothers सारख्या सिनेमातही स्टंटवुमन चे काम करत होती. १९८० मध्ये ती ह्यातून निवृत्त झाली.

लहानपणापासूनच,” मला भन्नाट वेगाने जावे असे वाटत असे” ती चार वर्षाची असताना वडिल हिरवळ कापायला यंत्रावर बसले की ही सुद्धा त्याच्या बाॅनेटवर बसून”आणखी जोरात आणखी जोरात न्या बाबा” असे हसत हसत ओरडायची. तिने काय धाडसी खेळ केले नाहीत? मोठ्या उंच इमारतींवरून उड्या मारल्या आहेत. अनेक खेळात भाग ऱ्घेतला आहे.आॅलिंपिक-पोहण्याच्या टीममध्ये सामील होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. पण दुर्दैवाने हात मोडला. थांबवावे लागले. त्यानंतर एकापाठोपाठ गोवर,कांजण्या देवी ,इतकेच काय मेनेंजायटीसच्या दुखण्यांतून पार पडावे लागले! मग आॅलिंपिकचे खेळ हे आपले काम नाही समजून ते सोडले.

बहिऱ्या केटीला बोलणे ऐकायला (समजायला) कुणी शिकवले? केटीच्या यशामागेही एक स्त्रीच आहे! केटीची आई. तिच्या आईने तिला बोलताना होणाऱ्या ओठांच्या हालचाली वरून बोलणे ऐकायला शिकवले! ओठांकडे ‘पाहून’ कसे ऐकावे ते शिकवले. खाणाखुणांची भाषा केटी शिकली नाही. ह्या अनुभवावरूनच केटीच्या आईने केटीसारख्या मुलांसाठी बहिरे मुके बोलके ऐकते करण्याची शाळा काढली!

ज्या स्त्रियांनी सर्वोच्च हिमालयाच्या डोक्यावर पाय रोवून उभे राहण्याचा पराक्रम केला आहे त्याच परंपरेतील केटी ओ’नीलचेही पराक्रम आहेत!

तिला वेगाची भाीति अजिबात नव्हती. त्यामुळेच तिच्यासाठीही काही राॅकेटइंजिन शक्तिवर चालणारी वाहने तयार करणारा तिचा जवळचा मित्र केय मायकलसन म्हणतो,” मी तिला घाबरल्यासारखे वाटते का हे कधीच विचारत नव्हतो. काण ती गाडी चालवू लागली की माझीच घाबरगुंडी उडायची;इतक्या बेफाम वेगाने ती गाडी चालवायची!”

अशी ही “सप्तअश्व गतिमान” केटी शुक्रवारी ता.९ आॅक्टोबर२०१८ रोजी, परवाच वारली. केटी उणीपुरी ७२ वर्षांची होती. इतक्या गतिमान केटीला परमेश्वर ‘’सदगति’च देणार ह्यात शंका नाही!

चार दिवस गॅदरिंगचे – १

रेडवुड सिटी

आमच्या ऱ्शाळेने काही अतिशय चांगल्या गोष्टी आमच्या आठवणींसाठी दिल्या; त्यात गॅदरिंगमध्ये होणारी विद्यार्थ्यांनी कामे केलेली व वा.शि.आपटे , आमचे पद्माकर देव व गो.रा. कामतकर यासारख्या उत्तम दिग्दर्शकांनी बसवलेली आजी आणि माजी विद्यार्थी विद्यर्थ्यांनीवेगवेगळी बसवलेली त्या काळची उत्तमोत्तम नाटके, संगीतिका ह्यांची मेजवानी दिली. संशयकल्लोळ. आचार्य अत्र्यांची साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी उद्याचा संसार, कवडी चुंबक तर मो.ग. रांगणेकरांचे कुलवधु व त्यांच्या तुझं नि माझं जमेना ह्या सारख्या तीन एकांकिका तर झुंझारराव सारखे शेक्सपिअरचे जबरदस्त पण देवलांनीही त्याच ताकदीने केलेले हे रुपांतर तितकेच प्रभावीपणे बसवून सादर करणारे आमचे शिक्षक-दिग्दर्शक व विद्यार्थी -नटांची नाटके पाहणे हा अवर्णनीय आनंद होता.

त्याच बरोबर पं.जगन्नाथबुवा पंढरपुरकर, मा. कृष्णराव, पं.नारायणराव व्यास, पं विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारख्या नावाजलेल्या गवयांच्या मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभत होते. तेही फक्त चार आण्यांच्या वर्गणीत! भाग्य भाग्य म्हणजे ह्यापेक्षा काय निराळे असते?!

मी हरिभाईमध्ये जाण्या अगोदर काही वर्षे शाळेच्या गॅदरिंगची सांगता अतिशय उत्कृष्ट जेवणाने होत असे. जेवणातील बेत, काही पदार्थांची वर्णने दोन चार दिवस ऐकायला मिळत असत. पण मी त्या प्रख्यात शाळेत गेलो त्यामागे गॅदरिंग व त्यातले हे जेवण मुख्य कारणे होती. पण काय ! आमची बॅच शाळेत आली ती दुसरे महायुद्ध संपत येण्याच्या काळात. कुठले जेवण असणार. खराच हिरमुसला झालो. तरीही पहिली एक दोन वर्षे तरी शाळेने अल्पोपहार नावाचा भरगच्च असा फराळ दिला. मस्त असायचे सगळे पदार्थ.

दीड-पाउणे दोन हजार विद्यार्थी पन्नास पंचावन्न शिक्षक गडी-शिपाईअशी भरपूर लोकसंख्या असे.
हा कार्यक्रम आमच्या शाळेच्या भव्य मैदानावर होत असे.विद्यार्थ्यांच्या दोन रांगा पीटी ला बसल्यासारख्या समोरासमोर तोंडे करून त्यांच्याच पाठीला पाठ लावून समोरासमोर बसलेल्या दोन रांगा. अशा पद्धतीने किती रांगा! काही वर्ग आणि शिक्षक वर्तुळाकारात बसलेले. काही विद्यार्थिनी व शिक्षक वाढायला असत. मुली वाढायला साव्यात असे सर्वच रांगांना वाटत असे. पण आमच्यासारख्या भिकार c-grade सिनेमाच्या टुकार हिरोंच्या वाट्याला गणिताचे, सायन्सचे आणि भूगोलाचे ‘सेकंड रन’ सिनेमाचे मास्तर येत. त्यामुळे पदार्थ कठिण आणि अवघड जाऊ लागले. पण त्यावर आमचा उपाय काढला. आम्ही पलीकडच्या मुली वाढणाऱ्या रांगांकडे पाहात प्रत्येक पदार्थ मग तो कसाही,अगदी गोड असला, तरी गोड मानून खात असू. पण दडपून खात असू!

अल्पोपहाराचे हे दृश्य खरोखर प्रेक्षणीय असे. कर्व मैदानात नाही पण एक दोन बाजू पतंगीच्या रंगीत त्रिकोणी कागदांच्या फडफडणाऱ्या पताकांच्या माळा, ठसठशीत अक्षरातील शब्दांच्या ओळी प्रमाणे बसलेले विद्यार्थी, त्यात मधूनच एक दोन गोलाकारात बसलेली विद्यार्थी, शिक्षक आणि त्या ओळीतून होत असणाऱ्या लगबगीच्या हालचाली हा पाहण्यासारखा देखावा असे. कॅमेरे फोटो ह्या देवदुर्लभ वाटणाऱ्या गोष्टी. मग हवाई चित्रिकरण कुठले! पण कुणी तसे ते टिपले असते तर आजही गुगलला किंवा गेट्टीला आपल्या मुकुटातले मानाचे शिरपेच वाटावे असे ते फोटो असते!

पण कितीही असले तरी सुखाचे दिवस थोडेच तसा हा अल्पोपहाराचा कार्यक्रमही दोन वर्षेच टिकला. गॅदरिंगचा अल्पोपहार बंद झाल्यावर ते भव्य मैदान आणखीच मोठे वाटू लागले!

उपोदघात

आपल्या रोजच्या व्यवहारात, अगदी घरातल्या घरातही काही वेळेस अशा घटना घडतात, असे प्रसंग येतात की आपल्याला नवल वाटते. “अरेच्या! मी आताच तुम्हाला फोन करणार इतक्यात तुमचा आला!” ” या या , आम्ही तुमचीच आठवण काढत होतो बघा. हो ना गं? आणि तुम्ही आलात व्वा !” असे किरकोळ परचित्त ज्ञानाचे प्रसंग तर सगळ्यांच्या रोजच्या अनुभवाचे आहेत.

बरेच वेळा माणसाला, कसलीही कल्पना नसताना असे अनुभव येतात की त्यावर विचार करुनही त्याचा उलगडा होत नाही . त्याला आपण योगायोग म्हणून पुढे जातो. पण अशा घटना कधी इतक्या अदभुत आश्चर्यकारक, विश्वास न बसाव्या अशा असतात. त्याला कोणी चमत्कारही म्ह्णतात . पण सध्याच्या काळात ‘चमत्कार’, दैव, ‘भवितव्य घडविणारा’ ‘प्राक्तन’ अशा शब्दांना मागणी नाही. कर्तृत्वान, कर्तबगार माणसांना त्या शब्दांचा आधार घ्यावा लागत नव्हता आणि नाही हेही खरे वाटते.

बहुतेक प्रसंगी ‘योगायोग हा शब्द मात्र बरेच वेळा ऐकायला येतो. कारण त्यातही काही गोष्टी एकाच वेळी अवचितपणे घडून येतात. पण काही विस्मयकारक गोष्टी जेव्हा आकस्मिक, अचानक घडतात तेव्हा माणूस अवाक होतो.
त्यावेही हा केवळ योगायोग म्हणायचा की चमत्कार म्हणायचा? ज्याचे त्याने हे ठरवावयाचे. अशा घटना परमेश्वरच, नामानिराळा राहून घडवून आणतो असे मानणारेही बरेच आहेत. लेखिका डोरिस लेझिंगचेही हेच म्हणणे आहे.

कार्ल युंग हा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होउन गेला. फ्राईड आणि कार्ल युंग दोघे समकालीन. त्याच्याकडे बरीच वर्षे अनेकजण त्यांना आलेले अविश्वसनीय, योगायोग, विस्मयजनक ह्या सदरात मोडणारे अनुभव सांगत. त्यांच्यासाठी त्याने आपली बरीच वर्षे दिली. त्या अनुभवांचा शास्त्रीय अभ्यास केला, आणि अशा अनुभवांचे नामाभिधान त्याने सिंक्रोनिसिटी या शब्दात केले. याचा अर्थ “मीनिंगफुल कोइन्सिडन्सेस ऑफ टू ऑर मोअर इव्हेंट्स व्हेअर समथिंग आदर दॅन द प्रॉबेबॅलिटी ऑफ चान्स इज इन्व्हॉवल्ड्”

आपण योगायोग, नशीब,आणि इंग्रजीतील लक, चान्स्, कोइंसिडन्सेस अशा शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल अशा घटना, अनुभव वाचणार आहोत. ह्या घटनांना काय म्हणायचे ते आपण स्वत:च ठरवायचे आहे. हे अनुभव बऱ्याच ज्यू लोकांचे आहेत. तसेच इतरही काही विक्रेते, गृहिणी,सामान्याजनांचे, लेखक, कादंबरीचेही आहेत.

पण त्या अगोदर एका डॉक्टराचा अनुभव वाचू या आणि यथाक्रमे पुढचे नंतर वाचू:

डॉक्टर बर्नाइ साइगेल, एक बालरोगतज्ञ आणि शस्त्रक्रिया तज्ञ सांगतात,”माझ्या आयुष्यात एक घटना नेहमी कायमची होत असते. मी कुठेही गेलो तरी मला एक पेनी सापडतेच! रस्त्यावर्, दुकानात, उपहारगृहात इतकेच काय एखाद्या हॉटेलात नुकत्याच स्वcच केलेल्या खोलीत गेलो तरी तिथेही मला पेनी सापडणारच. मला ती केव्हाही हुडकावी लागत नाही; मी आणि पेनी इतके अविभाज्य घटक आहोत.

आमच्या मिरॅकलला मांजराला खेळगडी असावा असे आम्हाला वाटत होते. आमच्या शेजाऱ्याच्या मांजरीला काही पिल्ले झाली. त्यांच्याकडून आम्ही एक पिल्लू आणले. पण त्याचे आणि आमच्या मांजराचे काही पटले नाही. काही दिवसांनी आम्ही त्यांना ते परत करायला गेलो. दुसरे आहे का म्हणून विचारले. ते म्हणाले एकच आहे. बघितले. फारसे काही गोजिरे वगैरे नव्हते. पण कोणीतरी खेळायला मिळाले आमच्या मिरॅकलला हे समाधान होते. पिल्लू घेऊन जाताना त्यांनी त्याचे काही नाव ठेवले आहे का असे विचारले असता, ते म्हणाले,” हो, त्याचे नाव आम्ही ‘पेनी’ ठेवलेय!”

Titan

जगात अनेक लेखकांच्या असंख्य कादंबऱ्या आहेत. अनेक भाषांतील किती कादंबऱ्या लिहिल्या असतील त्याची गणती नाही.पण इतक्या अगणित, नामवंत गाजलेल्या शतकानुशतके वाचल्या जाणाऱ्या आणि प्रसिद्ध कादंबऱ्या असतील. पण मॉर्गन रॉबर्टसनच्या १८३८ साली लिहिलेल्या कादंबरीचे एव्हढे काय महत्व असावे की ती फिलाडेल्फियाच्या सागरी जीवना संबंधी असलेल्या वस्तुसंग्रहात एका मोठ्या काचेच्या कपाटात ती जतन करून ठेवलेली असावी?

पिवळ्या पडलेल्या, बरीच पाने विस्कळीत, विरळ झालेली. काही पानांचे तुकडे पडलेले अशा जीर्ण अवस्थेतील ते पुस्तक आजही तुम्हाला तिथे दिसेल.

कादंबरी एका जहाजाच्या दुर्दैवी प्रवासाची आहे. ती अवाढव्य बोट बुडणे अशक्य आहे असा कंपनीचा दावा होता. तसे छातीठोकपणे जाहीरही केले होते. वेगही भरपूर होता.बोटीवर विविध सुखसोयींची रेलचेल होती.कादंबरीतील ही बोट १८३२च्या एप्रिलमध्ये पहिल्याच प्रवासाला निघाली. प्रवाशांमध्ये अमेरिका आणि इंग्लंड
मधील धनाढ्य लोक होते. ॲटलॅन्टिक महासागराच्या उत्तरेकडील भागातून ही पहिली सफर सुरू झाली; आणि एका हिमनगाला धडकून ती बुडाली. बोटीवर जीवरक्षक नावाही पुरेशा नव्हत्या. हजारो प्रवासी समुद्रात बुडाले. इतका प्रचंड गाजावाजा होउन निघालेली ‘कधीही न बुडणारी’बोट पहिल्याच प्रवासात बुडाली!

१८३८ साली लिहिलेल्या मॉर्गन रॉबर्टसनच्या कादंबरीचा हा थोडक्यात गोषवारा.

हीच गोष्ट,अशीच घटना कुठेतरी ऐकल्याचे आठवते ना? अगदी अशाच घटनेवर आधारलेला, पण सत्य घटनेवर प्रवासात बुडाली!आधारलेला, गाजलेला सिनेमा ‘टायटॅनिक’ आपण पाहिलेला आहे. तशीच घटना १८३२ साली प्रसिद्ध झालेल्या रॉबर्टसनच्या कादंबरीत आहे.

योगायोग म्ह्णावेत तरी ते किती असावेत! विश्वास बसणार नाही. नावात काय आहे म्हणणाऱ्यांनीही थक्क व्हावे अशी योगायोगांच्या गोष्टींची सुरवात नावापासूनच होते.

एप्रिल १८३८ साली लिहिलेल्या’रेक ऑफ टायटन’ कादंबरीतील कल्पित बोटीचे नाव ‘टायटन’ आणि १९१२ साली प्रवासाला निघालेल्या प्रत्यक्षातील बोटीचे नाव ‘टायटॅनिक’! कल्पित काद्ंबरीतील काल्पनिक ‘टायटनवर’ २२०० प्रवासी होते तर ‘टायटॅनिक’वर ३००० प्रवासी होते. वास्तवातील ‘टायटन’ आणि ‘टायटॅनिक दोन्ही बोटी ‘बुडणे शक्य नाही’ अशा कोटीतील बांधणीच्या. १९१२ साली तयार झालेल्या बोटीचीही अशीच ख्याती होती. कारण दोन्ही बोटीतील वेगवेगळे भाग पक्के पाणबंद होते.आत पाणी शिरू न शकणारे असेच होते.’टायटन’ची लांबी ८०० फूट तर ‘टायटॅनिक’ची साधारणत: ८८२.५ फूट होती.

कादंबरीतील ‘टायटन’ जेव्हा हिमनगाला धडकली तेव्हा लेखकाने तिचा वेग सागरी २५ सागरी मैल ठेवला होता.प्रत्यक्षातील ‘टायटॅनिक’जेव्हा हिमनगावर आदळली तेव्हा तिचा वेग २३ मैल होता. आपल्या कादंबरीत मॉर्गनने कल्पनेने तीन प्रॉपेलर्स बसवले अणि १९१२ साली इंजिनिअर्सनीही तीनच प्रॉपेलर्स बसवले. कादंबरीतल्या आणि खऱ्याखुऱ्या अशा दोन्ही बोटींवर बरेच प्रवासी श्रीमंत होते. पण शाही सुखसोयी केलेल्या ‘टायटन’वरील २२०७ प्रवाशांसाठी लेखक पुरेशा जीवरक्षक नावा ठेवायचे विसरला.त्याने केवळ २४ नावाच ठेवल्या.तर ७५ वर्षांनी गोदी कारखान्यात तयार झालेल्ल्या ‘टायटॅनिक’वरही इंजिनीअर्सनी ३००० प्रवाशांसाठी फक्त २० जीव रक्षक नावांचीच तरतूद केली!

अबब! योगायोगांची इतकी मोठी मालिका असू शकते? का ह्याला दुर्दैवी योगायोगांच्या एका पाठोपाठ येणाऱ्या लाटा म्हणाव्यात, समजत नाही. अशा घटनेला, तपशीलासह हुबेहुब तशाच असणाऱ्या,तसाच शेवट होणाऱ्या गोष्टीला चमत्कार म्ह्णण्याचा मोह झाला तर काय चुकले?

सुगीहारा

१९३९ सालची ही गोष्ट आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले होते . युरोपच्या इतिहासातील हा काळ म्हणजे एक काळेकुट्ट प्रकरण आहे.

ह्या काळात जपानच्या सरकारने केवळ ज्यू लोकांनाच नव्हे तर इतर कोणालाही सरकारच्या परवानगीशिवाय आपल्या कोणत्याही वकिलातीने व्हिसा देऊ नये असा हुकूम काढला होता.पण…

लिथ्वानिया येथील जपानी वकिलातीतील चिउने सुगीहारा एक अधिकारी. हा मात्र येईल त्या ज्यूला व्हिसा देत होता.नाझींच्या गॅस चेंबर,छळ छावण्या ह्यापासून कित्येक ज्यू लोकांना ह्या कनवाळू जपानी अधिकाऱ्याने वाचविले. दुसरे महायुद्ध संपल्यावर काही वर्षे माणुसकी जपणाऱ्या सुगीहाराचे नावही कुणासमोर आले नव्हते. मग त्याने केलेल्या कार्याची माहिती तरी कोणाला होणार? पण काळ स्थिरावल्यावर सुगीहाराने ज्यांचे प्राण वाचवले होते ते लोक आपण कसे वाचलो आणि कुणामुळे वाचलो हे वर्तमानपत्रे, रेडिओ अशा माध्यमातून सांगू लागले तेव्हा चिउने सुगीहाराचे नाव थोड्याच काळात सर्वतोमुखी झाले. अनेक पुस्तकांतून सुगीहाराचा उल्लेख ‘जपानी शिंडलर असा होवू लागला.

इझ्रायलच्या सरकारने, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांना आश्रय देऊन, इतर मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या सुगीहारासारख्या तारणहारांचे ऋण फेडण्याचे ठरवले. त्यापैकी अनेकांना, त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा गौरव म्हणून आयुष्यभर निवृत्ती मानधन दिले आहे. आणखी एका प्रतिकरूपाने इझ्रायलने कृतज्ञता व्यक्त केली. त्या तारणहारांच्या नावाने वृक्षारोपण केले आहे.

सुगीहाराच्या नावानेही वृक्षारोपण करण्याचे ठरवले. प्रथम त्याच्या नावे चेरीची झाडे लावण्याचे सरकारच्या मनात होते. पण चेरीपेक्षाही दीर्घायुषी वृक्षांची राई लावून करण्याचे योजले. त्यामुळे सुगीहाराचा योग्य प्रकारे सन्मान होईल ही त्यामागची भावना होती.सुगंधी देवदार==सेडर्= वृक्षाशिवाय दुसरे कोणते डोळ्यांसमोर येणार? शिवाय सेडर वृक्षाचे महत्व ज्यू धर्मात मोठे आहे. त्यांचे जे अगदी पहिले सिनेगॉग आहे तेथेही सेडर वृक्षच लावले होते. म्हणून सुगीहाराचा गौरव देवदार वृक्षांच्या मोठ्या राईने करण्याचे ठरले आणि तशी ती झाडीही लावली. ह्यापेक्षा दुसरा कोणता मोठा सन्मान असेल?

योगायोग पहा, ही सेडर वृक्षांची राई लावून झाल्यावर इझ्रायली अधिकाऱ्यांना समजले की जपानी भाषेत ‘सुगीहारा’म्हणजे सेडर वृक्षांची राई असाच होतो!

सुगीहारा’सेडर वृक्षांचे’ उपवन!

अब्राहम लिफर

अब्राहम लिफर इझ्रायल मधील असोदचा लोकप्रिय रब्बाय होता तो मोठा ज्ञानी होता. तो हयात असतानाची ही हकीकत आहे.

लिफरच्या सिनेगॉगमधील भक्तमंडळींपैकी एकाच्या मुलाचे लग्न बेल्जिअमच्या अँटवर्प येथील मुलीशी ठरले. इझ्रायलहून लिफर अँटवर्पला निघाले. ते स्वत: धरून एकूण नऊ पुरुष होत.

अँटवर्पपासून विमान तीनशे मैलांवर आले असता वैमानिकाने घोषणा केली की विमानातील इंधन संपत आले आहे. विमान तातडीने उतरावे लागत आहे. लहानशा विमानतळावर विमान उतरले. लफीरने कुठे एखाद्या निवांत जागी प्रार्थना करावयाचे ठरविले. विमानतळावर फक्त एकच कर्मचारी होता. त्याला,”आम्हाला प्रार्थना करायची आहे, एखादी खोली असेल तर उघडून देता का? “रबाय अब्राहमने विचारले.

रब्बय लिफरने साध्या इंग्रजीत चौकशी केली होती. पण समोरच्या माणूसाचा चेहरा विजेचा धक्का बसावा तसा झाला.स्वत:ला सावरत तो म्हणाला,” मी खोली देईन पण मला माझ्या वडिलांचे श्राद्ध करायचे आहे त्याचे ‘कड्डिश’ (मंत्र, प्रार्थना) म्हणू द्याल का”? “तू ज्यू आहेस का”? रबायही आश्चर्याने विचारत होते. मानेनेच हो म्हणत तो माणूस पुढे म्हणाला,”बेल्जियमच्या ह्या भागात कोणी ज्यू रहात असतील हे मला तरी ठाऊक नव्हते. रब्बाय इथे तुम्ही काय करताय”? तो माणूस आणखी पुढे विचारू लागला,”आणि तेही नेमके माझ्या वडिलांच्या श्राद्धाच्या तिथीलाच इथे कसे”?खोलीचे दार उघडून देता देता त्याने विचारले. तो कर्मचारी बोलतच राहिला,”तुमचा विश्वास बसणार नाही, तरी पण सांगतोच.मी सांगणार आहे ते शंभर टक्के खरे आहे.”

“माझे घरातल्या कुणाशीही पटत नव्हते. मी घर सोडून ह्या खेड्यात पळून आलो. आमच्या घरातील वातावरण , इतर सर्वजण अति धार्मिक सनातनी होते. मी धार्मिक वृत्तीचा नाही.. माझ्या गेलेलेल्या वडलांचे,बरीच वर्षे झाली. साधी (श्राद्धाची प्रार्थना,मंत्र) कड्डीशही कधी म्हणालो नाही.” “काल रात्री स्वप्नात माझे वडील आले. ते म्हणाले, “यांकेल, अरे उद्या माझ्या श्राद्धाची तिथी आहे. तू माझ्यासाठी कड्डीश म्हणावे अशी माझी इच्छा आहे.” “पण बाबा, कड्डीश म्हणायची तर ‘मिनयान’ (द्हा जण, गणस्ंख्या) पाहिजेत ते कुठून मिळणार? बाबा ह्या खेड्यात मी एकुलता एक ज्यू आहे.” “यांकेल, तू कड्डीश म्हणेन असे कबूल कर. मिनयानची व्यवस्था मी करतो”

“मी जागा झालो. स्व्प्न आठवले की मी थरथरायचो. पण नंतर विचार केला की हे सगळे अखेर स्वप्नच होते. नाहीतर इतक्या कोपऱ्यातल्या खेड्यात नऊ ज्यू कुठले येताहेत! आणि ते सुद्धा इथे आणि आजूबाजूला कोणी ज्यू रहात
नसताना ? स्वप्नावर कोणी विश्वास ठेवतो का? असा विचार करत मी कामावर आलो. “आणि तुम्ही, खुद्द रब्बाय आलात. तेही बरोबर ‘मिनयान’ घेऊनच”! तो एकच एक एकटा ज्यू कर्मचारी अवाक होउन रब्बायला भडभडा सांगत होता.

रब्बाय अब्राहम लिफर त्या माणसाला मायेने जवळ घेत शान्तपणे म्हणाले, “यांकल्, चल आपण सगळे कड्डीश म्ह्णूया.”

डेव्हिड ब्रॉडी

डेव्हिड ब्रॉडी महिन्यातून एकदा तरी मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला आपल्या मोटारीतून जात असे . विमानाने जाणे त्याला परवडणारे नव्हते असे नाही. त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. विमान प्रवास त्याला सहज शक्य होता. पण त्याच्या एका मित्राचा विमान अपघातात मृत्यु झाल्यापासून तो विमान प्रवास टाळत होता.

गेली दहा वर्षे तो मॉन्ट्रियलपासून न्यूयॉर्कला आपल्या मोटारीनेच जात होता. त्यामुळे तो रस्ता त्याच्या ‘चाकाखाल’चा झाला होता. प्रवासाला निघण्यापूर्वी तो चार तास झोप काढत असे; त्यामुळे सात तासांचा प्रवास तो वाटेत कुठेही न थांबता, थेट करत असे.

१९९६च्या मे महिन्यात डेव्हिड ब्रॉडी रात्री मॉन्ट्रियलमधून निघाला. एक तास झाला नाही तोच डेव्हिडला कसे तरीच वाटू लागले. एकदम थकवा आला. अंग दुखायला लागले आणि त्याचे डोळे मिटायला लागले. आतापर्यंत एकदाही असे झाले नाही आणि आजच एकदम असे का व्हावे असे त्याला वाटू लागले. बरं, निघण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे चार पाच तास चांगली ताणूनही दिली होती. तरी असे का व्हावे? डेव्हिड विचार करू लागला. वाऱ्याने बरे वाटेल म्हणून त्याने खिडकीच्या काचा खाली घेतल्या. थरमॉस मधून गरम कॉफी प्याला. कशाचाही उपयोग झाला नाही. डोळ्यांवर झोप येतच होती.
हे काही ठीक नाही असे म्हणत त्याने बाहेर पडण्याच्या पहिल्याच वळणाने गाडी काढून एका पेट्रोल पंपाकडे नेली. पंपावरच्या माणसाला, त्याने “जवळपास एखादे हॉटेल, मोटेल आहे का?” विचारले. “हो आहेत की; माझ्याकडे फोन नंबरही आहेत. थांबा देतो” म्हणत ते त्याने दिले. एकाही ठिकाणी जागा नव्हती. सगळी भरलेली.

“आश्चर्य आहे,” पंपावरचा माणूस म्हणाला, “अजून प्रवाशांची वर्दळ सुरुही झाली नाही तरीही सगळी भरलेली!”
पंपवाल्या माणसाने पन्नास साठ मैलावर असलेल्या हॉटेलकडेही चौकशी केली. तिथेही नन्नाचाच पाढा. “हे पहा, मला खूप झोप येतेय. थकवाही आलाय. जवळ कुठे शाळा,कॉलेजचे वसतीगृह खोल्यांची सोय असललेले काही आहे का?” डेव्हिड ब्रॉडी अगतिकपणे विचारत होता. “नाही. इथे तसे काही नाही.”पंपवाला माणूस म्हणाला. “बरं वृद्धाश्रमासारखे काही आहे का?कशीबशी एक रात्र कढायची आहे. बघ बाबा.”डेव्हिड विनवणीच्या सुरात म्हणाला.

अरे हो! रस्ता ओलांडून पुढे गेलात की वृद्धाश्रमासारखी एक लहानशी जागा आहे. पॅट्रिक राइली मालक आहे. चांगला माणूस आहे. करेल तुमची काहीतरी सोय.” पंपवाला गप्पिष्ट होता. माणूस कसाही का असेना मला काय, झोपायला खाट मिळाली की झाले. असे पुटपुटत डेव्हिड त्याचे आभार मानत, मोटार हळू हळू चालवत, डोळ्यांवर झापड येत होतीच तरी निघाला. वृद्धाश्रमात आला. एका खोलीत डेव्हिडची झोपायची सोय झाली.

सकाळ झाली. रात्री झोप चांगली लागली होती. थकवाही गेला होता. डेव्हिड ताजातवाना झाला. त्याने पॅट्रिक राईलचे मनापासून आभार मानले. तो जायला निघाला. थोडे पुढे गेला असेल तर लगेच माघारी आला. राईलला म्ह्णाला,”तुम्ही माझी काल रात्री मोठी सोय केली. वृद्धाश्रमातल्या कुणासाठी माझ्या हातून थोडे काही झाले तर मला बरे वाटेल. माझा व्यापारधंदा असला तरी मी ज्यू रबायही आहे. इथे कुणी ज्यू राह्तात का?”

नवल वाटून पॅट्रिक म्हणाला,’काय सांगायच्ं! इथे एक ज्यू म्हातारा रहात होता. तुम्ही काल रात्री आलात साधारणत: त्याच वेळेस तो वारला बघा.” “मग त्याच्या अंत्यसंस्काराची काही व्यवस्था केली असेलच तुम्ही,”डेव्हिडने विचारले. “सॅम्युअल विंस्टाईन शंभरीचा होता.त्याचे सर्व नातेवाईक त्याच्या आधी वारले. त्याचा कोणीही वारस आता नाही. त्याच्याजवळ किंवा त्याच्या नावे एक फुटकी कवडीही नाही. इथे जवळपास ज्यू लोकांची दफनभूमीही नाही. आणि असेल तर ती शंभर मैल दूर असलेल्या अल्बानी येथे असावी. म्हणून आम्ही ठरवलेय की इथल्या आमच्या ख्रिस्ती दफनभूमीतच त्याचे दफन करावे. निराधार गरीबांसाठी आम्ही जागाही राखून ठेवल्या आहेत.”पॅट्रिक सगळे सविस्तर सांगत होता.
“तुमचा हा खरंच चांगुलपणा आहे. पण निराधार असो, तो ज्यू होता. त्याला आपल्या दफनभूमीतच अखेरचा विसावा घ्यावा असे वाटत असणार .मी आज माझी स्टेशन वॅगन घेऊन आलोय. नाहीतर नेहमी मी माझ्या लहान गाडीतून जात असतो. माझ्या गाडीत शवपेटी सहज मावेल. तुमची हरकत नसेल तर त्याचा देह मी अल्बानीला घेऊन जाईन. बघा.”

कागदपत्रे तयार झाल्यावर डेव्हिड शवपेटीसह बृकलीनच्या ज्यू लोकांच्या दफनविधी करणाऱ्या संस्थेत आला. पण,”अहो, काय करणार आम्ही? त्याचा दफनविधी धर्मादाय केला असता आम्ही. पण आमच्या भूमीत जागाच नाही. तुम्ही क्वीन्सला जाऊन पाहता का?” असे त्याला ऐकायला मिळाले. पण क्वीन्समध्येही अशाच अर्थाचे सांगण्यात आले. “अशी वेळ कुणा ज्यूवर येईल हे आमच्या ध्यानीही आले नाही. त्यामुळे तशी राखीव जागाही नाही. पण मी ऐकलंय की मॅनहॅटनच्या वॉशिंग्टन हाईटस येथे सोय आहे. तुम्ही तिथे प्रयत्न करा.”

डेव्हिड ब्रॉडी सॅम्युअल विंस्टाईनच्या शवपेटीसह वॉशिंग्टन हाईट्स येथे आला. फर्निच्यरवर,खिडक्यांवर धूळ साचलेल्या त्या ऑफिसमधल्या एका जरव्ख म्हाताऱ्या डायरेक्टरने,”हो, आमच्याकडे धर्मादाय निधी आहे. त्यातूनच आम्ही गरीबांचे अंत्यविधी करतो.” तो म्हातारा डेव्हिडला सांगू लागला,”पनास वर्षांपूर्वी एका उदार धनिक ज्यू गृहस्थाने निष्कांचन, निराधार निराश्रित ज्यू माणसावर अशी पाळी आली तर भली मोठी देणगी दिली. त्यातूनच आम्ही अनेक जागा अशा लोकांसाठी राखून ठेवल्या आहेत. तुम्ही आणलेल्या म्हाताऱ्यासाठी आम्ही सर्व ते करू ते त्या दनशूर माणसाच्या देणगीमुळेच.काही काळजी करू नका.” म्हातारा बोलायचे थांबवत नव्हता. डेव्हिड नुसते हं हं करत होता.किंचित थांबून म्हातारा म्ह्णाला “कागदोपत्री नोंदी करायच्या की झाले..” तो स्वत:लाच सांगत असल्यासारखे बोलत होता.

जरव्ख म्हातारा जाडजूड रजिस्टर काढून लिहू लागला.”मृत व्यक्तीचे नाव सांगा.” “सॅम्युअल विंस्टाईन ,”डेव्हिडने सांगितले.
“हं सॅम्यु…विंस्टा……कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय.” नाव लिहिता लिहिता म्हातारा स्वत:शीच पुटपुटला.नंतर दुसऱ्या कुणाला तरी हाक मारत डेव्हिडला म्हणाला,”रीतिनियमांप्रमाणे मला एकदा शव पाहिले पाहिजे.” इतके म्हणत तो डायरेक्टर पद सांभाळणारा म्हातारा डेव्हिडच्या स्टेशनवॅगनकडे गेला.

इतका वेळ न थांबता बोलणारा तो म्हातारा गृह्स्थ थोड्या वेळाने ऑफिसमध्ये आला, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहात होत्या. गळा दाटून आलेल्या आवाजात म्हणाला,” मित्रा डेव्हिड, सॅम्युअल विंस्टाईनला आम्ही आमच्या दफनभूमीत विश्रांतीसाठी केवळ जागा देणार नाही तर मोठी सन्मानाची जागा देणार आहोत. सर्व मान मराताबासह त्याचा अंत्यसंस्कार मोठ्या गौरवाने करणार, रबाय डेव्हिड, तुम्ही ज्याला बरोबर आणलेत तो सॅम्युअल विंस्टाईन म्हणजेच आमचा तो उदार धनिक देणगीदार सॲम्युअल विंस्टाईनच आहे. पूर्वी त्याने स्वत:साठी खरेदी केलेल्या जागेतच त्याचे अंत्यसंस्कार होतील. मित्रा तू फार त्रास सोसून सॅम्युअलला इथे आणलेस.पण तुझ्या धडपडीचे सार्थक झाले. त्यामुळेच सॅम्युअल विंस्टाईन त्याच्या निजधामी, स्वगृही आला.” म्हातारा डोळे पुसत मधूनच थांबत बोलत होता.